Friday 4 January 2019

मनकर्णाबाईंना मिळालं हक्काचं घर


परभणी तालुक्यातील ठोळा गावातील ही गोष्ट. मनकर्णाबाई माधवराव लोढे या शेतमजूर बाईच्या पतीचं 2013 साली निधन झालं. दोन मुली, एक मुलगा यांचं पालनपोषण करण्याची जबाबदारी एकट्या मनकर्णाबाईंवर आली. घर कसंबसं चालू लागलं. पण... नववीत शिकणाऱ्या मुलाला कावीळ झाली. आणि दवाखान्यात न्यायलाही हाती पैसे नसल्यानं उपचाराअभावी मुलाचा मृत्यू झाला. त्यातच, 


मुलगीही लग्नाला आलेली. यावेळी मात्र गावकरी पुढे आले. त्यांनी लग्न लावून दिलं. 
धाकटी मुलगी सहावीत. आता तिच्या सोबत मनकर्णाबाई तुटक्या फुटक्या, पत्र्याच्या दहा बाय दहाच्या मातीच्या घरात राहत होत्या. घरात सामानसुमान काय? एक पिठाची थैली, दहा-बारा प्लास्टिकच्या बरण्या आणि एक मातीची चूल. घरात वीजही नाही. सगळं घर आणि आयुष्यही अंधःकारमय. नृसिंह पोखर्णी येथील शिक्षक राजू वाघ, कुलदीप उंडाळकर, बालाजी वाघ, बाबा शेख, शिक्षक लक्ष्मीकांत जोगेवार, कल्याण देशमुख, गोविंद एलकेवाड, सौरभ वडसकर, प्रकाश एडके यांनी हे सगळं बघितलं. संकल्प फाऊंडेशनद्वारे मनकर्णाबाईंना घर बांधून द्यायचा त्यांनी निर्धार केला.
राज्य सरकारच्या घरकुल योजनेतून हक्काचा निवारा मिळेल, अशी त्यांना आशा होती, मात्र अद्याप त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक यांच्यासह गावातील लोकांनी त्यांना सहकार्य करायचं ठरवलं. बांधकामास सुरूवात होताच गावातील अनेकांनी आर्थिक मदतीसाठी हातभार लावला.
राजू वाघ यांनी अनेक दानशुरांची भेट घेत सोशल मिडियावरूनही मदतीचं आवाहन केलं. त्यानुसार मोठ्या प्रमाणात मदत मिळाली. सर्वांच्या योगदानातून अखेर मनकर्णाबाई यांना निवारा मिळाला. या कामात सहकार्य करणार्‍या सर्व तरुणांचा विविध मान्यवरांच्या हस्ते मनकर्णाबाई यांच्या उपस्थितीतच सत्कार करण्यात आला.


- बाळासाहेब काळे.

No comments:

Post a Comment