Tuesday 23 July 2019

पॉकेटमनीतून दुष्काळग्रस्तांना मदत

मुंबईच्या सौरभ मंगरूळे या तरूणाची ही गोष्ट. सौरभने मुंबईतच अभियांत्रिकीची पदवी घेतली. तो मुंबईतच लहानाचा मोठा झाला. शिकत असताना रोजचं पेपर वाचन कामी आलं आणि मराठवाड्यातील दुष्काळाविषयी त्याला कळलं. तेव्हापासून त्याने घरून मिळणारा पॉकेटमनी वाचवायला सुरूवात केली. आणि सामाजिक संस्था, गरजूंना मदत देणं सुरू केलं. आता या गोष्टीलाही चार वर्ष झाली.
सौरभ सांगतो, “२०१३ मध्ये मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती गंभीर होती. पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत होते. मुंबईत राहून या दुष्काळाची तीव्रता लक्षात येणं शक्य नव्हतं. मात्र, वर्तमानपत्रांमधून दुष्काळाची भीषणता कळली. अनेक विद्यार्थ्यांचं फीअभावी शिक्षण थांबलं होतं, छोट्या मुलींपासून वृद्ध महिलांपर्यंत अनेकांना डोक्यावर हंडे घेऊन पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली होती. अनेकांच्या मुलीची लग्नं दुष्काळाने पुढं ढकलावी लागली होती. नापीकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्यांकडे वळत होते. ही स्थिती केवळ वाचूनही अंगावर काटा येत होता. त्यामुळे आपण शक्य तितकी मदत या परिसरातील किमान एखाद्या गरजू व्यक्तीला, एखाद्या संस्थेला, सामाजिक प्रकल्पाला करायला हवी असं वाटलं. अभियांत्रिकीचं शिक्षण घेत असताना मला घरून पॉकेटमनी मिळायचा. त्यातूनच मी वर्षभर बचत सुरू केली. रक्कम तशी छोटीच होती. मात्र, जेव्हा ही कल्पना मी कुटुंबिय आणि मित्रांना सांगितली तेव्हा त्यांनीही प्रोत्साहन देत आपला वाटा यात उचलला आणि मदतीच्या रकमेत भर पडली.”
आतापर्यंत सौरभ आणि त्याच्या मित्रांनी औरंगाबाद व लातूर जिल्ह्यातील अंजनडोह, गंगापूर, भारतीय समाज केंद्र इथं मदत केली आहे. यावर्षी त्यांना शिरूर तालुक्यातील आर्वी येथील शांतिवन संस्थेविषयी माहिती मिळाली. या संस्थेत ऊसतोड कामगार, आत्महत्याग्रस्त शेतकरी, अनाथ, वंचित घटकातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी दीपक व कावेरी नागरगोजे हे जोडपं काम करत असल्याची माहिती मिळाली. या संस्थेला व तमाशा कलावंतांच्या मुलांसाठी काम करणाऱ्या सुरेश व मयुरी राजहंस या दांपत्याच्या सेवाश्रम या प्रकल्पाला मदत केली. यासाठी सौरभला वडील सुनील मंगरुळे, मित्र प्रमोद मुंडे, धनंजय उपासनी, विशाल सासे, वैशाली ओठावनेकर, विभावरी शेटकर, समिक्षा महाले यांनीही आपल्या पॉकेटमनीतून साथ दिली.
#नवीउमेद 

- अमोल मुळे, बीड

सातपुड्यातला निसर्ग वाचणारा रामसिंग

नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुड्याच्या रांगांमधल्या कोवली गावचे रामसिंग दुधल्या वळवी. त्यांनी सातपुड्याच्या डोंगररांगांमधल्या निसर्गाचं वाचन आणि अभ्यास करून त्याला नकाशाबद्ध केलं आहे. २२० प्रकारच्या वस्तू , धान्य आणि वनस्पतींचं संग्रहालय त्यांच्याकडे आहे. 
वनउपज संरक्षित करून त्याचं उत्पादन वाढवणं आणि त्यावर प्रक्रिया करून जागतिक बाजारपेठेत तिला ओळख मिळवून देण्याचं काम रामसिंग निष्ठेने करत आहेत.
आपल्याकडचं बीज, धान्य, फळंफुलं , वन्यजीव यांचं संवर्धन झालं पाहिजे, त्याचबरोबर आदिवासी आत्मनिर्भर झाला पाहिजे, हा रामसिंग यांचा विचार. 1998 पासून नर्मदाकाठच्या कंजाला, सांबर, वेलखेडी, पलसखोबरा, डेबरामाळ, मांडवा परिसरात जैवविविधता संर्वधनाचं काम त्यांनी सुरू केलं. सुरुवातीला अडचणी आल्याच. पण नंदूरबारचं कृषी विज्ञान केंद्र आणि शासनाच्या विविध योजना यांची मदत घेत त्यांनी ३६ हजार झाडांचं सर्वेक्षण केलं. झाड, झुडपं, फुलझाडं , वेली, फळझाडं , कंदमुळं यांची वर्गवारी केली. नद्यांमधल्या माशांची सूची केली. 
सर्वेक्षणात ६२ प्रकारची झाडं, खाण्यायोग्य २८ प्रकारची फळं १३ प्रकारची कंदमुळं आढळली. ३५ प्रकारचे पक्षी तर १५ प्रकारचे प्राणी आढळले.
स्थानिक ज्ञानसंपदा एकत्रित आणि नोंदणीकृत असावी यासाठी रामसिंग यांनी २००९ पासून युद्धपातळीवर काम सुरू केलं. स्थानिक वाण, बी - बीजवाई, धान्य उत्पादनं यांची माहिती संकलित केली. ५५ पेक्षा अधिक भाज्यांचा अभ्यास केला. आदिवासींनी पुरातन काळापासून ५२ बियाणांचे जतन केलं आहे. लोकसहभागासाठी परिसरात हंगामानुसार होणाऱ्या तीन आदिवासी प्रदर्शनांचा आधार घेतला. वनउपज आणि आदिवासींनी उत्पादित केलेल्या उत्पादनावर प्रक्रियाउद्योग रामसिंग यांनी उभारला आहे.
आता या कामाचा आवाका ९ गावांवरून २५ गावांपर्यंत विस्तारत आहे. रामसिंग यांनी २१ बचतगट तयार करून १७५महिलांचं सक्षमीकरण केलं. कृषिमंडळं तयार करून ७०० आदिवासी शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण आणि समृद्ध करण्याची जबाबदारी त्यांनी पेलली आहे. 
- कावेरी परदेशी

एका पायाचा चित्रकार

रत्नागिरीचा धीरज राजेंद्र साटविलकर. धीरजला जन्मत:च दोन्ही हात नाहीत. तसंच एक पाय असून नसल्यासारखा आखूड आहे. त्याला दैवाने सर्वसामान्यांप्रमाणे फक्त एकच पाय दिला आहे. या पायावर धीरज उड्या मारत चालतो, जिने चढतो. आता त्याला जयपूर फुटमुळे किमानपक्षी चालणे शक्य झाले आहे. मुख्य म्हणजे धीरज पायाने अत्यंत सुंदर चित्र रेखाटतो. याचबरोबर सर्वसामान्य ज्याप्रमाणे हाताने लेखन करतो तसे भरभर लेखनही तो या पायाने करतो.
धीरजचा जन्म 17 डिसेंबर 1993 चा. जन्मत:च असं अपंगत्व बघून आई-वडील हताश झाले, पण न डगमगता त्यांनी त्याला आधार दिला. आई रोहिणी आणि मावशी वंदना जितेंद्र नेवरेकर यांनी धीरजचे संगोपन केले. मामा निशांत श्रीधर कोलथरकर यांनी मदत केली. आज त्याला भाऊ साहिल, तसेच दीप्ती संतोष साटविलकर यांचं सहकार्य लाभत आहे.
धीरज जसा मोठा होत गेला, तसेतसे त्यातील कलागुण सर्वांना जाणवू लागले. हात पाय नाहीत म्हणून तो रडत बसला नाही. तर, आपण सर्वसामान्यासारखे असल्याप्रमाणे मनी ठाम ठरवून जिद्दीने या सगळ्यातून तो उभा राहिला. चौथीपर्यंतचे शिक्षण त्याने कै. केशव प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयात घेतले. त्यानंतर दहावीची परीक्षा त्याने बहिस्थ म्हणून दिली. दहावीमध्ये अर्ज करूनही बोर्डाने धीरजला रायटर नाकारला. मात्र धीरज मागे हटला नाही. पायाने पेपर लिहिण्याचा निर्णय घेतला आणि 57 टक्के गुण मिळवले.
यादरम्यान धीरज स्वतःतील अंगभूत गुणांना उभारी देऊ लागला. अर्थातच त्याचा एक पाय, जणू त्याचा हात झाला आणि पायाच्या बोटात ब्रश पकडून तो आपल्या मनातील रंग कॅनव्हासवर उतरवू लागला. एखाद्या सराईत चित्रकाराप्रमाणे त्याचे चित्र कॅनव्हासवर दैवी रंग घेऊन चितारते. धीरजला आज आर्थिक मदतीची नितांत आवश्यकता आहे. कलाप्रेमी, विशेषतः चित्रप्रेमींनी, संस्थानी त्याच्याकडून चित्र विकत घेऊन त्याला मदतीचा हात द्यायला हवा.
धीरजच्या या जिद्दीची कहाणी 2007 साली ईटीव्ही मराठी वरील गंगुबाई नॉन मॅट्रिक या मालिकेतही घेण्यात आली होती. दहावीत नापास झाल्यानंतर आत्महत्येच्या निर्णयाप्रत असणाऱ्या मुलांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी धीरजवर खास एपिसोड करण्यात आला होता. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा अपंग कल्याण राज्य पुरस्कार 2013 त्याला मिळाला.

व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=472627023492854

- अभिजित नांदगावकर

कव्हर ड्राईव्ह (आखुडबुद्धी बहुशिंगी)

बायकोला काही खरेदीसाठी गावात जायचं होतं. तिनं जाताजाता घरीच असल्यानं मला मिष्काच्या (आमचा धाकटा चिरंजीव) पुस्तकांना कव्हर घालायची आज्ञा दिली. या वटहुकुमाला दोन तृतीयांश जनतेचा विरोध (पक्षी: माओ, मिष्का आणि मी. पण माझं मत ग्राह्य धरलं जात नसल्यानं 66%च) होता. आणि मी मराठी धनी, हुकमाचा गडी या उक्तीनुसार खाकी कागद, पेन्सिल, कटर, पट्टी, सेलोटेप, स्टेपलर घेऊन सज्ज झालो. माओ माझ्याकडं पिंजऱ्यातल्या केळी खाणाऱ्या माकडाकडं बघावं तसं बघत होता.
"बाबा, तुम्हांला कव्हर घालता येतं?" खरंतर त्याच्या प्रश्नामागं तुम्ही शाळेत कधी गेला होतात का असा सुप्तप्रश्न होता.
"म्हणजे काय? मला तीन वर्षं सर्वोत्कृष्ट कव्हरचं बक्षीस मिळालं होतं, माहितीय?"
ही खरी गोष्ट आहे. मला इतर कशातच बक्षीस मिळत नसल्यानं शाळेतल्या वाळिंबेबाई मला 'सर्वोत्तम कव्हर घालणारा मुलगा' या कॅटेगरीत बक्षीस द्यायच्या. गॅदरिंगला मी बक्षीस घ्यायला स्टेजवर जाऊ लागलो, की माझ्या डोक्यावर टपली मारत 'अरे, हे बक्षीस तुझ्यासाठी नाही. तुझ्या बाबांना पाठव घ्यायला.' असं म्हणत मला परत पाठवलं जाई. बाबा बक्षीस घ्यायला स्टाफरूममध्ये जात तेव्हा तिथं दिवाळी कम दसरा असं वातावरण असे. असो, तर मी सदगोपन रमेशच्या आत्मविश्वासानं ब्रह्मे घराण्याच्या कव्हर घालण्याच्या परंपरेचा पाईक होऊ पाहत होतो आणि समोरून अॅलन मुलाली माझा तेजोभंग करत होता.
"बाबा, लेबल कव्हर लावल्यावर चिकटवायचं असतं ना?" मुलालीचा पहिला बाऊन्सर.
"अरे, लेबल व्यवस्थित चिकटतात का ते पाहत होतो." सदगोपन रमेश बीट होतो पण तो बॉल कीपरच्या ग्लव्ह्जमध्ये गेल्यावर धैर्यानं हवेत बॅट फिरवतो.
"आणि आतल्या बाजूनं घडी घालायचं असेल तर कव्हर थोडं मोठं कापायला नको का?"
"मी आता कापणारच होतो, पण-"
तितक्यात कव्हर्समध्ये फ्लिंटॉफ कात्रीनं कव्हरचा ब्राऊन कागद कापताना दिसतो. फ्लिंटॉफच्या पाठीत धपका घालून कात्री हस्तगत केली जाते. कात्री हातात पडल्यावर या कात्रीनं बरोब्बर पुस्तकाच्या आकारात कापलेलं कव्हर आणखी मोठं होऊ शकत नाही या विदारक सत्याची जाणीव सदगोपन रमेशला होते. ते कव्हर वाईडबॉल समजून चोळामोळा करून फेकण्यात येतं. यावरही मुलाली 'हौज द्याट?" असं अपील करतो.
"अरे, कव्हरचा कागद चांगला आहे का हे पाहत होतो. हल्लीचे कागद फारच पातळ असतात. आमच्या वेळेस पुस्तक फाटेल पण कव्हर वर्षानुवर्षं शाबूत!" मुलाली हसतो नुसताच. छद्मीपणे. ह्या गधड्याला चांगला सडकवला पाहिजे एकदा.
सदगोपन रमेश पुन्हा स्टान्स घेतो. यावेळी पुस्तकाच्या मापापेक्षा दोनदोन इंच जादा मोजून कव्हर व्यवस्थित कापलं जातं. पुस्तक बऱ्यापैकी कव्हरमध्ये जातं. सदगोपन रमेश तोंडातून जीभ अडीच इंच बाहेर काढून कव्हरला आता सेलोटेप लावणार तोच-
अरेच्चा! इथली सेलोटेप कुठं गेली?
तर डीपमिडविकेटला फ्लिंटॉफ त्या टेपच्या रोलची गाडीगाडी करून खेळत असतो. आता फटके दिले तर हा फ्लिंटॉफ भोकाड पसरून रडणार आणि मग शर्ट काढून हवेत गरगरा फिरवणार हे माहीत असल्यानं सबुरीनं त्याच्याकडं टेप मागितली जाते. बापाचं ऐकायचं नाही अशी शिकवण असल्यानं बाळ निग्रहानं नकार देतं. शेवटी समजूतदार रमेश स्टेपलरचा उपयोग करून कव्हर आणि पुस्तक यांची जोडी जोडतो. धावफलकावर एक धाव लागते. हुश्श!
"बाबा, कव्हरचा कागद उलटा झालाय." मुलाली या क्षणाचीच वाट बघत असल्यासारखं शांतपणे.
"होय. मुद्दामच घातलंय. ही बाजू खराब झाली की कव्हर सुलट करून वापरायचं." सदगोपन रमेश शफल होत कपाळावरचा घाम पुसून उत्तर देतो.
तितक्यात थर्डमॅनकडून मुलालीला त्याचा मित्र खेळायला बोलावतो. दोघं मित्र बोलण्यात गुंतलेले पाहून रमेश गडबडीनं ते उलटं कव्हर सुलटवण्याचा प्रयत्न करतो, पण स्टेपलरच्या पिना अखंड मारलेल्या असल्यानं या गोंधळात ते कव्हर फाटतं. मुलाली आपल्या मित्राला सांगत असतो, "अरे, माझे बाबा पुस्तकाला कव्हर घालतायत. ते बघायलाच जास्त मज्जा येतेय."
झालं. आता डॉमिनिक कॉर्कही सिलीपॉईंटला दबा धरून बसतो. सदगोपन रमेशवर मनोवैग्यानिक दबाव आणखी वाढतो.
"काही प्रॉब्लेम नाही बाबा. हे गेल्या वर्षीचं पुस्तक होतं."
"मग हे इतकं नवंकोरं कसं?" मुलाली आता गुगली टाकतोय हे कळूनही रमेश घाईत बॅट फिरवतो.
"कारण याला आईनं कव्हर घातलेलं." थंडपणे मुलाली चेंडू अडवतो.
म्हणजे जवळपास अर्धा तास झाला तरी अजून धावफलक कोराच!
"बाबा, मला याचं विमान करून दे." फ्लिंटॉफ कुठंतरी सापडलेला घोटीव कागदाचा तुकडा नाचवत फर्मावतो.
"अरे, माझ्या भावाला मस्त विमान बनवता येतंय. त्याला सांगूया का?" कॉर्क विचारतो.
"हो , हो. घेऊन जा त्याच्याकडं हा कागद." सदगोपन रमेश सुटकेचा निश्वास सोडतो.
"त्यापेक्षा त्यालाच इथं बोलवूया ना?" हा दुष्टपणा अॅलन मुलालीशिवाय आणखी कुणाला सुचणार? दीड मिनिटात लाँगऑनला आणखी एक फिल्डर जमा होतो. कामाला सुरुवात केल्यापासून जवळपास सव्वा तासानं पहिलं कव्हर घालून झालेलं असतं. आता या सेट झालेल्या प्रोसेसनुसार सगळी पुस्तकं धपाधप कव्हर घालून काढायची असतात. सदगोपन रमेश थोडासा सुखावतो.
"बाबा, तुम्ही कव्हर घालण्याआधी जरा इन्स्ट्रक्शन्स वाचायला हव्या होत्यात."
"अरे हे शाळावाले मला काय शिकवणार कव्हर घालायचं?"
"तसं नाही, इथं लिहिलंय की ट्रान्सपरन्ट शीटची कव्हर घाला म्हणून."
हे म्हणजे सगळी मॅच खेळून झाल्यावर आयसीसीनं ती अनधिकृत होती असं हे घोषित करण्यासारखं होतं.
"हे आत्ता सांगतोयस? आधी का वाचलं नाहीस?"
"आधीच वाचलं होतं. मला वाटलं तुम्ही प्रॅक्टिस करताय."
लाँगऑन आणि सिलीपॉईंटचे फिल्डर हा सोहळा पाहून धन्य होतात. इतका वेळ दाबून ठेवलेला संताप उफाळून येतो. अॅलन मुलालीच्या गालावर त्याचा निचरा होणार तोच बेल वाजते. आणखी कोण गधडा हा खेळ पहायला आलंय हे बघायला मिष्का पळत जातो. त्याचा आनंदाचा चित्कार ऐकूनच मला कळत की मैदानात सचिन तेंडुलकरची एन्ट्री झालेली आहे. आता मी पुन्हा नॉन- स्ट्रायकर एन्डला जायला हरकत नाही.
- ज्युनिअर ब्रह्मे

‘डीजे’त रमले, लग्न तुटले! वधूने लग्न न करता नवरदेवास शिकवला धडा

लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन. वधू-वर दोघेही लग्न ठरल्यापासून डोक्यावर अक्षता पडेपर्यंत प्रचंड आतूर असतात. या आनंदाच्या प्रसंगी नाच, गाणे, संगीत सर्व काही धडाक्यात होतं. पण कधीकधी आततायीपण अंगलट येतो आणि क्षुल्लक चुकीची मोठी किंमत मोजावी लागते. आपल्या कर्णकर्कश आवाजामुळे हृदयाचा ठोका चुकविणारा ‘डिजे’ लग्नप्रसंगांची दैना करून टाकतो. ‘आवाज वाढव डिजे तुला…’ म्हणत हिडीस नाचणाऱ्यांना आवारा म्हणायाची वेळ अनेकदा येते. यवतमाळ येथे घडलेली एक घटना डिजे वाजविणाऱ्यांसाठी धडा ठरावी.
यवतमाळपासून ६० किलोमीटरवरच्या पिंपळनेर (ता. आर्णी) येथील स्वाती शिवदास आडे या तरूणीचा तालुक्यातीलच शारी गावातील तरूणासोबत विवाह ठरला होता. शुक्रवार १७ मे रोजी सकाळी १० वाजता लग्नाचा मुहूर्त होता. त्यासाठी वऱ्हाडी मंडळी पिंपळनेर येथे पोहचली. मात्र मंडपात न येता वऱ्हाड्यांनी गावातच नवरदेवासह डीजेच्या तालावर ठेका धरला. लहानशा गावातील प्रत्येक रस्त्यावरून ही वरात डिजेच्या तालावर ठेका धरत फिरली. डिजेच्या आवाजाने गावकरीही त्रस्त् झाले. अनेकांनी आवाज जरा कमी ठेवा म्हणून सुचविलं. पण काहीही फरक पडला नाही. इकडे मंडपात वधुपक्षाकडील पाहुण्यांसह सर्वचजण नवरदेव व वऱ्हाडींची प्रतीक्षा करीत होते. विवाह मुहूर्त टळून गेला. सर्वांचेच चेहरे त्रासिक झाले. शेवटी वधुचे काका वऱ्हाड्यांना आणण्यासाठी गेले. नाचण्याच्या नादात वऱ्हाड्यांनी मुलीच्या काकास धक्काबुक्की केली. आमच्या सोईने येऊ, असे म्हणत अपमानित करून पाठवलं. काकांनी ही गोष्ट मंडपातील काही ज्येष्ठ लोकांना सांगितली. आपला होणारा नवरा लग्नापेक्षा नाचण्यास महत्व देत असल्याची बाब नववधू स्वातीसही कळली. स्वातीस वडील नाहीत. त्यामुळे या काकांनीच तिचा सांभाळ केला. पित्यासमान काकांचा अपमान करणाऱ्या अशा मुजोर वरपक्षातील मुलासोबत लग्न न करण्याचा निर्णय तिने घेतला. तिच्या या निर्णयाला काका, तिचा भाऊ, कुटुंबिय व गावकऱ्यांनीही संमती दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी वऱ्हाडी नाचत असलेल्या ठिकाणी पोहचून स्वातीचा लग्न न करण्याचा निर्णय त्यांना सांगितला व वरात गावाबाहेर घेऊन जाण्यास सुचवलं. मात्र वऱ्हाड्यांनी हुज्जत घालून धमकावल्याने चिडलेल्या ग्रामस्थांनी हाताला मिळेल ती वस्तू घेऊन वरासह वऱ्हाडींना गावाबाहेर पिटाळून लावलं. गावकऱ्यांचा हा रूद्रावतार बघून नवरदेवासह अनेकजण मिळेल त्या जागी लपून बसले. काही वेळाने वर आणि वधू पक्षाकडील काही मंडळींनी एकत्र बसून लग्नासाठी झालेल्या व्यवहाराची देवाण-घेवाण करून हे लग्न मोडलं. ही वार्ता कळताच आर्णी पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. मात्र कोणीच कोणाविरूद्ध तक्रार न दिल्याने प्रकरण सामोपचाराने मिटलं. केवळ नववी उत्तीर्ण स्वातीने घेतलेला हा धाडसी निर्णय बेधुंद नाचणाऱ्या वऱ्हाड्यांसाठी मोठा धडा मानला जात आहे.
स्वातीने घेतलेल्या निर्णयाबद्दल कोणाचीही नाराजी नव्हती. मात्र हळद लागलेल्या स्वातीचे पुढे काय होणार, हा प्रश्न सर्वांना पडला. मंडप, वधू, पाहुणेमंडळी, जेवणावळी सर्व तयारी असताना लग्न मोडल्याने वधुपक्ष काळजीत पडला. हे तिथंच उपस्थित एका तरूणाने हेरलं. त्याने कृतीतून दिलेल्या उत्तराने एकाच लग्नात दोन आदर्श पायंडे पडलेले बघायला मिळाले. आर्णी तालुक्यातीलच म्हाळुंगी येथील निरंजन उत्तम राठोड या तरूणाने स्वातीसोबत लग्न करण्याची इच्छा तिच्या काकांसह कुटुंबियांकडे बोलून दाखविली. गावात शेती करणारा निरंजन हा स्वातीचा आतेभाऊच असल्याने त्याच्या प्रस्तावाला सर्वांनी लगेच होकार भरला. स्वातीनेही त्याचा प्रस्ताव स्वीकारला. सकाळी वाजंत्री बहुगलबला करणाऱ्या त्याच मंडपात सायंकाळी उशिरा ‘वाजंत्री बहुगलबला न करणे, शुभ मंगल सावधान!’ या मंगलाष्टकाचे स्वर निनादले आणि स्वातीच्या आयुष्याची निरांजनी उजळून निघाली. 

- नितीन पखाले, यवतमाळ

अन् तिच्या जिद्दीपुढे अखेर परिस्थितीही झुकली...

दीड वर्षांपूर्वीची गोष्ट. घरात लागणारं काही सामान आणण्यासाठी कीर्ती कुळये आणि तिचा धाकटे भाऊ घरातून बाहेर पडले. रस्त्याने जाताना एका कंटेनरने त्यांना धडक दिली. दोघं लांब फेकले गेले. कीर्ती बेशुध्द झाली तर तिच्या छोटा भाऊ रक्तबंबाळ अवस्थेत पडला होता. शुध्दीवर आल्यावर आपल्या भावाला वाचविण्यासाठी कीर्तीने खूप प्रयत्न केले. मात्र, उपचाराला नेत असताना त्याची प्राणज्योत मावळली.
लाडक्या नातवाच्या मृत्यूने कीर्तीचे आजी-आजोबा आजारी पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर आरवली महामार्गावर तिच्या वडिलांची चहाची टपरी. महामार्गावरील त्यांची चहाची टपरी उठवावी लागणार हे वृत्त कीर्तीच्या वडिलांना कळलं. यात नुकसान भरपाईही मिळाली नाही. एकीकडे मुलगा, आई-वडील गेल्याचे दु:ख आणि त्यातच उदरनिर्वाहाचं साधन गेलं. या सगळ्याचा वडिलांनी धसका घेतला आणि वर्षभरापूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचंही निधन झालं. काही दिवसांतच कीर्तीचे मावशी आणि काकाही वारल्याची धक्कादायक बातमीही तिला मिळाली. आपल्या आयुष्यात हे काय घडतंय हे किर्तीला कळत नव्हतं. पण आता आईसाठी ती पुन्हा जिद्दीने उभी राहिली. चहाची टपरी पुन्हा सुरू झाली.
एकापाठोपाठ घरातील सहा व्यक्ती गमावल्यामुळे कीर्तीच्या आईला मोठा धक्का बसला होता. त्याचा परिणाम तब्येतीवर होऊन तिची आईही गेल्या वर्षभरापासून सातत्याने आजारी पडत होती. अखेर चार महिन्यांपूर्वी कीर्तीचा शेवटचा आधार असलेल्या तिची आईचंही निधन झालं.
घरातील सात माणसे गेल्यानंतर मात्र किर्तीने या नियतीसमोर लढायचे ठरवले. या सगळ्या परिस्थितीला सामोरं जाताना तिचं शिक्षण सुरू आहे. सध्या ती एमएच्या दुसऱ्या वर्षाला असून तिला युपीएससी आणि एमपीएससी या स्पर्धा परिक्षेतून अधिकारी बनायचं आहे. त्यासाठी ती आजही चहा विकून उदरनिर्वाह करत आहे.
एकीकडे मुलं रस्त्यावर उभं राहून व्यवसाय करण्यासाठी मागेपुढे पाहत असतानाचे चित्र दिसतं आहे. कीर्ती मात्र सकाळी 7 ते रात्री 7 पर्यंत चहा विकण्याचे काम अगदी जिद्दीने करत आहे. काŸलेज असताना ती दुपारी चहाची टपरी सुरू करते. हे काम आपण बिनधास्तपणे करतो काही भीती वाटत नाही कारण इतक्या सगळ्या संकटातून पुढे आले आहे की, छोटे संकटे आली की, मी लगेच मात करते त्यामुळे मी फक्त माझ्या ध्येयाकडे लक्ष ठेऊन आहे. स्वत:च्या हिंमतीवर मी एक दिवस अधिकारी बनणार असा विश्वास किर्तीने व्यक्त केला.
- जान्हवी पाटील, रत्नागिरी


पाण्यापायी माणसं आणि नातंही काही काळ दुरावतेय...

दुष्काळ, अलिकडच्या काळात सहजपणे उच्चारला जाणारा शब्द. यंदा मात्र गावची, गावच्या माणसाची, शेतीची आणि शेतीत राबणाऱ्या जिवांची कोलहाल केलीय दुष्काळाने. देवगाव, दुष्काळाने होरपळ होत असलेलं एक गाव. कायम बागायती असणाऱ्या गावांतील शेती, हळहळू उजाड होत गेली. हिरव्यागार झाडांनी नटलेला परिसरात चोरून, लपून कुऱ्हाड पडायला लागली आणि मागच्या आठ-दहा वर्षात बरीच झाडं बुंध्यापासून थोटी झाली. शिवार उजाड होत गेला, पण कोणालाही त्याबाबत बोलावं वाटलं नाही. नवी झांड तर लावणंच बंद. त्याचा परिणाम गावशिवार बोडखा झाला.
यंदा दुष्काळ आला. तसंही देवगावाने गेल्या दहा वर्षात चार-पाच वेळा दुष्काळ सोसलाय. यंदा मात्र परिस्थिती अत्यंत गंभीर. खायला धान्याचा तुटवडा नाही. फक्त पाणी नाही, जनावरांना चारा नाही. अख्ख्या चार महिन्याच्या पावसाळ्यात पाऊस झाला नाही. विहीरी, तलाव, नाले, कोरडेठाक. लोक 1972 च्या दुष्काळाची तुलना करत होते. पण जाणकार त्यापेक्षाही भयंकर दुष्काळ असल्याचं सांगतात. शेताची तर वाटच लागली, पण प्यायलाही पाणी नाही. जनावरांची उपासमार, कर्ती पोरं गाव सोडून दूरदेशी जात आहेत. देवगावचे रंगराव पाटील गावकीतील पुढारी. त्यांनी मागणी केली आणि कधी नव्हे यंदा टॅंकरने पाणी पुरवठा करावा लागला. गावाच्या जवळ टॅंकर भरायला पाणी नाही, म्हणून पंधरा मैलावर असलेल्या सिंदफणा धरणात खोदलेल्या सरकारी विहिरीतून टॅंकर भरू लागली. गावांत टॅंकर आलं की साऱ्या गावाची पाणी भरायला धडपड. पाण्याच्या टाक्या, बॅलर, भांडी बादल्या, पातेले, आसंल त्यात पाणी भरायचं. टॅकरवाला मोजून-मापून पाणी देतू. नंबरशीर. दहा दिवसाला नंतर येतू. ठरलेला कालावधी लोटला की गावांतली माणसं रस्त्याकडं नजर लावून बसतात टॅंकरची वाट पाहत. गावांत पाण्याचा टॅंकर आला की त्यावर झुंबड उडते. आज एका भागात, उद्या दुसऱ्या भागात. नंबर लागलेले. एका भागात टॅंकर आला आणि दुसऱ्या भागातील लोक पाणी न्यायला आले की वादावादी.
अगदी नात्यातील लोक असले तरी. ...आज आमच्या भागात टॅंकर आलाय, उद्या येणार नाही. पाणी वाट्याला आलं नाही तर...उद्या देईल का आम्हाला. अजून महिनाभर पाऊस पडल्यावर कशाला कोण बोलतंय असं. दुष्काळाने पिचलेल्या
गावांतील हा संवाद यंदा सहजासहजी एेकायला मिळतोय. पाणी किती मोलांचं हे स्पष्ट होतेय. अगदी नात्यातील माणसांच नातंही काही काळ पाण्यामुळे दुरावलं जात असल्याचं पहायला मिळतंय. पै- पाहुणेही एकमेकांच्या घरी जाताना दिसत नाहीत की दूरदेशी गेलेली माणसं सुट्टीत गावांत यायला धजावत नसल्याचं चित्र एकट्या देवगावात नाहीत. राज्याच्या, डोंगर भागातील अनेक गावांत आज पहायला मिळत आहे. 
- सूर्यकांत नेटके, अहमदनगर

मोफत पाणी तेही घरपोच

नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वरपासून १५ किलोमीटरवर वसलेलं विनायकनगर. गणेशगाव ग्रुप ग्रामपंचायतीतलं गाव. लोकसंख्या ५०० च्या आसपास. इथल्या सर्व विहिरींनी कधीच तळ गाठला आहे. कधीतरी पाण्याचा टँकर आणून विहिरीत ओतला जातो. त्यावर तीन-चार दिवसांचं भागतं. पुन्हा विहीर कोरडी. कपडे धुण्यासाठी महिलांना किमान दीड किलोमीटरवर लांब जावं लागतं. काहींना त्यापेक्षाही दूर.
मात्र इथल्याच शरद महाले यांच्यामुळे २५ ते ३० कुटुंबातल्या महिलांच्या डोक्यावरचा भार तरी हलका झाला आहे. महाले यांची विंधण विहीर. सकाळी आणि संध्याकाळी प्रत्येकी अर्धा तास पाणी. यातून साधारण १०० जणांना ते दररोज दीड ते दोन हजार लिटर पाणी मोफत पुरवत आहेत.
महाले यांची ही विहीर शेतात. गाव आणि शेत यात दीड किलोमीटरचं अंतर. महिलांची पायपीट थांबावी यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून महाले ट्रॅक्टर वापरत आहेत. कसा? गावकरी दररोज त्यांच्या ट्रॅक्टरला आपापल्या नावांच्या रिकाम्या टाक्या बांधतात. महाले ट्रॅक्टर घेऊन शेतात जातात. आपल्या घरासाठी पाणी भरण्यासोबतच ते या टाक्याही भरतात. ट्रॅक्टर गावात आला की महिला आपापली टाकी घेऊन जातात.
शेताच्या आसपास असणारी काही कुटुंबही महाले यांची वाट पाहत असतात. ट्रॅक्टर आला की पाणी भरण्यासाठी एकच धावपळ उडते.
परिसरात ज्या काही निवडक मंडळींकडे पाणी आहे, त्यांच्याकडून ते विकत घ्यावं लागतं. मात्र या हे विनायकनगर, आदिवासीबहुल गाव. इथल्या कुटुंबियांची आर्थिक स्थिती बेताचीच. दुष्काळामुळे बहुतांश पुरूष नाशिक शहर, औद्योगिक वसाहतीत कामाच्या शोधात. काम मिळाले तर दोन पैसे मिळणार, अन्यथा तिथे जाता- येतानाचे भाड्याचेही पैसे वाया जातात. अशा स्थितीत महाले यांची विंधण विहीर ग्रामस्थांना एकमेव आधार आहे.

-प्राची उन्मेष, नाशिक

ऐंशी रूपयांची गोष्ट, (आखुडबुद्धी बहुशिंगी - ज्युनिअर ब्रह्मे)

(स्थळ-सिनेमाथिएटर, कॅशियरची खिडकी)
"बोला काका, काय हवंय?"
(पिशवीतून वर्तमानपत्राची सुरळी काढून दाखवत) "ही जाहीरात तुमचीच आहे ना?"
"कोणती? स्त्री किंवा पुरुष मदतनीस पाहिजे ही?"
"नाही हो. त्याखालची."
"हरवली आहे-"
"नाही हो, त्याखालची सिनेमाची जाहीरात तुमचीच आहे ना?"
"अं, हो. पण पुढचा शो साडेतीनला आहे. तिकीटविक्री अजून चालू व्हायची आहे."
"मला तिकीट नकोय."
"हे सांगायला इथंवर आलात का?"
"नाही. मला माझ्या तिकीटाचे पैसे परत पाहिजेत."
"कुठल्या तिकीटाचे?"
"बाराच्या शोचे. माझा सीट क्रमांक के बत्तीस."
"शो संपल्यावर कसे पैसे परत देता येतील? शिवाय फक्त शो रद्द झाला तरच पैसे परत द्यायची पद्धत आहे आमची."
"शो मी पाहिलाय. म्हणूनच विचारलं ही जाहीरात तुमची आहे का म्हणून."
(चष्मा लावून जाहीरात वाचत) "जाहीरातीत असं कुठं लिहिलेलं दिसलं की आम्ही पैसे परत देऊ म्हणून?"
"तुम्ही फसवणूक केलीत म्हणून मी पैसे परत मागतोय."
"कसली फसवणूक? प्यासी चुडैलऐवजी शैतानी हवेली सिनेमा दाखवला की काय आमच्या लोकांनी?"
"नाही. स्क्रीनवर प्यासी चुडैलच होती. पण तुम्ही इथं जाहीरातीत स्पष्ट काय लिहिलंय ते वाचा."
"अं काय?"
"हे पहा- एका तिकिटात सोळा चुंबनदृष्यं पाहायची सुवर्णसंधी सोडू नका."
"बरं मग?"
"मी बाराच्या शोमधली एकूण चुंबनदृष्यं मोजली, ती पंधराच भरली."
"बरं, मग?"
"मग काय? माझी फसवणूक झालीय. मला पैसे परत पाहिजेत."
"पंधरातरी बघितलीत ना मिटक्या मारत?"
"सोळावं दृष्य जे बघायला नाही मिळालं तेच सर्वात चांगलं असेल तर?"
"बरं, कोणतं बघायला मिळालं नाही ते सांगा, मी पुढच्या शोच्या वेळी ते आलं की तुम्हांला बोलावून तेवढंच दाखवायची व्यवस्था करतो."
"वा रे वा. मला काही कामधाम नाहीय वाटतं तुमची चुंबनदृष्यं बघायचं सोडून."
"पाहिजे काय हो तुम्हांला?"
"पैसे. परत पाहिजेत."
"कशाबद्दल?"
"विश्वासघात केल्याबद्दल."
"पैशांऐवजी दुसरं काही-"
"-चुंबन चालेल."
"मी देऊ?"
"ओ मिस्टर, तुमचं चुंबन घ्यायला मी म्हणजे काही भलताच वाटलो काय?"
"मग काय हवंय?"
"एकदा सांगितलं ना? चुंबन चालेल. म्हणजे जे चुंबनदृष्य बघायला मिळालं नाही ते दाखवलं तरी चालेल. पण त्यासाठी मी थांबणार नाही."
"दोन शोच्या मधल्या वेळेत कसं दाखवता येईल हो?"
"ती हिरॉईन थिएटरमध्येच बसून असेल ना पुढचा शो सुरु होईपर्यंत? तिला दे म्हणावं. हवंतर हिरोची भूमिका मी..."
"अहो आजोबा, सिनेमा फिल्मवर शूट केलेला असतो. ती हिरॉईन आत्ता या क्षणी स्वित्झर्लंडमध्ये किंवा राजस्थानातही असू शकेल."
"मग मला माझे तिकीटाचे ऐंशी रुपये परत करा."
"ते शक्य नाही."
"का बुवा?"
"म्हणजे असं बघा, ऐंशी रुपयात सोळा चुंबनं होती. म्हणजे एका चुंबनाचे किती झाले?"
"पाच रुपये. तेव्हढं गणित मलापण येतंय रॅंग्लरसाहेब. पण जे दृष्य बघायला मिळालं नाही त्याची किंमत बाकी दृष्यांइतकीच असेल कशावरून?"
"म्हणजे?"
"म्हणजे ते चुंबन चाळीस रुपयांचं नसेल कशावरून?"
"बरं, चाळीस रूपये चालतील तुम्हांला?"
"का? समजा, जे चुकलंय ते चुंबनदृष्य ऐंशी रूपयांचं असून बाकी पंधरा चुंबनं त्यावर फ्री असतील तर?"
"एकावर पंधरा फ्री? काहीतरी लॉजिक लावा आजोबा…"
"लॉजिक लावूनच सांगतोय. एकावर पंधरा फ्री हे बरोबर आहे."
"कसं काय?"
"घटत्या उपयोगितेचा सिद्धांत. नायिकेचं एक चुंबन घेतल्यानंतर पुढच्या चुंबनांची किंमत शून्य झाली असणार नाही कशावरून?"
"आजोबा, माझंही एफवायला लॉजिक होतं. किंमत शून्य झाली असेल कशावरून?"
"हे पटवायचा एकच मार्ग आहे- सगळी चुंबनं दाखवायची. तीही आत्ताच. ताबडतोब."
"शक्य नाही."
"मग पैसे परत."
"नाही दिले तर?"
"तर पुढच्या शोच्या वेळी इथं उभं राहून तुमच्या खोटेपणाची जाहीरात करून सगळ्या प्रेक्षकांना पळवून लावेन."
"असं करता येईल तुम्हांला?"
"मला काय ऐरागैरा समजता का? गेल्या आठवड्यात एक सिंह कमी दिसला म्हणून रॅंबो सर्कसला पळवून लावलंय मी. तुम्ही काय चीज आहात?"
"अरे बापरे, तुम्हीच का ते? काका, तुमचे पैसे देऊन टाकतो. हे घ्या ऐंशी रुपये."
"अहो रॅंग्लर, ऐंशी गुणिले त्रेसष्ट किती?"
"ते का?"
"कारण, अशी त्रेसष्ट तिकीटं आहेत माझ्याकडं!"
#नवीउमेद
Hrishikesh Rangnekar

वडिलांच्या वयाइतकी झाडे देऊन लेकी साजरा करतात वडिलांचा वाढदिवस


नाशिकच्या अमी व मिली छेडा या दोन बहि‍णींची ही आगळीवेगळी गोष्ट. त्यांच्या वडिलांचा मुकेश यांचा वाढदिवस पर्यावरण दिनाला (5 जून) येतो. अमी सांगते, “आम्ही बाबांचा वाढदिवस गेल्या १२ वर्षापासून वेगळ्या पध्दतीने साजरा करतो. वडिलांच्या वयाइतकी झाडे दरवर्षी नातेवाईक व मित्र परिवाराला भेट म्हणून देतो. यामध्ये औषधी, सुवासिक तर कधी मोठी झाडे, शोभिवंत अशी कुठल्याही प्रकारची झाडे ही भेट स्वरुपात दिली जातात. गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्या वयाच्या १० पट झाडे दान करत आहोत.” यंदा अशी ६२० झाडं दिल्याचं अमी उत्साहाने सांगते. ती म्हणते, “पूर्वी आम्ही स्वत:च नातेवाईकांकडे जाऊन झाडं लावायचो. तेही त्या झाडांची मनापासून काळजी घेत असत. पण आता आता आकडा वाढल्यामुळे स्वत: झाडं लावणं शक्य होत नाही. म्हणून आम्ही रोपं त्यांना भेट देतो आणि बाकीचं काम मित्र परिवार करतो. बाबांच्या चेहऱ्यावरचा आनंद हीच आमच्या उपक्रमाची सार्थकता. भेट दिलेल्या झाडांना फुलं लागली, फळं आली की लोकं आम्हांला त्याचे फोटो पाठवतात हे बघून खूप आनंद वाटतो. झाड निवडतांना आम्ही औषधी झाडं, फुलझाडं, बारमाही, सावली देणारी अशी वेगवेगळी झाडं निवडतो.”
नाशिक शहरात मुकेश यांचा हॉर्टीकल्चरचा व्यवसाय आहे. आपण ज्या समाजात वावरतो त्याला आपण काही देणं लागतो ही शिकवण आई जयना व वडील मुकेश यांनी मुलींना दिली. ही शिकवण प्रत्यक्षात आणण्यासाठी झाडे देण्याचा संकल्प केल्याचं मुली सांगतात. आता झाडांची संख्या वाढत असल्यामुळे या कामात काही ओळखीची मंडळी मदत करत आहे. झाडं नेऊन देणं, ती वेळेवर पोचली का नाहीत याची काळजी घेणं यासाठी प्रसाद उपासनी, कुंतक गायधनी, निखिल जोशी, गार्गी एलकुंचवार, माँटी सिंग मदत करतात. असा उपक्रम अन्य ठिकाणी राबविला जावा अशी अपेक्षा अमी व्यक्त करते.
- प्राची उन्मेष, नाशिक

पुण्याचे 'हिल-मॅन'

अनिल गायकवाड. त्यांना सगळे प्रेमाने मामा म्हणतात. मूळ गाव सातारा. सध्या वास्तव्य पुण्यात बाणेर इथं. 1978 साली एनसीएलमध्ये पर्यावरण या विषयावर कार्यक्रम झाला. यावेळी अनिल यांनी एक शोधनिबंध वाचला. मुंबई, कॅलिफोर्निया अशी समुद्राजवळ वसलेली शहरे तापमान वाढीमुळे पाण्याखाली जातील, प्रदूषण वाढेल, माणसाचं जगणं अवघड होईल, असा निबंधाचा गोषवारा. त्यावेळीच पर्यावरण विषयाच्या अभ्यासाला त्यांनी सुरूवात केली. 1978 ते 2006 या काळात पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी पर्यावरणाचं जमेल तितकं काम सुरू केलं. सगळ्यांनीच हे काम करायला हवं या हेतूने 2006 साली 'वसुंधरा स्वच्छता अभियान' या लोक चळवळीची त्यांनी सुरूवात केली. फक्त पुणं किंवा महाराष्ट्र सुंदर होऊन चालणार नाही तर संपूर्ण वसुंधरा स्वच्छ व्हायला हवी हा नावामागचा हेतू.
आठवड्यातून दर रविवारी एक तास काम करायचं ठरलं. कुठं खराटा हातात घेऊन स्वछता करा, कुठं पर्यावरणाविषयी जागरूकता, तर कुठं झाड लावणं. जेवढी झाडं लावता येतील तेवढी जगवायची, जेवढी जगवता येतील तेवढीच झाडं लावायची ही खूणगाठ मनाशी होती. पुण्यातील पाषाण टेकडीवर झाड लावायला सुरूवात झाली. पाण्यासाठी टेकड्यांवर टाक्या बांधण्यात आल्या. सध्या टेकडीवर 30 टाक्या आहेत. अनेक रहिवासी मित्रांनी आपल्या घरातून पाण्यासाठी कनेक्शन दिली. मात्र काही दृष्ट वृत्तीनी झाडे उपटली, तोडली काही वेळेस तर वणवे लावण्यात आले. नंतर मात्र झाडांची संख्या वाढल्यावर टेकड्यांवरची अवैध बांधकामं थांबली. ह्या कामाचा पसारा एवढा वाढला की, आयटी, अभियांत्रिकी, वकील, मोठे अधिकारी अशा सगळ्या लोकांनी येऊन श्रमदान करण्यास सुरूवात केली. गेली अनेक वर्षे रोज सकाळी 7 वाजता न सांगता सगळी मंडळी येतात टाकीतलं पाणी झाडांना घालून निघून जातात. मामांच्या कामाचा वारसा असा अनेक वसुंधरावासियांनी खांद्यावर उचलला आहे. आज जवळजवळ 25,000 झाडे लावली, जगवली अन् वाढवली आहेत.
मामा आणि ग्रुपचं काम इथंच थांबलं नाही. पुणे शहरात नदी प्रदूषण अफाट. 2008 साली त्यांनी राम नदी स्वच्छता अभियान हाती घेतलं. भुकूम-पाषाण-बाणेर अशा 18 किलोमीटर लांब नदीची स्वच्छता. राम नदी स्वच्छतेसाठी 20 विविध संस्था, 35 महाविद्यालये, इंडस्ट्री तसंच किर्लोस्कर वसुंधरा ट्रस्टने मदत केली. नदीचे 9 भाग करून प्रत्येक संस्थेला काम वाटून देण्यात आलं आहे. मग त्यात नदीच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांचं प्रबोधन, घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन अशा अनेक गोष्टी आल्या. रासायनिक शेतीमुळे होणारे दुष्परिणाम हे सगळ्यात जास्त निसर्गाला हानिकारक आहेत. 2014 साली त्यांनी पदमश्री सुभाष पाळेकर ह्यांच्या नैसर्गिक शेतीवरील शिबीरात सहभाग घेतला. नैसर्गिक शेती हाच उपाय हे लक्षात आल्यावर अनेक गावागावात प्रबोधन, जागरूकता अन् प्रात्यक्षिकाला सुरूवात केली. मामांनी आतापर्यंत 10 शिबीरात भाग घेतला आहे. मुळशी परिसर व इतर ठिकाणी देशी बियाणांचा प्रचार चालू आहे. महाराष्ट्रात नैसर्गिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा शेतमाल विकण्यासाठी दर वर्षी बाणेर, तर ह्यावर्षी सिद्धी गार्डनमध्ये 'वसुंधरा धान्य महोत्सव' भरवण्यात आला. पुणेकरांना वर्षभराचे धान्य घेता आलं. जवळच्या ठिकाणी नैसर्गिक शेतमाल मिळावा म्हणून बाणेर येथे एक दुकान उघडण्यात आलं. सागरमित्र संस्थेसोबत अनेक शाळेत प्लास्टिक कचरा व्यवस्थापनावर काम सुरू आहे. मासिक पाळीसाठी वापरलेल्या कृत्रिम पॅडमुळे होणाऱ्या परिणामाचा विचार करून सुती कापडाचे पॅड व जनजागृती चालू आहे. आज मामांनी सुरू केलेलं काम लाखो लोक पुढं नेत आहेत. त्याचंच ज्वलंत उदाहरण म्हणजे पुण्यातील पाषाण टेकडी. या टेकडीवर अवैध काँक्रीटकरण चालू होतं. ते थांबवण्यासाठी वसुंधरा अभियानाच्या गटाने एकत्र येऊन आंदोलन केलं. 4600 लोकांनी यावर सह्या केल्या. काम थांबलं. निसर्ग जिंकला. आता असंख्य कामांना उधाण आलं आहे ते लोकसहभागातूनच. 
मामा सगळ्यांना एकच सांगतात, “टूथपेस्टऐवजी दंतमंजन वापरा, साबणाऐवजी शिकेकाई-रिठा वापरा, कपडे सुती असावेत. आपण एवढा जरी बदल केला तरी पर्यावरण जगेल. नको असलेल्या गोष्टी टाळा, पर्यावरणपूरक आयुष्य जगा. कारण झाड आहे तरच माणूस आहे.”
अनिल गायकवाड- 99220 01442
- संतोष बोबडे, पुणे
#नवीउमेद #जागतिकपर्यावरणदिन
Santosh Bobade Anil Gaikwad