Tuesday 16 May 2017

शेतकरी झाला विक्रेता



नांदेडच्या आठवडी बाजारातली ही गोष्ट. दुरून आवाज येत होता, ‘फक्त दहा रुपयात टरबूज...दहा रुपयात टरबूज’. एक दहा-बारा वर्षाचा मुलगा आणि त्याचे वडील टरबूज विकायला बसले होते. समोर ट्रॅक्टरभर हिरव्यागार टरबूजांचा ढीग. डोक्यावरच्या रणरणत्या उन्हाची पर्वा न करता लोकही दोन-चार टरबूज खरेदी करून जात होते. विशेष म्हणजे, प्रत्येकाला टरबूजाच्या गोडीविषयी माहिती बाप-लेक आवर्जून सांगत होते. एखाद्याचं टरबूज गडबडीत हातातून पडून फुटले तर त्याला म्हणत होते, ‘राहू द्या साहेब, दुसरे बदलून घ्या, हा शेतकऱ्याचा माल आहे, दलालाचा नाही.’ हा उमदा शेतकरी आहे, पुरभाजी माधवराव तिडके. तिडके नांदेड जिल्ह्यातील दिग्रस (नांदला) गावचे.
 त्यांची सात एकर शेती. त्यात दोन बोअर. त्यामुळे पाण्याची चांगली सोय. गहू, ज्वारी, सोयाबीन, ऊस, हळद ही पारंपरिक पिकं ते घेतातच. यावर्षी प्रयोग म्हणून त्यांनी टरबूज हे 75 दिवसाचं उन्हाळी घ्यायचं ठरवलं. सुरुवातीला 30 गुंठे जमिनीवर हे पीक घेतलं. आणि खर्च वजा करून त्यांना एक लाखाचा नफाही मिळाला. तिडके सांगतात, ‘सकाळी आणि संध्याकाळी एक तास ठिबकने पाणी दिले. पहिला बहार 18 टन निघाला. तो शेतातून 8.50 प्रति किलोने विकला. आता दुसरा बहार 8 टन निघाला आहे’.
पहिल्या बहराचा माल वजनाने जास्त भरत होता. पण या पिकाचा काहीच अनुभव नसल्याने वाहतुकीचा प्रश्न होता. म्हणून तो शेतातून विकला. दुसर्‍या बहाराचा माल आकाराने लहान. त्याला दलालांकडून नगण्य भाव मिळू लागला. कष्टाने पिकविलेले टरबूज जवळपास फुकटच द्यायचे. दलाल ते तिप्पटीनं विकून चांगला नफा मिळवणार हे तिडके यांना पटले नाही. शेवटी हे टरबूज स्वतःच विकायचा त्यांनी निर्णय घेतला.
एक उत्पादक शेतकरी स्वतःच्या मालाचा विक्रेता झाला. नांदेड हे जिल्हयाचं शहर जवळच. तिथल्या आनंदनगर, तरोडा नाका भागात टरबूज विक्री सुरू झाली. मालाची किंमत ठरवून 1 ते 1.5 किलो वजनाचं एक टरबूज 10 रुपयांना विकलं. ग्राहकांनीही भरघोस प्रतिसाद दिला. यावर्षी टरबूज शेतीत मिळालेल्या यशाने तिडके यांना आत्मविश्वास मिळाला आहे. त्यामुळेच पुढील वर्षी दोन एकरात टरबूज आणि खरबूज लावण्याचे ठरविले आहे. अर्थात पुढील वर्षी विक्री आपणच करणार हेही ते आत्मविश्वासाने सांगत होते.
सध्या अनेक शेतकऱ्यांनी टरबूजाचे पीक घेतले आहे. त्यांचा माल 5 ते 8 रूपये किलोने विकत असतानाच पुरभाजी तिडके यांनी दहा रूपये किलोने टरबूज विकून उत्तम नफा मिळवून दाखवला आहे. सर्वच टरबूज उत्पादकांसमोर त्यांनी उदाहरण ठेवले आहे. हा मार्ग बाकीच्यांनीही चोखाळायला हवा.
पुरभाजी तिडके संपर्क क्र.- 9011733287

- उन्मेष गौरकर.

....आणि ती खरंच प्रेरणा बनली!

अंधाऱ्या कोपऱ्यात ठेवलेल्या कुंडीतले रोप आणि घरादाराचं दुर्लक्ष झालेलं मूल, दोघांचीही अवस्था सारखीच असते. पण या दोघांना प्रेम मिळालं आणि काळजी घेतली गेली तर?
वर्ध्याच्या हिंगणघाट पंचायत समितीतील लाडकी नावाचं छोटंसं गाव. या गावातल्या जि प शाळेतील मीना-राजू मंचाची उत्साही सदस्य- प्रेरणा. प्रत्येक उपक्रमात हिरिरीने भाग घेणारी, वर्गात उत्साहाने प्रश्न विचारणारी! पण प्रेरणाचे हे बदललेलं स्वरुप मी तुम्हांला सांगतेय. त्या आधी, दुसरी- तिसरीपर्यंत वर्गातली सर्वात लाजाळू मुलगी होती ती. अंगणवाडीतल्या तिच्या लहान भावाची शाळा सुटली की मधल्या सुट्टीपासून त्याला सांभाळणारी प्रेरणा.
लहानग्या प्रेरणाच्या मनावर सतत दडपण असायचं की मी भावाला अंगणवाडीतून आणून माझ्यासोबत ठेवलंय, त्यामुळे मला कुणी रागावणार तर नाही ना? मी प्रेरणाला यातून बाहेर काढायचं ठरवलं. प्रेरणाचा विश्वास संपादन करण्यासाठी मी तिच्या भावाला तिच्यासोबत वर्गातच बसण्याची परवानगी देऊन टाकली. मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागले. तिला मुद्दाम सोपे प्रश्न विचारून उत्तरं देता आलं की संपूर्ण वर्गासमोर शाबासकी देऊ लागले. तिला जवळ घेऊन मी तिच्या डोक्यावरुन हात फिरवायचे. या छोट्याश्या कृतीने प्रेरणाचा चेहरा चमकायचा.
प्रेरणाच्या घरची परिस्थिती गरिबीची. आई- वडील दोघंही शेतमजूर. घरातील मोठी मुलगी या नात्याने भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी तिच्यावरच पडलेली. आई, वडील आणि आजी पारंपरिक विचाराचे असल्याने तथाकथित 'वंशाचा दिवा' असलेल्या धाकट्या भावाचे लाड व्हायचे आणि प्रेरणासह तिच्या बहिणी मात्र 'डोक्यावर भार असलेल्या मुली' होत्या.
प्रेरणाची अभ्यासातली आणि नेतृत्त्वगुणाची चमक मला दिसत होती. कुटुंबाकडून तिच्यावर होणाऱ्या अन्यायाचं वाईट वाटायचं. मी प्रेरणाच्या घरी वारंवार जाऊ लागले. तिच्या आई- वडिलांना प्रेरणाच्या हुशारीची आणि लहान वयातच ती दाखवत असलेल्या समजूतदारपणाची जाणीव करून दिली. मुलगा- मुलीला वेगवेगळी वागणूक द्यायला नको. उद्या हीच प्रेरणा चांगली शिकून, मोठी होऊन तुमच्या कुटुंबाचा आधार बनेल असा विश्वास मी वेळोवेळी द्यायचे.
हे सारं घडायला तीन-चार वर्षे लागली. पण आता प्रेरणामधे खूपच सकारात्मक बदल झाले होते. दरम्यान तिला मीना-राजू मंचामध्येही सहभागी करुन घेतलं होतं; जेणे करून तिच्यावर लहानपणापासून स्त्री-पुरुष समानतेचे संस्कार व्हावेत आणि मोठेपणी तिच्या पालकांप्रमाणे तिने मुलगा-मुलगी असा भेदभाव करू नये.
आता सगळं सुरळीत होतंय असं वाटतानाच प्रेरणाच्या आईला कॅन्सरनं गाठलं आणि पुन्हा एकदा घरची सगळी जबाबदारी प्रेरणावर येऊन पडली. खूप प्रयत्न करूनही प्रेरणाची आई वाचली नाही. आम्ही सगळे शिक्षक तातडीनं तिच्या घरी पोहोचलो. प्रेरणाची काय अवस्था झाली असेल याची कल्पनाही करवत नव्हती. पण घरी पोहोचतो तर प्रेरणा तिच्या रडणाऱ्या दोन्ही भावंडांना कुशीत घेऊन धीराने उभी होती. आईचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घेऊन जातानाही ती शांत होती, उलट भावंडांना आणि वडिलांना जगण्याचा धीर देत होती.
मला त्या क्षणी प्रेरणाचा प्रचंड अभिमान वाटला. आपण मोठ्यांनीसुद्धा प्रेरणाकडून भरपूर काही शिकण्यासारखं आहे! प्रेरणा आजही शाळेला नियमित येते, घरची सगळी जबाबदारी सांभाळून!
लेखन: सुनीता चांदेकर.

समाजसेवेची जाण, वाढवते वर्दीची शान



तेलंगणा आणि कर्नाटक सीमेलगत वसलेला नांदेड जिल्ह्यातला देगलूर तालुका. इथं, श्रीदेवी पाटील या प्रशिक्षणार्थी पीएसआय म्हणून २०१३ मध्ये रुजू झाल्या. महिला सबलीकरण आणि बालमजुरी निर्मूलन यात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. पाटील यांनी आत्तापर्यंत ५१ बालकामगारांची सुटका करून त्यांना शाळेची वाट दाखवली आहे. देगलूर तालुक्यातल्या आदिवासी आश्रमशाळांतल्या गैरप्रकारांना रोखण्यासाठी त्या तिथे अचानक भेट देतात. तिथे नीट जेवण आणि अन्य सुविधा आहेत की नाही याची तपासणी करतात.
मार्केटमध्ये फिरताना, सिव्हिल ड्रेसवरही त्या रोड रोमियोंचा समाचार घेतात. त्या देगलूरला हजर झाल्याबरोबरच एक प्रसंग घडला. आणि त्यांच्या कामाची चर्चा सुरु झाली. रस्त्यावर मुलींची छेड काढणाऱ्या दोनतीन सडकसख्याहरींना पाटील यांनी पकडून काठीचा प्रसाद देत पोलीस ठाण्यापर्यंत नेलं. यामुळे रोडसाईड रोमियोंना वचक बसला. महिन्यातून एकदा त्या महिलांना पोलीस ठाण्यात आमंत्रित करतात. आणि गप्पांमधून कायद्याचं पालन, रक्षण महिला कसं करू शकतात, हे समजून देतात.
शेजारच्या तेलंगणा राज्यातल्या मुलांशी इथल्या मुलींची लग्नं लावून देणं इथे चालतं. श्रीमंती, जमीनजुमला बघितलं जातं. मात्र मुलाची चौकशी केली जात नाही. मग महिनाभरात या मुली माहेरी परततात. संसार मोडतात आणि परित्यक्ता महिलांचे प्रश्न तयार होतात. पाटील यांनी गुन्हे दाखल न होऊ देता पती-पत्नी, सासर-माहेरची माणसं यांचं समुपदेशन करून अनेक संसार जुळवले आहेत. यासाठी त्यांनी जवळपास ८० कार्यक्रम घेतले.
आणीबाणीच्या प्रसंगात महिलांना तातडीने मदत मिळावी यासाठी पोलीस खात्याने 'प्रतिसाद' नावाचं मोबाईल ऍप तयार केलं आहे. पाटील यांनी शाळा-कॉलेजं आणि महिला मंडळात कार्यक्रम घेऊन त्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आज अनेक विद्यार्थिनी, महिला हे ऍप वापरतात. यातला नंबर फिरवला की संकटात सापडलेल्या महिलेच्या चार नातेवाईकांच्या मोबाईलवर मेसेज जातो. पोलिसांनाही लोकेशन कळतं आणि तत्काळ मदत मिळू शकते.
जनतेला पोलीस आपले मित्र वाटावेत यासाठी त्या विविध कार्यक्रमात भाग घेतात. पोलीस-नागरिक संबंध विश्वासाचे व्हावेत म्हणून सोशल पोलिसिंगचे अनेक उपक्रम त्यांनी सुरू केले. सोशल पोलिसिंग फायद्याविषयी श्रीदेवी पाटील म्हणतात, "अनेकदा लोक बंदोबस्तात, गुन्ह्याच्या तपासात मदत करतात. त्यांना सामील करून घेतल्याने त्यांचा खाकीबद्दलचा विश्वास वाढतो आणि गुन्हेगारांना तातडीने गजाआड करता येतं".
त्यांचं पोलीस खात्यात येणं, तळमळीने काम करणं याविषयी त्यांनी सांगितलं, "‘माझे वडील बळीराम पाटील मुख्याध्यापक होते. त्यांनी आम्हा भावंडात, मुलगा-मुलगी असा कधीच फरक केला नाही. बुलढाणा जिल्ह्यातलं मोताळकर पोफळी हे माझं गाव. नवोदय विद्यालयात मी शिकले. आयएएस व्हायचं माझं ध्येय होतं. म्हणून बारावीनंतर मी पुण्याला आले. एलएलबी केलं. पीएसआय परीक्षा दिली आणि निवडली गेले."
महिला पोलीस अधिकारी म्हणून त्या कुठल्याच सवलती घेत नाही. मृत देहाचा पंचनामा, खुनाचा तपास, पोलीस बंदोबस्त, गुन्हेगारांशी सामना अशी कामं त्या आव्हान म्हणून स्वीकारतात. या नोकरीत कामाची वेळ ठरलेली नसते. नेहमी अलर्ट राहावं लागतं. रोजच झोपायला बारा-एक वाजतो. तरीही या कामात समाधानी असल्याचं त्या सांगतात.
श्रीदेवी पाटील
- सु.मा.कुळकर्णी.

७५ वर्षांची जीवनदायिनी

धुळे शहरातील मालेगाव-चाळीसगाव रस्त्याला जोडणारा हा ५० फुटांचा रस्ता. या रस्त्याचे काम सुरु होते. आणि मध्ये अडथळा ठरत होती ती जिवंत पाण्याचा झरा असलेली विहीर. विहिरीचा ७५ टक्के हिस्सा रस्त्यात येत असल्याने ती बुजवण्याशिवाय पर्याय नव्हता. काय करायचं?
तेव्हा स्थानिक नगरसेवक सतीश महाले यांनी विहीर बुजू द्यायची नाही असा निर्णय घेतला. आणि संबंधित ठेकेदाराला तशा सूचना दिल्या गेल्या. ही विहीर तब्बल ७५ वर्ष जुनी. याच विहिरीतून उन्हाळ्याच्या दिवसांत धुळे शहर आणि ग्रामीण भागाला पाणी पुरवलं जातं. 

ही विहीर वाचविण्यासाठी एक ऍक्शन प्लॅन तयार केला गेला. एखादा पूल बांधण्यासाठी तयार करतात तसा आराखडा तयार केला गेला. विहिरी वरूनच गटार बांधण्यात आली. आता रस्त्यात येणाऱ्या विहिरीवर सिलिंग टाकलं जाणार असून विहिरीचा एक चतुर्थांश भाग खुला राहणार आहे. उर्वरित हिस्सा गटार आणि रस्त्यात झाकला जाणार आहे. या रस्त्यावरून पन्नास टन वजनाचा ट्रक गेला तरी ते वजन सिलिंग अलगद उचलेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. विहिरीचे पाणी काढता येईल आणि विहिरीत अससेल्या मासे, कासवांना ऊन मिळेल असं काम इथे करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे विहिरीजवळ सुरक्षा कठडे बांधण्यात येणार असून गरजवंतांना टँकरने पाणी पुरवठा करण्याचं काम अव्याहत सुरु राहणार आहे. 
पाण्याचा एक एक स्रोत अनमोल आहे तो जोपासला पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे, ही धुळेकरांना झालेली जाणीव महत्त्वाची. 
- प्रशांत परदेशी.

Sunday 14 May 2017

शेतीशाळा


सागर जाधव एका कंपनीत इंजिनिअर. चांगली नोकरी असली तरी व्यवसायाची आवड. त्याला शेळीपालन हा व्यवसाय सुरु करायचा होता. तो म्हणतो, मी विविध संस्थांमधून माहिती मिळवली पण ती सविस्तर नव्हती. तेवढ्यात मला 'संडे स्कुल ऑफ ऍग्रो एंटरप्रेनरशिप'बद्दल माहिती मिळाली. तिथे 'शेळीपालन' कार्यशाळेसाठी नाव नोंदवलं. आणि माझा उद्देश सफल झाला. हा व्यवसाय कसा करावा, शेळीपालनाच्या पध्दती, शेळयांसाठी निवारा, आहार, आजार याबरोबरच लसीकरण व बाजारपेठ अशी सगळीच माहिती मिळाली. शंकानिरसन झालं आणि आता शेळीपालन व्यवसायात याचा मला फायदा होत आहे’.


कृषी व पूरक उद्योगांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांना उद्योग उभारणीसाठी प्रोत्साहन देण्यासाठीच हा उपक्रम सुरु झाला. नाशिक येथील ह्युमन सर्व्हिस फाउंडेशनची ही संकल्पना. संस्थेचे अध्यक्ष आहेत संजय न्याहरकर. प्रत्येक महिन्यांच्या दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी नाशिक इथं ही कार्यशाळा भरते. कृषी व कृषी संबंधित शेळीपालन, दुग्धव्यवसाय, मधुमक्षिकापालन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, कृषीपर्यटन, नर्सरी, पॉलीहाऊस/शेडनेटशेती, बेकरी, लँडस्केपिंग, शेतकरी उत्पादक कंपनी, सफरचंद, बोर, ड्रॅगन फळ, अंजीर लागवड, सेंद्रिय शेती यांसह विविध व्यावसायिक विषयांवर मार्गदर्शन केले जाते. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक यासाठी उपस्थित असतात. आजपर्यंत शेळीपालन, कुक्कुटपालन, मत्स्यशेती, हायड्रोपोनिक चार निर्मिती या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली आहे. 
संजय न्याहरकर म्हणतात, कृषी हे कष्टाचं क्षेत्र. याला तंत्रज्ञानाची जोड द्यायला हवी. तसंच जोडधंदाही हवा. त्यामुळे अनेक नव्या संधी निर्माण होतील. रोजगार निर्मितीही यातून शक्य आहे. तरीही आज युवक याकडे वळताना दिसत नाहीत. बेरोजगार तरुणांना कृषी व जोडधंद्याची माहिती उपलब्ध करून दिली तर ते स्वतःचा उद्योग सुरु करू शकतात, याच उद्देशाने 'संडे स्कुल ऑफ ऍग्रो एंटरप्रेनरशिप' ची सुरुवात डिसेंबर २०१६ मध्ये केली’.
या उपक्रमातून कृषी क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या युवकांना प्रोत्साहन देण्यात येते. कौशल्यावर आधारित कृषी व कृषिपूरक व्यवसायाचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले जाते. स्वयंरोजगार निर्मितीसाठी सहकार्यही केले जाते.


- मुकुंद पिंगळे.

सुजाण शिक्षक, जाणत्या शाळा

 रविना- पायल आता शाळेत चांगल्याच रमल्या आहेत.
महाराष्ट्रातील टोकाचा गडचिरोली जिल्हा. गडचिरोलीपासून १२८ किमि दूरचा अहेरी तालुका. या अहेरीपासून १२ किमि आत वसलेलं मोदुमडगू गाव. गावात एकुलती एक प्राथमिक जिल्हा परिषद शाळा.
मोदुमडगू गावात २०१६च्या जुलैमध्ये भटक्या समाजातलं मावरे कुटुंब दाखल झालं. आपल्या तीन मुली आणि आजींना घेऊन नवरा- बायकोनं एका झोपडीत संसार थाटला. फायबरच्या खुर्च्या आणि छोट्या-मोठ्या वस्तू आसपासच्या गावांमधे विकून ते पोटाची खळगी भरू लागले.
कुटुंब तर गावात राहतंय, पण त्यांच्या मुली मात्र शाळेत येत नाहीत, हे शाळेतील श्रीनिवास गौतम सरांच्या लक्षात आलं. शाळेने साधनव्यक्ती सुषमा खराबे आणि अहेरीच्या गटशिक्षणाधिकारी निर्मला वैद्य यांच्या हे लक्षात आणून दिलं. सगळ्यांनाच बाब गंभीर वाटली. खराबे मॅडम आणि वैद्य मॅडम यांनी थेट मोदूमडगू गाठलं. गाववेशीजवळच्या मावरे कुटुंबाच्या झोपडीत प्रवेश केला आणि घरात असलेल्या आजींना नाती शाळेत का येत नाहीत, याबद्दल विचारणा केली. "साळा? आमच्या पोरींनी तर जल्मापासून कदी साळंच त्वांडच पाह्यलं नाय. बगा.. त्या कंदीच साळंला गेल्या न्हाईत. आमच्याकडं येवढा पैका न्हाय पोट्ट्यांना साळंत पाठवाया!” आजींचं उत्तर. 
आजींकडून आणखीही कळलं की, मावरे कुटुंब मूळचं चंद्रपूरमधल्या नागभीड तालुक्यातलं, बहुरूपी समाजातलं. पण पारंपरिक बहुरूपी कलेवर पोट भरत नाही, म्हणून आता फायबरच्या वस्तू विकण्याच्या व्यवसायाकडे वळलं होतं. मात्र आपण गरीब आहोत, म्हणून नाती शाळेत जाऊ शकत नाहीत, हा आजींचा गैरसमज होता. 
गटशिक्षणाधिकारी वैद्य मॅडम यांनी आजींना समजावलं. प्रत्येक मुलामुलीने शिक्षण घेतलं पाहिजे. तो त्यांचा हक्क आहे. देशात 'शिक्षण हक्क कायदा' मंजूर झाला आहे. योग्य शिक्षण घेतलं तर मोठेपणी गरिबीत राहावं लागणार नाही. शिकून मुली स्वतः कमवू शकतील...हे त्यांनी आजींना सांगितलं. शेजारी शांत उभ्या असलेल्या आजीच्या नाती रविना आणि पायल मॅडमचं बोलणं ऐकत होत्या. खराबे मॅडमही आजींना समजावत म्हणाल्या, “आजी, मुलींना शाळेत पाठविण्यासाठी पैसे लागत नाहीत. मुलींना गणवेष मिळतो. शाळेत दुपारी जेवायलाही मिळतं. मुलींचं शिक्षण सरकारकडून मोफत होतं. दप्तर, पुस्तकं सगळं आम्हीच देऊ. तुम्हाला कसलाच खरच येणार नाही... ”मॅडमचं बोलणं ऐकून आजींच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. मुलींचे डोळे लकाकायला लागले.. “आमाला खरंच नवीन कापडं मिळतील साळंत आलो तर? जर नवीन कापडं मिळणार असतील तर आमी आजपासूनच साळंला येतो.” रविना आणि पायल एका सुरात म्हणाल्या.
खराबे मॅडमना खूपच आनंद झाला. मुलींना घेऊन त्या ताबडतोब दुकानात गेल्या आणि त्यांनी दोन नवे गणवेश खरेदी केले. मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन रविना आणि पायल यांना शाळेत समारंभपूर्वक दाखल करून घेण्यात आलं. नातींच्या शाळाप्रवेशाच्या प्रसंगी आजी हजर होत्या. मुलींचं कौतुक आणि त्यांना मिळालेला नवाकोरा गणवेश पाहून आजींचे डोळे पाणावले.
सुरूवातीला लाजणाऱ्या रविना- पायल आता शाळेत चांगल्याच रमल्या आहेत.
लेखक - नकुल लांजेवार, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोसबी, तालुका आरमोरी, गडचिरोली.

बोंढारची शाळा


नांदेड तालुक्यातलं नेरली कुष्ठधाम. इथून जवळच बोंढार इथं जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा. २०१० पासून नांदेड जिल्ह्यातल्या ११ शाळा ब्रिटीश कौन्सिलशी जोडल्या गेल्या. विशेष म्हणजे, बोंढारमधल्या या शाळेने राज्यातील ४२ शाळांशी स्पर्धा करीत, 'ब्रिटीश कौन्सिल इंटरनॅशनल अवार्ड (२०१०) मिळविलं. याचं श्रेय आहे, मुख्याध्यापक राजाराम राठोड, सहकारी अश्विनी कौरवार, केशवराव अरसुळे, सरपंच देऊबाई बैकरे, शिक्षक आणि ग्रामस्थांना.
पहिली ते पाचवीपर्यंतची ही शाळा. विद्यार्थी आहेत केवळ ४२. एक मुख्याध्यापक, दोन शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याकडे व्यक्तिगत लक्ष देतात. ज्ञानरचनावादावर आधारित इथली शिक्षणपद्धती. गाणी, चित्रकला आणि खेळातून इथली मुलं शिकतात. बालाजी कछवे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'ब्रेनजिम' अर्थात मेंदूच्या व्यायामशाळेत मुलं अनेक भाषा शिकत आहेत. अगदी १५० पर्यंतचे पाढेही तयार करतात. उलटी सुलटी उजळणी इथल्या मुलांना मुखोद्गत आहे. सुटीच्या दिवशी, शाळा सुटल्यावर मुले गटागटाने अभ्यास करतात. मोठी मुले लहान मुलांचा अभ्यास घेतात. एकत्र मिळून खेळतात, असे शालेय समितीचे अध्यक्ष चंदू बागल सांगत होते.
ब्रिटीश कौन्सिलच्या इंटरनॅशनल स्कुल अवार्डच्या तयारीविषयी शाळेचे माजी-आजी मुख्याध्यापक गोविंद उपासे आणि राजाराम राठोड यांनी समजावून सांगितले. या अवार्डची नामांकन फी २० हजार रुपये आहे. ही फी राठोड सरांनी भरली. 
युकेमधील मँचेस्टर शहरापासून ६५ किलोमीटरवरील लिव्हरपूल येथील 'हाटन हिल प्रायमरी स्कुल' आणि बोंढार येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळा यांच्यात विविध ऍक्टिव्हिटी संदर्भात सतत मेल, पोस्ट, भेटीगाठीद्वारे व ऑन लाईन आंतरक्रिया सुरु असते. तसंच वर्षभर विद्यार्थी, शिक्षक, पालक, अधिकारी यांच्यात देखील या प्रकल्पाचे उद्दिष्टानुरूप तारखेनुसार नियोजन, अंमलबजावणी, अधिकारी, पालक यांच्या भेटी, परीक्षण, तपासण्या असा भरगच्च कार्यक्रम असतो.
विद्यार्थ्यांत पर्यावरण विषयक जाणीवजागृतीसाठी आंतरराष्ट्रीय निकष आहेत. त्यानुसार वृक्षारोपणापूर्वी, विद्यार्थ्यांना जवळच्या जंगलात नेतात. झाडांचे महत्त्व निरीक्षणातून, चर्चेतून, नेट सर्चिंग, भाषण, निबंध, चित्रकला आणि फोटोच्या स्पर्धा घेऊन पटविले जाते. नंतर झाडे लावणे, रोपे दत्तक घेणे, ती जोपासणे वनस्पती व विविध वृक्षांचा अभ्यास, भारतातील व यू केमधील वृक्ष, फुले,फळे, पाने, हवामान, आदींचा तुलनात्मक अभ्यास, यावर लेखी-तोंडी परीक्षा, प्रश्नमंजुषा स्पर्धा घेतल्या जातात. परितोषिकेही दिली जातात. म्हणूच बोंढार शाळेत, परिसरात, गावात लावलेली सुमारे हजार झाडे जगली आहेत. विद्यार्थ्यांचे हे प्रकल्प यु केच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना व त्यांचे प्रकल्प येथील विद्यार्थ्यांना मेल, पोस्ट यांच्याद्वारे पाठविले जातात. 

बालचित्रकलेची प्रदर्शने दोन्हीकडे भारतात. स्पोर्ट्स, लाईफ स्टाइल, ऐतिहासिक वारसा, रुढी परंपरा, सण उत्सव, सांस्कृतिक जीवन, भविष्यातील गरजा असे विविध उपक्रम चालतात. 
राठोड सर आणि दिलीप बनसोडे (सध्या मनपाचे शिक्षणाधिकारी), अश्विनी कौरवार यांनी यु केच्या हाटन हिल प्रायमरी शाळेला भेट दिली आहे. प्रत्येक वर्गात मुलांनी तयार केलेली शैक्षणिक साधने, प्रोजेक्टर एल सी डी संगणक, फरशीवर काढलेले रंगीत खेळ याद्वारे शास्र, कला, भाषा, गणित, भूगोल विषय हे विद्यार्थी शिकत असतात.
शिक्षण फक्त शाळेपुरतं मर्यादित राहिलं नाही. मुलांनी गावही बदलून टाकलं आहे. बोंढार गावात आणि रस्त्याच्या दुतर्फा १६०० झाडे लावली आहेत. विद्यार्थी, शिक्षक व गावकऱ्यांनी एकत्र येत आसना नदीवर जिल्ह्यातील सर्वात मोठा चाळीस फुटांचा वनराई बंधारा बांधला आहे. त्यामुळे बोंढार गाव टॅंकर मुक्त झाले आहे. त्यामुळे उन्हाळ्यातही शेती पिकू लागली आहे.
या शाळेला २००८-२००९ मध्ये जिल्हा परिषदेचा सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कार, २०११ मध्ये सानेगुरुजी स्वच्छता शाळा पुरस्कार मिळाला आहे. ग्रामपंचायतीला मिळालेला सौरऊर्जेवर चालणारा विद्युतपंप शाळेला दिल्याने ही शाळा ग्रीन स्पॉट बनली आहे.
- सुरेश कुलकर्णी, नांदेड

दुर्मिळ रक्तदाता झाला जीवनदाता


मागच्याच महिन्यात आठ तारखेला रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालयात अंजली हेळकर प्रसूतीसाठी दाखल झाली. चिरेखाणीवर काम करणाऱ्या अंजलीची हिमोग्लोबिन पातळी होती केवळ सहा. त्यामुळे प्रसूतीसाठी रक्त पुरवणे गरजेचे होतेच. लगेचच रक्तगटाची तपासणी केली गेली. आणि रिपोर्टमध्ये'ओ' पॉझिटिव्ह रक्तगटाची नोंद झाली. सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. पण खरी मेख पुढेच होती. 'ओ' गटाचे रक्त चढवण्यासाठी 'मॅच' करण्यात आले पण ते मॅच झालेच नाही. नेमका काय प्रकार झाला हे कळेना. मग पुन्हा एकदा लॅब टेक्निशियन आणि वैद्यकीय टीमच्या सल्ल्याने एक टेस्ट केली गेली. या टेस्टनंतर कळलं की हा 'बॉम्बे ब्लड ग्रुप' आहे. आता मात्र सगळे हादरले. कारण हा अत्यंत दुर्मिळ रक्तगट. 
जगभरात केवळ 30 हजार लोक या रक्तगटाचे आहेत. त्यातले भारतात केवळ 179. या रक्तगटाचा शोध मुंबईत लागल्यामुळे त्याला ‘बॉम्बे ब्लड' ग्रुप हे नाव मिळाले.
आता रत्नागिरीत हा रक्तगट कुठे आणि कधी मिळणार हा प्रश्न होता. मग सोशल मीडियावर या रक्तगटाची गरज असल्याचा मेसेज फिरवण्यात आला.
योगायोगाने सांगलीच्या विक्रम यादव या तरुणाच्या हाती हा मेसेज पडला. विक्रमचा स्वतःचाच
रक्तगट होता बॉम्बे ब्लड. मेसेज वाचताच विक्रमने चक्क दुचाकीवर रत्नागिरी गाठले. त्वरित रक्त मिळाल्याने आज अंजली आणि तिचे बाळ सुखरूप हाती लागले आहे. नंतर विक्रमचा जिल्हा शासकीय रूग्णालयामार्फत सत्कारदेखील करण्यात आला. रत्नागिरी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. आर. आरसुळकर सांगतात, हिमोग्लोबीन कमी असल्याने अंजलीची परिस्थिती नाजूक होती. तिला रक्त दिलं गेल्याने तिच्यात लवकरच सुधारणा होईल. बॉम्बे ब्लड ग्रुप असल्याचे लवकर कळत नाही. सुरूवातीला तो ओ पॉझिटीव्ह म्हणून दाखवतो मात्र ओ पॉझिटीव्ह जेव्हा मॅच होत नाही तेव्हा तो बॉम्बे ब्लड ग्रुप आहे का, याची खात्री करावी लागते.
बहुतेकांना ओ, बी, ए पॉझिटीव्ह- निगेटीव्ह ब्लड ग्रुप माहिती असतात. पण यापलीकडे आणखी एक ब्लड ग्रुप असेल याची माहिती फारशी नसते. देशातील नाही तर संपूर्ण जगातील दुर्मिळ असा हा ‘बॉम्बे ब्लड ग्रुप'. या गटाचे रक्तदाते अत्यंत कमी असल्यामुळे हे रक्त उपलब्ध करणे ही मोठी समस्या आरोग्य यंत्रणेला भेडसावते.
आपला रक्तगट दुर्मिळ आहे हे विक्रमही जाणून आहे. स्वत:च्या दुचाकीमागे त्याने ठळक अक्षरात ‘बॉम्बे ब्लड ग्रुप मोफत सेवा' असे लिहूनच ठेवले आहे. सामाजिक बांधिलकीतून विक्रम करत असलेले कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. विक्रम सांगतो, 'माझा ब्लड ग्रुप जगातील दुर्मिळ गट असल्याची कल्पना असल्यानेच मी मदतीसाठी आलो. रक्तदान केल्याने माझे रक्त कमी झाले नाही तर वाढले आहे. तसेच आता मला एका मातेचे, बाळाचे आशिर्वाद लाभले आहेत'.


- जान्हवी पाटील, रत्नागिरी

मी जिंकणारच..”

“आम्ही फक्त किडनी, ह्रदय किंवा कर्करोग - अर्थात ज्यामुळे मरण येईल, अशाच आजारांसाठी - आर्थिक मदत करतो. त्यामुळे तुम्हाला मदत करू शकत नाही. – मदतीच्या अपेक्षेत असताना हे वाक्य कानावर आलं आणि अपूर्वाचा जन्मापासूनचा प्रवास आठवला. जी व्यक्ती यंत्राशिवाय ऐकू - बोलू शकत नाही तिचं जगणं म्हणजे मरणच नाही का?” भाग्यश्री पाटील यांचा सवाल अस्वस्थ करणारा. 
अपूर्वा ही नाशिकच्या भाग्यश्री पाटील यांची गोड लेक. जन्मतःच कर्णबधीरत्व, ह्रदयाला छिद्र. चिमुकल्या देहाने अवघ्या ११ वर्षात अपेंडीक्स आणि ऐकू येण्यासाठी केलेल्या शस्त्रक्रिया सोसलेल्या. अपूर्वा पाच वर्षांची होती. आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत हिच्या हातातलं पिस्तुल पाहून तिच्या मनात कुतूहल जागं झालं. आज तिने राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधीत्व करण्याचा टप्पा गाठला आहे. 

जन्माने आणि परिस्थितीने दिलेल्या प्रतिकूलतेवर जिद्द आणि चिकाटीने मात करत अपूर्वा नेमबाजीप्रशिक्षण पूर्ण करत आहे. भाग्यश्री सांगतात, “अपूर्वा विशेष मुलगी असल्याने सुरूवातीपासूनच सासरच्या मंडळीनी तिला चांगली वागणूक दिली नाही. दुसर्याल अपत्याचा विचार कर, असा सल्ला नातेवाईक देत राहिले. अपूर्वासाठी एवढा मोठा वैद्यकीय खर्च कशासाठी करायचा, हा नातलगांच्या नजरेतला टोकदार प्रश्न घायाळ करायचा. शाळेतही, ती विशेष मुलगी असल्याने होणारी हेळसांड पाहता तिला भोसला शिशु विहारमध्ये घातलं. याच काळात तिला सहज ऐकता यावं, यासाठी श्रवणयंत्र बसविण्याची शस्त्रक्रिया झाली. ऎकू येण्यातले अडथळे कमी झाले. शिक्षकांच्या प्रोत्साहनामुळे शिकण्याची, जिंकण्याची, काही करण्याची ऊर्मी निर्माण झाली. नकळत्या वयात अपूर्वाला लेखनाचा छंदही जडला. तिची नेमबाजी शिकण्याची ओढ पाहून सातपूर क्लब हाऊसच्या मोनाली गोर्हे यांना प्रशिक्षणासाठी विचारलं. त्यांनी अपूर्वाला विनामूल्य शिकवायचं ठरवलं. मोनाली यांचे प्रयत्न, डॉ. घाटगे यांचं मार्गदर्शन, यामुळे अपूर्वा विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करू लागली. तिला चार सुवर्ण पदकांसह अनेक सन्मान मिळाले आहेत.”
अपूर्वा म्हणते, “मला ऑलिंपिकमधल्या अपंगासाठी असलेल्या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधीत्व करायचं आहे. माझं आजारपण निभावताना आई-बाबांची दमछाक होते, हे समजतं मला. पण त्यांचे कष्ट मला प्रेरणा देतात. आणि मला विश्वास आहे - मी जिंकणारच..”
भाग्यश्री सांगतात, “अपूर्वा खूपच समजुतदार आहे. तिचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी मी केवळ भार वाहणारी आहे. मात्र, त्यासाठी आमच्या आर्थिक विवंचना संपल्या पाहिजेत.”
अपूर्वाच्या उपचारांवरच्या खर्चासाठी सुरूवातीला काही सामाजिक संघटनांनी, नातेवाईकांनी मदत केली. पण नंतर अनेकांनी पाठ फिरवली. वर्षाकाठी ५० ते ६० हजार रु उपचारांनाच लागतात. त्याखेरीज नेमबाजीप्रशिक्षण, पोहणं आणि अन्य उपक्रम असतात. खर्च कुठून करायचा?
अशाही स्थितीत अपूर्वा जून महिन्यात होणार्‍या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राज्याचं प्रतिनिधित्व करणार आहे. त्यासाठी सर्व निकषांवर ती पात्र ठरली आहे. फक्त स्वतःचं पिस्तुल या एका गोष्टीसाठी अडलं आहे. सध्या भाग्यश्री पाटील या खर्चासाठी पैसे उभे करण्याच्या प्रयत्नात आहेत.
प्रवास पालकत्वाचा – भाग्यश्री पाटील

सोशल मिडियाबद्दल पसरलेल्या निगेटिव्हिटीला ‘नवी उमेद’ हे प्रभावी उत्तर

नवी उमेद वर्षपूर्ती 
टीमचं मनोगत
सोशल मिडियाबद्दल पसरलेल्या निगेटिव्हिटीला ‘नवी उमेद’ हे प्रभावी उत्तर आहे :
आशय गुणे,`नवी उमेद' टीमचे अनौपचारिक मार्गदर्शक, प्रथम या संस्थेत कार्यरत.
गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या एका संध्याकाळी मला मेधाताईंचा फोन आला. "अरे आशय, आम्हाला 'संपर्क'चे फेसबुक पेज चालविण्यासाठी कुणीतरी हवे आहे. तुझ्या ओळखीचे कुणी आहे का?" मी क्षणभर विचारात पडलो. पण मग म्हटलं, "मीच करतो की!" आणि मी प्राथमिक कामाला सुरुवात केली. ‘संपर्क’मध्ये हेमंत कर्णिक आहेत, हे मला त्याच दिवशी कळलं. ते माझ्या फेसबुक फ्रेंडलिस्टमध्ये होते, पण प्रत्यक्ष भेट झाली नव्हती.
हे सगळं अगदी मागच्याच वर्षी झाले आहे, ह्यावर खरं तर विश्वासच बसत नाही. 'नवी उमेद'च्या टीमसोबत जुळलेलं 'ट्युनिंग' हे खूप आधीपासून आहे, असं वाटतंय.
सोशल मीडिया, आणि विशेषतः फेसबुक हे आज अतिशय महत्वाचे माध्यम आहे. पण हे किती लोकांच्या लक्षात येते? आपण सगळेजण फेसबुकवर सक्रीय असतो. अनेक विषय वाचतो आणि त्या विषयांवर आपले मतदेखील व्यक्त करतो. पण आपल्या ह्या मताद्वारे आपण काही विधायक करू शकतो का? इंटरनेट हा माहितीचा साठा आहे, हे मान्य. पण ह्या माहितीची किंवा त्यातून सुचत असलेल्या कल्पनांची देवाणघेवाण झाली तर? तर हे नक्कीच आपल्या सर्वांच्या फायद्याचे ठरेल. शिवाय, सोशल मिडियाबद्दल जी काही निगेटीव्हीटी समाजात पसरलेली आहे त्याला हा असा सकारात्मक वापर, हे नक्कीच एक प्रभावी उत्तर असेल.
आणि म्हणता म्हणता एक प्लॅन तयार झाला. पेजसंबंधित कामं आणि माहिती ह्यासाठी एक विशेष ग्रुप वॉट्सअप वर तयार झाला. पॉझिटिव्ह स्टोरीज पेजवर शेअर अथवा प्रकाशित करायच्या, हे ठरल्यानुसार सुरू झालं. त्याला थोडा प्रतिसाद मिळू लागला. आणि मग वाटलं, जर आपलं पेज महाराष्ट्रातून चांगल्या घडामोडी एकत्रित करण्याचा एक प्लॅटफॉर्म म्हणून समोर आलं तर?
संपर्कचे काही कार्यकर्ते, पत्रकार होतेच. त्यांचा संस्थेशी ऋणानुबंध असल्यामुळे त्यांनी हे काम सुरुवातीला हाती घेतलं. आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या काही भागातून सकारात्मक घडामोडी येऊ लागल्या. आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला. मग आणखी काही जिल्ह्यांतले पत्रकार टीममध्ये सामील झाले. स्टोरीला लाईक्स मिळू लागल्या आणि लोकं त्या शेअर करू लागले. ह्याचा अर्थ असा की फेसबुकद्वारे सकारात्मक गोष्टी 'शेअर' होऊन अनेक लोकांपर्यंत पोहोचू लागल्या. आणि आमचा उत्साह वाढला. आम्ही लगेच जून महिन्यात फेसबुक वापरण्याबद्दल आमच्यातच एक वर्कशॉप घेतलं. आमच्या ह्या मित्रांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आणि आता सगळे फेसबुकवर सक्रिय झाले आहेत.
दरम्यान मी माझा फोन नंबर नवी उमेद पेज च्या 'contact us' मध्ये टाकला. कधी कधी फोन येतो, "नमस्कार, मी लातूरहून बोलतो आहे. सोलापूरच्या अबक ह्यांनी लिहिलेली स्टोरी वाचली. आवडली. मला माझ्याकडे तिचे अनुकरण करायचे आहे. त्यांना संपर्क करायचा आहे...” पेजचा उद्देश सफल होताना पाहणं हा नक्कीच एक वेगळा आनंद आहे!

Thursday 4 May 2017

पोस्टवरच्या लाइक्सपेक्षा इंपॅक्ट महत्वाचा, हे कळलं

नवी उमेद वर्षपूर्ती 
टीमचं मनोगत
बघता बघता नवी उमेदला आणि मलाही उमेदसोबत काम करायला लागून एक वर्ष पूर्ण झालं. नेहमीपेक्षा वेगळं काम म्हणून ही जबाबदारी घेतली. पेजचं काम सुरू केलं तेव्हा मी कुणा मित्र-मैत्रिणींचे फोटो लाईक करणं, क्वचितच कमेंट करणं, जुन्या शाळा-कॉलेजातल्या मित्र-मैत्रिणींशी पुनर्भेट एवढ्यापुरतंच फेसबुक वापरत होते. जरा नवीन कुणाची फ्रेंड रिक्वेस्ट आली तरी ओळखीचं नसताना नकोच ऍक्सेप्ट करायला, असा विचार करायचे. 
नंतर जसं रोज फेसबुकवरचं पेज हँडल करायला लागले तशी मला या माध्यमाची ताकद जाणवायला लागली. म्हणजे एक पोस्ट होती, ‘मुलींच्या नावाच्या पाट्या’ ही. ती प्रसिद्ध झाली. नंतर एक-दोन दिवसातच पोस्टनायक दादाभाऊ जगदाळे यांचा फोन आला. त्यांच्या कामाविषयीची पोस्ट शेअर होत होत जालना सीईओपर्यन्त पोचली होती. त्यांनी त्याच दिवशी दुपारी दादाभाऊना बोलावून घेतलं, त्यांचं कौतुक केलं आणि जिल्ह्यात ही योजना राबविण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली. दादाभाऊ अगदी भारावून गेले होते. तुमच्यामुळे आणि नवी उमेदमुळे हे घडू शकलं, असं म्हणत राहिले. या प्रसंगामुळे माणसाला पाठिंब्याची, पाठीवर कुणाचा तरी हात असण्याची किती गरज असते आणि त्यातून पुढं काम करायचीही ऊर्जा मिळत राहते, हे जाणवलं. अर्थातच ती ऊर्जा माझ्यापर्यंतही पोहोचली.
माझं काम आलेल्या लेखांच्या संपादनाचं, तो थोडक्या शब्दांत पोस्टमध्ये रूपांतरित करायचा. लेख अशासाठी म्हणते, कारण माझ्यासह सगळ्यांनाच भारंभार लिहायची सवय. पण निरीक्षणातून हे लक्षात आलेलं की ‘रीड मोअर’ आलं की वाचक पुढे जात नाहीत. इतका पेशन्स आता कुणामध्येच नाही. म्हणून मग पोस्ट 700-800 वरून 500 शब्दांपर्यत आणली. फेसबुकने सांगितलं की वाचकांमध्ये मोबाईलवर वाचणारे अधिक आहेत. मग मोबाईलच्या स्क्रीनवर पटकन वाचता येणारी छोटीच गोष्ट हवी हे लक्षात आलं. जास्त शब्दांत आपण जेवढा आशय व्यक्त करतो तोच कमी शब्दातही सांगू शकतो हे मला तेव्हाच जाणवलं. आता मी योग्य आशय थोडक्या शब्दातही वाचकांपर्यंत पोचवू शकते. आत्तापर्यंत मी काम केलं होतं ते फिचर एजन्सीसाठी, साप्ताहिक किंवा क्वचित कधी पेपरसाठी. संपर्कसोबत पुणे प्रतिनिधी म्हणूनही काम केलं होतं. पण उमेदनी मला एकाचवेळी संपादक आणि समन्वयक अशा दोन्ही जबाबदाऱ्या दिल्या. समन्वयक म्हणून एकाचवेळी 20-22 जणांशी संपर्कात राहायचं, विषयांची चर्चा करायची, त्यांना एकत्र बांधून ठेवायचं, टीमस्पिरिट टिकवायचं, ही खरी माझी परीक्षा. पण माझ्या टीमनं नेहमीच सहकार्य केलं. एकदा विषयांचे निर्णय झाल्यावर सगळ्यांनीच त्यानुसार काम केलं, नवं काही सुचवलं आणि स्वतःहून सतत संपर्कात राहिलेसुद्धा.
पेजच्या कितीतरी तांत्रिक बाबी सुरुवातीला कळायच्या नाहीत. हळूहळू पोस्टचा ‘रिच’ किती, वाचक संख्या, पोस्ट आधीच draft करून ठेवणं, नंतर त्या शेड्युल करणं यामुळं काम खूपच सोपं झालं. फेसबुकने ही शिस्त घालून घ्यायला एक प्रकारे मदतच केली. तांत्रिक बाबी शिकताना कळलं की पोस्टला मिळालेल्या लाईक हा एक अगदीच छोटा, खरं तर दुर्लक्षित करण्याचा भाग आहे. खरं महत्त्व आहे ते कमेंटला आणि शेअर होत होत घडून येणार्याो इंपॅक्टला.
उमेदचं काम सुरू असतांनाच आम्ही विकासपिडियासह वेबलेखन प्रशिक्षण शिबीर आयोजित केलं. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. उमेदला काही नवे लेखकही यातून गवसले.
वर्षपूर्तीनिमित्ताने हे सगळं शेअर करावंसं वाटलं. सोशल मिडियावरच्या नव्या प्रयोगात सहभागी होण्याचं मोठं समाधान वाटत आहे. वाचकांचा छान प्रतिसाद मिळत आहे. लहान मुलं-मुली हा आमचा फोकस आहे. लवकरच आम्ही काही नव्या कल्पना घेऊन येऊ. शेवटी मला आमच्या जिल्हा प्रतिनिधींचे खास आभार मानायचे आहेत खास. सलग वर्षभर नवनवीन विषय शोधून ते उत्साहात लिहीत राहिले. त्यांच्या पोस्टसने पेजचा प्रभाव वाढत आहे.
 : वर्षा जोशी-आठवले, संपादक-समन्वयक



निसर्गाला हवी परतफेड : त्यासाठी माती, पाणी आणि पिकांत केले प्रयोग

परभणी तालुक्यातलं झरी गाव. इथं राहणाऱ्या कांतराव देशमुख यांनी स्वतःच्या शेतीत प्रयोग केलेच. पण गावालाही सोबत घेत त्यांनी परिसरात जलसंधारणाची कामं केली. त्यामुळे हा परिसर पाण्याच्या बाबतीत स्वयंपपूर्ण बनला आहे. 
कांतरावांनी शेतीत लक्ष घालायला सुरुवात केली ७८ साली. त्यांच्याकडे एकूण ५५ एकर शेती. सुरुवातीला ते पारंपारिक पिकंच घेत. गहू, ज्वारी, तूर, मुग, सोयाबीन ही पिकं घेतली. कितीही कष्ट केले तरी उत्पन्न वाढत नाही. त्यामुळे ही शेती परवडणार नाही, हे त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी वेगवेगळे प्रयोग करून पाहिले. मुख्य पिकांमध्ये आंतरपिकं घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे उत्पादनात वाढलं, तरी उत्पन्न वाढत नव्हतं. मग जरा वेगळ्या वाटेवर चालायचं ठरवलं. जे विकतंय त्याचंच उत्पादन घ्यायचं त्यांनी ठरवलं. मग विविध ठिकाणच्या यशस्वी शेतकर्‍यांच्या त्यांनी भेटी घेतल्या. बाजारपेठांची माहिती करून घेतली. आणि मोसंबीची लागवड केली. सुरूवातीला पावणेचार एकरावर लावलेली मोसंबी पुढे ५० एकरापर्यंत वाढवत गेले. 

आता जवळपास ४० वर्ष ते मोसंबीचं उत्पादन घेत आहेत. तीन वर्षांपूर्वीच्या भीषण दुष्काळातही ठिबक सिंचनद्वारे झाडांना पाणी देवून त्यांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर केला. मात्र पुन्हा दुष्काळाचा फटका बसला. नाईलाजाने मोसंबी बाग मोडून ते पेरू लागवडीकडे वळले आहेत. सध्या १४ एकरावर पेरू बाग असून गावात एक प्रोसेसींग युनिटही त्यांनी सुरू केले आहे. त्यांची फळं औरंगाबाद, नाशिकच्या बाजारात थेट विकली जातात. ज्यावेळी मोसंबीचं उत्पादन घेतलं जायचं तेव्हा कांतराव यांनी दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई, बेंगलोर, नागपूर, पुणे इथल्या व्यापार्‍यांना थेट माल पाठविण्याची व्यवस्था केली होती. विशेष म्हणजे विहीर आणि बोअरच्या पाण्यावर त्यांनी या फळबागा वाढविल्या आहेत. 
भारतात फळं खाणार्‍यांचं प्रमाण जास्त असल्याने चांगल्या फळांना मोठी मागणी असते. देशमुख म्हणतात, ‘निसर्गाशी जुळवून घेत मी शेती करत आलोय. मोसंबीचे मृग, आंबिया, हस्त असे तीन बहार असतात. पाणी नसताना मी मृग बहार घेतला. कारण यात एप्रिल-मे महिन्यांत बागांचं पाणी तोडावे लागते. पाणी नसलं की ताण द्यायचो. आंबिया बहार घेतला असता तर संपूर्ण उन्हाळ्यात झाडांना पाणी द्यावं लागलं असतं आणि पाण्याची अधिक गरज भासली असती. मी देशभरात अनेक ठिकाणी जाऊन शेतीतील वैविध्यपूर्ण प्रयोग पाहून आलोय. त्यांनी इस्त्रायल देशाचा दौराही केलेला आहे.
 कांतराव म्हणतात, ‘मी शेतावर काम करणारा माणूस आहे. शेतच मालकाला काम सांगत असते. शेतात सहज चक्कर मारली तर अनेक कामं आपल्या लक्षात येतात’.
आपण निसर्गाकडून खूप काही घेतो. पण परतफेड करत नाही, ही बाब कांतरावांना अस्वस्थ करते. ते सांगतात, आज आपण जे पाणी वापरतोय ते पूर्वजांनी साठवून ठेवलेलं होते. आपण त्याचा केवळ उपसा करत असून भविष्यासाठी पाणी साठवण्याची व्यवस्थाच नाही. कांतराव देशमुख यांनी 1989 मध्ये जलसंधारणाचं काम हाती घेतलं. विहीर पुनर्भरण केले.
जमिनीचा पोत सुधारण्यासाठी त्यांनी विविध प्रयोग केले आहेत. ४० वर्षापासून ते शेतात हिरवळीचं खत घालतात. ते सांगतात, ‘आजकाल दर तीन महिन्याला पिकावर पिकं घेतली जातात. दुकानदाराच्या सांगण्यानुसार भरमसाठ खतं आणून घातली जातात. त्यामुळे जमिनीचं आरोग्य बिघडतं. मी सेंद्रीय पध्दतीची खतं वापरण्यावर अधिक भर देतो. शिवाय आम्ही शेणखतही मोठ्या प्रमाणात वापरतो. त्यामुळेच आमची जमीन अधिक भुसभुशीत आणि सुपीक बनली आहे’. अनेक संशोधक व शास्त्रज्ञांनी त्यांच्या जमिनीची, गांडूळाची पाहणी केल्याचंही ते सांगतात.
- बाळासाहेब काळे.

ते पाच दिवस तिला परत मिळणार !

आमदार डॉ भारती लव्हेकर यांच्या वर्सोवा मतदारसंघातल्या सर्व शाळा-कॉलेजात सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग आणि डिसपोजल मशिन्स बसवली जाणार आहेत. असा कालसुसंगत उपक्रम करणारा - वर्सोवा हा महाराष्ट्रातला पहिलाच मतदारसंघ ठरणार आहे. हा ‘नवी उमेद’च्या जिव्हाळ्याचा, गेलं वर्षभर लावून धरलेला विषय असल्याने आज, या पोस्टद्वारे आम्ही भारतीताईंचं अभिनंदन करत आहोत. विशेष म्हणजे, भारतीताईंनी स्वतःहून, ही बातमी आम्हाला कळवली. मतदारसंघातली एखादी समस्या संवेदनशीलपणे जाणून घेऊन तड लावणार्‍या सर्वच आमदारांना पाठबळ द्यायला हवं.
मतदारसंघातल्या एखाद्या घरात मुलगी जन्माला आली, की भारतीताई स्वतः त्या तान्हुलीचं स्वागत करायला जातात, यावर ‘नवी उमेद’ने मागे लिहिलं आहेच. मासिक पाळीच्या दिवसांतलं मुलींचं आरोग्य हा खूप लक्ष देण्याचा, मुली – पालक - शिक्षक या सगळ्यांनाच जागरूक करण्याचा विषय. हे लक्षात घेऊन भारतीताईनी सुरू केलेल्या कामाने एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. त्यांच्या वर्सोवा मतदारसंघातल्या सर्व शाळा-कॉलेजांत आणि अन्य मोक्याच्या ठिकाणी मशिन्स बसवली जाणार आहेत. मशिनमधून नॅपकिन्स काढण्यासाठी रिचार्ज करता येण्यासारखं स्मार्ट कार्डही तयार केलं आहे.
उपक्रमाची सुरूवात उद्याच (२१ एप्रिल १७) चिल्ड्रेन वेल्फेअर सेंटर संस्थेच्या यारी रोड इथल्या शाळेत आणि कॉमर्स कॉलेजात होणार आहे.भारतीताईंच्या प्रयत्नांमुळे ही अत्याधुनिक सुविधा देणं शक्य झाल्याचं संस्थापक अजय कौल म्हणाले. संस्थेचे ऍक्टिव्हिटी चेअरमन प्रशांत कशिद यांनी सांगितलं, “या निर्णयाने शाळेतल्या मुलींना फारच आनंद झाला आहे. शाळा आणि कॉलेज मिळून सुमारे अडीच हजार मुली या मशीन्सचा लाभ घेतील.” 
लातूर जिल्ह्यातल्या तांदुळजा जिप शाळा, पारधेवाडी आणि पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन इथे अलिकडेच एनजीओच्या पुढाकाराने मशिन्स बसवली गेली असल्याचं ‘नवी उमेद’ पेजवरून आम्ही प्रसिद्ध केलंच आहे. आता मुंबईतल्या शाळेचाही समावेश यात होत आहे.
आमदार निधीतून मुली-स्त्रियांसाठी ही मशिन्स बसवण्याची परवानगी मिळावी, ही मागणी भारती लव्हेकर यांनी लावून धरली आहे. तसा धोरणात्मक निर्णय अजून झाला नसला, तरी स्वतःच्या आमदार निधीतून मतदारसंघात मशिन्स बसवण्याची परवानगी त्यांनी मिळवली. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सहकार्यामुळे हे घडल्याचं भारतीताई म्हणाल्या.
भारतीताई या विधिमंडळाच्या महिला कल्याण समितीच्या सदस्य आहेत. समितीच्या दौर्‍यांदरम्यान जिप शाळा, आश्रमशाळा, वसतीगृह पाहाताना मासिक पाळीच्या काळातली मुलींची सॅनिटरी नॅपकिन्सची निकड भागवणं किती तातडीचं आहे, हे त्यांना जाणवलं. याचसाठी त्यांनी आणि अन्य आमदारांनी त्यासंबंधीच्या धोरणाचा आग्रह धरला आहे. युनिसेफच्या अजेंड्यावरही हा विषय अग्रक्रमाने आहे.
 भारतीताईंनी माहिती दिल्यानुसार वर्सोवा मतदारसंघातल्या सुमारे ५०० जागा मशिन्स बसवण्यासाठी हेरल्या आहेत. यात मेट्रो स्टेशन, बस डेपो, महिलांची स्वच्छतागृह, झोपड्या आणि चाळी असलेल्या वस्त्या आहेत. पोलिस स्टेशनकडूनही मशिन्सची मागणी आली आहे. मतदारसंघाबाहेरचे लोकही माझ्याकडे मशिन्ससाठी मागणी करताहेत, असं त्या म्हणाल्या. टप्प्याटप्प्याने मशिन्स बसवली जातील. सॅनिटरी नॅपकिन्सचा सुरळीत पुरवठा, मशिन्सचा मेंटेनन्स ही यापुढची आव्हानं आहेत. मुली आणि महिलांच्या आरोग्याविषयी जागृती करणंही सुरूच ठेवणार असल्याचं भारती लव्हेकर म्हणाल्या. 
- समता रेड्डी, लता परब

Wednesday 3 May 2017

‘आम्हाला पण शिकवा’

व्यवसायाने सॉफ्टवेअर सल्लागार. शिक्षण-नोकरीसाठी परदेशात वास्तव्य झालेलं. शेतीची आवड म्हणून मूळ गावी जाणंयेणं... अशी पार्श्वभूमी असलेल्या अमोद जोशी यांनी ३०-३५ शाळकरी मुलांच्या शिक्षणाचं पालकत्वच घेतलं आहे. त्यांनी सांगितलं, “अधनंमधनं आरजपाडा (तलासरी) इथं काकांकडे जात असतो. तिथं कामाला असणाऱया गावकरयांच्या मुलांची अभ्यासात गती नाही, हे बघितलं. मला गणिताची आवड. म्हणून मुलांना गणित शिकवायला सुरुवात केली. एका वर्षात दीप आणि सूरज दुबे या दोघांनी गणितात इतकी प्रगती केली की गावातली बरीच मुलंमुली ‘आम्हाला पण शिकवा’ म्हणू लागली…” 

बेरीज-वजाबाकी, गुणाकार-भागाकार, संख्यासराव (३६ – ६३ सारख्या संख्यांमध्ये होणारी गल्लत आदी समस्या टाळण्यासाठी) आणि पाढे हे प्राथमिक शाळेच्या मुलांना शिकवण्यासाठी अमोदनी मोबाइल प्रोग्राम तयार केला आहे. एका मोबाइलवर एका वेळी चार मुलं उदाहरणं सोडवू शकतील अशी व्यवस्था यात केली आहे. खूप उदाहरणं सोडवायला मिळत असल्यामुळे सरावाचा हेतू साध्य होतो. तासाला १०० गणितं हा वेग मुलांनी गाठला आहे. दीप- सूरजच्या शाळांमित्रांचा ओढा जोशींच्या घराकडे वाढला आणि दोन वर्षांत त्यांच्याकडे शिकायला येणार्यांशची संख्या ३५वर गेली. या सगळ्यांना मोबाइल मिळवून देऊन अमोदनी अभ्यासाची व्यवस्था केली. गणित शिकणं आनंदाचं झालं. 
पण विद्यार्थ्यांचे इतरही विषय कच्चे. कारण पालक अशिक्षित नि सामाजिक वातावरण मागास. अमोद यांच्या पत्नी तेजस्विनी आफळे शुद्धलेखन, इतिहास, भाषाविषयांचं आकलन वाढवण्यासाठी मुलांची शिकवणी घेऊ लागल्या. त्या व्यवसायानं आर्किऑलॉजिस्ट. अमोद यांच्यासारखंच त्याही महिन्यातले १५ दिवस गावी जाऊन शिकवतात. 
गावात शाळा दोन. जिल्हा परिषदेची शाळा पहिली ते सातवी. आठवी ते बारावीचं शिक्षण ‘बालकल्याण मंदिर’च्या शाळेत. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकबळ कमी. ४५० विद्यार्थ्यांना ५ शिक्षक हे प्रमाण. त्यामुळे जोशींच्या प्रयत्नांचा शिक्षकांना फायदाच झाला. निस्वार्थी हेतू, इनोव्हेटिव्ह कल्पना यामुळे शाळेनं त्यांच्या सहकार्याचं स्वागतच केलं. मित्रांच्या मदतीनं जुने मोबाइल मिळवून अमोदनी शाळेत ‘मोबाइल लायब्ररी’ सुरू केली. नोव्हेंबर २०१६ पासून सुरू केलेल्या या लायब्ररीला तुफान प्रतिसाद मिळाला.
शिक्षकांच्या कमतरतेवर त्यांनी उपाय सुचवला. पहिली ते चौथीच्या मुलांचा संख्यावाचनाचा शिकवणीवर्ग शाळेच्याच वेळात घ्यायचा आणि तिथे वरच्या वर्गातल्या मुलांनी शिकवायचं. सहावी, सातवी, आठवीतल्या मुलांना तयार करण्यात आलं. आपल्या गावासाठी काहीतरी करणं, ही तुमची जबाबदारी आहे, असं त्यांना समजावलं. आज अभ्यासामध्ये गुणवत्ता वाढवण्याचं काम मुलं अतिशय उत्तमरीत्या करत आहेत. 

 अमोद सांगतात, “शाळा सुटल्यावर संध्याकाळी अभ्यासासाठी येतानाही मुलं उत्साही असतात. आणि यात मुली ७० टक्के आहेत. डेडिकेशन, चिकाटी म्हणजे काय, हे मुलींकडून शिकावं.”
आता उभयतांनी ‘पालकत्व’ घेतलं म्हटल्यावर मुलांचा अभ्यासाचा कंटाळा घालवणंही आलंच. बसून गणितं करून फार वेळ झाला की सायकलवरून चक्कर मारून येता येतं. वीकएन्डला डोंगरांवर भ्रमंतीचा कार्यक्रम असतो. या वेळी मात्र निसर्गवाचनाची गुरू मुलं असतात!
तलासरी तालुक्यातल्या १५४ शाळांतल्या सर्वच मुलांना प्राथमिक स्तरावरचं गणित आलंच पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न झालेच पाहिजेत, अशी अमोद जोशींची तळमळ आहे. प्राथमिक स्तरावरचं गणित केवळ १७ ते १८ टक्के मुलांनाच जमतं, ही आकडेवारी किती वेदनादायक आहे, असं ते म्हणतात. मुलाला शाळेत घातलं की आपली जबाबदारी संपली, असं पालकांनी करू नये. अशिक्षित पालकही मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देऊ शकतात, असं त्यांचं सांगणं.
‘प्रथम’चं तलासरीमध्ये काम आधीपासून असल्यामुळे गणित क्षमताविकनसनाचं काम या संस्थेच्या साथीनं पुढं न्यायचं, असं आता ठरत आहे. 
प्रवास पालकत्वाचा - अमोद जोशी .
- सुलेखा नलिनी नागेश

ए जिंदगी, गले लगा ले

निळ्या डोळ्यांच्या गो-यापान योगिताला डोळ्यांचा काही त्रास असेल, असं कोणालाच वाटलं नाही. जन्मानंतर काही महिन्यांतच तिला डायरिया-गॅस्ट्रो झाला. मुलगी जगते की नाही, इतकी वाईट स्थिती. इथचं जिद्दीची पहिली चुणूक योगितानं दाखवली. काही दिवस हॉस्पिटलमध्ये घालवून ती घरी आली. थोड्या दिवसातच ती आजूबाजूला बघत नाही, हे लक्षात आलं. मग सहाच महिन्याच्या या तान्ह्या बाळीचं डोळ्याचं ऑपरेशन झालं. लेन्सेस बसवल्या. दुर्देवानं ऑपरेशन अयशस्वी झालं. वय वाढलं, मग थोडं दिसतंय, म्हणून शिशुवर्ग सुरु झाला. इंग्लिश-देवनागरी अक्षरं पाटीवर गिरवणं चालू झालं. पाच वर्षांची झाली. पण बाकी हालचाली खूप कमी, चालणं-बोलणंही नव्हतंच. काही नातेवाईकांनी तर ती मतीमंद असल्याचीही शंका काढली. त्यातूनही तिची शिकायची इच्छा दिसत होतीच. 
मग डॉक्टरांच्या सल्ल्याने कमला मेहता अंध विद्यालयात तिला नवव्या वर्षी पहिलीत प्रवेश मिळाला. सोमवार ते शुक्रवार दादरला हॉस्टेलमध्ये आणि शनिवार-रविवार आजी-आजोबांकडे जोगेश्वरीला असं चक्र सुरु झालं.
 पुढे वडील सेवानिवृत्त झाले आणि त्यांनी गावी शालोपयोगी साहित्याचं दुकान काढलं. त्यामुळे आई-वडील गावीच राहायचे. योगिताचं अभ्यासाबरोबर संगीतशिक्षणही चालू होतं. तिचा संगीतामधला रस पाहून, शाळेने ‘अल्लारखा’ संस्थेची शिष्यवृत्ती दिली. त्यामुळे रीतसर तबल्याचं शिक्षण घेता आलं. अभ्यास आणि संगीत दोन्ही छान चालू होतं. दहावीपर्यंत डाव्या डोळ्याने थोडं दिसत होतं. पण परीक्षेच्या आधी डोळ्याला अपघात झाला. डॉक्टरने मेंदू कमजोर होतोय, त्यावर ताण नको, असं सांगितलं. आणि संगीत किंवा शिक्षण यापैकी एकाचीच निवड करायला सांगितली. प्रयत्नशील योगिता हार कसली मानतेय ? संगीत आणि शिक्षण - दोन्ही चालू राहिलं. इतिहासामध्ये एमए देखील झालं. 
सध्या ती संगीत विशारदची तयारी करते आहे. तिचा आवडता कलाप्रकार लोकसंगीत. तबला, ढोलकी, मृदंग, ताशा-दिमडी, हलगी, पखवाज, खंजीरी, टाळ अशी जवळपास ३०-३५ वाद्य ती वाजवते. विशेष म्हणजे तालवाद्य ती रेडिओवर ऐकून शिकली आहे. कांचनताई सोनटक्केंच्या नाट्यशाळा संस्थेशी ती दुसरीपासून जोडली आहे. तिथे तिने अभिनय, पार्श्वसंगीत, गाणं, नाटक असं सगळं केलंय. 
 मुंबई विद्यापीठाच्या फेस्टिवलमध्ये योगिताच्या गटानं सुवर्णपदक मिळवलं. कॉलेजमध्ये बेस्ट स्टुडन्ट ट्रॉफी तर योगिताचीच! आज ती अस्मिता विद्यालय, जोगेश्वरी इथे सर्वसाधारण मुलांना संगीत आणि इतिहास शिकवते. आकाशवाणीच्या बातम्या ऐकणं ती कधीच चुकवत नाही. केंद्रिय दिव्यांगण सशक्तीकरण विभागाच्या ‘क्रिएटिव्ह adult’ या क्षेत्रात भरीव कामगिरीसाठी २०१६च्या राष्ट्रपती पुरस्काराची ती मानकरी. स्वतःला दृष्टिहीन न समजता - मी दृष्टिबाधीत आहे, असं ती सांगते.
इतक्या वर्षाच्या प्रवासाने आता आपल्याला जगाकडे पहायची दृष्टी मिळाल्याचं ती सांगते. आपण स्वतःला आहे तसं स्वीकारलं, तर न्यूनगंडाचा प्रश्नच येत नाही, असं ती म्हणते. मेडिटेशन, शास्त्रीय संगीत हे तिच्या आनंदी राहण्याची प्रेरणा. आनंदी राहा, आनंदी जगा आणि आनंद पसरवा हे तिचं जीवनसूत्र. तिच्या मनमोकळ्या हास्याचं रहस्य हेच आहे.
जगण्यासाठी दृष्टीपेक्षाही सकारात्मक दृष्टिकोन हवा, हेच योगिता आपल्याला शिकवते.
 - मेघना धर्मेश.

ग्रामस्थांच्या सहभागाने शिक्षणही आलं..!

स्पर्धेचं युग, त्यात इंग्रजीशिवाय पुढे जाता येणार नाही. मराठी शाळेत शिकून भविष्य नाही, अशी कारणं सांगून आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालण्यांचा विचार पालक करतात. अनेक जण मराठी शाळांचा दर्जा चांगला नाही म्हणूनही मुलांना मराठी शाळेत घालण्यााचे टाळतात. हे सध्याचं चित्र. यातूनही काही शिक्षक व ग्रामस्थ असलेल्या शाळा टिकवण्याचे आणि त्यांचा दर्जा सुधारण्यााचे प्रयत्न करत आहेत. असाच एक प्रयत्न बीड जिल्ह्यात घडतो आहे. माजलगाव तालुक्यातील एक हजार लोकसंख्येचं जायकोवाडी गाव.

ग्रामस्थ, शिक्षण समिती व जिल्हा परिषद यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक माणिक राठोड यांनी शाळेचा चेहरा मोहरा बदलण्याचा संकल्प केला. शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी आणि त्यांनी शिक्षणात रमावं यासाठी काय करता येर्इल, हा विचार सुरु झाला. या संदर्भात चर्चा करण्यासाठी राठोड यांनी १५ ऑगस्ट २०१६ रोजी ग्रामस्थांची शाळेत बैठक घेतली. पहिली ते पाचवीचे विद्यार्थी होते ९०. पैकी अनेक विद्यार्थी गैरहजर असत. या विद्यार्थांना शाळेत आणण्याासाठी काय करता येईल यावर चर्चा झाली. शाळेत रंगरंगोटी करण्याबरोबच अद्ययावत ई-लर्निंग कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढच्या आठ-दहा दिवसातच ग्रामस्थ आणि शिक्षकांनी तब्बल तीन लाख रूपयांचे वर्गणी गोळा केली. त्यातून एका वर्गात डीजीटल कक्ष स्थापन करण्याात आला. शिवाय बोलक्या भिंती, ज्ञानरचानवादावर आधारित फरशीकाम, वृक्षारोपण आणि शौचालय उभारण्यात आलं. प्रोजेक्टरही खरेदी करण्यात आला. 
शाळेचा चेहरामोहरा बदलण्यासाठी शिक्षकांसह ग्रामस्थांनी एकत्र येत चोख काम केलं. या कष्टाचं फलित आता शाळेत पाहायला मिळतंय. शाळेत प्रत्येक दिवशी ९७ ते ९८ टक्के उपस्थिती वाढली. पंचक्रोशीत गावाचं कौतुक तर झालंच. शिवाय अन्य शाळांच्या तब्बल एक हजार शिक्षक व मुख्यााध्याोपकांनी शाळेला भेट दिली. यापैकी अनेक शिक्षकांनी शाळेच्या‍ नोंदवहीत ‘शाळा तर आहेच, याबरोबर शिक्षणही आहे’ अशा प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
- हनुमंत लवाळे.