Tuesday 4 February 2020

आता चढाओढ लग्नसमारंभातला खर्च टाळण्यासाठी व्हावी ...


ना वाजंत्री, ना पंगत, ना मानपान, केवळ पाहुण्यांना पेढा भरवत मंदिरात घंटेच्या साक्षीनं झालेल्या एका साध्या विवाहाची चर्चा सध्या खान्देशात होत आहे.
लग्न होतं सागर आणि अर्चना यांचं. अर्चना शहादा तालुक्यातल्या कवठळ इथली. रसायनशास्त्रात एम एस्सी. सागर मूळचा गोगापूरमधला. नोकरीनिमित्त आता बडोद्याला. तिथल्या एका कंपनीत मार्केटिंग मॅनेजर. या कंपनीचे मालक स्मिताबेन आणि संजय चौधरी. सागरच्याच नात्यातले.
चौधरी दांपत्य वेगळ्या विचारांचं. 'चालीरीती, मानपान , दागदागिने , मंडप , जेवणावळ,थाटमाट यावर लग्नात विनाकारण भरमसाठ पैसा खर्च केला जातो. निव्वळ वाजंत्रीवरच लाख तरी खर्च होतात. जेवणावळीसाठी लाखो रुपये खर्च होतात. क्षमतेपेक्षा जास्त अन्न वाढल्यानं ते वाया जातं. युवा पिढीनं पुढाकार घेऊन या सर्वाला काळानुसार बगल दिली पाहिजे, ' असं त्यांना वाटतं. लग्नसमारंभावर होणारा खर्च टाळून हा पैसा मुलंमुली स्वतःच्या घरासाठी, त्यातल्या वस्तूंसाठी वापरू शकतात. भविष्याची सोय म्हणून बचत करू शकतात. त्यातून उद्योगधंदा सुरू करू शकतात.'
आपले हे विचार सागर आणि स्मिताबेन कंपनीतल्या, आजूबाजूच्या मुलांकडे व्यक्त करतात. सागरला ते पटले. चौधरी दांपत्याशी बोलल्यावर सागरचे आईवडील वंदना आणि गणेश पाटील, अर्चनाचे वडील अशोक पाटील यांनीही ते उचलून धरले.
शहादा तालुक्यातल्याच पिंगाणे इथल्या नागेश्वर मंदिरात दीड महिन्यापूर्वी लग्न झालं. लग्नाला फक्त ५० माणसं. आदल्या दिवशी हळदीसाठीही सागरकडे ४०-५० माणसं होती. लग्नसमारंभावरचा खर्च टाळल्यामुळे झालेल्या बचतीतून सागर आणि अर्चना बडोद्याच्या घरासाठी अनेक संसारोपयोगी वस्तू खरेदी करू शकले. या विवाहाची चर्चा समाजात आणि खान्देशात होत आहे.
लग्न आता अशीच झाली पाहिजेत. किमान सामुदायिक पद्धतीनं तरी झाली पाहिजेत, असं संजय आणि स्मिताबेनना वाटतं. त्यासाठी ते प्रबोधन करत आहेत. 


- रुपेश जाधव, नंदुरबार 

पद्मश्री पुरस्कार विजेत्यांच्या कर्तृत्त्वाला उजाळा...

अहमदनगर जिल्ह्यातल्या बीजमाता राहीबाई पोपेरे आणि पोपटराव पवार. दोघांनाही यंदाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तुत्वाला दिलेला उजाळा.
अकोले तालुक्यातील पश्चिम भागातल्या आदिवासी पट्ट्यातलं कोंभाळणे. तिथल्या राहीबाई सोमा पोपेरे. महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसूबाईचं शिखर, हरिचंद्रगड, कोकणकडा, साम्रदची सानंद, अशी उंचचउंच कातळ शिखरं याच भागातील.
राहीबाईंच्या वडिलांकडची परिस्थिती गरिबीची असल्याने शाळा शिकता आली नाही. वयाच्या बाराव्या वर्षी लग्न. आदिवासी भागात देशी बियाणाचा वापर करुनच पिके घेतली जातात. त्यामुळे या भागातील बहूतांश कुटूंबे देशी वाणाचे संवर्धन करतात. राहीबाईंचं कुटूंबही तीन- चार पिढ्यापासुन देशी बियाणांचे संवर्धन करणारं. 2014 साली आदिवासी भागात महिलांसाठी काम करणाऱया बायफ या संस्थेच्या संपर्कात त्या आला. संस्थेचा महाराष्ट्र जनूककोश प्रकल्प या भागात सुरू झाला होता. संस्थेचे नाशिक विभागाचे समन्वयक जितीन साठे एकदा राहीबाईंच्या घरी गेले. तब्बल 54 पिकांचे 116 वाण आणि त्यात वाल आणि पावट्याच्या 20 वाणाचं संवर्धन त्या करत असल्याचं समजलं. 2016 मध्ये बायफच्या पुढाकारातून संस्थेचे अध्यक्ष गिरीष सोहनी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी बियाणे बॅक सुरू केली. त्यांना ‘मदर ऑफ सीड’, बीजमाता अशी ओळख मिळाली. त्यांच्यामुळे दुर्मिळ देशीवाणांचे जतन होत आहे.
अकोले तालुक्यात महिला बचतगटाच्या माध्यमातून वाणांची विक्री होते. अनेक महिलांसाठी हे रोजगाराचे साधन बनलं आहे. परसबाग संकल्पनेच्या माध्यमातून देशी बियाणं राज्यभर पोहोचत आहे.
याच जिल्ह्यातले पोपटराव पवार. तीस वर्षापुर्वी नगर जिल्ह्यामधील सहा ते सात तालुके दुष्काळी. हिवरेबाजार नावाचे गाव त्यातील एक. दुष्काळाने पिचलेल्या आणि त्यामुळेरोजगाराच्या शोधात गाव सोडण्याशिवाय पर्याय नव्हता. पण शहरात उच्च शिक्षण घेतलेले पोपटराव मात्र परतले.
नोकरीच्या शोधात असतानाच त्यांना गावांतील स्थिती मात्र स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे
त्यांनी नोकरी न करता गावी येऊन गावांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला आणि 1990 मध्ये गावांतील तरुणांना एकत्र केलं वृक्षलागवडीतून इतिहास घडवला.
जलसंधारणाची कामे केली. अल्प पाऊस पडूनही दुष्काळी हिवरेबाजार पाणीदार झाले. गावच्या शाळेतील मुल उपलब्ध झालेल्या पाण्याचा ताळेबंद मांडु लागले. एकेकाळी रोजगारासाठी दुसऱया गावांत जाणारे येथील शेतकरी आता शेकडो लोकांना
आपल्या गावांत रोजगार उपलब्ध करून देत आहेत. कोट्यावधीचं शेती उत्पन्न काढत आहेत. समस्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा आदर्श घेऊन तीस वर्षापुर्वी गावातील व्यसनमुक्तीचा लढासुरू केला. ही चळवळ यशस्वी झाल्यानंतर त्यांना गावातील लोकांनी सरपंच होण्याचा आग्रह केला. सरपंच झाल्यानंतर त्यांनी पीकपद्धतीतबदल केला. कमी पाण्यावर येणारी पिकांना त्यांनी प्राधान्य दिलं. शेजारील डोंगरावर वृक्षलागवड केली. तसेच जागोजागी पाणलोटाची कामेकेली. त्यातून मोठ्याप्रमाणात पाण्याचा संचय झाला. त्यातून गाव खऱ्या अर्थाने हिरवे झाले. गावाचे उत्पन्न वाढले. तरूणांच्या हाताला
गावातच काम मिळाले. चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, कुपनलिका बंदी असे विशेष प्रयोगही त्यांनी केले. वीस वर्षापर्वीचगाव हागणदारीमुक्त केलं.गावातील सर्वच घरे महिलांच्या नावावर
आहेत. सर्व निर्णय ग्रामसभेला विचारात घेऊनच होतात. हिवरेबाजारला आतापर्यत दहा लाखापेक्षा अधिक लोकांनी भेटी दिल्यात. येथील कामाचा आदर्श घेऊन
राज्यात आणि देशात अनेक गावे समृद्ध झाली आहेत.
- सूर्यकांत नेटके, नगर
#नवीउमेद #अहमदनगर

डोक्यावरील हंडा आता नको...

उन्हाळा सुरू होण्यास महिनाभराचा कालावधी असला तरी आदिवासी महिलांच्या डोक्यावर हंडा येण्यास सुरूवात झाली आहे. पाणी भरण्यासाठी आदिवासी महिलांना कुठेतरी खोल दरीतील विहिरीवर, झऱ्यावर पाणी भरण्यासाठी ये-जा करावी लागते. एका फेरीत दोन दोन भरलेले हंडे डोक्यावर घेत दरड चढतांना त्यांची दमछाक होते. मानेचे, कमरेचे विकार सुरू होतात ते वेगळेच.
आदिवासी महिलांमागे लागलेले हे दुष्टचक्र भेदण्यासाठी सुलगाणा तालुक्यातील ठाणगाव परिसरात व्हेल्स अ‍ॅण्ड व्हिल्स या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने शाहज मेमन यांच्या सहकार्याने येथील महिलांसाठी ‘वॉटर व्हील ड्रम्स’ मोफत वितरीत करण्यात आले. हे ड्रम बाजारात दोन ते तीन हजारांपर्यंत मिळतात. एका ड्रमात ४५ लीटर पाणी बसते. हा ड्रम एक माणूस जमिनीवरून सहज ढकलत आणू शकतो. या ड्रममुळे आदिवासी महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली उतरण्यास मदत होईल.
#नवीउमेद

गांधीजींचं मोठेपण उलगडणार्‍या छोट्या गोष्टी: २० (वाचक : मेधा कुलकर्णी)

व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=2384334025172485

ओळख नव्या आमदारांची : आमदार राम सातपुते (भाजप)


स्कील डेव्हलपमेंटवर भर देईन :
राम सातपुते हे मुळचे जिल्हा बीड येथील आष्टी तालुक्यातील धामणगावचे रहिवासी. वडील विठ्ठल आणि आई जिजाबाई आणि त्यांच्या तीन मुली असा त्यांचा परिवार. गावाकडे वडिलांचा पारंपरिक चप्पल तयार करण्याचा व्यवसाय. आजही त्यांचे गावाकडे दुकान आहे. माळशिरस तालुक्यातील भांबुर्डी कायम दुष्काळी गावात त्यांचे लहानपण गेले. घरची परिस्थिती बेताची होती. वडील विठ्ठल सातपुते यांनी ऊस तोडणीचे कष्टप्रद काम करुन मुलांना शिक्षण दिले.
माळशिरस येथील शंकर सहकारी साखर कारखान्याकडे विठ्ठल सातपुते हे 1990 ते 1995 पर्यंत ऊस तोडणीचे काम करत होते. त्यानंतर भांबुर्डे येथील मदने यांच्या शेतामध्ये चाकरी केली तेव्हापासून राम यांची माळशिरस तालुक्याशी नाळ जुळली.
संघाच्या बालसंस्कार वर्गातून त्यांची जडणघडण झाली. शाळा- महाविद्यालय जीवनापासून ते सामाजिक कार्याकडे वळले. गावी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणानंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी पुणे गाठले.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांचा विद्यार्थी संघटनेशी संपर्क आला. तेथूनच त्यांनी विद्यार्थी संघटनेच्या चळवळीला सुरुवात केली. ग्रामीण भागात वाढल्यामुळे अनेक प्रश्नांची जाण होती. त्यांना विद्यार्थ्यांच्या छोट्या छोट्या प्रश्नातले गांभीर्य लवकर उमजत होते. त्यातूनच विविध आंदोलने उभारताना आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न प्रशासनाकडून यशस्वीपणे सोडून घेताना त्यांचे नेतृत्व विद्यार्थ्यांमध्ये, युवकांमध्ये प्रस्थापित झाले.
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कामाची दखल घेऊन गेल्या वर्षी राम सातपुते यांना भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आले. पक्षाचे काम करत असताना त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अनेक गरजू लोकांना मदत केली. भ्रष्टाचारविरोधी आंदोलन, शिक्षणाचे बाजारीकरण विरोधात आंदोलन, सामाजिक प्रश्नांचे जागरण या माध्यमातून राम यांनी देशभर प्रवास केला. युवा मंत्रालयातर्फे दक्षिण कोरियात नेतृत्व केले होते. नॉर्थ इस्ट त्यांच्या अभ्यासाचा विषय.
राम यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 'थॉट्स ऑन पाकिस्तान' तसंच डॉ. संजीव सोनवणे यांची अहिल्यादेवी होळकर यांच्यावर लिहिलेली पुस्तके खूप आवडतात. ते मुळात सर्वसामान्य कुटुंबातील असल्यामुळे जनतेशी त्यांचा चांगला संपर्क होता. त्यांचे काम पाहून हाय प्रोफाइल माळशिरस विधानसभा राखीव मतदार संघातून महायुतीचे उमेदवार म्हणून राम यांना निवडणुकीचे तिकीट मिळाले. यात त्यांनी उत्तम जानकरांचा पराभव करून विजय मिळवला.
सातपुते म्हणाले, माळशिरस तालुक्यामध्ये रस्त्यांची मोठी समस्या आहे. ती समस्या मार्गी लावीन. तालुका पातळीवर रुग्णालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. ती भरती व्हावी या संदर्भात प्रयत्न करीन. शेती सिंचनाच्या सोयी सुविधा वाढविण्यावर माझा भर असेल. नगरपंचायत परिसरात एमआयडीसी असणे आवश्यक आहे. त्यामुळे युवकांना रोजगार प्राप्त होईल. स्कील डेव्हलपमेंटवर भर देईन. लघु उद्योगांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांना शासनाकडून अर्थसाह्य मिळवून देण्याचा प्रयत्न करीन. मोदी सरकारने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अनेक चांगली कामे केली आहेत. तीच कामे तालुका पातळीवर सुरू अाहेत.
सर्वसामान्य नागरिकांची कोणतीही कामे पैसे दिल्याशिवाय होत नाहीत. ही आर्थिक लूट थांबवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन. ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी पुणे मुंबईला जावं लागतं, मतदारसंघात त्यांच्यासाठी राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र सुरू करण्याचा उद्देश आहे. अभ्यासिका अाणि दर्जेदार मार्गदर्शक या केंद्रात उपलब्ध असतील. कुस्ती प्रशिक्षणाचे आंतरराष्ट्रीय केंद्र सुरू करायचं अाहे. माती परीक्षण केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करेन
आणि राहुरी कृषी विद्यापीठाचे उपकेंद्र मतदारसंघात आणण्याला माझे विशेष प्राधान्य राहील.

गांधीजींचं मोठेपण उलगडणार्‍या छोट्या गोष्टी : १९ (वाचक : अश्विनी जोग)

व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=2505692006421300

गांधीजींचं मोठेपण उलगडणार्‍या छोट्या गोष्टी : १८

व्हिडीओ लिंक : 
https://www.facebook.com/sampark.net.in/videos/417411649153580/

मंगेशच्या निबंधानं अनेक मुलांना मदत मिळण्याची शक्यता


मंगेशसारख्या विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्ष तीन हजार रुपये शिष्यवृत्ती सरकारकडून देता यावी यासाठी प्रस्ताव तयार करा, अशा सूचना शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यामुळे अनेक मुलांना मदत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मंगेशच्या निबंधाची दखल कडू यांनी घेतली. २३ जानेवारीला त्यांनी मंगेश, त्याची आई आणि शिक्षिका नजमा शेख यांना विधानभवनात बोलावलं होतं.
बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातल्या देवीनिमगाव जवळ वाळकेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. वाळकेवस्ती , अनारसे वस्ती इथल्या मुलांसाठी ती आहे. या शाळेत चौथीच्या वर्गात मंगेश शिकतो.
सप्टेंबर २०१९ मध्ये मंगेशचे वडील वारले. त्याची आई शारदा वाळके. शारदाताई दिव्यांग. कसाबसा त्या घराचा गाडा हाकतात. शाळेत मुख्याध्यापिका आणि मंगेशच्या वर्गशिक्षिका नजमा शेख यांनी मुलांना आपले वडील या विषयावर निबंध लिहायला सांगितलं होतं. आपलं दुःख, वडिलांच्या पश्चात झालेली घराची व्यथा मंगेशनं निबंधात व्यक्त केली. 'माझे पप्पा काही दिवसांपूर्वी टीबीच्या आजाराने वारले, मी पाण्यात बुडत असलेली गाय कशीबशी बाहेर काढली, आम्हाला कोणीही मदत करत नाही, मला आणि आईला चोरांची भीती वाटते, पप्पा मला तुमची खूप आठवण येते'. अशा अत्यंत भावनिक शब्दात मंगेशने आपली व्यथा लिहिली होती. निबंध वाचून कवयित्री असलेल्या शेख मॅडमना गहिवरून आलं. आपल्या काही शिक्षक सहकाऱ्यांना त्यांनी मंगेशचा निबंध दाखवला . त्यांच्या मदतीनं तो सोशल मीडियावर प्रसारित केला. विविध माध्यमात याची जोरदार चर्चा सुरू झाली.


राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यापर्यंतही हा निबंध पोहोचला. त्यांनी 19 जानेवारीला तात्काळ समाजकल्याण विभागामार्फत 'दिव्यांग बीज भांडवल योजनेअंतर्गत 1.5 लाख रुपये स्वयंरोजगारासाठी अर्थसाहाय्य , जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कल्याण निधीतून शेष ५%, बस पास, यु. डी. आय.डी. कार्ड, तसंच दिव्यांग महामंडळामार्फत रोजगारासाठी अर्थसाहाय्य अशा योजना लागू केल्या. मुंडे यांनी वाळके परिवाराला भरीव आर्थिक मदत करण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
आष्टी तहसील कार्यालयातील तहसीलदार वैभव महिंद्रकर , नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे , निलिमा थेऊरकर , शारदा दळवी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी धान्य , कपडे आणि रोख रकमेची मदत केली . गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनीही शाळेला भेट देऊन मदत केली .
बीड येथील स्नेह सावली प्रकल्पाचे संचालक निलेश मोहिते यांनी तर मंगेशसह त्या वस्तीवरील पाच मुलींना शिक्षणासाठी सर्व सुविधा देण्याची तयारी दाखवली .
कडा येथील डॉ सचिन टेकाडे आणि डॉ मंजुश्री टेकाडे यांनी मंगेश आणि शारदाताईंना मोफत आरोग्यसुविधा देण्याची जबाबदारी घेतली . याशिवाय अनेक ठिकाणाहून शारदाताईंच्या बँक खात्यात मदत करण्यासाठी विचारणा झाली .

-राजेश राऊत , बीड

माने सरांच्या शाळेतला प्रत्येक विद्यार्थी आनंदी का आहे




माने सर मूळचे अंबाजोगाईचे. गेली १४ वर्ष ते शिक्षक आहेत. त्यातली ११ वर्ष आदिवासी, नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्यातली.अनेक आदिवासी गोंडी विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणलं. सध्या परभणी जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातल्या पारडी इथल्या जिल्हा परिषद शाळेत. त्यांचं स्वतःचं शिक्षण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत झालं. लहानपणी मनातले गुरुजी न लाभल्याची खंत ते दूर करत आहेत.  त्यासाठी, अमृतकण, मित्र माझा आरसा,,वाचनाचा आनंद सोहळा,बालसभा,वर्ग दैनंदिन अहवाल, परीक्षण,प्रश्न आमचे उत्तर तुमचे, मला बोलू द्या, लेखक आपल्या भेटीला, आम्ही असे घडलो,जागर शिक्षणाचा, उत्कृष्ट वाचक पुरस्कार, शाळा रत्न पुरस्कार, निवड एकलव्याची, बालकुमार मेळावे, पुस्तक भिशी, एक क्षण स्वच्छतेचा,माझा वर्ग माझी रांगोळी,प्रश्नपेटी,माझा वाढदिवस,थीम फलक,चालता बोलता,चला मुलाखत घेऊया, शिवार भ्रमंती,सीड बँक,कानगोष्ट,पुस्तक पासबुक,माझी सखी रोजनिशी,एक सप्ताह एक विद्यार्थी भेट,मान्यवरांशी चलभाषेवरून संवाद,ग्रामसभेत सहभाग असे अनेक कल्पक उपक्रम.
या उपक्रमांमुळे विद्यार्थी वाचनाबरोबरच लेखनाकडे वळतात. पेन मित्रमुळे राज्यातले जिल्हाधिकारी, साहित्यिक,समाजसेवक असे १५० जण विद्यार्थ्यांचे मित्र झाले आहेत. २०० पत्रं विद्यार्थ्यांकडे जमली आहेत. बाहेरच्या जगाशी विद्यार्थी जोडले गेले आहेत.
ज्ञानपोईच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते. मुलांना कोणाशीही निर्भीडपणे संवाद साधता यावा यासाठी बालसभा.
अभ्यासातली सर्वांची गती सारखी नसते. अभ्यासात आपला मित्र मागे असेल तर त्याला सोबत घेतलं पाहिजे, आपण जिंकलं पाहिजे न सोबत आपला मित्रही, ही भावना निर्माण व्हावी यासाठी जिंकू जिंकू. दर महिन्याला एक लेखक ते शाळेत बोलावतात.शाळेला गावकऱ्यांचा हातभार लागावा यासाठी वर्षातून तीन वेळा जागर शिक्षणाचा.
आबा महाजन यांच्या पुस्तकाचं बंजारा भाषेत पारडीच्या मुलांनी अनुवादित केलेलं 'आनंदेरो झाड' हे पुस्तक नोव्हेंबरमध्ये मुंबईत ग्रंथालीच्या दिनकर गांगल यांच्या हस्ते प्रकाशित झालं.
''विद्यार्थ्यांनी मला श्रीमंत केलं आहे विद्यार्थी यशस्वी झाला की शिक्षकाच्या श्रमाचं चीज होतं.'' असं माने सर म्हणतात.



''प्राथमिक शिक्षण म्हणजे भविष्याचं बीज. शिक्षण मुलांच्या जीवनात आनंद फुलवणारं असलं पाहिजे आणि त्याचं माध्यम म्हणजे शिक्षक.'' युवराज माने सर सांगत होते.

मुख्याध्यापिका...

मागील ५ वर्षांपासून आम्ही आमच्या शाळेत परिपाठात मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्याचा उपक्रम राबवित आहोत. यामुळे विद्यार्थ्यांना लहान वयातच संविधानाची माहिती मिळत आहे.
- उर्मिला पाटील, मुख्याध्यापिका,
वसंतदादा पाटील हायस्कूल, लोहारा,
जिल्हा उस्मानाबाद
व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=179334716489827

गेल्या पाच वर्षांपासून मुलं वाचताहेत संविधान उद्देशिका

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या लोहारा येथील वसंतदादा पाटील हायस्कूल ही १ ते १० वी पर्यंतची शाळा. शाळा विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी अनेक उपक्रम आखत असते. यापैकीच एक, परिपाठात संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन. मागील ५ वर्षांपासून हा उपक्रम दररोज सुरू आहे.
२६ जानेवारीपासून प्रत्येक शाळेत परिपाठाच्या वेळी दररोज संविधानाच्या उद्देशिकेचे समूह वाचन घेण्यात यावे असा शासन निर्णय नुकताच झाला. मात्र, लोहारा येथील ही शाळा मागील ५ वर्षांपासून हअसं वाचन करतच आहे. सोम-मंगळ मराठी भाषेत, बुध-गुरु हिंदीत तर शुक्र-शनि इंग्रजीमधून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात येते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना लहानपणापासून संविधानाची माहिती होत आहे.
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली. या निमित्ताने प्रत्येक वर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय राज्यघटनेतील मुलतत्वांची व्याप्ती व सर्वसमावेशकता सर्व नागरिकांना समजावी आणि घटनेतील न्याय, स्वातंत्र्य, समानता व बंधुता ही मुलतत्वे मनावर कोरली जावीत यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय होणे आवश्यक आहे.
भारतीय संविधानातील मूलतत्त्वे, संवैधानिक हक्क आणि कर्तव्ये यांची रूजवणूक शालेय मुलांच्या मनात झाली की मोठं झाल्यावर ते जबाबदार, सुजाण नागरिक घडती, असा विश्वास वाटतो.
.-गिरीश भगत, उस्मानाबाद


व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=272696227026968

स्वेटर



डिसेंबर महिना सुरू झाला आणि स्टेशन जवळील रस्त्यावर स्वेटरचे ढीग दिसायला लागले. नेपाळी आणि तिबेटी विक्रेते लोकांना स्वेटर दाखविण्यात मग्न झाले. या स्वेटर विकणार्‍यांच वैशिष्ट्य म्हणजे ते "स्वेटर लेलो भाई! स्वेटर लेलो" असं कधी म्हणत नाहीत आजूबाजूला असणारे रंगीबिरंगी स्वेटर जणू ते काम करत असतात. काही लोक म्हणतात हे स्वेटर प्युअर लोकरीचे नसतात. पण मला वाटतं हे स्वेटर गरीब लोकांची थंडी पळवण्याचे काम नक्कीच करतात.
लहानपणी मला डून स्कूल किंवा तत्सम उच्चभ्रू शाळेत जाणाऱ्या मुलांच्या मरून किंवा लालसर रंगाच्या स्वेटर बद्दल खूप आकर्षण होते. किती रुबाबदार दिसायची ती मुलं! नंतर क्रिकेटची आवड निर्माण झाल्यावर क्रिकेटपटूच्या पांढऱ्या रंगाचे, निळ्या रंगाची बॉर्डर असणारे स्वेटर खूप आवडायचे.
पूर्वीच्या हिंदी चित्रपटांचे नायक तर वेगवेगळ्या डिझाईनचे स्वेटर घालायचे ते पण छान दिसायचे.
मला मात्र फुल शर्ट घालून वर हाफ स्वेटर घालायला आवडतो.

दिवाळीच्या आधीच कुठला स्वेटर घ्यायचा याबद्दल विचारमंथन चालू होते. दिवाळीला दोन्ही मुलं परदेशाहून येणार होती मनात म्हटलं मुलं आल्यावर त्यांना सांगूया इथूनच स्वेटर आणायला कारण तिथून आणायला सांगितले आणि बरोबर मापाचा झाला नाही तर पंचायत व्हायची! धाकटा मुलगा आधी आला आणि आल्याबरोबर बॅग उघडून त्यातील एकेक भेटवस्तू काढून देऊ लागला. आईसाठी आणि इतर नातेवाईकांसाठी त्याने भेटवस्तू आणल्या होत्या. मनात म्हटलं, माझ्यासाठी काही आणलं आहे की नाही, तेवढ्यात एक पिशवी पुढे करून म्हणाला "बाबा! हे तुमच्यासाठी "मी म्हटलं "काय आहे?" म्हणाला, "उघडून तर बघा" आणि उघडून बघितलं तर काय चक्क स्वेटर होता माझ्या आवडीच्या रंगाचा! "अरे खूप महाग असेल ना! इथे स्वस्त मिळाला असता"
"नाही बाबा! तुमच्या सुनेने स्वतःच्या हाताने विणलेला आहे. रोज ती कामावरून आल्यावर दोन-दोन तास महिनाभर विणत होती."
माझ्या डोळ्यात टचकन पाणी आले. दर आठवड्याला मुलाचा आणि सुनेचा फोन येतो पण ती माझ्यासाठी स्वेटर विणत होती याचा थांगपत्ता त्यांनी मला लागू दिला नाही. कारण त्यांना मला सरप्राईज द्यायचे होते ना! मी मुलाला म्हटले, "अरे! हा स्वेटर महाग नाही तर अमूल्य आहे आणि उबदार सुद्धा कारण यात माझ्या मुलीचे प्रेम आहे.'
माझ्या दोन्ही सुना म्हणजे माझ्या मुलीच आहेत हे परत एकदा मला पटले.
- सुधीर शेवडे ठाणे

यशोमती ठाकूर यांच्याशी संवाद

विदर्भातील तिवसा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या काॅंग्रेसच्या यशोमती ठाकूर नुकत्याच महिला आणि बालविकास खात्याच्या मंत्री झाल्या. कालच त्यांची संपर्कच्या टीमने भेट घेतली. महिलांच्या समस्या किती वेगवेगळ्या आहेत आणि त्या सोडवण्यासाठी कसे प्रयत्न करणार ते त्यांनी या भेटीत सांगितलं.
यावेळी संपर्क प्रतिनिधींनी महिलांच्या समस्या, विशेषतः बालविवाहाच्या वाढत चाललेल्या कुप्रथेवर विधिमंडळाच्या अधिवेशनात चर्चा व्हावी, अशी मागणी केली.


व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=123905552150687

गांधीजींचं मोठेपण उलगडणार्‍या छोट्या गोष्टी: १७

व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=430325017645766

या दिव्यांग शाळेचे जवळपास ९० %विद्यार्थी यशस्वीपणे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत


संतोष वाघमारे, प्रमोद बिराजदार, जयश्री जाधव, स्नेहा कोकाटे, प्रयाग पवळे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या लोहारा तालुक्यातल्या सास्तूरच्या निवासी दिव्यांग शाळेचे विद्यार्थी. आपापल्या कलागुणांनी विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवत आहेत.
शाळेनंतर अभियांत्रिकी, विधी, नर्सिंग अशा विविध शाखांमध्ये प्रवेश मिळालेले अनेक विद्यार्थी. शासकीय, निमशासकीय सेवेबरोबरच उद्योगव्यवसाय करणारे. शाळेचे जवळपास ९० %विद्यार्थी यशस्वीपणे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. दिव्यांग म्हणजे परावलंबी या धारणेला या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी छेद दिला आहे.
१९९३ चा किल्लारी भूकंप. परिसरातल्या ५२ गावांवरची मोठी आपत्ती. अनेक जण अपंग झाले. विशेषतः ६ ते १८ वयोगटातली मुलंमुली. त्यांच्या पुनर्वसनाचं महत्त्व श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाला उमगलं. त्यातूनच १० मार्च १९९५ ला दिव्यांगांसाठी निवासी शाळा आणि व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू झालं. शाळेत काही अनाथ विद्यार्थीही आहेत.
शाळेचा परिसर विविध झाडांनी बहरलेला. समर्पित वृत्तीचे शिक्षक आणि कर्मचारी. त्यामुळे मूल एकदा शाळेत आलं की शाळा त्याला घरच वाटते.
शाळेचा निकाल बहुतांश करून १००%. विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परिक्षांची माहिती शाळा देते. त्याची पूर्वतयारी करून घेते. डॉ. होमीभाभा स्पर्धा परीक्षा , शिष्यवृत्ती , एम टी एस, नवोदय , इतिहास प्रज्ञा शोध परीक्षा, एलिमेंटरी - इंटरमिजीएट चित्रकला परीक्षा, यासाठी मुलांना प्रोत्साहन दिलं जातं. ई लर्निंग,संगणक प्रशिक्षण आहेच. कला, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर मुलांनी गुणवत्ता सिद्ध केली आहे.
काही प्रमाणात शासकीय अनुदान आणि प्रामुख्यानं मोठ्या शहरातल्या दानशूर व्यक्तींकडून मिळणारं साहाय्य यावर संस्थेचा गाडा चालला आहे.
समस्येला आत्मविश्वासानं,हिमतीनं सामोरं जाण्याचं बाळकडू इथं मुलांना मिळतं. 

- गिरीश भगत, उस्मानाबाद. 

इथं केलं जात संशोधन...

नंदूरबार जिल्ह्यातलं शहादा. इथल्या साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचं फार्मसी कॉलेज. नवी उमेद नुकतंच इथं सोशल मीडिया वापरःतंत्र आणि मंत्र या विषयावर कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेला मुलांनी उत्तम प्रतिसाद दिला. त्यावेळी सहभागींनी काही विषयावर पोस्ट तयार केल्या. त्यातीलच ही एक व्हिडिओपोस्ट.
नंदूरबार जिल्ह्यातलं शहादा. इथल्या साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचं फार्मसी कॉलेज. फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस.पी.पवार तसंच फार्माकोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ.जी.एम.चव्हाण यांनी प्राणी प्रयोगशाळेविषयी माहिती दिली. सर सांगतात, या प्रयोगशाळेला पशू प्रयोग नियंत्रण समितीची अर्थात सीपीसीएसईएची मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे इथं प्रयोगासाठी लागणारे उंदीर, अल्बिनो उंदीर, ससे उपलब्ध असतात. या प्राण्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन केलं जातं. त्यातील मुख्य म्हणजे मेंदूचे रोग, मधुमेह व पोटाचे रोग इत्यादी आहेत.
प्राणी प्रयोगशाळेत प्राण्यांची पूर्णपणे काळजी घेतली जाते. त्यांच्या आहार- राहण्याचे वातावरण यावर नियंत्रण ठेवण्यात येते. तसंच वेळोवेळी त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. संशोधन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची यंत्रसामुग्रीही इथं उपलब्ध आहे.

व्हिडीओ लिंक :
https://www.facebook.com/watch/?v=604232960333763

गांधीजींचं मोठेपण उलगडणार्‍या छोट्या गोष्टी: १५ (वाचक : दिनेश अदावडकर)

व्हिडीआे लिंक : https://www.facebook.com/watch/?v=164282681548359

मुलगा-मुलगी भेद नको; मुलगी झाली खेद नको


बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे 'मुलगा-मुलगी भेद नको; मुलगी झाली खेद नको' हा मोलाचा संदेश देण्यासाठी सामान्य रुग्णालयाच्या परिचारिका पुढाकार घेत आहेत. नुकत्याच झालेल्या मकर संक्रांतीपासून इथं कन्या जन्माचे स्वागत सुरू करण्यात आलं. मातेला साडीचोळी आणि बाळाला झबलं दिला जाईल. त्यासाठी परिचारिका स्वतः खर्च करणार आहेत. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश टापरे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम नियमित सुरू ठेवला जाणार आहे. इथून पुढे दर बुधवारी हा उपक्रम केला जाईल असं डॉ.निलेश टापरे यांनी सांगितलं.
बुलढाणा जिल्ह्यात शासनाच्यावतीने बेटी बचाव बेटी पढाव हा उपक्रम अनेक वर्षांपासून राबविला जातो. या उपक्रमाची आणखी जागृती व्हावी कन्या जन्माचे स्वागत व्हावे यासाठी आता सामान्य रुग्णालयाने पुढाकार घेतला आहे. एका बाजूला मुलींना कमी लेखणारी मुलींच्या विरुद्ध असलेली समाजरचना आणि दुसऱ्या बाजूला सहजरीत्या परवडू शकणारी गर्भलिंग परीक्षणाची सोय यामुळे स्त्री-भ्रूण हत्येत वाढ होऊन बाल लिंग गुणोत्तर प्रमाण दिवसेंदिवस कमी होत गेलेले दिसते. त्यासाठी सरकारने मुलगी वाचवा मुलगी शिकवा योजना सुरू केली आहे. मुलींच्या कमी होत जाणाऱ्या जन्मदर समस्येला तोंड देण्यासाठी ही योजना 2014च्या ऑक्टोबर महिन्यापासून सुरू केली आहे. त्यामुळे आता ही देशव्यापी मोहीम चळवळ बनली आहे. मात्र समाजात अजूनही पाहिजे तशी जागृती नाही त्यासाठी आता खामगावात जन्माचे स्वागत हा उपक्रम राबविला जाणार आहे.


- अमोल सराफ, बुलढाणा

व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=164282681548359
 

गांधीजींचं मोठेपण उलगडणार्‍या छोट्या गोष्टी: १४ (वाचक : सविता दामले)

व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=544493509686162

ओळख नव्या आमदारांची : सरोज आहिरे (राष्ट्रवादी काँग्रेस)

मतदारसंघ देवळाली, जिल्हा नाशिक
महिला आणि युवकांच्या हाताला काम मिळवून द्यायचं आहे
"वडिल बाबुलाल आहिरे आमदार होते. या गोष्टीला ४० वर्ष झाली आणि त्यांना जावून ३० वर्ष. मात्र त्यांनी त्यांच्या मतदार संघात केलेली कामे-लोकांशी असलेला त्यांचा जनसंपर्क यामुळे आज त्यांची मुलगी म्हणून लोकांनी मताच्या स्वरूपात दिलेला आशिर्वाद माझ्यासाठी लाखमोलाचा आहे हीच आजवरच्या प्रवासाची शिदोरी", अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदार सरोज आहिरे आपल्या भावना व्यक्त करतात.
देवळाली मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला. माजी मंत्री बबन घोलप यांचे वर्चस्व असतांना चार वेळा निवडून आलेल्या तत्कालिन सेनेचे आमदार योगेश घोलप यांना शह देत आ. सरोज यांनी देवळा मतदार संघात विजय संपादन केला. राजकीय परिभाषेत त्या ‘जायंट किलर’ ठरल्या. नगरेसवक असतांनाही त्यांनी सेनेच्या माजी महापौर नयना घोलप यांचा पराभव करत नगरसेवक म्हणून काम करण्यास सुरूवात केली. नगरसेवकची पहिली टर्म पूर्ण होण्याआधीच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले. त्यांनी आमदारकीसाठी भारतीय जनता पक्षाकडे मागणी केली. मात्र युतीमुळे तो मतदार संघ सेनेला सुटला. सरोज यांनी राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश करत देवळा मतदार संघात निवडून लढविण्याचा निर्णय घेतला. आमदारकीच्या निवडणुकीसाठी बदलती राजकीय समीकरणे-आर्थिक जुळवाजुळव सरोज यांना परवडण्यासारखी नव्हती. सरोज यांच्यासाठी मतदार संघातील लोकच पुढे आले. प्रचारासाठी येणाऱ्या सरोज यांना आर्थिक मदत त्यांनी केली. नगरसेवक म्हणून सरोज यांचे काम पाहता त्यांना आमदार म्हणून काम करण्याची संधी जनतेने दिली. या ॠणातून मुक्त व्हायचे नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
कौटुंबिक अडचणीमुळे अर्धवट राहिलेले शिक्षण सरोज सध्या पूर्ण करत आहेत. कला शाखा पदवीच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा त्या देणार आहेत. भटकंती हा त्यांचा छंद असल्याने मतदार संघातील दौरा हा त्यांच्या आवडीचा भाग आहे.
आमदार म्हणून सूत्रं हाती घेतांना मतदार संघातील बंद असलेला साखर कारखाना आणि कधीही बंद होऊ शकेल असा एकलहरा वीज प्रकल्प सुरू कसा राहिल यासाठी त्यांना प्रामुख्याने काम करायचे आहे. या माध्यमातून महिला, युवक यांना काम मिळेल. ‘हाताला काम मिळालं’ की पुढचे प्रश्न गौण ठरतात असे सरोज सांगतात. या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाली असून लवकरच कामाला सुरूवात होईल. मतदार संघातील बहुतांश भाग हा ग्रामीण व आदिवासी असल्याने या ठिकाणी शिक्षणाचा अभाव आहे. येथील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देता येईल अशी शाळा उभारायची असा सरोज यांचा ध्यास आहे. आरोग्याच्या अडचणी पाहता प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात गुणवत्तापूर्ण सुविधा देण्यावर त्यांचा भर आहे. स्वच्छतेसाठी सद्य स्थितीत प्रबोधनावर भर देण्याकडे सरोज यांचा कल आहे. मतदार संघातील पाण्याचा प्रश्न कसा सुटेल यासाठी त्या आग्रही आहेत. गावागावात स्वच्छ पाणी कसे पोहचेल यासाठी त्यांचा अभ्यास सुरू आहे.
महिला-युवती व बालकांच्या सर्वांगिण विकासासासाठी त्यांना स्वसंरक्षण महत्त्वाचे वाटते. समुपदेशन, स्वसंरक्षण कार्यशाळा, जिल्हा परिषदेच्या शाळांचे रुप बदल बालकांना शिक्षणातून आनंद कसा मिळेल यासाठी काय करता येईल यासाठी माहितीची जमवाजमव सुरू आहे. सर्व कामांची रुपरेखा तयार असून पाच वर्षात त्या सॉर्टआऊट कशा होतील यासाठी पाऊले टाकण्यास सुरूवात झाली असल्याचे सरोज यांनी नमूद केले.
दुसरीकडे, पक्षाच्या जाहिरनाम्यानुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी, बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट होणार नाही, त्यांच्या मालाला योग्य भाव कसा मिळेल याकरता चर्चेपेक्षा कृतीवर भर देण्याचा त्यांचा मानस आहे.
#नवीउमेद #देवळाली #नवेआमदार #नाशिक #सरोजआहिरे

गांधीजींचं मोठेपण उलगडणार्‍या छोट्या गोष्टी: १३

व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=791285284654474

गांधीजींचं मोठेपण उलगडणार्‍या छोट्या गोष्टी: १२ (वाचक : माधवी कुलकर्णी)

व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=403945440529565

आतोणे शाळेतल्या मुलांचं वादन...

रोहा तालुक्यातल्या आतोणे गावातल्या शाळेतली ही मुलं. आम्ही मध्यंतरी मुलांना शाळेत खाऊ, खेळणी दिली. त्यातच हे डफलीसारखं वाद्यही होतं. मुलांना बाकी खेळाचा आनंद तर लुटलाच, पण हे आगळं वाद्यही त्यांना मनापासून आवडलं. हे साथीला घेऊन मुलंमुली गाण्याचा आनंद लुटत आहेत. हा व्हिडीओ पाठवला आहे गजानन जाधव या त्यांच्या सरांनी.

व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/sampark.net.in/insights/?section=navPosts

गांधीजींचं मोठेपण उलगडणार्‍या छोट्या गोष्टी: ११ (वाचक : मृणालिनी जोग)

व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/sampark.net.in/insights/?section=navPosts

विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालवलेलं सेवा किचन


बुलडाण्यातलं राजर्षी शाहू औषध निर्माण महाविद्यालय. या महाविद्यालयात अंतिम वर्षाला असलेले पवन, ऋषिकेष, राजेश, शाहदान,सोहेल, हर्षदा, किशोर आणि त्यांचे इतर मित्रमैत्रिणी. ग्रामीण भागातून आलेली ही मुलं. त्यांना इनोस्पायर या विभागीय स्पर्धेत पहिलं बक्षीस मिळालं. या रकमेतून काही तरी चांगलं करावं, विशेषतः गरजू विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावं असं वाटत होतं. त्यातून तीन महिन्यांपूर्वी सुरू झालं सेवा किचन.
चिखली रोडवर हे हॉटेल आहे. सुट्टीच्या दिवशी म्हणजे दर रविवारी इथं विद्यार्थ्यांना पोटभर जेवण दिलं जातं. इथं मेन्यू आणि रेट कार्ड नाही. बेत ठरलेला. फ्रुट कस्टर्ड, पालकपुरी, छोले आणि कढीखिचडी. विशेष म्हणजे इथं पैसे द्यायची सक्ती नाही. तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही मदत करू शकता. मुलांना यातून गरजू मुलांच्या शिक्षणासाठी पैशांची तरतूद करायची आहे. या हॉटेलमध्ये सुविचारांबरोबर एक पाटी आहे . त्यावरच लिहिलं आहे , 'सेवा किचन'मध्ये या.. अन् मोफत पोटभर जेवा!
किचनमध्ये अनेक विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून काम करत आहेत. हॉटेलमधे काम करणारी मुलं विविध जातीधर्माची आहेत. सर्वांनी आपले आडनाव हे भारतीय ठेवलं आहे. त्यामुळे हे कुण्या एकाचं नाही, सर्वांचं आहे असा संदेश दिला जात आहे. जास्तीत जास्त ग्राहक येतील आणि त्यातून गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लागेल असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. 


-दिनेश मुडे, बुलडाणा 

गांधीजींचं मोठेपण उलगडणार्‍या छोट्या गोष्टी: १० (वाचक दिनेश अदावडकर)

व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=2391746347746670

एका बापाचे लेकरास पत्र

आत्महत्येच्या बातम्यांनी अस्वस्थ झालेल्या लेकरास या बातम्या वाचून अस्वस्थ झालेला एक बाप लेकराला पत्र लिहितो . त्या पत्राचा प्रवास एका लघुपटापर्यंत झाला .डिप्रेशन ही एक जागतिक समस्या . आपल्या अनेकविध आजारांच्या कारणातली ४० टक्के कारणं ही खिन्नमनस्कतेशी निगडित .आपल्या जगण्याला व्यापून टाकणारी समस्या .. काही जणांच्या आत्महत्येपर्यंतच्या प्रवासाला कारणीभूत ठरणारी.उत्तर शोधायची .. कुठे .. केव्हा ... आणि कुणी ...न संपणारे प्रश्न ..पण शांतपणे विचार केला की लक्षात येतं , या प्रश्नांची उत्तर आपणच शोधायची आहेत .ती उत्तर आपल्याच जगण्यात दडलेली आहेत.अगदी आपल्या जन्मापासूनच नव्हे तर जन्माची चाहूल लागल्यापासूनच.हा लघुपट म्हणजे ..स्वत:चा शोध घेण्याचा धडा .स्वत:लाच समजावून सांगण्याचा एक आत्मशोध आनंदाने जगण्याचा आनंदाने जगवण्याचा आनंदाने जगू देण्याचा. रुद्रेश , अनिरूध्द आणि सचिन यांनी माझी संकल्पना तितक्याच तरलतेने मांडली आहे.
असोशीने आणि कसोशीने जगण्याचा आनंद घेण्याची आणि देण्याची वृत्ती हा लघुपट पाहून निर्माण व्हावी हीच तीव्र इच्छा .आनंदाने जगण्याची उमेद जागवण्यासाठी,स्वतः आत डोकावून पाहिलं तरी पुरेसे आहे; हे लक्षात आणून देण्यासाठी ही फिल्म.
-डाॅ. श्रीकांत कामतकर
drkamatkar@gmail.com
9822215118
  

व्हिडीओ लिंक : https://www.youtube.com/watch?v=1kjYhQeQIJo&feature=youtu.be&fbclid=IwAR04CnDONeRi5UGia1saFHKpVaQdojUI0XSe1fy-0yawCPe8s6HcveLzHmA

गांधीजींचं मोठेपण उलगडणार्‍या छोट्या गोष्टी : ९

व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=701057860407529

महिलांच्या दराऱ्यानं हातभट्ट्या बंद

दारू पिणाऱ्याला १० हजार दंड .. विक्री करणाऱ्याला २० हजार रुपये दंड ... गाव शिवारात गावठी दारू निर्मिती करणाऱ्याला ५० हजार रुपये दंड आणि जो दारू निर्मिती करणाऱ्याला पकडून देईल त्याला आकर्षक बक्षीस .. समशेरपूरमधल्या महिलांनी हा ठराव केला आहे.
समशेरपूर, आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यातलं गाव. वस्ती साधारण दीड हजार. गावात २५ बचतगट. हैदराबाद घटनेनंतर या महिलांमध्येही चर्चा सुरू झाली. चकमकीत संशयित मारले गेले. पण महिलांवर होणारे अत्याचार, शोषण संपेल का? ते संपवण्यासाठी मूळ समस्येवर काम करणं आवश्यक आहे, असं या महिलांना वाटलं. महिलांच्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषणाचे सर्वात मोठे कारण आहे, व्यसन. मद्य आणि अंमली पदार्थांपासून मुक्त समाज घडवला तर महिलांच्या शोषणात मोठी घट होईल. बचतगटांच्या विकासातही व्यसनी लोकांकडून अडथळे येत होते. संघटित असूनही हे थांबवता येत नसेल तर काय उपयोग... या मंथनातूनच निर्धार पक्का झाला. सरपंच गीतांजली पाटील यात अग्रणी होत्या.
दारूबंदीसाठी महिलांनी ग्रामसभा घेतली. सुरुवातीला प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नव्हतं. मग महिलांनी स्वतःच आचारसंहिता तयार केली. तीन किलोमीटरच्या शिवारात दारू विक्री आणि पिणाऱ्यांना दंड. या निर्णयाची माहिती देणारे बॅनर गावात लावण्यात आले. मग महिलांनी गस्त सुरू केली. या निश्चयी आणि संघटित महिलांचा दरारा एवढा आहे की या परिसरातल्या हातभट्ट्या जवळपास बंदच झाल्या आहेत.
गावातल्या अनेक पुरुषांचा पाठिंबा त्यांना आहे आणि आता पोलिसांचीही साथ त्यांना आहे. या उपक्रमाची जिल्ह्यातही चर्चा होत आहे.

- कावेरी परदेशी, नंदुरबार

गांधीजींचं मोठेपण उलगडणार्‍या छोट्या गोष्टी : ८ (वाचक : लता परब)

व्हिडीओ लिंक :  https://www.facebook.com/watch/?v=945973885760423

महिलांसाठी पोलिसांचे ‘सुरक्षा कवच’, सुरक्षेत आता हद्दीचा नाही अडसर


‘रात्री अकराची वेळ. बीड शहरापासून दूर खंडेश्वरी मंदिर परिसर. दोन मुलींची दुचाकी बंद पडते. महिला हेल्पलाइन १०९१ वर त्या फोन करतात. बीड पोलिसांच्या नियंत्रण कक्षात त्यांचा संपर्क होतो. घरी जाण्यासाठी त्या पोलिसांची मदत मागतात. अवघ्या सात मिनिटांत या मुलींजवळ पेठ बीड पोलिसांची व्हॅन, पुरुष आणि महिला पोलिस कर्मचारी हजर होतात. बऱ्याचदा उपाययोजना, उपक्रम जाहीर होतात. पण स्थानिक पातळीवर त्याची व्यवस्थित अंमलबजावणी झाली तरच त्याचा उपयोग. पोलीस सुरक्षा कवच उपक्रमाबाबत शहरातल्या पत्रकारांनी मिळून याबाबत पडताळणी केली. त्यात आलेला हा समाधानकारक अनुभव. महिला, मुलींच्या मदतीसाठी रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत बीड पोलिसांनी सुरु केलेला हा उपक्रम चर्चेचा ठरत आहे.
हैदरबाद, उन्नावच्या घटनांनी देशात संतापाची लाट उसळली. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. हैदराबाद घटनेत रात्री नऊच्या सुमाराला डॉक्टर तरुणीवर दुर्देवी प्रसंग ओढावला होता. ही बाब लक्षात घेऊन बीडचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी बीड जिल्ह्यात ‘पोलिस सुरक्षा कवच’ उपक्रम सुरु केला आहे.
या उपक्रमाविषयी सांगताना एसपी हर्ष पोद्दार म्हणतात, ''महिला मग त्या अधिकारी, कर्मचारी असोत अथवा मजूरी करणाऱ्या कामगार ; घरी परतण्यासाठी अनेकदा उशीर होतो. त्यावेळी त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. रात्रीच्या वेळी रिक्षा, बस मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन त्यांच्या मदतीसाठी सुरक्षा कवच उपक्रम सुरू केला आहे. रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत कोणत्याही महिलेला मदतीची गरज असेल तर १०० क्रमांकावर अथवा पोलिसांच्या नियंत्रण कक्षात ०२४४२-२२२३३३, २२२६६६ अथवा महिला मदतीसाठीच्या १०९१ या क्रमांकावर संपर्क करावा. महिला, युवती जिथे असेल तिथे जवळच्या ठाण्याचे पोलीस तात्काळ पोहचतील आणि महिलेला पोलीस वाहनातून थेट तिच्या घरी सोडण्यात येईल. महिला दुसऱ्या जिल्ह्यातील, लांब राहणारी असेल तर रात्रभर तिला सुरक्षित वाटेल अशा ठिकाणी तिची राहण्याची व्यवस्था करण्यात येते. सकाळी तिला इच्छितस्थळी पोहचवण्याची व्यवस्था केली जाते. यासाठी रात्र गस्तीवर असलेल्या पोलिस वाहनांचा आधार घेतला जात आहे. सर्व वाहनांना जीपीएस असल्याने महिला जिथे आहे त्या भागात कोणते वाहन लवकर पोहचू शकते हे पाहून तशा सूचना दिल्या जातात. यात पोलिस ठाण्याच्या हद्दीचा प्रश्नच शिल्लक ठेवलेला नाही. याबाबत सर्व ठाणे प्रमुखांना सूचना दिल्या असून नागरिकांनाही आवाहन केले आहे. याला प्रतिसाद मिळत आहे.''
ग्रामीण भागातूनही तक्रारी येत असून त्यांचं निराकरण केलं जात आहे. सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मुलीला दोन मुलांनी त्रास दिला. तिने आधी याबाबत कुणाला सांगितला नाही. पण सुरक्षा कवचबाबत माहिती मिळताच तिने नियंत्रण कक्षात प्रकार कळवला. त्यानंतर सिरसाळा पोलिस तिच्या घरी पोहचले आणि सर्व प्रकार समजून घेऊन दोन टवाळखोरांवर गुन्हा दाखल झाला.
अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे म्हणाले, ''रात्री मदतीसोबतच दिवसा महिला, मुलींची छेडछाड होऊ नये यासाठी जिल्ह्यात शक्ती पथक स्थापन केले असून हे पथक महिला अधिकारी, कर्मचारी चालवतात. सार्वजनिक ठिकाणे, शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवणी वर्गांच्या परिसरात गस्त घालून टवाळखोरांवर पथकाकडून कारवाई केली जाते.''
पोलिस सुरक्षा कवच
इथे करा संपर्क
१०० क्रमांकावर फोन करा
१०९१ - महिला हेल्पलाइन
बीड पोलिस नियंत्रण कक्ष
(०२४४२) २२२३३३, २२२६६६

- अमोल मुळे, बीड

गांधीजींचं मोठेपण उलगडणार्‍या छोट्या गोष्टी : ७ (वाचक : दिनेश अदावडकर)

व्हिडीओ लिंक :  https://www.facebook.com/sampark.net.in/videos/1254698651388867/?v=1254698651388867

Friday 31 January 2020

गांधीजींचं मोठेपण उलगडणार्‍या छोट्या गोष्टी: ६ (वाचक : मेधा कुलकर्णी)

व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=1209380345914119

आदर्श आंबेडकरांचा..... मोठा माणूस होण्याचं स्वप्न झालं साकार

सोलापूरमधलं रमाबाई आंबेडकर नगर. तिथे राहणारे नंदा आणि कुमार वाघमारे. दोघे सोलापूर महानगरपालिकेत सफाई कामगार. त्यांचा मुलगा कुणाल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्याचे आदर्श. त्यांच्याप्रमाणेच मोठं होण्याचं त्याचं लहानपणापासूनच स्वप्न होतं. मुलाचं स्वप्न साकार व्हावं यासाठी आईवडिलांनीही रात्रंदिवस मेहनत केली. शिक्षणात काही कमी पडू दिलं नाही. कुणालनीही आईवडिलांच्या कष्टाचं चीज केलं. 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१८ मध्ये दिवाणी न्यायाधीश(क) स्तर आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी या पदासाठी १९० जागांकरिता जाहिरात दिली होती . यासाठी ७ एप्रिल २०१९ ला पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा १ सप्टेंबरला आणि ६ डिसेंबरला मुलाखत झाली. डिसेंबर २०१९ च्या शेवटच्या आठवड्यात निकाल जाहीर झाला. त्यात कुणाल संपूर्ण राज्यातून १० वे तर अनुसूचित जातींमधून पहिले आले . २०० पैकी १५८ गुण त्यांना मिळाले.
कुणाल यांचं शालेय शिक्षण महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक २१ आणि २ मध्ये झालं. दयानंद महाविद्यालयातून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण. भाई चन्नुसिंह चंदेल महाविद्यालयातून एमएसडब्ल्यू.
याच दरम्यान त्यांच्या जमिनीचा खटला उभा राहिला. खटल्याच्या सुनावणीदरम्यानच वकिलाचा मृत्यू झाला. या घटनेतूनच कायद्याचा अभ्यास सुरू झाला. त्यातला रस वाढत गेला आणि दयानंद विधी महाविद्यालयातून वर्ष २०१४ मध्ये एलएलबी पूर्ण केलं . एलएलबीला सोलापूर विद्यापीठात प्रथम आणि २०१६ मध्ये एलएलएमला दुसरा क्रमांक. ''संघर्षाशिवाय काहीच मिळत नाही.'' अॅड. कुणाल सांगतात. ''स्वप्न नुसतं पाहण्यात कमी वेळ घालवला. ते पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ दिला. रोज घरीच ७-८ तास अभ्यास केला. माझ्या यशात आईवडील, ४ बहिणी आणि पत्नीचं मोठं योगदान आहे.''
-अमोल सीताफळे, सोलापूर

गांधीजींचं मोठेपण उलगडणार्‍या छोट्या गोष्टी: ५ (वाचक : अश्विनी जोग)

व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=1284203571703718

ओंकारच्या रसवंतीची गोष्ट...



सांगली जिल्ह्यातल्या औदुंबर या तीर्थक्षेत्राजवळचं बावची गाव. इथल्या ओंकार खोत या तरूणाने हायवेलगत माऊली रसवंती आणि छोटंसं किराणा दुकान सुरू केलंय. ओंकार ११वीत शिकत असताना त्याला ही कल्पना सुचली. वडील प्रकाश खोत यांच्याकडे हट्ट करून त्याने हा व्यवसाय सुरू केला. पर्यटकांची भरपूर ये-जा सुरू असलेला हा रस्ता असल्याने ओंकारची रसवंती तेजीत असते. किराणा टपरीवर तो रसायनविरहित गूळ विकतो. गेल्या वर्षभरात लाखभर रुपयांची कमाई झाल्याचं ओंकारने सांगितलं.
नवी उमेदच्या वाचक सुमन दिवाकर यांनी हा व्हिडिओ खास नवी उमेदसाठी करून पाठवला. ओंकारला शुभेच्छा आणि सुमनताईंना धन्यवाद.
व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=453788288837107

गांधीजींचं मोठेपण उलगडणार्‍या छोट्या गोष्टी: ४ (वाचक : दिनेश अडावदकर)

व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=411741936209322

खासगी शाळांतील ३० टक्के मुले लठ्ठ ! (बातम्या तुमच्या आमच्या मुलांच्या)

अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफ.डी.ए.) इंडियन डायबेटीस असोसिएशनसोबत केलेल्या संयुक्त सर्वेक्षणात हा प्रकार निदर्शनास आला आहे.
हल्ली धकाधकीच्या जीवनात आहार संतुलन ठेवणं कठीण होऊन बसलं आहे. त्यात शाळेतील लहान मुलं ही आलीच. ही शाळकरी मुलं फक्त शाळेतच जात नसून ते वेगवेगळे क्लासेस, ट्युशन्स व एक्स्ट्रॉ क्लासेसला जात असल्यामुळे ही मुलं घरातून बराचवेळ बाहेर असतात. त्यामुळेच बाहेर जे काही मिळेल, जे समोर असेल ते खातात. अश्यावेळी कमी वेळात जे खाता येईल, थोडक्यात भूक शमेल हेच लक्षात ठेऊन मुलं जंक फूडच्या आहारी जातात.
शाळा, कॉलेजमध्ये कॅण्टीनमधून चिप्स, तळलेले पदार्थ, पिझ्झा, बर्गर, चॉकलेट्स असे जंक फूडचे पदार्थ सहज उपलब्ध असतात. आणि असे चमचमीत पदार्थ कुणालाही सहजच आवडतात. यातून त्यांच्या पोषण गरजा भागवल्या जात नाहीत. एका सर्वेक्षणानुसार दिल्लीच्या शाळांमधील मुलांच्या लठ्ठपणाचे प्रमाण २००२मध्ये १६ टक्के होते तर २००६ मध्ये ते २४ टक्क्यांनी वाढले.
विद्यार्थ्यांच्या निरोगी आरोग्यासाठी कशा पद्धतीचा आहार आवश्यक आहे, याची माहिती पालकांना देणे आवश्यक आहे. त्यासाठी शाळास्तरावर नियुक्त होणाऱ्या समितीकडून ‘मास्टर शेफ’ स्पर्धांसह इतरही उपक्रम राबवून पालकांना, विद्यार्थ्यांना आवडेल असे नावीन्यपूर्ण खाद्यपदार्थ तयार करणे गरजेचे आहे.
- लता परब
बातमी लिंक : Nashik News: ‘जंक फूड’विरोधात विद्यार्थीप्रबोधन! - student awareness against 'junk food'! | Maharashtra Times - http://mtonline.in/qKGena/lmy

आमचा खारीचा वाटा

नुकतीच झालेली सावित्रीमाईची जयंती आणि आमच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त 10 सुकन्या खाती आमच्या वतीने पहिलं डिपॉजिट भरून काढण्यात आली. ही खाती कुसळंब व दाजी पेठ पोस्ट ऑफिस इथं काढण्यात आली. त्यामध्ये विविध सामाजिक व आर्थिक घटकातील कुटुंबांचा समावेश होता. 
बऱ्याच वेळी परिस्थितीमुळे मुलींना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं, शिक्षणाचा खर्च परवडणारा नसल्यामुळे मधेच शिक्षण सोडून द्यावं लागतं. लातूर जिल्ह्यातील जढाळा येथील स्वाती पिटले प्रकरण व पंढरपूरमधील पॉलिटेक्निकचं शिक्षण घेणाऱ्या मुलीने आपल्या वडिलांना शिक्षणाचा खर्च परवडणारा नसल्याने परिस्थितीला कंटाळून केलेली आत्महत्या.
अशा घटना घडू नयेत म्हणून मुलींच्या आई- वडिलांना तिच्या लहानपणापासूनच तिच्यासाठी बचतीची सवय लागावी यासाठीचा आमचा हा छोटासा प्रयत्न. यामुळे मुलींकडे एक प्रकारचं ओझं म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन हा बदलणारा नाही. परंतु यामुळे तिला तिच्या गरजेच्या वेळी शिक्षणासाठी नक्कीच मदत होईल अशी आशा आम्ही बाळगतो.
- पूजा कांबळे, दत्ता चव्हाण

गांधीजींचं मोठेपण उलगडणार्‍या छोट्या गोष्टी: ३ (वाचक : सायली राजाध्यक्ष)

व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=878738262523408

तस्नीमच्या शाळेची गोष्ट

तस्नीम असद बॉम्बेवाला. शिक्षणाने आर्किटेक्ट. सर्वसामान्य गृहिणी. पहिल्या अपत्याच नाव ‘अस्मा’. अस्मासाठी मोठी स्वप्नं पाहणं सुरू झालं. ती अडीच वर्षांची झाली आणि इतर सामान्य मुलांपेक्षा ती वेगळं वागते आहे, सर्व सामान्य मुलांच्या आकलनापेक्षा अस्माची आकलन क्षमता कमी आहे हे तस्नीम यांना लक्षात यायला लागलं. लगेचच त्यांनी नागपूर-मुंबई अशा अनेक ठिकाणी अनेक डाँक्टरकडे अस्माला दाखवलं. पण तिला झालाय काय हे निश्चित कुणालाच सांगता येईना. या सगळयात प्रचंड पैसे खर्च झाला, पण आजाराचं निदान होईना. अस्मा सहा वर्षांची असताना मुंबईतल्या एका डॉक्टरांनी अस्माला Niemann Pick-type-C हा आजार असल्याचं सांगितलं. या आजाराचे भारतात केवळ ४ रुग्ण आहेत तर जगभरात २००. या आजारावर कुठलाही औषधोपचार उपलब्ध नाही. कारण त्यावर फारसं संशोधनच झालेलं नाही. या आजारात रुग्णाचा मेंदू हळूहळू क्षीण होत जातो व एकदिवस काम करणं बंद करतो. असे रुग्ण फार तर २०-२५ वर्षे जगतात.
स्वतः मुलीच्या मृत्यूचं वय माहित असलेल्या आईला काय वाटत असेल हे शब्दात सांगणं कठीण. अशा परिस्थितीत सामान्य पालक खचून जातील. आपल्याच नशिबात असं मूल का? असा दोष स्वतःला देत राहतात. सर्वथा मानसिक निराशा येते पण तस्नीमने या परिस्थितीतून जात स्वतःला व परिवाराला सांभाळलं, सावरलं. हिंमत बांधली, अस्मा आहे तेवढा काळ सर्वोत्तम स्थितीत तिचा सांभाळ करायचा तिने निर्धार केला. इतक्यावरच तस्नीम थांबलेल्या नाहीत.
‘अस्मा’च्या असाध्य आजाराबद्दल कळल्यावर तिची योग्य काळजी घेणं त्यांनी सुरू केलंच. शिवाय, अशा मुलांना कसं सांभाळायचं, त्यांना ट्रेनींग काय व कसं द्यायचं, त्यांना कसं शिकवायचं याबद्दल त्यांनी अमेरिकास्थित एक संस्थेतून विशेष शिक्षण घेतलं.
तस्नीमच्या लक्षात आलं की यवतमाळ सारख्या आडवळणाच्या गावात वैद्यकीय सोयी फारशा नाहीत. आणि सगळ्यांनाच नागपूर-पुणे-मुंबई येथे आर्थिक दृष्ट्या जाणे अशक्य आहे. स्वतःच्या मुलीसाठी त्यांनी मुंबई पुण्याच्या केलेल्या वाऱ्या कमी नव्हत्या. तेव्हा अशा special kids साठी यवतमाळ येथे विशेष शाळा सुरू करायचं त्यांनी ठरवलं आणि २०१६ मध्ये छोट्याशा जागेत शाळा सुरु केली. त्यानुसार त्यांनी ‘नवदीन एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना केली. त्याच नावाने यवतमाळ शहरात शाळा सुरू केली. आज त्यांच्याकडे १५ ते २० विद्यार्थी आहेत. ADHA, LD, Autism, Slow Learner, Cerebral palsy, Dyslexia, multiple disability, Mental retardation, down syndrome, etc. अशा विविध आजाराने ग्रस्त असे ३ ते १६ वयोगटातील दिव्यांग त्यांचे विद्यार्थी आहेत. साधारण मुलांपेक्षा यांना शिकवणं अत्यंत कठीण आहे. दोन अधिक दोन हे शिकायला बरेचदा मुलांना दोन महिने लागतात. पण तस्नीम हिम्मतीने सगळं करत आहेत. मुलांना अक्षर ओळख देणे, काम स्वतःहून करायला शिकवणे, खेळ व त्यातून शिकवण, योगा, व्यायाम असं सगळं तस्लीम मुलांना शिकवतात.
तस्नीम यांना हे सगळं का करावसं वाटलं? असं विचारलं. त्या म्हणतात, “आजार माणसाची आर्थिक परिस्थिती पाहून येत नाही. यवतमाळच्या आजूबाजूला असे काही पालक आहेत जे अशा special child च्या वैद्यकीय आणि शैक्षणिक बाबतीत फार खर्च करू शकत नाही. तेव्हा अशा पालकांच्या पाल्यांसाठी काहीतरी करावं, अस्माची आई म्हणून जे काही सोसलंय ते इतर पालकांच्या वाट्याला येऊ नये, आणि अशा दिव्यांग, मतिमंद मुलांना शिक्षण मिळावं म्हणून शाळा सुरू केली आहे.” मुलांना कसं सांभाळावं, 'अशा' पाल्यांचा सांभाळ करताना स्वतःला कसं तयार करावं, या विषयावर त्या पालकांचं समुपदेशन करतात.
या कामात त्यांचे पती असद त्यांना व्यवसाय सांभाळून मदत करतात. आज नवदीन शाळा असद यांच्याच दुकानातील वरच्या मजल्यावर सुरू आहे.
सर्व सामान्य मुलांना सांभाळताना पालकांच्या नाकी नऊ येतात. मग अशा विशेष मुलांना सांभाळणं, त्यांची काळजी घेणं किती अवघड असेल. तरी हे काम तस्नीम यांनी आव्हान, जबाबदारी म्हणून स्वीकारलं आहे.
तस्नीम असद बॉम्बेवाला
nvdeen education society,
A shool for special kids,
www.navdeen-education.webnode.com
nvdeen.edu@gmail.com
mb 9970 1516 52
- निखिल परोपटे, यवतमाळ

ओळख नव्या आमदारांची : श्वेता महाले (भाजप)

चिखलीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे : आमदार श्वेता महाले
२०१९ च्या निवडणुकीनंतर गठित झालेल्या विधानसभेत २४ महिला आमदार आहेत, मागच्या विधानसभेतल्या महिला आमदारांहून दोन जास्त. यापैकी १२ भाजपच्या आहेत. श्वेता महाले या भाजपच्या विदर्भातल्या एकमेव महिला आमदार. आणि पहिल्यांदा निवडून आलेल्या १२ महिला आमदारांपैकी आहेत. ३६ वर्षाच्या, तरूण आहेत.
त्यांच्या माहेरी (पाटील) आणि सासरी (महाले) दोन्ही कुटुंबांमध्ये सामाजिक – राजकीय काम करणारे नातलग असल्याने श्वेता यांच्यासाठी हे क्षेत्र परिचयाचं होतं. लग्न झाल्यावर संसार आणि मुलाला वाढवण्यात श्वेता यांची सुरूवातीची वर्ष गेली. २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारांत त्यांनी पंतप्रधान मोदी यांचं भाषण ऎकलं. आणि भारावून जाऊन राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात बुलढाणा जिल्हा परिषदेवर निवडून येण्यापासून झाली.
त्या म्हणाल्या की, महिला-बालकल्याण विभाग कुणाला नको असतो. पण मी त्या विभागाची जबाबदारी आवडीने घेतली. महिला-बालकल्याण सभापती म्हणून त्यांनी जिल्हा परिषद महिला सदस्यांच्या प्रशिक्षणात लक्ष घातलं. प्रशिक्षणासाठी राखीव असलेला नि्धी वापरला. आदर्श अंगणवाड्या असा उपक्रम सुरू करून अंगणवाडी सेविकांना प्रेरित केलं, त्यांच्या कामाची पावती दिली. गावातल्या आणि तालुक्यातल्या निवडून आलेल्या स्त्रियांच्या हाती पहिल्यांदा माईक मिळाल्यावर त्यांना कसा आत्मविश्वास वाटतो, हे अनुभवणं खूप छान वाटल्याचं श्वेता म्हणाल्या.
आता आमदार झाल्यावर महिलांच्या समस्यांना प्राधान्य देणं सुरूच राहाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. महिलांच्या, गावांच्या विकासाशी जोडलेला मूळ विषय पिण्याचं पाणी हा आहे. चिखली मतदारसंघातल्या सर्वच्या सर्व १४६ गावांना आणि चिखलीतल्या गरीब श्रीमंत सर्व कुटुंबांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावतो आहे. तो सोडवायचा, हे माझ्या यादीतलं पहिलं काम आहे, असं श्वेता महाले यांनी सांगितलं. 

गांधीजींचं मोठेपण उलगडणार्‍या छोट्या गोष्टी : २ (वाचक : माधवी कुलकर्णी)

व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=740725789733356

रद्दीच्या पैशातून मुलांच्या संगोपनाला आधार

नागपूरमधले नागेश पाटील. सामाजिक क्षेत्रात गेली २० वर्ष कार्यरत. गरीब,अनाथ पण हुशार मुलांना उत्तम शिक्षण मिळावं आणि ती स्वतःच्या पायावर उभी राहावीत, यासाठी ते काम करतात. २०१२ मध्ये त्यांनी 'जिव्हाळा' ही संस्था यासाठी सुरू केली.
‘बेटी बचाओ बेटी पढाओ’‘रद्दी देई बुद्धी’ या त्यांच्या संस्थेच्या ब्रीदवाक्यातून देशालाही बेटी बचाओचा संदेश मिळाला. सध्या त्यांच्या संस्थेत एकूण ४२ मुलं. त्यापैकी १५ मूलं आणि १९ मुली अरूणाचल प्रदेशमधल्या तर ८ मूली विदर्भातील. ५ वी ते पदवीपर्यंत शिक्षण घेणारी. भरतनाटयमपासून अभियांत्रिकीपर्यंत वैविध्यपूर्ण शिक्षण घेणारी. नर्सिंगचं प्रशिक्षण पूर्ण करून ९ मुली नोकरीही करत आहेत.
नागलोक बुद्धिस्ट सेंटरमध्ये अरुणाचल प्रदेशातला चकमा नावाचा युवक शिकायला होता. त्याची पाटील यांच्याशी भेट झाली. त्याला त्यांच्या कार्यविषयी समजलं. आपल्या बहिणीच्या शिक्षणाची आणि संगोपनाची जबाबदारी घेण्याची विनंती चकमानं पाटील यांना केली. तिच्याबरोबर १३ मुली आल्या. असं करतकरत अरुणाचल प्रदेशमधली मुलं संस्थेत येऊ लागली.
मुलं आणि मुलींसाठी राहण्याची स्वतंत्र व्यवस्था. मुलींसाठी एक वॉर्डन. जेवण स्वतः पाटील यांच्या पत्नी करतात. मदतीला एक आचारी. मुलांना शहरातल्या प्रतिष्ठित शाळांमध्ये घातलं आहे. पाटील यांच्या कामात त्यांच्या पत्नीचा न बँकेत काम करणाऱ्या बहिणीचा मोठा वाटा आहे. पाटीलही पूर्वी नोकरी करायचे. पण मुलांकडे पुरेसं लक्ष देता येत नसल्याचं वाटल्यानं त्यांनी नोकरी सोडली.
आईवडिलांशी भेट घालून देण्यासाठी ते दरवर्षी मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत अरुणाचल प्रदेशला घेऊन जातात. या कामासाठी पाटील यांना दरवर्षी २५ ते ३५ लाख रुपये खर्च येतो. यासाठी काही दानशूरांची साथ त्यांना आहे. काही दाते नियमितपणे रद्दी देतात. ही रद्दी विकून मिळणारे पैसे ते मुलांसाठी वापरतात.
राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून अनेक मान्यवरांनी त्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. महाराष्ट्र भूषणसह ७० पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.

- नीता सोनवणे, नागपूर

गांधीजींचं मोठेपण उलगडणार्‍या छोट्या गोष्टी : १ (वाचक : नीना कुळकर्णी)

लिंक : https://www.facebook.com/watch/?v=395853391333371

कल्पकतेला वाव अन‌् मिळाली जगण्याची उमेद

ही सुंदर, कल्पकतेने घडवलेली शुभेच्छापत्रं पाहताय? यासह टाकाऊ वस्तूपासून बनवलेल्या आकर्षक पिशव्या पण. कोणी बनवल्यात माहितीये? त्या बनवल्यात पाली (ता.बीड) येथील इन्फंट इंडिया आनंदवनातील युवती अन‌् महिलांनी.
एचआयव्ही बाधितांचे जगणे म्हणजे व्यक्तीगत आयुष्यातील संघर्ष अन समाजाकडून होणारी उपेक्षा. अशा स्थितीत जीवनात आनंद यावा, तरी कसा. याच विचारांतून इन्फंट इंडियातील महिला, युवती, मुलांसाठी दोन वर्षांपूर्वी कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात आलं. अभ्यासाविषयी फारशी उत्सुक नसलेली व काहीशी आत्ममग्न असलेली आसमा शेख. तिला शुभेच्छापत्रे बनवायला, टाकाऊ वस्तूंपासून विविध शिल्प बनवायला, कापडी बॅग बनवायला आवडायचं. इन्फंट इंडियाचे संचालक दत्ता बारगजे आणि संध्या बारगजे यांनी आसमासह प्रकल्पातील सर्व महिला, मुलींना त्यांची कल्पकता वापरता यावी, यासाठी कौशल्य विकास केंद्राची संकल्पना मांडली. त्याला समाजातील मान्यवरांचे पाठबळ मिळाले अन‌् हे केंद्र सुरुही झाले.
आज आसमासह १८ मुली फावल्या वेळेत पिशव्या, शुभेच्छापत्र बनवतात. विविध ठिकाणी असलेल्या उपक्रमांच्या निमित्ताने स्टॉल लावून त्याची विक्रीही करतात. यातून या कामाचा मोबदलाही मिळतो अन‌् आपल्या हातून काहीतरी घडत आहे, त्याचे समाधानही. नव्या वर्षात आता या मुली, महिलांनी बनवलेले साहित्य अधिकाधिक लोकांपर्यंत कसे जाईल, याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या प्रकल्पातील सर्वांच्या जगण्याला, कल्पकतेला नवे आयाम देणारा हा उपक्रम उत्तरोत्तर बहरत जात आहे.
- अनंत वैद्य, बीड

केम छो? मजा मा!

बरेच वर्षापासून मस्कुलर डिस्ट्रॉफी सारख्या असाध्य रोगाने ग्रस्त आहे त्यामुळे मी चालणे काय उभाही राहू शकत नाही. अशा परिस्थितीत कोणीही नैराश्यग्रस्त होऊ शकतो. पण नेहमी सकारात्मक दृष्टिकोन आणि नवीन गोष्टींबद्दल जिज्ञासा यामुळे मी कायम आनंदी असतो.
मला गुजराती माणसांची एक गोष्ट खूप आवडते दोन गुजराती माणसं एकमेकांना भेटली की एक संवाद हमखास होतो; 'केम छो?' आणि दुसरा म्हणणार 'मजा मा' म्हणजे मजेत. किती छान! नुसतं ठीक म्हटलं की चाललंय आपलं कसंतरी असं वाटतं.
शारीरिक अस्वास्थ्यामुळे मी बाहेर जाऊ शकत नाही पण कोणी मला विचारलं "काय कसं काय?"तर मी लगेच 'मजा मा' असंच म्हणतो. कारण खरंच मी नेहमी मजेत असतो.
रोज जरी बाहेर जात नसलो तरी महिन्या दोन महिन्यात एकदा विवियाना मॉलला जातो आणि केएफसी चिकन खातो. जमलं तर एखादा चित्रपट सुद्धा पाहतो.
तुम्हाला खोटं वाटेल पण मी आठ वेळा अमेरिकेला जाऊन आलो आहे आणि एकदा तर एकटा जाण्याचं धाडस सुद्धा केलं आहे.
तिकडे मुलाने एक स्कूटरपण घेतली आहे माझ्यासाठी. मग मी स्कूटरवरून मॉलमध्ये किंवा एखाद्या दुकानात जाऊन खरेदी सुद्धा करतो. माझा मुलगा आणि सून मला सगळीकडे म्हणजे हॉटेलमध्ये किंवा बर्थडे पार्टीमध्ये आवर्जून घेऊन जातात. तिकडे अशी सोय सर्व ठिकाणी असते. एकदा तर सुनेने ब्युटी पार्लरमध्ये नेऊन माझं पॅडिक्यूअर आणि मॅनिक्युअर सुद्धा करून आणलं आहे. अशा रीतीने तीन-चार महिने राहून भरपूर मजा करून आणि अमाप पॉझिटिव्हिटी घेऊन परत येतो. या सर्वांमध्ये माझ्या पत्नीची सक्रिय साथ असते म्हणूनच हे शक्य होते. ही पॉझिटिव्हिटी मला पुढच्या वारी पर्यंत पुरते.
घरी असलो तरी मला कधीही कंटाळा येत नाही कारण सकाळी उठल्यावर संपूर्ण पेपर वाचून काढतो. नंतर एखादे चांगले पुस्तक सुद्धा वाचतो घरातल्या स्मार्ट टीव्ही वर अँग्री बर्ड, quizup वगैरे गेम सुद्धा खेळतो. तसेच गुगल स्ट्रीट व्ह्यू वर वेगवेगळ्या शहराची सफर सुद्धा करतो. व्हाट्सअपवर मुलांशी आणि नातलगांशी व्हिडिओ चॅट करतो. मागे एकदा मुलगा नवीन घर घेणार होता तेव्हा गुगलवर वेगवेगळी घरं बघून त्याला नवीन घराबद्दल माहिती पण देत असे. शिवाय टिव्हीवर नॅशनल जिओग्राफिक ऍनिमल प्लॅनेट आणि मराठी सिरीयल तर पाहतोच त्यामुळे घरात असून सुद्धा वेळ कसा जातो कळतच नाही.
आता सांगा कोणी गुजराथी माणसानं मला जर विचारलं 'केम छो' तर मी 'मजा मा' असंच म्हणणार ना?
- सुधीर शेवडे, ठाणे

Wednesday 29 January 2020

वाडीचा प्रसाद होणार न्यायाधीश

बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यातील वाडी. ८५० घरांची वस्ती असलेलं खेडेगाव. इथला प्रसाद ठाकरे. वय २७. राज्य लोकसेवा आयोगाची दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ विभाग) आणि न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाला आहे.
प्रसाद सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला. प्राथमिक शिक्षण नगर परिषदेच्या मराठी प्राथमिक शाळेत. १० वीला ६० टक्के. १२ वीत ५१ टक्के. गुण कमी असल्यानं डॉक्टर होण्याचं स्वप्न बारगळलं. प्रसाद काहीसा हिरमुसलाच. घरची शेती करायची ठरवलं. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात एकूणच पाऊस अनियमित. त्यामुळे शेतीतून उत्पन्न कमालीचं घसरलेलं. प्रसादनं तीन वर्ष शेती केली. त्यातच दीड लाखांचं कर्ज झालं.
त्याने एलएलबीला प्रवेश घेत वकिली करण्याचे ठरवलं. एलएलबीला ५७ टक्के तर एल एल एम ला 70 टक्के. शेतीतून घर आणि शिक्षण खर्च निघणं अशक्य होतं. प्रसादने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. दररोज किमान ७ ते ८ तास अभ्यास.
२५० गुणांच्या परीक्षेत प्रसादला लेखीमध्ये १०९ आणि मुलाखतीमध्ये ३२ गुण मिळाले.. या परीक्षेसाठी राज्यभरातून जवळपास १५ हजार विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते. मात्र, अंतिम यादीत फक्त १९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.  ''परिस्थितीचा बाऊ करण्यात अर्थ नसतो. संघर्ष करावाच लागतो. जिद्द मात्र सोडायची नाही. कुठे ना कुठे यश मिळतंच.'' असं तो आत्मविश्वासानं सांगतो. वडील साहेबराव यांची प्रेरणा आणि अखंड साथ यामुळे जिद्द कायम राहिली, असं प्रसाद सांगतो.


-दिनेश मुडे, बुलडाणा

सिनेमा (ब्रह्मेपीडीयातील एक नोंद) (आखुडबुद्धी बहुशिंगी)

शीतकपाट (रेफ्रीड्जरेटर)मध्ये ज्याप्रमाणे कामप्रेस केलेला फ्रीऑन वायू खेळवून तापमान खाली उतरविले जाते त्याच्या विरुद्ध तत्वावर चालणारे यंत्र. या यंत्राची कल्पना लिओनार्दो दा विंचीला प्रथम सुचली असावी. त्याने याचे संकल्पचित्र बनवून त्याला हेलिकापतर असे नाव दिले. काम्प्रेसरमधून वायू फिरवून थंड केला जातो तद्वत एका मोठ्या प्रोजेक्टरमध्ये माणसांना छोटे करून त्या प्रतिमा वेगात फिरवून दाखवल्या जातात. या कलेचा शोध नवयुगात एडिसन प्रयोगशाळेने लावला. तदनंतर स्फूर्ती घेऊन फ्रान्सच्या ल्युमिएर बंधूंनी १८९५ साली सिनेमाचा पहिला प्रयोग केला. त्याच सुमारास भारतात हरिभाऊ ब्रह्मे यांनी पुणे येथे गणपती उत्सवात पहिला सिनेमा १८९३ साली दाखवला असे समजले जाते. हा सिनेमा रंगीत, आवाजासहित आणि ल्युमिएर बंधूंसारखा फिल्मवर चित्रीत केलेला नसून जिवंत होता. या सिनेमात बंदूकीच्या गोळीने समोरच्या माणसाच्या शरीराला छिद्र पाडण्याचा एक प्रसंग दाखवला जायचा. शुभारंभाच्या प्रयोगांनंतर या सिनेमाचे प्रयोग (पात्रांअभावी) होऊ शकले नाहीत. या सिनेमाच्या फिल्म कुठेही उपलब्ध नसल्याने पहिलेपणावर ल्युमिएर बंधूना हक्क सांगता आला.
ल्युमिएर बंधूंच्या यशाने प्रभावित होऊन जगभर सर्वत्र सिनेमाची पाळेमुळे रुजली. रात्रभर चालणाऱ्या लांबलचक नाटकांपेक्षा आटोपशीर असलेला हा प्रकार लवकरच लोकप्रिय होऊन सगळीकडे सिनेमा दाखवणारी थिएटरे उभी राहू लागली. अमेरिकेत क्यालिफोर्निया, भारतात कोल्हापूर, ब्राझीलमध्ये ॲमेझॉन, चीनमध्ये शांघाय आणि रशियात सायबेरीया या निसर्गरम्य ठिकाणी नवनव्या सिनेमांचे शूटींग धडाक्याने होऊ लागले.
सुरुवातीला, सिनेमा पाहणाऱ्या लोकांना आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून मूक सिनेमे बनवले जात. चारली चापलीन नामक नट या काळात अमेरिकेत प्रसिद्धीस पावला. या काळात सबटायटल्स (उपशीर्षकां)शिवाय सिनेमा पाहण्याची लाट असल्याने त्याचे इंग्रजी सिनेमे लोकांना न कळून इतरत्र त्याची लोकप्रियता फारशी झाली नाही. लारेल हार्डी नावाचा कधी जाड तर कधी बारीक असणारा नटही याच सुमारास उदयाला आला. सिनेमा पाहणाऱ्यांना विडीकाडीसाठी अथवा शेंगागंडेरीसाठी वेळ देता यावा म्हणून सिनेमात मध्येमध्ये गाणी वाजवण्याची प्रथा सुरु झाली. लोकांनी चहापाणी करण्याऐवजी गाणी ऐकत बसू नये म्हणून वाईट आवाजाच्या लोकांकडून गाणी म्हणवून घेण्याचा प्रघात होता. (हे लोण भारतात उशीराने पोचल्याने किमान शब्बीरकुमार, मुन्ना अजीझ आदी गायकांची सोय झाली.) गाणी वाजविता यावीत यासाठी सिनेमाला आवाज देण्याच्या कलेचा शोध लावला गेला. जाझ सिंगर या बोलपटापासून बोलपटांचे (टाकीज) युग सुरु झाले. केवळ वक्र भृकुटीच्या सहाय्याने अभिनय करणाऱ्या नटांची पंचाईत होऊन, स्टेजप्रमाणे आपली भाषणेही चोख पाठ करणे क्रमप्राप्त बनले. बरेच मूक अभिनेते या काळात पडद्याआड लुप्त झाले.
तत्कालिन कृष्णधवल रंगांमुळे पडद्यावर कृष्णकृत्ये करणारे खलपात्र दाखवण्यास अडचण येत असलेने सिनेमे रंगवण्यास सुरुवात झाली. सुरुवातीस एकएक चित्र स्वतंत्र रंगवले जाई. चंद्रावर स्वारी (१९०५) हा फ्रेंच सिनेमा कृष्णधवल कॅमेऱ्याचे चित्रीत करून नंतर रंगवला गेला. पुढे रंगीत कॅमेऱ्यांचा शोध लागल्याने रंगीत सिनेमे बनवणे सोपे झाले.
भारतात या कलेचा प्रसार बहुतच वेगाने झाला. नाटकांप्रमाणे सिनेमांसाठी अभिनयाची गरज नसलेने नुसते पडद्यावर उभे राहू शकणारे नट नायक म्हणून उदयास आले. पियानोवर भाकरी थापटल्यासारखे हात हलवणे, कॅमेरासमोर स्थितप्रज्ञासारखे उभे राहणे, हृदयविकाराचा झटका आला आहे असा चेहरा करून प्रेमगीत गाणे या अभिनयबळावर अनेक अभिनेते भवसागर तरून गेले. ७०च्या दशकात, आशा पारेख नामक नटीचा उदय झाला. तिचे दोन्ही डोळे एकाचवेळी कॅमेराच्या फिल्डमध्ये मावत नसलेने ७० एमएम वाईडस्क्रीनचा शोध लावावा लागला. कालांतराने भलत्याच भरीव अंगाच्या दाक्षिणात्य नटींना नीट न्याहाळण्याची सोय म्हणून थ्रीडी सिनेमाचीही सुरुवात झाली. जेव्हा बहुतांश सुस्वर गायक काळाच्या पडद्याआड लुप्त झाले तेव्हा गाणी सहनीय व्हावी म्हणून डॉल्बी नावाचे तंत्रज्ञान वापरले जाऊ लागले. यामुळे, गाणे सुसह्य वाटत नसले तरी नवीन तंत्रज्ञान असल्याने गाणे चांगले वाटते अशी समजूत लोक करून घेतात.
सध्या भारत देशात सर्वाधिक सिनेमे दरवर्षी बनवले जातात (हे सिनेमे प्रेक्षागारात दाखवून प्रेक्षकांनाही बनवले जाते.)

- ज्युनिअर ब्रह्मे

चला, मुलगे घडवूया (भाग १६)

नवी उमेदवर सध्या 'चला, मुलगे घडवूया' ही मालिका सुरू होती. मला दोन्ही मुली आणि मला सख्खा भाऊ नाही. त्यामुळे मुलामुलीतला भेद आमच्या घरी आमच्या वाट्याला आलाच नाही. घरात मुलगाच नसल्यामुळे जी सो कॉल्ड कामं मुलांनी करायची ती सगळी आम्ही मुलीचं करत होतो.
आता मात्र माझ्या मुली लहान आहेत आणि आजूबाजूच्या आयांकडून आणि कित्येकदा मुलांकडूनही मुली हे करत नाहीत, ते करत नाहीत हे ऐकायला मिळायचं. ही मुलं एकत्र खेळताना मुली नर्स व्हायच्या तर मुलगे डॉक्टर. एकदा मधे पडून मला सांगावं लागलं की मुलीही डॉक्टर असतात.
नुकतंच धाकटीला एक वाढदिवसाला जायचं होतं. गिफ़्ट आणायला गेलो. दुकानदाराने लगेच 'लडकेको देना है या लडकीको' असं विचारलं. मुलींसाठी गिफ़्ट दाखवली ती गळ्यातलं, कानातलं बनवायचं खेळणं, क्विलींगचा सेट, आर्टिफिशियल नखं आणि दुसरं खेळणं होतं अर्थातच भातुकली. पुन्हा 2 ते 3 दिवसांनी मुलीला पाण्याची बाटली हवी होती. पुन्हा एकदा तोच प्रश्न - 'बॉटल लडकी के लिये या लडके के लिये' या वेळी मात्र हा प्रश्न ऐकून त्याला म्हटलं, 'अरे, पाण्याच्या बाटलीत काय आहे मुलगी आणि मुलगा?' तर दुकानदार म्हणे, 'है ना । लडकीयोंके लिए पिंक ओर बार्बीकी पिक्चर्सवाली बोटल्स है । ओर लडकोके लिए अव्हेनजर्स, स्पायडरमॅन । ' हे ऐकूनच खरंतर चिडचिड झाली. त्याला म्हटलं हा फरक तुम्ही करताय. सगळ्याच मुलींना पिंक कलर, बार्बी आणि भातुकली आवडते असं नाही. तुम्ही वेगळं काही दाखवलंत तर तेही त्यांना आवडू शकतं.
अशी उदाहरणं बघितली की वाटतं, हे मुलगा मुलगी प्रकरण इतकं खोलवर झिरपलं आहे की हे बदलण्यासाठी काय करावं, कसं करावं हा प्रश्नच पडावा.
सरकारी शाळांत मीना राजू मंच हे काम करतो आहे. पण उच्च मध्यमवर्गीय शाळांचं आणि घरांचं काय?
उमेदवर मालिका सुरू केली तेव्हा हैदराबाद प्रकरण ताजं होतं. पोलिसांनी आरोपींचं एन्काऊंटर केलं तेव्हा काहीजण याविरुद्ध बोलले तर काही लोक बाजूने. विरुद्ध बोलण्याऱ्या लोकांना गलिच्छ भाषेत सुनवायला कुणालाच लाज वाटली नाही. आपल्या नावात आईचं नाव लावणाऱ्या काहींनी इथं आपण मनातून कसे आहोत हेही दाखवून दिलं.
तेव्हा मात्र हे सगळं बदलण्यासाठी काय करायला हवं हा विचार आमच्या उमेद टीमच्या मनात घोळू लागला. आणि आशय गुणे या उमेद टीममधल्या समंजस मुलाने 'चला, मुलगे घडवूया' हा विषय सुचवला. टीममधल्या काहींनी याविषयी लिहिलंच शिवाय उमेदसाठी म्हणून बऱ्याच जणांनी या विषयावर त्यांच्या घरात काय चर्चा झाली, त्यांच्या घरातील मुलांचे स्त्रियांविषयी विचार काय आहेत, ते घडवण्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले ते लिहून पाठवलं.
या सगळ्यातून बऱ्याच टीप्स समोर आल्या. ज्यांच्या घरात लहानगी मुलं मुली दोघेही मोठी होताहेत त्यांच्यासाठी या टीप्स नक्कीच उपयोगी ठरतील.
मुलांशी मोकळा संवाद हवा.
शंका, प्रश्न न टाळता समजतील अशी उत्तरं द्यायला हवीत.
घरात आई बाबा दोघांनी मिळून कामं केली तर मुलांवरही ते बघून असंच करायला हवं हे संस्कार सहज होतात. वेगळं सांगावं लागत नाही.
खेळाबाबतही हे खेळ मुलींचे, हे मुलांचे असं वर्गीकरण न करता मुलालाही भातुकलीची आवड कशी निर्माण होईल हे पाहायला हवं.
वाईट वाटलं, मन भरून आलं तर रडलं तरी चालतं, पण मन मोकळं करायला हवं हे मुलांनाही आवर्जून सांगायला हवं.
मुलांचे मित्रमैत्रिणी कोण हेही पालकांना माहीत हवं.
निर्णयही आईचं मत विचारात घेऊन घेतले जातात हे मुलांसमोर घडायला हवं. कुटुंबातल्या पुरूषांना सर्व स्त्रियांविषयी आदर असणं. रंगरूपापेक्षा गुण, कतृत्त्वाला महत्व.
या मालिकेत एकूण 17 पोस्ट्स प्रसिद्ध झाल्या. पुरुष पालकांपैकी 5 बाबा लोकांनी मालिकेसाठी लिहिलं. तर 9 आयांनी लिहिलं. विशेष म्हणजे एका आजींनी त्यांच्या नातवंडांविषयीही लिहिलं. मालिकेतलं सर्वच जण विविध क्षेत्रातले आहेत. काही वकील आहेत, चळवळीतले कार्यकर्ते आहेत, पत्रकारितेतले आहेत तर डॉक्टर आईही आहेच.
हैद्राबाद रेपवरच्या प्रतिक्रियांत हे रोखण्यासाठी काय कारावं, कसं करावं यावर चर्चा खूप झाली. पण, आम्ही पालक म्हणून काय जबाबदारी पार पाडलीये याबद्दल चर्चा व्हायला हवी असं आम्हाला वाटलं. कारण, आम्ही चांगली बाजू लोकांपुढे आणत असते. आमच्याच टीममध्ये मृणालिनी, लताचा नवरा संदीप परब, जालन्याचे उमेद प्रतिनिधी अनंत साळी, नाशिकची चारूशीला, मुंबईची मेघना असे कितीतरी जागरूक पालक आहेत, हे जाणवलं. त्यांनीही लिहिलं आणि ही मालिका सिद्ध झाली. यातून नव्या पालकांना मुलं वाढवताना मदत झाली आणि मुलं वयात येणाच्या टप्प्यातल्या पालकांना दिशा मिळाली हा हेतू साध्य व्हावा, हीच इच्छा.
- वर्षा जोशी - आठवले