Friday 31 January 2020

रद्दीच्या पैशातून मुलांच्या संगोपनाला आधार

नागपूरमधले नागेश पाटील. सामाजिक क्षेत्रात गेली २० वर्ष कार्यरत. गरीब,अनाथ पण हुशार मुलांना उत्तम शिक्षण मिळावं आणि ती स्वतःच्या पायावर उभी राहावीत, यासाठी ते काम करतात. २०१२ मध्ये त्यांनी 'जिव्हाळा' ही संस्था यासाठी सुरू केली.
‘बेटी बचाओ बेटी पढाओ’‘रद्दी देई बुद्धी’ या त्यांच्या संस्थेच्या ब्रीदवाक्यातून देशालाही बेटी बचाओचा संदेश मिळाला. सध्या त्यांच्या संस्थेत एकूण ४२ मुलं. त्यापैकी १५ मूलं आणि १९ मुली अरूणाचल प्रदेशमधल्या तर ८ मूली विदर्भातील. ५ वी ते पदवीपर्यंत शिक्षण घेणारी. भरतनाटयमपासून अभियांत्रिकीपर्यंत वैविध्यपूर्ण शिक्षण घेणारी. नर्सिंगचं प्रशिक्षण पूर्ण करून ९ मुली नोकरीही करत आहेत.
नागलोक बुद्धिस्ट सेंटरमध्ये अरुणाचल प्रदेशातला चकमा नावाचा युवक शिकायला होता. त्याची पाटील यांच्याशी भेट झाली. त्याला त्यांच्या कार्यविषयी समजलं. आपल्या बहिणीच्या शिक्षणाची आणि संगोपनाची जबाबदारी घेण्याची विनंती चकमानं पाटील यांना केली. तिच्याबरोबर १३ मुली आल्या. असं करतकरत अरुणाचल प्रदेशमधली मुलं संस्थेत येऊ लागली.
मुलं आणि मुलींसाठी राहण्याची स्वतंत्र व्यवस्था. मुलींसाठी एक वॉर्डन. जेवण स्वतः पाटील यांच्या पत्नी करतात. मदतीला एक आचारी. मुलांना शहरातल्या प्रतिष्ठित शाळांमध्ये घातलं आहे. पाटील यांच्या कामात त्यांच्या पत्नीचा न बँकेत काम करणाऱ्या बहिणीचा मोठा वाटा आहे. पाटीलही पूर्वी नोकरी करायचे. पण मुलांकडे पुरेसं लक्ष देता येत नसल्याचं वाटल्यानं त्यांनी नोकरी सोडली.
आईवडिलांशी भेट घालून देण्यासाठी ते दरवर्षी मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत अरुणाचल प्रदेशला घेऊन जातात. या कामासाठी पाटील यांना दरवर्षी २५ ते ३५ लाख रुपये खर्च येतो. यासाठी काही दानशूरांची साथ त्यांना आहे. काही दाते नियमितपणे रद्दी देतात. ही रद्दी विकून मिळणारे पैसे ते मुलांसाठी वापरतात.
राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून अनेक मान्यवरांनी त्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. महाराष्ट्र भूषणसह ७० पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.

- नीता सोनवणे, नागपूर

No comments:

Post a Comment