Friday 31 January 2020

कल्पकतेला वाव अन‌् मिळाली जगण्याची उमेद

ही सुंदर, कल्पकतेने घडवलेली शुभेच्छापत्रं पाहताय? यासह टाकाऊ वस्तूपासून बनवलेल्या आकर्षक पिशव्या पण. कोणी बनवल्यात माहितीये? त्या बनवल्यात पाली (ता.बीड) येथील इन्फंट इंडिया आनंदवनातील युवती अन‌् महिलांनी.
एचआयव्ही बाधितांचे जगणे म्हणजे व्यक्तीगत आयुष्यातील संघर्ष अन समाजाकडून होणारी उपेक्षा. अशा स्थितीत जीवनात आनंद यावा, तरी कसा. याच विचारांतून इन्फंट इंडियातील महिला, युवती, मुलांसाठी दोन वर्षांपूर्वी कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात आलं. अभ्यासाविषयी फारशी उत्सुक नसलेली व काहीशी आत्ममग्न असलेली आसमा शेख. तिला शुभेच्छापत्रे बनवायला, टाकाऊ वस्तूंपासून विविध शिल्प बनवायला, कापडी बॅग बनवायला आवडायचं. इन्फंट इंडियाचे संचालक दत्ता बारगजे आणि संध्या बारगजे यांनी आसमासह प्रकल्पातील सर्व महिला, मुलींना त्यांची कल्पकता वापरता यावी, यासाठी कौशल्य विकास केंद्राची संकल्पना मांडली. त्याला समाजातील मान्यवरांचे पाठबळ मिळाले अन‌् हे केंद्र सुरुही झाले.
आज आसमासह १८ मुली फावल्या वेळेत पिशव्या, शुभेच्छापत्र बनवतात. विविध ठिकाणी असलेल्या उपक्रमांच्या निमित्ताने स्टॉल लावून त्याची विक्रीही करतात. यातून या कामाचा मोबदलाही मिळतो अन‌् आपल्या हातून काहीतरी घडत आहे, त्याचे समाधानही. नव्या वर्षात आता या मुली, महिलांनी बनवलेले साहित्य अधिकाधिक लोकांपर्यंत कसे जाईल, याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या प्रकल्पातील सर्वांच्या जगण्याला, कल्पकतेला नवे आयाम देणारा हा उपक्रम उत्तरोत्तर बहरत जात आहे.
- अनंत वैद्य, बीड

No comments:

Post a Comment