Saturday 25 January 2020

दुष्काळ पडला तरी घोडे कुटुंबाला एक वर्ष पाणी पुरेल...

अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातलं गाव बारी. महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर असलेल्या कळसूबाईच्या पायथ्याशी हे गाव. पावसाचं प्रमाण जास्त परंतु उताराची जमीन अन कातळ खडक यामुळे पावसाळ्यानंतर दोन महिन्यांनी पाण्याच दुर्भिक्ष जाणवतं. पाण्यासाठी डोक्यावर हंडे घेऊन जावं लागे. 
बाळू घोडे हे तेथील प्रयोगशील शेतकरी. पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्याचं त्यांनी ठरवलं. 
जानेवारी 2019 ला घराच्या बाहेरील बाजूस त्यांनी खड्डा काढून पाण्याची टाकी बांधली. विशेष म्हणजे टाकीची रचना त्यांची स्वतःचीच. ८ फूट लांब, ६ फूट रुंद, ६ फूट खोल. खर्च ५० हजार रुपये. ही टाकी सुमारे २००० लीटर पाणी साठवते.
पावसाळ्यात समोरचं घरआणि स्वतःच्या घराच्या पत्र्यावरचं पाणी पाईपद्वारे साठवून पिंपात सोडलं जातं. मग ते टाकीत सोडलं जातं. पावसाचं पाणी एकत्र करून ते पिंपात सोडताना पाईपच्या मुखावर कापड बसवून पाणी गाळतात . पाण्यात किडे होऊ नये म्हणून त्यात मासे आणि ग्रामपंचायतीतून मिळणारे निर्जंतुक औषध टाकलं जातं . पाणी घेताना त्यावर सूर्यप्रकाश पडू नये याची काळजी घेतली जाते,सूर्यप्रकाश पडल्यास त्यात किडे होण्याची शक्यता असते.
बाळूभाऊ म्हणतात,जर एखाद्या वर्षी दुष्काळ पडला तर,माझ्या कुटुंबाला वर्षभरासाठी पुरेल इतके पाणी टाकी साठवते. बाळूभाऊंमुळे गावतील इतर मंडळी टाकी बनवण्यास उत्सुक आहेत.
यासोबतच काळी नाचणी,काळी वरई,कालभात,कारले,दोडका,दुधी,उडीद,पावटा,राजमा अशा सुमारे ४० देशी वाणांच्या बियाणांचं जतन त्यांनी केलं आहे. गेली चार वर्षे झाले ते सेंद्रिय शेती करतात. कृषी विद्यापीठातले अनेक विद्यार्थी, पर्यटक त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येतात.
बाळू घोडे- ९४२३७ ४०५१६ 

- संतोष बोबडे

No comments:

Post a Comment