Tuesday 23 July 2019

अन् तिच्या जिद्दीपुढे अखेर परिस्थितीही झुकली...

दीड वर्षांपूर्वीची गोष्ट. घरात लागणारं काही सामान आणण्यासाठी कीर्ती कुळये आणि तिचा धाकटे भाऊ घरातून बाहेर पडले. रस्त्याने जाताना एका कंटेनरने त्यांना धडक दिली. दोघं लांब फेकले गेले. कीर्ती बेशुध्द झाली तर तिच्या छोटा भाऊ रक्तबंबाळ अवस्थेत पडला होता. शुध्दीवर आल्यावर आपल्या भावाला वाचविण्यासाठी कीर्तीने खूप प्रयत्न केले. मात्र, उपचाराला नेत असताना त्याची प्राणज्योत मावळली.
लाडक्या नातवाच्या मृत्यूने कीर्तीचे आजी-आजोबा आजारी पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर आरवली महामार्गावर तिच्या वडिलांची चहाची टपरी. महामार्गावरील त्यांची चहाची टपरी उठवावी लागणार हे वृत्त कीर्तीच्या वडिलांना कळलं. यात नुकसान भरपाईही मिळाली नाही. एकीकडे मुलगा, आई-वडील गेल्याचे दु:ख आणि त्यातच उदरनिर्वाहाचं साधन गेलं. या सगळ्याचा वडिलांनी धसका घेतला आणि वर्षभरापूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचंही निधन झालं. काही दिवसांतच कीर्तीचे मावशी आणि काकाही वारल्याची धक्कादायक बातमीही तिला मिळाली. आपल्या आयुष्यात हे काय घडतंय हे किर्तीला कळत नव्हतं. पण आता आईसाठी ती पुन्हा जिद्दीने उभी राहिली. चहाची टपरी पुन्हा सुरू झाली.
एकापाठोपाठ घरातील सहा व्यक्ती गमावल्यामुळे कीर्तीच्या आईला मोठा धक्का बसला होता. त्याचा परिणाम तब्येतीवर होऊन तिची आईही गेल्या वर्षभरापासून सातत्याने आजारी पडत होती. अखेर चार महिन्यांपूर्वी कीर्तीचा शेवटचा आधार असलेल्या तिची आईचंही निधन झालं.
घरातील सात माणसे गेल्यानंतर मात्र किर्तीने या नियतीसमोर लढायचे ठरवले. या सगळ्या परिस्थितीला सामोरं जाताना तिचं शिक्षण सुरू आहे. सध्या ती एमएच्या दुसऱ्या वर्षाला असून तिला युपीएससी आणि एमपीएससी या स्पर्धा परिक्षेतून अधिकारी बनायचं आहे. त्यासाठी ती आजही चहा विकून उदरनिर्वाह करत आहे.
एकीकडे मुलं रस्त्यावर उभं राहून व्यवसाय करण्यासाठी मागेपुढे पाहत असतानाचे चित्र दिसतं आहे. कीर्ती मात्र सकाळी 7 ते रात्री 7 पर्यंत चहा विकण्याचे काम अगदी जिद्दीने करत आहे. काŸलेज असताना ती दुपारी चहाची टपरी सुरू करते. हे काम आपण बिनधास्तपणे करतो काही भीती वाटत नाही कारण इतक्या सगळ्या संकटातून पुढे आले आहे की, छोटे संकटे आली की, मी लगेच मात करते त्यामुळे मी फक्त माझ्या ध्येयाकडे लक्ष ठेऊन आहे. स्वत:च्या हिंमतीवर मी एक दिवस अधिकारी बनणार असा विश्वास किर्तीने व्यक्त केला.
- जान्हवी पाटील, रत्नागिरी


No comments:

Post a Comment