Tuesday 13 March 2018

आधी खावे मग सांगावे


कळसूबाईच्या पायथ्याशी असलेलं बारी गाव. तिथे राहणारे घोडे बंधू , पोपट आणि बाळू. त्यांची ७-८ एकर जमीन. भात हे मुख्य पीक. पाऊस भरपूर. पण जमिनीची सुपीकता कमी होत होती. संकरित बियाणं आणि रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचा कस कमी होत असल्याचं बाळू यांच्या लक्षात आलं. रासायनिक खतांचा वापर शरीरासाठी घातक असल्याचंही समजलं. मग दोन्ही भावांनी विचार करून पारंपरिक शेतीचा निर्णय घेतला. गांडूळखत , शेणखत वापरून तांदूळ, नाचणी, वरई, ज्वारी, डाळी, कडधान्य अशी पिकं आता ते घेतात. 'आधी खावे मग सांगावे' या तत्त्वाला अनुसरत त्यांनी हे धान्य आधी आपल्या घरात वापरलं. त्याचे चांगले परिणाम जाणवू लागल्यानंतर, ते लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. आपल्या शेतात पिकणाऱ्या धान्यापासून पौष्टिक आणि चवदार पदार्थ तयार करण्यासाठी घोडे बंधूंनी अलीकडेच गावात कळसूबाई महिला गट स्थापन केला आहे. ज्वारीची शेव, नाचणी आणि ज्वारीच्या शेवया, नाचणीचे पापड, नाचणीची बिस्किटं असे पदार्थ हा गट तयार करतो.
                                                              रक्तवाढीसाठी उपयुक्त असा तामकुडा आणि मधुमेह असणाऱ्यांसाठी काळा भात ही त्यांच्या शेतीची वैशिट्यं. यापासून त्यांना वार्षिक ९०हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळतं.
पारंपारिक शेतीसोबतच, पारंपारिक जातीच्या गायीचं जतनही घोडे बंधू करत आहेत. भारतीय जातीच्या ३२ गायी त्यांच्याकडे आहेत. त्यापासून वर्षाला एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळतं. पारंपरिक पद्धतीत सध्या तुलनेनं उत्पन्न कमी आहे. ते वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दूरगामी विचार करता हीच पद्धत योग्य ठरेल असं त्यांना वाटतं. शिवाय मुंबईतल्या सामान्य नोकरीपेक्षा हे उत्पन्न नक्कीच अधिक आहे, असं ते सांगतात. काही काळ त्यांनी मुंबईतही नोकरी करून पाहिली. मात्र २००६ पासून पुन्हा शेती करण्चाया निर्णय त्यांनी घेतला.
घोडे बंधू सेंद्रिय शेतीचा प्रचारही करतात. नागपूरमधला बीजमहोत्सव , पुण्यातली भीमथडी जत्रा आणि स्वतःच्या बारी गावामधल्या मिलेट फेस्टिवलला येणाऱ्या पर्यटकांना पारंपरिक शेतीचं महत्त्व घोडे बंधू पटवून देतात. 

 -विजय भोईर

No comments:

Post a Comment