Tuesday 12 February 2019

त्यांचं बालपण त्यांना मिळवून द्यायला हवं



तुळजापूरचं भवानी मंदिर. एकीकडे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्यांची गर्दी. तर दर्शन घेऊन बाहेर येताच भीक मागणाऱ्या मुला-मुलींची गर्दी. हे तुळजाभवानी मंदिरातलं रोजचं चित्रं. मंदिर परिसरामध्ये सर्व वयोगटातील मुलं-मुली, भक्तांचे दर्शन झाल्यानंतर त्यांचे हात पकडून, कपडे पकडून भीक मागतात. कित्येकदा तर ही मुलं भीक दिल्याशिवाय त्यांच्यापासून दूर जात नाहीत. या प्रकारामुळे भाविकांना नाहक त्रास होतो. हा प्रकार अनेक वर्षापासून सुरू आहे स्थानिक पातळीवर या मुलांना या कामापासून दूर करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मात्र त्यांचा या भिकाऱ्यांवरती कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. दिवसेंदिवस हा प्रकार वाढत चालला आहे.
भाविकांना होणारा त्रास लक्षात घेऊन राष्ट्रीय अपराध जांच ब्युरोचे जिल्हा सूचना अधिकारी संजयकुमार बोंदर यांनी या प्रश्नांमध्ये लक्ष घालून तुळजाभवानी मंदिर समिती, तुळजापूर पोलीस स्टेशन, तुळजापूर नगरपरिषद, उस्मानाबाद जिल्हा महिला व बालकल्याण विभाग तसेच राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे यांच्याकडे तक्रार केली. गेल्या सहा महिन्यापासून याविषयी या खात्याअंतर्गत परस्परांना पत्रव्यवहार करून कारवाईचे आदेश देण्यात आले. परंतु प्रत्यक्ष कारवाई करण्यासाठी मात्र कोणताही विभाग पुढे आलेला नाही. या अंतर्गत जबाबदारी असणारे अधिकारी आणि त्यांचे प्रशासन सदर जबाबदारी आमच्या खात्याची नसल्याचे सांगून कारवाई करण्यापासून दूर जात आहेत. या भिकारी मुलांना या कामापासून दूर करून त्यांच्या शैक्षणिक आणि कौटुंबिक प्रगतीसाठी हातभार लावण्यासाठी खरे प्रयत्न व्हायला हवेत. पण, इथं मात्र, कायद्यातील तरतुदी पुढे करून प्रशासनातील मंडळी ही उपाययोजना करण्यापासून दूर राहत आहेत.

महिला व बालकल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांनी याबाबत कारवाईसाठी आमच्या कार्यालयाकडे पुरेसा फंड नसल्याचे कारण पुढं केलेलं आहे. या खर्चासाठी त्यांनी राज्य सरकारच्या महिला बालकल्याण विभागाकडे मागणी केल्याचे सांगितलं. दरवेळी होणारी दिरंगाई लक्षात घेता हा प्रश्न निकाली निघणे अवघड दिसतो आहे. संजयकुमार बोंदर यांच्यासारखी व्यक्ती याकामासाठी अनेक महिन्यापासून काम करते आहे. आता प्रशासनाने याबाबत गांभीर्याने दखल घेऊन कार्यवाही करणं गरजेचं होतं. मात्र प्रशासनामधील अधिकाऱ्यांमध्ये या प्रश्नाबाबत गांभीर्य दिसून येत नाही त्यामुळे याप्रश्नी सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांला अपयशाला सामोरं जावं लागत असल्याचं हे चित्र.
 

खरतर, बालकास भीक मागण्यास लावणाऱ्या व्यक्तीसाठी किमान सात ते दहा वर्षापर्यंत सश्रम कारावास आणि पाच लाख रुपयापर्यंतची दंडाची शिक्षा होऊ शकते. तर, भीक मागण्यासाठी बालकास अपंग करणाऱ्या व्यक्तीस दहा वर्षांपर्यंत सश्रम कारावासाची शिक्षा होऊ शकते अशी तरतूद कायद्यामध्ये आहे.
कायद्यामध्ये अनेक तरतुदी असल्या तरी तुळजाभवानी मंदिर परिसरातील लहानग्यांपर्यंत त्या पोहोचू शकत नाहीत, हे इथलं खरं चित्रं. या सगळ्यातून घटनेने दिलेला चांगलं जगण्याचा, शिक्षणाचा मूलभूत हक्कच आपण या मुलांपासून हिरावून घेत आहोत. आता तरी प्रशासनाने या मुलांकडे पाहावं आणि त्यांचं बालपण त्यांना मिळवून द्यावं.
- अनिल आगलावे, तुळजापूर 

No comments:

Post a Comment