Tuesday 12 February 2019

संक्रातीचं वाण यंदा बालग्रामला







परभणीमधल्या गजानन नगरातलं विठ्ठल मंदिर. गेल्या आठवड्यातल्या रविवारची गोष्ट. श्रीहरी गोविंद प्रतिष्ठान आणि ज्ञानेश्वरी महिला मंडळाचा कार्यक्रम. कार्यक्रम संक्रातीच्या हळदीकुंकूवाचाच पण काहीसा वेगळा. वाण सामूहिक. बीड जिल्ह्यातल्या गेवराई इथं असलेल्या बालग्राम संस्थेला. अनाथ मुलांच्या संगोपनाचं काम ही संस्था करते. संस्थापक संतोष गर्जे यांना मान्यवरांच्या हस्ते ४१ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.
मंडळात ३३ महिला. वाणासाठी प्रत्येकी एक हजार रुपये किंवा इच्छेनुसार त्यापेक्षा अधिक. अध्यक्ष सुजाता भंडारे यांनी या मंडळाची स्थापना केली. मंडळ गेल्या १० वर्षांपासून वाणासाठी पैसे खर्च न करता जमा झालेली रक्कम एखाद्या गरजू संस्थेला देत आहे. अशा प्रकारे आतापर्यंत शहरातल्या ज्ञानदीप विद्यालयातले गरजू विद्यार्थी, मनीष बालसदन, पुण्यातील अपनाघर वृद्धाश्रम, उदगीर इथली स्नेहाधार संस्था, नाम फाऊंडेशन, औरंगाबादमधलं सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ यांना मदत देण्यात आली आहे. सामाजिक ऋणातून उतराई होण्यासाठी हा उपक्रम हाती घेतल्याचं महिला सांगतात.
या मंडळाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही राजकीय पदाधिकार्‍यांकडून देणगी स्वीकारली जात नाही. त्यांचे शुभेच्छाफलकही लावले जात नाहीत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक राजेंद्र पोकर्णा. महापौर मीनाताई वरपूडकर, भाजपा महिला कार्यकारिणी सदस्य मेघना बोर्डीकर, नगरसेविका माधुरी बुधवंत , त्वचारोगतज्ञ डॉ स्मिता चिलगर, जयभवानी महिला सहकारी सूतगिरणीच्या अध्यक्ष डॉ संप्रिया पाटील आणि मान्यवरांची उपस्थित होते.

-बाळासाहेब काळे, परभणी 

No comments:

Post a Comment