Sunday 18 August 2019

त्यांच्यामुळे आज अनेक तरुण शहरात न जाता गावात स्वतःचा व्यवसाय करत आहेत


जवळजवळ २६ वर्ष त्यांनी स्वतःला शेती, उद्योग, पर्यावरण, ग्रामविकास यासाठी वाहून घेतलं आहे. त्यांचं नाव विनायक महाजन. वय ६३. अवघ्या दापोलीला ते काका म्हणून परिचित.
कोळथर गावात त्यांचा जन्म आणि शालेय शिक्षण. मुंबईतल्या भगूबाई मफतलाल पॉलीटेक्निकलमधून मेकेनिकल इंजिनिअरिंग. वर्ष ७३-७४ च्या सुमाराला शिक्षण घेताघेताच नोकरीला सुरुवात. एका बड्या शीतपेय कंपनीच युनिट नुकतंच भारतात आलं होतं. त्या कंपनीसाठी बाटल्या तयार करण्याचं यंत्र तयार करण्याचं काम काकांच्या कंपनीला मिळालं. काम करत असताना जाणवलं की हे पेय हानिकारक आहे. देशी फळांपासून शीतपेय बनवल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यालाही होईल. समाजाचा विचार करण्याचा वारसा घरातूनच लहानपणापासून मिळाला होता. कोकम सोडा, आवळा सोडा तयार करण्याचं तंत्र त्यांनी आत्मसात केलं. दापोलीत कुडावळे इथं महाजन बेव्हरेजेस सुरू केली.
९३-९४ च्या सुमाराला काकांनी सहकुटुंब कोकणात कायमस्वरूपी राहण्याचं ठरवलं. गावाला कायमस्वरूपी आल्यावर शेतीतल्या अनेक समस्यांचं अधिक चांगल्या प्रकारे आकलन होऊ लागलं. मग शेतकऱ्यांसाठी ना नफा ना तोटा या तत्त्वावर ' शाश्वत कृषी संवाद' बुलेटिन चालवलं. दर महिन्याला शेतकऱ्यांच्या बैठका. बाहेरगावी अभ्यासदौरे.
'कोकणात खूप विविधता आहे. शहरात जाण्यापेक्षा आपल्या मातीत राहून मालक व्हा' , हा विचार त्यांनी तरुणांना दिला. दापोलीत भाजीपाल्याची गरज होती. सगळी भाजी बाहेरगावावरून येत असे. काकांनी भाजी पिकवणाऱ्या ३०-४० शेतकऱ्यांना एकत्र आणलं. २०१० मध्ये शेतकऱ्यांची ' दापोली तालुका शेतकरी सेवा सहकार मर्यादित' संघटना सुरू झाली. त्यांना हक्काची जागा मिळवून दिली. हे शेतकरी आता एकूण गरजेच्या दीड टन भाजी दापोलीत विकू लागले आहेत. काही तरुण व्हाट्सपद्वारे भाजी विकतात. कुणाला कुठला उद्योग सुरू करायला असेल,शेती वा फुलांसबंधी माहिती हवी असेल तर काका निस्वार्थपणे सदैव तयार असतात.
गावात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा त्यांनी स्वतःच्या पद्धतीनं बंधाऱ्यांचं आरेखन केलं. साखळी बंधारे बांधले.
त्यांचा भर नैसर्गिक , सेंद्रिय शेतीवर. दोन वर्षांपूर्वी त्यांनी 'नियोजन नक्षत्र' अँप तयार केलं. यात हवामान,आर्द्रता ,कोणतं पीक कुठल्या ऋतूत घ्यायचं, कसं घ्यायचं , शेतीशी संबंधित इतर माहिती आहे. अडचणीच्या वेळी कुठल्याही शेतकऱ्याला मदत मिळावी म्हणून त्यांनी हाईक या सोशल अँपवर 'ग्रामोदय' गट सुरू केला . जवळपास २५० शेतकरी या गटाचे सदस्य आहेत. .त्यांचं 'बळी आणि राजा' नावाचं पुस्तक 2010 ला प्रकाशित झालं. शेतीची हानी आणि त्यावर मार्ग याबाबत पुस्तकात विवेचन आहे. एकच पीक न घेता बहूपीक घेतल पाहिजे असा त्यांचा आग्रह. कोकणात बरक्या फणसाला कोणी विचारत नाही. काकांनी त्यापासून चॉकलेट तयार केली. आंबा, काजू यावर त्यांचे असंख्य प्रयोग सुरू असतात. कोकण कृषी विद्यापीठाची उत्तम साथ त्यांना आहे.
केंद्र सरकारच्या उन्नत भारत अभियानात ग्रामसमन्वयक म्हणून योगदान ते देत आहेत. गावांचा संपूर्ण विकास हेच त्यांचे उद्दिष्ट. त्यांच्यामुळे आज अनेक तरुण शहरात न जाता गावात स्वतःचा व्यवसाय करत आहेत.


- संतोष बोबडे, पुणे

No comments:

Post a Comment