Saturday 10 February 2018

घंटा नसलेली अनोखी शाळा!





Image may contain: 2 people, outdoor


मी मूळचा बीडचा, घरची परिस्थिती तशी जेमतेमच, त्यामुळे डी.एड. केलं आणि ते करतानाच जाणवलं, मानवी समाजाचे भविष्य मानली जाणारी पिढी घडविण्याचे सामर्थ्य आपल्याला मिळतंय, अजून काय पाहिजे? 2005 मध्ये पहिली नेमणूक झाली ती औरंगाबादच्या पैठणमधील चिंचाळा नावाच्या एका दुर्गम खेड्यातील जिल्हा परिषद शाळेवर. विद्यार्थी नियमित नाहीत, शाळेचं बाह्यरुपही उदासवाणं. पहिल्या दिवशी या शाळेचा कायापालट करायचा मी निश्चय केला.
Image may contain: 29 people, people smiling, people sitting
त्यासाठी आधी ग्रामस्थांसोबत बोलू लागलो. नवीन आलेला तरुण शिक्षक काहीतरी वेगळं घडविण्यासाठी धडपड करतोय, हे लोकांना समजलं. लोकांनीही आर्थिक मदत दिली. त्यातून सर्वप्रथम शाळा सुंदर रंगांनी रंगविली. मी स्वत: मुलांच्या मदतीने भिंतींवर राष्ट्रीय नेत्यांची, फळा- फुलांची, पाठातल्या शब्दांची आणि अंकांची वेगवेगळी चित्रं भिंतींवर रंगविली. शाळेसमोर सुंदर असे फुलझाडांचे उद्यान विकसित केलं.
या शाळेत काम करताना मी कधीही घड्याळाकडे पाहिलं नाही. प्रसंगी रात्रीचे आठ- नऊ वाजेपर्यंत शाळेत थांबून काम केले. शाळेचे भौतिक स्वरूप बदलल्याने विद्यार्थ्यांना शाळा खूपच आवडू लागली, मुलं उत्साहाने दररोज शाळेत येऊ लागली. मात्र केवळ बाह्य स्वरूप सुंदर असून चालणार नाही तर विद्यार्थ्यांची आणि शाळेची गुणवत्ता वाढविणेही गरजेचं, हे मला समजत होतं.

Image may contain: 13 people, people smiling, people standing and outdoor                                                                                          या शाळेत चौथीपर्यंतच्या वर्गासाठी आम्ही दोनच शिक्षक शाळेत होतो. त्यामुळे मुलांना उत्तम शिकवणं, हे ध्येय आणखी थोडं कठीण होतं. म्हणूनच आम्ही शिक्षकांनी मुलांना स्वावलंबी बनविण्यासाठी अनेक उपक्रम सुरु केले. त्यातलाच एक म्हणजे - ‘दत्तक मित्र’. यामध्ये प्रगत विद्यार्थी आणि अभ्यासात काहीसा मागे असलेला विद्यार्थी यांच्या जोड्या बनविल्या. हुशार विद्यार्थ्याने अप्रगत विद्यार्थ्याला मदत करायची, त्याला आलेल्या अडचणी सोडवून द्यायच्या. अगदीच उत्तर नाही मिळालं तर शिक्षकांकडे यायचं अशी पद्धत घालून दिली. शिवाय ‘रिंगण स्वाध्याय’ उपक्रमात आम्ही मुलांचे गट बनवित असू, यात कधी गणिताचे एखादं उदाहरण सोडवायचं असे किंवा इंग्रजी शब्दांचे अर्थ असत. शिवाय गटांची स्पर्धा ठेवली जाई, त्यामुळे आपल्या गटातील प्रत्येक विद्यार्थी हुशार व्हावा यासाठी इतर सवंगडी मदत करत असत.
याशिवाय विद्यार्थ्यांसाठी दिनांकाचा पाढा, शिष्यवृत्ती तसेच नवोदय विद्यालय अभ्यासिका, कौन बनेगा ज्ञानपती?, इंग्लिश डे असे अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम आम्ही घेतले. विद्यार्थ्यांची प्रगती होत आहे, हे ग्रामस्थांना दिसत होते. त्यामुळे आम्हांला लोकसहभागातून तीन संगणकही मिळाले. विद्यार्थ्यांना संगणकशिक्षण देण्यासही सुरुवात केली. अगदी सुट्टीच्या दिवशीही विद्यार्थी शाळेत येत राहिले.
महत्त्वाचं म्हणजे आमच्या शाळेची घंटाच मी काढून टाकली. शाळेची वेळ खरंतर सकाळी 9.30 ते दुपारी 4.30 अशी होती. मात्र विद्यार्थी 8-8.30 लाच शाळेत हजर व्हायचे. वर्गाच्या किल्ल्याही गटनायकांच्या हाती सोपविलेल्या होत्या. आम्ही शाळेत येण्याआधीच विद्यार्थ्यांनी आपापला अभ्यास चालू केलेला असे. कोणी खेळात किंवा बागकामात रमलेला असे. शाळा सुटल्यानंतरही विद्यार्थी शाळेतच रेंगाळत. कोणी गोष्टीची पुस्तकं वाचत बसे, तर कोणी संगणकावर काम करत असायचा. घरी शैक्षणिक वातावरण नसलेले विद्यार्थी शाळा भरण्याच्या आधी आणि शाळा सुटल्यावर हक्काने शाळेतच अभ्यास करीत बसायचे.
वाळके सर सध्या बीडच्या पारगाव जोगेश्वरीच्या शाळेत कार्यरत आहेत, तिथं त्यांनी राज्यातला पाहिला ऑडिओ- व्हिडिओ शालेय स्टुडिओ उभारलाय
सोमनाथ वाळके.

No comments:

Post a Comment