Saturday 19 May 2018

समाजशास्त्राला रंजक बनविताना

लातूर शहराला लागून असलेली वरवंटी जिल्हा परिषद शाळा. शाळेचा स्टाफ महिलाकेंद्री- ७ शिक्षिका आणि एक मुख्याध्यापक. या शाळेत इयत्ता आणि तुकड्यांचे वेगवेगळे वर्ग नाहीत, हेच इथलं वेगळेपण. त्याऐवजी आहेत समाजशास्त्र, गणित, भाषा अशी दालनं. या शाळेत मुलं दिवसभर एकाच वर्गात बसून राहत नाहीत. त्याऐवजी ज्या विषयाचा तास असेल त्या दालनात दाखल होतात आणि ज्ञानरचनावादी पद्धतीने अभ्यास करतात.
वरवंटी शाळेतील ही विषयदालने पाहण्यासारखी आहेत. समाजशास्त्र हा विषय शिकविणाऱ्या सविता धर्माधिकारी यांनी समाजशास्त्र दालनात अनेक अभिनव प्रयोग केले आहेत. त्यात मानवी उत्क्रांतीच्या अवस्थेनुसार निअँडरथल, होमो इरेक्टस, होमो सेपियन अशा अवस्थेची चित्रं काढलेली आहेत. त्या चित्रांवर त्या मानवांची वैशिष्ट्ये दाखविलेली आहेत. ती चित्रं विद्यार्थी गळ्यात अडकवितात आणि मग उत्क्रांतीच्या अवस्थेनुसार क्रमानं उभं राहण्याचा खेळ खेळतात किंवा चित्रावरून उत्क्रांतीची अवस्था ओळखून त्याच्या वैशिष्ट्यांची चर्चा करतात.जबाबदार नागरिकांची पायाभरणी करणाऱ्या ‘नागरिकशास्त्र’ या विषयाकडे तसं दुर्लक्षच केलं जातं. पण धर्माधिकारी यांनी हा विषय प्रात्यक्षिके, अभिरुप संविधान समिती आणि निवडणुकीद्वारे एकदम रंजक करुन टाकला आहे. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना आपलं संविधान कसं तयार झालं, याबाबतचा अभ्यास आहे. ते फक्त पुस्तकातून शिकवण्यापेक्षा धर्माधिकारी मॅडमनी 'अभिरुप संविधान समिती' तयार केली होती. त्यात एक विद्यार्थी संविधान समिती अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर झाला, तर कुणी राजकुमारी अमृत कौर, कुणी सरदार वल्लभभाई पटेल बनले. या विद्यार्थ्यांनी देशाच्या संविधानावर चर्चाही केली. प्रत्येक विद्यार्थ्याला पदवीपर्यंत मोफत शिक्षण मिळावे, प्रत्येक गावात अत्याधुनिक सोयींचा दवाखाना आणि कुशल डॉक्टर्स असावेत अशा शिफारशीही त्यांनी केल्या.

या चर्चेच्या अनुषंगाने धर्माधिकारी यांनी देशाचे संविधान आणि कायदा हा नागरिकांच्या भल्यासाठी आणि देशाच्या सुव्यवस्थेसाठी कसा आवश्यक आहे, ते समजावून सांगितले. गंमत म्हणजे यानंतर वरवंटी शाळेतील विद्यार्थ्यांनी 2016 साली त्यांच्या वर्गाचं संविधानही तयार केलं होतं. त्यासाठी संविधान समिती नेमण्यात आली, त्याच्या बैठका झाल्या आणि वर्गासाठीचे कायदे त्याद्वारे तयार झाले. त्यासाठी लिखित रूपात वर्गाच्या संविधानाचे प्रास्ताविकही विद्यार्थ्यांनी तयार केलं. महत्त्वाचे म्हणजे संविधान समितीत आवर्जून सर्व जाती- धर्मांच्या आणि बोलीभाषा बोलणाऱ्या सदस्यांचा समावेश केला गेला.
वरवंटी शाळेतील विद्यार्थ्यांच्या उत्सुकतेची आणखी एक गोष्ट म्हणजे- शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक. आता तुम्ही म्हणाल, विद्यार्थ्यांचे मंत्रिमंडळ तर अनेक शाळांमध्ये असते. पण वरवंटी शाळेत ही निवडणूक प्रक्रिया अगदी खऱ्याखुऱ्या निवडणुकीसारखीच पार पडते. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन त्याचं वेळापत्रक नोटीस बोर्डवर लागलं जातं. त्यानंतर उमेदवारांनी फॉर्म भरणे, निवडणुकीच्या प्रचारसभा, मतदानाचे चिन्ह, प्रत्यक्ष अंगठ्याचा शिक्का मारून मतदान, त्यानंतर मतमोजणी आणि मग मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ जाहीर करणे असा भरगच्च कार्यक्रम असतो. यात निवडून आलेले मंत्रिमंडळ वर्षभरासाठी शाळेची जबाबदारी घेते. प्रत्यक्ष इव्हीएम शाळेत आणणे शक्य नसल्याने ते कसे चालते याचा व्हिडिओ आणि फोटो धर्माधिकारी मॅडम यांनी मुलांना दाखविले.
समाजशास्त्राशिवाय इंग्रजी आणि गणिताचे अभिनव उपक्रम वरवंटी शाळेत घेतले जातात, 

- स्नेहल बनसोडे- शेलुडकर

No comments:

Post a Comment