Thursday 24 May 2018

एका, नव्हे दोन लग्नांची गोष्ट

''लग्न म्हटलं की अजूनही खर्च मुलीकडच्यांनाच जास्त पडतो. यामुळे मुलींचे आईवडील कर्जबाजारी होतात. कोणतीही अपेक्षा न ठेवता, एका अनोळखी मुलासाठी, त्याच्या कुटुंबासाठी आपलं घर सोडून मुलगी दुसऱ्या घरी येते. याची जाणीव ठेवायची सोडून तिच्या घरच्यांना खर्चात का बरं पाडायचं? असा प्रश्न आम्हाला पडायचा.'' रत्नागिरीतले विद्यानंद आणि अनमोल कोत्रे हे दोघे चुलत भाऊ बोलत होते. नुकतंच विद्यानंदचं मयुरी मांडवकरशी तर अनमोलचं सुप्रिया गुडेकरशी लग्न झालं. हे दोन विवाह आगळेवेगळे ठरले. 




धर्मादाय आयुक्त कार्यालयानं पटवर्धन प्रशाळेत आयोजित केलेला सामुदायिक विवाह सोहळा. एकूण 10 जोडपी. त्यापैकी 8 जोडप्यांनी धार्मिक विधिवत विवाह केला तर 2 जोडप्यांनी हे सगळे विधी, परंपरा आणि रूढी बाजूला ठेवले. केवळ हार आणि मंगळसूत्र घातलं. आपण मनानं एकमेकांना स्वीकारल्यानं विधींची गरज नाही, असं सांगत लग्न केलं.
"कुंडलीतल्या आकड्यांची जुळवाजुळव नव्हे. दोन मनांचं सुंदर मिलन, दोन मनांचा समजुतदारपणा, एकमेकांवरचा विश्वास म्हणजे लग्न. कर्तव्यबंधन नव्हे, तर दोन मनांचं अतूट बंधन. मंगलाष्टकातील सावधानता नव्हे, तर चुका पोटात घालणं, म्हणजे लग्न. दोन जीवांचं हे मिलन आई-वडील आणि समाजाच्या साक्षीनं शेवटपर्यंत निभावणं.'' लग्नाबद्दलचे आपले विचार विद्यानंद आणि अनमोल यांनी यावेळी मांडले. धर्मादाय आयुक्तांसह उपस्थितांनीही टाळ्यांच्या कडकडात नवदांपत्यांचं कौतुक केलं. या विवाहाचा आदर्श इतर तरुणांनीही घेण्याचं आवाहन धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी केलं.
कोत्रे बंधू कोतवडे इथले. आर्थिक परिस्थिती बेताचीच. महिनाभरापूर्वी त्यांनी रजिस्टर पद्धतीनं लग्न करण्याचा निर्णय घेतला. याच सुमाराला सामाजिक कार्यकर्ते सत्यवान कोत्रे आणि श्रद्धा कळंबटे यांनी त्यांना सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न करण्याचं सुचवलं. विद्यानंद आणि अनमोल यांनी सर्व नातेवाईक, गावपंचायतीसमोर आपले विचार मांडले. त्यांच्या आधुनिक विचारांचा सर्वानी खुलेपणानं स्वीकारही केला.
प्रत्येक तरुणानं असा विचार केला तर हुंडाबळीसारखे प्रकार घडणारच नाहीत असं नववधू मयुरी आणि सुप्रियाला वाटतं. 

No comments:

Post a Comment