नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यातलं दुर्गम खरवंडी गाव. याच गावात वडील, पाच चुलत्यांसह एकत्र राहणारं काशिनाथ खंडागळे यांचं कुटुंब. कुटुंबातली मुलगी सीमा. शिकून स्वत:च्या पायावर उभं राहाण्याचं स्वप्न बघणारी. त्यासाठी कष्ट घेणारी. गावकरी म्हणत, पोरीला कशाला शिकवता? लग्न करून टाका. पण कुटुंबाने याकडे साफ दुर्लक्ष केलं. खंडागळेेंची स्थिती बेताचीच. शेती पावसावर अवलंबून. जिल्ह्यात जिथून बोलावणं येईल तिथे ऊसतोडणीला जायचं. मात्र, शिक्षणाअभावी आपली हेळसांड झाली तशी मुलांची होऊ द्यायची नाही असं खंडागळे कुटुंबातल्या ज्येष्ठांनी पक्क ठरवलं होतं. त्यामुळेच सीमा पोलीस उपनिरीक्षक झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात अनुसूचित जाती प्रवर्गात ती राज्यात 14 वी आली . कुठलीही शिकवणी न लावता तिनं हे यश मिळवलं.
गावातल्या जिल्हा परिषद शाळेत तिचं प्राथमिक शिक्षण. मनमाडमधल्या सेंट झेवियर मनमाड बोर्डिंग स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण.इंग्रजी आणि इतिहास विषय घेऊन पदवीपर्यंत शिक्षण. नाशिकच्या समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात राहत असतानाच स्पर्धा परीक्षेची तयारी तिनं सुरू केली. हवालदार भर्तीत ती अवघ्या एका गुणानं अपयशी ठरली. कोणाचंही मार्गदर्शन नसल्यामुळे दिशाहीन घोकंपट्टी सुरू होती. कालांतरानं गणेश सास्ते यांचं मार्गदर्शन मिळालं. सास्ते सध्या धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये लेखापाल. एमपीएससीसाठी अभ्यास नेमका कसा करायचा, प्रवेश अर्ज कसा भरायचा, याचं मार्गदर्शन त्यांनी सीमाला केलं.
घरचे पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्यानंच यश मिळाल्याचं सीमा सांगते. तहसीलदार होण्याचं तिचं स्वप्न आहे. तिच्या यशाबद्दल येवला पंचायत समितीचे उपसभापती रुपचंद भागवत यांनी तिच्या घरी जाऊन तिचा सत्कार केला.
घरचे पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्यानंच यश मिळाल्याचं सीमा सांगते. तहसीलदार होण्याचं तिचं स्वप्न आहे. तिच्या यशाबद्दल येवला पंचायत समितीचे उपसभापती रुपचंद भागवत यांनी तिच्या घरी जाऊन तिचा सत्कार केला.
- प्राची उन्मेष.
No comments:
Post a Comment