Wednesday 8 August 2018

प्राथमिक शिक्षक ते डीवायएसपी


डीवायएसपी गणेश इंगळे. पहिलीच पोस्टिंग गडचिरोलीला. सुरुवातीला भौगोलिक परिस्थिती, नक्षलवादी चळवळ, तिथल्या हिंसक घटना, नक्षल चळवळीचा पाया म्हणून काम करणारे नक्षलसमर्थक, ग्रामरक्षक दल, एरियारक्षक दल आणि संघटन कार्यकर्ते यांच्या कारवायांचा बारकाईनं अभ्यास केला. आदिवासी जनतेच्या मनातली पोलिसांची भीती दूर केली. मानसिकता बदलण्याचा प्रयत्नही केला. नक्षलवादी विकासापासून दूर नेत असल्याचं समजावलं. ६ नक्षल्यांना अटक, नक्षली साहित्य जप्त अशी कारवाई. वावरणंही कठीण असलेल्या परिसरात दोन वर्षात शांती मेळावा, जनमैत्री मेळावा, विकास मेळावा, ज्ञानगंगा- फिरते वाचनालय, अनुसुचित जाती-जमातींना मार्गदर्शन, महिला आरोग्य शिबीर, ग्रामस्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती कार्यकम, दिवाळी भेट उपकम. याच कामगिरीची दखल घेऊन काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना विशेष महासंचालक पदक जाहीर केलंयगडचिरोलीतल्या सामाजिक उपक्रमात लोकसहभाग मोठा होता. हे उपक्रम राबवताना खूप समाधान लाभलं, रत्नागिरीतही असे काही उपक्रम राबवणार असल्याचं इंगळे सांगतात. वर्षभरापूर्वी त्यांनी रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारला. 
इंगळे मुळचे अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातल्या पानवली गावचे. आईवडिलांचं लहानपणीच देहावसान. शिक्षण मुंबईत घाटकोपरला मावशीकडे. मावशी, मामा, नातेवाईकांच्या सहकार्यानं डीएडपर्यंतचं शिक्षण. स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या जिद्दीतून नाशिकमधल्या रायता गावात वर्षभर शिक्षक. रोजची १२ किमीची पायपीट. मग एमपीएससी आणि 2013 मध्ये डिवायएसपी म्हणून निवड. शांत, मनमिळावू स्वभाव, तपासकामातली चतुराई, धाडसी वृत्ती, समस्या मार्गी लावण्याचा हातखंडा यामुळे अल्पावधीतच इंगळे यांनी पोलीस खात्यात आदर्श अधिकारी म्हणून नाव कमावलं आहे. परिस्थिती कशीही असली तरी आपण ध्येय सोडता कामा नये , असं ते सांगतात. 
-जान्हवी पाटील.

No comments:

Post a Comment