Tuesday 16 January 2018

शांतीवनमुळे शेतीत नंदनवन

जिल्हा बीड. तालुका शिरूर. इथल्या आर्वी गावातलं ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी काम करणारं शांतिवन आता बरंच प्रसिद्ध आहे. गेली १७ वर्षे शांतिवनात हे काम सुरु आहे. यासोबतच शांतिवनने आता ‘मनोबल’ प्रकल्प सुरु केला आहे.
‘मनोबल’विषयी संचालक दीपक नागरगोजे सांगतात, “सातत्याने अवर्षणचा सामना करणाऱ्या परिसरातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात होणारी घट, त्यातून कायम हाती ऊसतोडणीसाठी असलेला कोयता, ऊसतोडणीसाठी स्थलांतर, मुलींच ओझं नको म्हणून बालविवाह, मुलांच्या शिक्षणावर कोयता असा प्रश्नांचा गोतावळा शेतीशी निगडीत होता हे ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी काम करताना लक्षात आलं.” ते पुढं म्हणाले, “२०१३ साल असावं, प्रचंड दुष्काळ, संपूर्ण तालुका टँकरवर अवलंबून. शांतिवनमध्ये ३०० च्या जवळपास मुलं, अक्षरश: पाणी विकत घ्यावं लागलं, शासकीय मदतीविना चालणाऱ्या प्रकल्पाला हा खर्च परवडणारा नव्हता. म्हणून जलसंधारणाची कामं हाती घेतली. २०१४ मध्ये ८० बाय ५० मिटरचं शेततळे खोदलं, दोन विहिरी खोदल्या, पुढच्या वर्षीच्या पावसाने चित्रच पालटलं. विहिरी भरल्या, शेततळे पूर्ण भरलं. पाच कोटी लिटर पाण्याची ही ‘वॉटरबँक’ झाली. आणि शांतिवन दुष्काळमुक्त झालं.”
पाण्याची चिंता मिटली अन् शेतीत प्रयोग सुरु झाले. यंदा दोन एकरवर बेड, मल्चिंग करुन टोमॅटोची लागवड केली. जुलै, ऑगस्टमध्ये प्रचंड पीक आलं. पुणे, मुंबई, चंद्रपूरच्या बाजारपेठांमध्ये विक्रमी भाव मिळाला. त्यामुळे शांतीवनला दहा लाखांचं उत्पन्न मिळालं. यात सात ते साडेसात लाख निव्वळ नफा होता. यानंतर त्याच दोन एकरावर त्यांनी प्रयोग केला तो फुलशेतीचा. झेंडू फुलशेतीतूनही दोन लाखांचं उत्पन्न मिळालं. नागरगोजे म्हणतात, “प्रयोग यशस्वी झाल्यानंतर ते शेतकऱ्यांनाही करायला लावले, भाजीपाल्याची गटशेती केली.”
शेती करायची तर पाणी हवं, दुष्काळी तालुक्यात वॉटरबँकेशिवाय पर्याय नाही. म्हणून ११ शेतकऱ्यांना गतवर्षी शांतीवनने मोफत शेततळे दिलं. ३० बाय ३० मिटर आकार आणि दीड कोटी लिटर साठवण क्षमतेची ही शेततळी आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना यंदा दुप्पट उत्पन्न मिळालं. यंदाही २५ शेतकऱ्यांनी शांतिवनच्या मदतीने शेततळी बांधली आहेत. दोन वर्षात ४०० एकर क्षेत्र ओलीताखाली आलं असून १०० शेतकऱ्यांना शेततळे देऊन एक हजार एकर क्षेत्र ओलीताखाली आणण्याची इच्छा दीपक नागरगोजेंनी व्यक्त केली.
मनोबल प्रकल्पाचे लाभार्थी गोरक्ष मोहिते म्हणाले, “पारंपािरक शेती नेहमी तोट्यातच. शेततळ्यानंतर टोमॅटोला विक्रमी भाव मिळाला, आता झेंडूही लावला आहे. तंत्रशुद्ध शेतीचे फायदे कळत आहेत. शिवाय, पाणी कितीही असलं तरी ते वापरायचं ठिबक सिंचनानेच हे पथ्यही सर्वांनी पाळलं. यामुळं आता आयुष्यच बदलल्यासारखं वाटतयं.”

- अमोल मुळे.

No comments:

Post a Comment