दरम्यान आफरिम बेगम एक गटांगळी खाऊन वर आली होती. ती गळ्याला पडण्याचा धोका ओळखून अंतर ठेऊन एजाजने तिला पकडलं. काठावर सोडलं.
पुन्हा सुळूक मारून एजाज तब्बसुम जवळ पोचला. नाकातोंडात बरंच पाणी गेल्याने ती गुदमरत होती. त्याने तिच्या हाताला मजबूत पकडले. आणि स्वत: पाण्यात बुडून तिचं डोकं वर राहील याची काळजी घेत काठाकडे येऊ लागला. तेवढ्यात राजेश्वर देशमुख आणि पुंजाराम मदने यांनी एक साडीचे टोक एजाजच्या दिशेने फेकले. ते पकडून एजाजने तिला वाचविलं.
आता मुली बुडत असल्याची बातमी गावभर पसरली होती. सारा गाव बंधाऱ्यावर जमला होता. काही जण पाण्याबाहेर काढलेल्या मुलींच्या पोटातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले. एजाज पाण्याबाहेर येणार; तेवढ्यात काठावर उभी असलेली शन्नो एजाजला म्हणाली, “बाबा, मेरी बहन अफसर बेगमभी डूब गई है, उसेभी बाहर निकाल.”
एजाज परत फिरला. पुन्हा खोल पाण्यात जाऊन तिसरीचा शोध घेऊ लागला. इतक्यात केसांची हालचाल दिसली आणि त्याने जोरात सूर मारून केस पकडून तिला काठाच्या दिशेने खेचून आणलं. पुंजाराम मदने, भास्कर कल्याणकर, राजेश्वर देशमुख यांनी तिला बाहेर काढायला मदत केली. कोणी तरी म्हणाले, “और एक अंदर है सुमय्याSS”. आपली वर्ग मैत्रीण सुमय्या पण या बंधाऱ्यात बुडाली आहे, हा एजाजाला पण धक्का होता.
२५ फूट खोल पाण्यात एजाज सुमय्याचा शोध घेत राहिला. तो वेगवेगळ्या ठिकाणी तळ गाठायचा. पण सुमय्या दिसत नव्हती. अखेरचा प्रयत्न म्हणून त्याने पुन्हा एकदा तळ गाठला. तेव्हा पायाला काही जाणवलं. श्वास रोखून तिला वाचवायला त्यानं पुन्हा डुबकी मारली. तिचे पाय धरून वर आणलं खरं पण तोवर सुमय्या सर्वांना सोडून खूप दूर गेली होती. एजाजने तब्बसुम आणि आफरीनचे प्राण वाचवले. अफसर आणि सुमय्याला मात्र तो वाचवू शकला नाही. याची त्याला आजही खंत वाटते आहे.
अतिशय कठीण प्रसंगी साहस दाखवून दोन मुलींचे प्राण वाचविणाऱ्या एजाजचा गावाने सत्कार केला. आता त्याच्या या साहसाची नोंद राष्ट्रीय पातळीवरही झाली आहे. कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याला बालशौर्य पुरस्कार दिला गेला. 7 मुली आणि 11 मुले अशा एकूण 18 बालकांना 2017 साठीचा राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार दिला गेला. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात एकट्या एजाजची निवड करण्यात आली आहे.
खेळात हुशार असलेला एजाज अब्दुल नदाफ पार्डी येथील राजाबाई कनिष्ठ महाविद्यालयात १० व्या वर्गात शिकतो. अतिशय गरीबीमुळे कुणाचे ट्रक्टर रोजंदारीवर चालवून, पडेल ते काम करून तो कुटुंबाला आर्थिक मदत करतो.
दहावी झाल्यावर ड्रायव्हरची नोकरी करावी या एजाजचा विचाराला बालशौर्य पुरस्काराने नवी दिशा दिली आहे. आता त्याला सैन्यात जाऊन देशाची सेवा करायची आहे.
- सु.मा.कुळकर्णी.
No comments:
Post a Comment