Showing posts with label Online Safety. Show all posts
Showing posts with label Online Safety. Show all posts

Monday, 8 January 2018

वेबमाध्यम आणि मुलांच्या मेंदूचा प्रतिसाद


अति तिथे माती ही जुनी म्हण आजही सुसंगत ठरते आहे. आपल्याला गॅझेट हाताळण्याचं व्यसन लागलेलं आहे. हे कसं ओळखायचं? याची महत्त्वाची खूण म्हणजे त्यात आपला किती वेळ गेला आहे ते न कळणं. लोक कित्येक तास गॅझेट्स वर असतात आणि त्यांना ते समजतही नाही.
यापायी मुलं अभ्यास करत नाहीत, तरुण मुलांना करियर घडवण्याची ही महत्वाची वर्ष आहेत हे लक्षात येत नाही, काहींच्या नोकरी व्यवसायावर गदा येऊ शकते. अशी वेळ येऊ नये म्हणून काळजी घ्यायलाच हवी.
- आपण कोणत्या कामासाठी नेट सुरू केलं आहे हे लक्षात ठेवा आणि काम संपल्याक्षणी मोबाईल लांब ठेवा.
- शक्यतो मोबाईल दुसर्‍या खोलीत ठेवा आणि अभ्यास किंवा काम करण्यासाठी वेगळ्या खोलीत थांबा.
- स्वतःवर अजिबात नियंत्रण राहत नसेल तर घड्याळाचा alarm लावा, हा alarm मोबाईलवर लावू नका. घड्याळाचं ऐका.
- आपला आनंद केवळ नेटमधे लपलेला नाही, हे वारंवार स्वतःला सांगून खऱ्या गोष्टींमधला आनंद शोधण्यासाठी प्रयत्न करा. त्यासाठी नव्या गोष्टी शिका. नव्या ठिकाणी फिरायला जा.
- जबाबदारीची नवी कामं मुद्दाम अंगावर घ्या.
- ज्याप्रमाणे अल्कोहोल किंवा कोकेनचं व्यसन लागल्यावर मेंदूमध्ये परिणाम दिसतात तसेच परिणाम इंटरनेटचेसुद्धा मेंदूवर दिसतात. अल्कोहोल मिळालं नाही तर व्यसनी माणसं जशी बेचैन होतात तसंच काहीसं इथंही घडतं.
- मेंदूतला ग्रे मॅटर म्हणजेच विचार करणारा भाग. 'सायकॉलॉजी टूडे'च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार मेंदूत घडलेल्या बदलांची चित्र neuro-imaging तंत्रानुसार पाहिली आहेत. त्यातून जाणवलं की, कायम व्यसनात अडकलेल्या माणसांच्या मेंदूतील ग्रे मॅटरवर परिणाम असतो. जी लहान किंवा तरुण वयातली मुलं सात तास किंवा त्यापेक्षा जास्त काळ गॅझेट वापरतात त्यांच्या निर्णयक्षमतेवर, भावनिक नियंत्रणावर परिणाम होतो.

याचा थेट परिणाम माणसाच्या भावनांवर आणि संवेदनांवर होत असतो. ही गोष्ट भावनिक बुद्धिमत्तेसाठी योग्य नाही. याचा परिणाम पुढे शारीरिक आरोग्यावरही होऊ शकतो.
- गॅझेट्स अतिवापराचा दुष्परिणाम एकाग्रता आणि स्मरणशक्ती यावरही आढळून आला आहे.
- मेंदूमध्ये व्हाइट मॅटर या नावाचा एक भाग असतो. इथूनच चेतासंस्थेतल्या ग्रे मॅटरकडे वागणुकीविषयीचे संदेश दिले जातात. ह्या व्हाइट मॅटरवरदेखील अति इंटरनेट वापराचा दुष्परिणाम दिसून येतो. टीनेजर्स वर झालेल्या अभ्यासातून हे दिसून आलं आहे. वागणुकीवर होणारा परिणाम फार सखोल मानला जातो.
- मनातल्या भावभावनांचा, ताण-तणावांचा, अतिरेकी लैंगिक उद्दीपनांचा, सतत गेम खेळण्यामुळे मिळणाऱ्या उत्तेजनाचा, एकूणच मेंदूला सतत दक्ष ठेवण्याच्या प्रयत्नांचा, आणि पुन्हा पुन्हा मागणी करणाऱ्या डोपामाइनचासुद्धा परिणाम मेंदूला भोगावा लागतो.
- गरज म्हणून फ्री वायफाय दिलं जातं, पण त्यावर बंधने असावीत.
- ज्या लोकांना इंटरनेटवर खूप वेळ रहायची संवय झाली आहे आणि सुटका हवी आहे, त्यांच्या समुपदेशनासाठी हेल्पलाईन असावी.
- काही शैक्षणिक संस्थामध्ये नेटचा वापर करता येऊ नये यासाठी जॅमर्स बसवलेले असतात. त्याची संख्या पुढच्या काळात वाढवावी लागेल, असं चित्र आहे.
 : डॉ. श्रुती पानसे

Sunday, 17 December 2017

वेबमाध्यम आणि मुलांच्या मेंदूचा प्रतिसाद


"आजची तरुण पिढी सतत मोबाइल-सोशल मिडिया- इंटरनेटमध्ये गुंग असते." ही एक ठरलेली तक्रार. पण तरुण पिढीला नावं कशासाठी ठेवायची? लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण इंटरनेटने वेढलेले आहेत. काहींना कामासाठी, काहींना बिनकामाचं, काहींना खेळण्यासाठी, तर काहींना मित्र-मैत्रिणी गोळा करण्यासाठी. आपण आत्ता कुठे आहोत, काय करत आहोत, मनात कोणता विचार चालू आहे हे सगळं दुसऱ्याला सांगण्यासाठी इंटरनेट हवंच. असं, सतत गॅझेट्स वापरण्याचे मेंदूवर, मुलामणसांच्या क्षमतांवर काही परिणाम होत आहेत. त्याबद्दल काही निरीक्षणं, काही शंका, काही प्रश्न.
- इंटरनेट ऍडिक्शन डिसऑर्डर (IAD) हा आजार लोकांना होतो आहे.
- सायबर रिलेशनशिप ऍडिक्शन या नावाचा आजार होतो आहे. अशी मुलं सर्व वेळ आभासी मित्र-मैत्रिणींशी बोलत असतात, ते नवनवे आभासी मित्र-मैत्रिणी गोळा करत राहतात. त्यामुळे त्यांना खरोखरच्या मित्र-मैत्रिणींमध्ये फारसा रस उरत नाही. अशी मुलं प्रत्यक्ष भेटणं टाळतात. मोबाईल हातात घेऊन, एकमेकांना त्यातलं काही दाखवत गप्पा मारणं हे नेहमी दिसणारं दृष्य आहे.
- सायबर सेक्स ऍडिक्शन हाही प्रकार दिसून आला आहे. हाताशी सहज उपलब्ध असलेली अतिरेकी माहिती, चित्र, फोटो, व्हीडिओ, गोष्टी, विनोद याकडे एक चाळा म्हणून लोक वळतात. पुन्हा पुन्हा तेच तेच बघत राहतात. यातून मेंदूतली संबंधित क्षेत्र पुन्हा पुन्हा उद्दीपित होत राहतात.
- कारपेल टनेल सिंड्रोम - वजन वाढणं, डोळे कोरडे होणं, डोळ्यांवर आणि मानेवर ताण येणं. त्याचे परिणाम दीर्घकाळ टिकणारे.
- दीर्घकाळ लक्ष देऊन एखादं काम पूर्ण करणे हा प्रकार कदाचित कमी होण्याची शक्यता आहे. मुळातच अटेंशन स्पॅन कमी होतो आहे, त्यामुळे सराव करणं, पुन्हापुन्हा एखादी गोष्ट जमेपर्यंत सराव करणं ही गोष्ट कमी होईल. याचा परिणाम अभ्यासावर होतो आहे. वेळखाऊ पण आवश्यक कामं पूर्ण करण्यासाठी लागणार्‍या चिकाटीवर होऊ शकतो. संगीत कलेसाठी, वाद्यवादन यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी जो रियाझ लागतो, तो ही मुलं कसा करू शकतील?
एखाद्या विषयाच्या संशोधनासाठी वर्षानुवर्ष काम करावं लागतं. आजची पिढी ते करू शकेल का?
यावर उपाय काय?
ज्या मुलांसमोर खरोखर एखादी ध्येयासक्ती असेल, एखादी पॅशन असेल तर ती मुलं कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता पुढे जातातच. म्हणून आपल्या मुलांमध्ये अशी पॅशन निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
 : डॉ. श्रुती पानसे

Monday, 11 December 2017

वेबमाध्यम आणि मुलांच्या मेंदूचा प्रतिसाद


या तंत्रज्ञानाच्या युगात मोठ्या होणार्‍या मुलांच्या संदर्भात काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्या आहेत. आधीच विभक्त कुटुंब पद्धती, मुलांना खेळायला पुरेशी मोकळी जागा नसणं, अभ्यासाचं ओझं, यामुळे मुलांचं जग लहान होत चाललं आहे. त्यातून ते जर तंत्रज्ञानाने आणखीच आक्रसलं, तर? तर, एरवी सहजपणे शिकता येणारी काही मूलभूत कौशल्य त्यांना शिकता येणार नाहीत. उदाहरणार्थ, दुसर्‍यांशी संवाद, समोरच्या व्यक्तीचा चेहरा वाचून अंदाज घेणं, अशा प्रकारे अंदाज घेत आपण वागणं, टीमवर्क, स्वतः च्या आणि दुसऱ्या व्यक्तीच्या समस्या सोडवणं, या सर्व कौशल्यांमध्ये आजची मुलं मागे पडत आहेत, असं संशोधनातून समोर येत आहे. आज गॅझेट्सचा अतिवापर करणारी मुलं जेव्हा मोठी होतील तेव्हा इतरांशी जुळवून घेणं ही मूलभूत कौशल्य नसल्यामुळे त्यांना अडचणीचं ठरणार आहे. उद्याच्या प्रौढ समाजाबद्दल विचार करताना हे लक्षात नको का घ्यायला? गॅझेट्सना सुरक्षित अंतरावर ठेवणं म्हणूनच आवश्यक आहे.
आज मोठ्या असलेल्या माणसांवर ही तंत्रज्ञानाच्या अतिवापराचे परिणाम वेगवान आहेत. त्यांना त्यांचे ताणतणाव कमी करायचे असतात. तऱ्हेतऱ्हेची आव्हानं असतात, प्रत्येकाचे आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक प्रश्न असतात. या प्रश्नाशी झुंजण्यात दिवस जातो. हे सगळं विसरण्यासाठी माणसं स्वतःला रमवण्याचा प्रयत्न करतात. तरीही, काही जणांवर या गॅझेट्सचा घट्ट विळखा पडतोच.
मेंदूची क्षमता अफाट आहे. पूर्ण आयुष्यात आपण आपल्या मेंदूचा पुरेपूर वापर करू शकत नाही. मेंदू खूप सारी कौशल्य शिकू शकतो, हातांनी करण्याच्या गोष्टीसुद्धा अभिनव पद्धतीने करू शकतो, पण आपणच मेंदूला पुरेसं काम देत नाही, अशी आजची स्थिती आहे. क्षमता असताना मेंदूला काम दिलं नाही तर तो उलट क्रमाने उत्क्रांत होत जाणार की काय ? बापरे!
तसं नको व्हायला.
म्हणून मुलांना मोबाईल पासून दूर ठेवायचं असेल तर -
1. वेळेची मर्यादा पाळणं आवश्यक. ठराविक वेळेनंतर मोबाईल पाहायचाच नाही. यासाठी स्वतःशी किंवा मुलांशी कठोर वागावं लागेल.
2. मुलं-मुलं, मोठी माणसं एकत्र येतील, समोरासमोर बसून बोलतील याच्या संधी, निमित्त शोधून काढा.
3. मेंदूला चालना देणारे उपक्रम करा.
4. आनंदी संवेदना देणारं डोपामाईन द्रव्य मुलांना कोणकोणत्या कृतीतून मिळेल त्याची योजना करा.
 : डॉ. श्रुती पानसे

Sunday, 3 December 2017

वेबमाध्यम आणि मुलांच्या मेंदूचा प्रतिसाद


आपल्या मेंदूमध्ये सदासर्वकाळ विद्युतरासायनिक लहरी निर्माण होत असतात. हे मेंदूसाठी आवश्यक असतं. यालाच ब्रेन वेव्हज म्हणतात. ज्यावेळी मुलं किंवा मोठी माणसं गॅझेट्स हाताळत असतात त्यावेळी एरवी निर्माण होणाऱ्या मेंदूच्या लहरींपेक्षा या लहरींचा पॅटर्न वेगळा असतो. मेंदू शास्त्रज्ञांना आढळलं की, जी मुलं मोबाईलवर खूप जास्त वेळ गेम खेळत असतात त्यांच्यामध्ये त्यांना एडीएचडी (attention deficit hyper disorder)हा आजार जडू शकतो. या मुलांमध्ये एकाग्रतेची समस्या निर्माण होऊ शकते.
मुळात गॅझेट्सची सवय लागायला अनेक मानसिक कारणं असतात. परीक्षेतले कमी गुण, सततचं अपयश, आईबाबांची बोलणी खाणं, मित्र- मैत्रिणीनंबरोबर मैत्रीपूर्ण संबंध नसणं, अभ्यासाचा / नेमून दिलेल्या कोणत्याही कामाचा आत्यंतिक कंटाळा, काहीही करावसं न वाटणं, घरात किंवा आसपासच्या वातावरणात भांडण, रुसवाफुगवा, नैराश्य अशी नकारात्मकता, घरात माणसं नसल्याने आलेला एकटेपणा, आईबाबांनी टीव्ही बघू न देणं, आळस, एका क्लासमधून दुसऱ्या क्लासमध्ये धावणं, सतत लेखन, पाठांतराचं ओझं, अभ्यास- गृहपाठ असा अतिशय व्यस्ततेचा बराच काळ गेला असेल तर थोडासा जरी मोकळा वेळ मिळाला तरी मुलं लगेच मोबाईलकडे वळतात. हेच काय ते एकमेव मनोरंजन, असं त्यांना वाटायला लागतं.
म्हणजेच, आजूबाजूच्या घटनांमधला, माणसांमधला रस कमी झाला, कोणत्याही गोष्टीबद्दल छान वाटेनासं झालं की मुलं या स्वस्त मनोरंजनाकडे वळतात. या माध्यमातून त्यांना सतत काही तरी मिळत राहतं. काही गोष्टींपासून लांब जाण्यासाठी जसा व्यसनांचा सहारा घेतला जातो, तसंच. मोबाईलचा वापर करता करता त्यात इतके गुरफटून जातात की हे योग्यच आहे, इथेच तर सगळी मजा आहे असं त्यांना वाटायला लागतं.
गॅझेट्सच्या मानसिक दुष्परिणामांच्या अशा अनेक केसेसशी संबंधित मोठ्या प्रमाणात अभ्यास आणि संशोधन होत आहे. अमेरिकन ऍकेडमी ऑफ पेडियट्रिक यांनी प्रत्येक वयोगटात किती वेळ मोबाईल हाताळावा यासाठी वेळ मर्यादा आखून दिलेली आहे. त्यानुसार दोन वर्षाखालील मुलांना मोबाईल मुळीच द्यायचा नाही. तीन ते पाच वयाच्या मुलांना एक तासाच्या वर कोणतीही इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स देऊ नयेत असं स्पष्ट केल आहे. 10 ते 18 वयोगटातल्या मुलांनी केवळ दोन तास वापरला तर हरकत नाही. तर त्यावरच्या वयोगटांना या पेक्षा थोडा अधिक काळ चालू शकतो असं सांगितलेलं आहे. पण, यापेक्षा किमान दुप्पट तरी वेळ मुलं मोबाइल हाताळत असतात .
मोठ्या माणसांनी मोबाईल हाताळला, त्यावर काही वेळापुरते गेम खेळले तर चालू शकतं. यामुळे त्यांचे ताणतणाव काहीसे कमी होतात आणि काही वेळानंतर सहजपणे मोबाईल बाजूला ठेवून ते आपापल्या कामाला लागू शकतात. परंतु मुलांचं असं होत नाही. ते मोबाइल बाजूला ठेवत नाहीत. अशी गॅझेट्स बाजूला करायचा प्रयत्न केला तर मुलं भयंकर चिडचिड करतात. तो बाजूला ठेवायला सांगितल्यानंतर त्यांना ते जमत नाही. एखादं व्यसन सोडवतांना त्या माणसामध्ये withdrowal symtoms दिसतात, तेच symptoms मोबाईल पासून मुलांना दूर करताना दिसून येतात. याचा अर्थ मेंदूने ही सवय घट्टपणे लावून घेतलेली आहे.
ऑनलाईन एक्टिविटी ही खूप वेगात चालू असते. आपण एकाच वेळेला अनेक गोष्टी हाताळू शकतो. आता तर मोबाईलमुळे एकाच वेळी whatsapp ,फेसबुक, instagram, कॅलक्युलेटर, अलार्म, बॅंक, अशा अनेक गोष्टी वेगात होऊ शकतात. ते ही बसल्याजागी ! मात्र शास्त्रज्ञांच्या मते मेंदू एका वेळी एकच काम चांगल्या पद्धतीने करू शकतो. त्याला जास्त कामाला लावलं तर विलक्षण थकवा येतो. चिडचिड वाढते. लहान मुलांच्या बाबतीत तर मेंदूतले पॅटर्न बदलू शकतात. म्हणूनच काही प्रमाणात इ लर्निंग आवश्यक असलं, तरी सर्रास digitization नको. यापुढच्या काळात मोबाईलसारखी गॅझेट्स महत्वाची आहेत असं मानून ती हाताळण्याचं योग्य प्रशिक्षण मिळायला हवं.
  डॉ. श्रुती पानसे


Sunday, 26 November 2017

वेबमाध्यम आणि मुलांच्या मेंदुचा प्रतिसाद


इ लर्निंग वापराचा आमचा एक अनुभव. चौथीच्या वर्गातलं एक दृश्य. इ लर्निंग स्क्रीनवर एक फिल्म चालू आहे. आवाज पूर्णपणे बंद केलेला आहे. मुलांना फक्त चित्र दिसताहेत. तरीही मुलं फिल्ममध्ये गुंगलेली आहेत. फिल्म सुरू व्हायच्या आधीच आम्ही सांगितलं होतं की या गोष्टीतले संवाद ऐकू येणार नाहीत. ते तुम्हीच तयार करायचे आहेत. पंधरा मिनिटांनी ही फिल्म संपली. मुलांनी मनाने संवाद लिहिले. वर्गात वाचून दाखवले. पुन्हा एकदा आवाजासह मुलांना फिल्म दाखवली. आपण लिहिलेले संवाद आणि तिथले संवाद यातला साम्य आणि फरक मुलं ताडून बघत होती.
ई लर्निंग हे आजचं अतिशय प्रभावी आणि यशस्वी प्रकरण आहे यात शंका नाही.
हल्ली प्रत्येक शाळेला ई-लर्निंग हवं आहे.
काय आहे या ई-लर्निंग मध्ये? वर्गातच मोठा स्क्रीन असतो. त्यावर शिक्षक हवे ते व्हिडीओज दाखवू शकतात; यामध्ये बालभारतीतले धडे-कविता- गणित- परिसर- विज्ञान- इतिहास या सगळ्याशी संबंधित चित्रं, व्हीडिओज दाखवू शकतात. किंवा शिक्षकाच्या मोबाईलवर असलेला एखादा video शिक्षकाच्या मोबाईलवर असलेली गाणी, भाषणं, मुलाखती असं काहीही मुलांना दाखवायचं असेल तर ते सहज सोप्या रीतीने साध्य होतं. मुलांना वेगवेगळे प्रयोग प्रत्यक्ष बघता येतात. आजची एखादी ताजी बातमीदेखील इंटरनेट कनेक्शन असल्यास मुलांपर्यंत पोचवता येते. मुलांना हे स्क्रीनशिक्षण अतिशय आवडतं हे तर प्रत्यक्षच दिसतं आहे.
- सरकार देखील ई-लर्निंगला अनुकूल आहे. एखाद्या शाळेत इ लर्निंग उपलब्ध आहे हे आता त्यांच्या जाहिरातीमध्ये सुद्धा येऊ लागलेलं आहे.
- ई लर्निंग मुळे शिक्षकांच्या डोक्यावर असलेला भार काही अंशी उतरतो. शिक्षण सुकर होतं. ज्ञानरचनावादी पद्धतीत शिक्षकाने मदतनीसाच्या भूमिकेत जायचं आहे, त्यासाठी हे पूरक आहे.
पारंपारिक वर्गातलं चित्र असं असतं की, शिक्षक शिकवाहेत, मागे खडूफळा आहे, हातात पुस्तक आहे. ते बोलताहेत, मुलं ऐकताहेत. लिहून घेताहेत. प्रश्नांची उत्तरं देताहेत. अशा वेळी मेंदूच्या डाव्या भागात काम सुरू असतं . कारण डाव्या भागात भाषेचं केंद्र आहे. ऐकणं, बोलणं, समजावून घेणं, उत्तर देणं, लिहून घेणं ही डाव्या बाजूची कामं आहेत.
आता हाच पाठ इ लर्निंग क्लासरूममध्ये चालू असेल तर मेंदूच्या केवळ डाव्याच नाही तर उजव्या भागातही उद्दीपन चालू होईल. मेंदूचा जास्तीत जास्त भाग वापरला जाईल. कारण उजव्या भागामध्ये रंग, चित्र, कल्पना, अभिनय, संवाद, संगीत याचं काम चालतं. या घटकांशी संबंधित क्षेत्रं उजवीकडे असतात. हे सर्व समोर स्क्रीनवर दिसत असतं. म्हणून केवळ ‘व्याख्याना’पेक्षा दृक-श्राव्य माध्यम जास्त परिणामकारक वाटतं. मेंदूची ही परिभाषा लक्षात घेऊन या ई लर्निंगचा जास्तीत जास्त चांगला वापर कसा करून घ्यायचा हे शिक्षकाच्या हातात आहे.
हे फायदे बघतांना एक गोष्ट मात्र विसरून चालणार नाही, ती म्हणजे हाताने केलेल्या कुठल्याही कामाला ई-लर्निंग हा पर्याय असू शकत नाही. उदाहरणार्थ
१. एखादा प्रयोग पुस्तकातून वाचून दाखवणे
२. तो डिजिटली स्क्रीनवर दाखवणे आणि
३. मुलांनी तो प्रयोग प्रत्यक्ष स्वत:च्या हाताने करणे
यात योग्य प्रकारे ब्रेन डेव्हलपमेंट ही ‘प्रत्यक्ष हाताने करून शिकणे ’ हीच असणार आहे. त्यामुळे जरी ई-लर्निंगद्वारे एखादा प्रयोग दाखवला तरी प्रत्यक्ष हातांनी करण्याला पर्याय नाही.
ई लर्निंगच्या स्क्रीनशिक्षणाला प्रोत्साहन देणारे आपण मुलांच्या हातात गॅझेट्स असण्याला मात्र नाकारतो. याची कारणं काय?
वाचूया पुढील भागात..

: डॉ. श्रुती पानसे

Tuesday, 7 November 2017

वेबविश्वात आपली मुलं सुरक्षित आहेत का? - भाग सहा


मागच्या भागात काउन्सेलिंग प्रक्रियेची चांगली माहिती मिळाली. पण काउन्सेलिंगनेही सुटू शकत नाहीत, अशा काही केसेस असतात का? अशा केसेस कशा हाताळल्या जातात?
- काही वेळा मुलांमध्ये पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स दिसून येतात. लहानपणापासूनच काही मुलं आक्रमक असतात, सहजपणे खोटं बोलत असतात. अशा स्थितीत मुलांच्या हातात इंटरनेट गेलं तर खूपच मोठी समस्या तयार होते. अशा मुलांना ऍडमिट करणं, योग्य ते औषधोपचार देणं, जास्त काउन्सेलिंग करणं असे उपाय केले जातात. या संदर्भात दोन केसेसची उदाहरणं देते.
चार-पाच वर्षापूर्वी आमच्याकडे या विषयातली पहिली केस आली होती. एक मुलगा, विशाल म्हणूया त्याला. विशालचे वडील त्याला ॲडमिट करायलाच घेऊन आले. म्हणाले, माझ्या मुलाला इंटरनेटचं व्यसन आहे. त्याला ॲडमिट करा. या विषयाचा ते नीट अभ्यास करुन आले होते. खरं तर, विशालच्या वडिलांशी चर्चा केल्यानेच आम्हाला इंटरनेटव्यसन या विषयाचं गांभीर्य पहिल्यांदा आमच्या लक्षात आलं. विशाल कॉलेजमध्ये जातो सांगून इंटरनेट कॅफेमध्ये जाऊन बसायचा. विशालच्या अनुपस्थितीबद्दल कॉलेजकडून पत्र आल्यावर हा प्रकार त्याच्या वडिलांच्या लक्षात आला. आम्ही विशालला ॲडमिट करुन घेतलं. त्याने चांगला प्रतिसादही दिला आणि इंटरनेट ॲडिक्शनमधून तो व्यवस्थित बाहेरही आला. त्याला व्यायामाची चांगली सवय लागली. स्वतःच्या दिनक्रमाचं नीट वेळापत्रक आखून त्याने अभ्यास केला. नंतर उच्चशिक्षणही घेतलं.
आता दुसरी केस. ही टोकाची होती. एका टीन एज मुलाचं, अक्षयचं इंटरनेटवेडाचं प्रमाण वाढलेलं होतं. तो रात्रीचं जेवण झाल्यावर कंप्युटरवर बसायचा. तो रात्रभर बसायचा. एकदा सकाळी त्याच्या आईबाबांनी बघितलं, तर तो त्याच अवस्थेत तसाच डोळे तारवटून बसलेला. बसल्या जागी लघवी झाल्याचंही त्याला कळलेलं नव्हतं. म्हणजे नैसर्गिक विधीसाठीही तो जागेवरून उठला नव्हता. अशा वेळी ॲडमिट करण्याखेरीज पर्यायच नसतो.
अशा टोकाला गेलेल्या व्यक्तींसाठी ३० दिवसांचा एक कोर्स असतो. इंटरनेट किंवा मोबाईलपासून मुलांना पूर्णपणे दूर ठेवलं जातं. त्यामुळे मुलं चिडचिड करतात. त्यांना थोडे विड्रॉवल सिंम्पटम्स येतात. मग त्यांना समजावून सांगावं लागतं की हेही एक व्यसनच आहे. वर्तनात्मक व्यसन. अशा मुलांच्या पालकांविषयी तक्रारी ऐकून मुलं आणि पालक यांचं समुपदेशन केलं जातं. ॲडमिट झाल्यावर आमच्या केंद्रातलं दैनंदिन वेळापत्रक मुलांना पाळावं लागतं. त्यातून मुलांना एका सकारात्मक जीवनशैलीची ओळख होते आणि महिन्याभरात नव्या जीवनक्रमात मुलं रुळूनही जातात. या दिनक्रमाचं महत्व त्यांना कळतं. व्यायाम करुनही मन किती आनंदित होतं, हे त्यांना जाणवतं. आपले पालक आपलं ऐकतायत, आपल्याशी नीट बोलतायत हे लक्षात येतं. दारुच्या व्यसनींना दारूपासून पूर्णपणे दूर रहा असं सांगावं लागतं. मात्र इंटरनेटचं वेड बरं करताना या तंत्रज्ञानाच्या चांगल्या बाजू समजावून सांगितल्या जातात. गॅझेट्सचा योग्य कारणासाठी उपयोग, इंटरनेटचा स्मार्ट वापर करायची सवय लावली जाते. काही नियम घालून दिले जातात. सांगितलेलं पाळलं जातंय का याचा फॉलोअप ठेवला जातो. मुक्तांगणच्या अनेक उपक्रमांमध्ये त्यांना सहभागी करुन घेतलं जातं. महाराष्ट्रातल्या आमच्या इतर फॉलोअप सेंटरमध्ये जाऊन ते इतर लोकांना मदत करतात. अक्षय या दीर्घ उपचारप्रक्रियेतून जाऊन बरा झाला. काउन्सेलिंग ही अशी मोठी आणि वेळखाऊ प्रकिया असते हे पालकांनी लक्षात ठेवायला हवं. आता वर्तवणुकीतले आजार, मानसिक आजार वाढतायत. त्यामुळे काउन्सेलिंग ही आता काळाची गरज झाली आहे.
वेबविश्वात आपली मुलं सुरक्षित राहावीत यासाठी मुलांना वेगवेगळ्या गैरप्रकारांची उदाहरणं समजावून सांगा. त्यासंबंधीचे लेख त्यांच्यासोबत वाचा. मुलांच्या सर्व प्रश्नांना उत्तरं द्यायचा प्रयत्न करा. तुमच्याकडे उत्तर नसेल तर मुलांबरोबर बसूनच ते शोधा. त‌ज्ञांचा सल्ला घ्या. इंटरनेटवरची सर्व महिती खरी असतेच असं नाही, हेही मुलांना समजावून सांगा.
आजची तरुण पिढी स्वकेंद्री, स्वार्थी आहे असं म्हटलं जातं. मला हे मान्य नाही. चांगले मार्ग दाखवले की मुलं ते अनुसरतात. मुलांना इतरांना मदत करायला आवडते. ती त्यांना करू द्या.
शेवटी मी पालकांना एवढचं सांगेन की, मुलांना मोकळ्या हवेत फिरायची, खेळायची सवय लावा. मुलं लहान असताना इंटरनेट आणि गॅझेटसपासून त्यांना शक्य तेवढं लांब ठेवा. टीन एजमध्ये मुलांना गॅझेट्सचा योग्य उपयोग करायची सवय लावा. इंटरनेट, सोशल मिडियाचं जग फसवं आहे, याची आणि खरोखरीचं जग सुंदर आहे, याची मुलांना परोपरीने जाणीव करून द्या.
(समारोप)

- मुक्ता पुणतांबेकर, सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आणि संचालक


Tuesday, 31 October 2017

वेबविश्वात आपली मुलं सुरक्षित आहेत का? - भाग पाच



टीन एजमधल्या मुलांना कसं हाताळायचं, ते पालकांना कळत नाही. एक मुलगी बारावीला आहे. दिवसातले १८ तास इंटरनेट, मोबाईल यावर असते. पालकांनी काही विचारलं तर ती त्यांच्या अंगावर ओरडते, धमक्या देते. अशा स्थितीत काय करावं?
- अशा वेळेला पालकांनी आधी संवाद साधायचा पूर्ण प्रयत्न करावा. मागच्या भागात त्याविषयी आपण बरीच चर्चा केली आहे. अनेक मार्गही सुचवलेत. पण ती मुलगी काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीये तर आता काउन्सेलिंगची खरंच गरज आहे, हे पालकांनी लक्षात घ्यायला हवं. पालकांनी स्वत: त्रास करुन घेऊन परिस्थिती बदलणार नाहीये. आधी पालकांनी स्वत: काउन्सेलरला भेटून मोकळेपणाने बोलावं. आपल्याला ताप आला की डॉक्टरकडे जातो तेवढ्याच सहजपणे काउन्सेलरला भेटायचं. काउन्सेलर मध्यस्थ आणि तटस्थ व्यक्ती म्हणून आपल्याला चांगली मदत करु शकतात. फॅमिली डॉक्टरप्रमाणेच फॅमिली काउन्सेलर ही सध्या गरज बनत चालली आहे. हे समाजाने मान्य करायला हवं. शारिरिक आणि मानसिक आरोग्यासाठी नेहमीच ताबडतोब निदान हिताचं असतं. वेळ घालवला तर गोष्टी आणखी बिघडतील, हे लक्षात घ्यावं. मुलांमध्ये समस्या दिसत असलीत तर लगेच काउन्सेलिंग सुरु करणं बरं.
पालक आणि मुलांसाठीचे काउन्सेलिंगचे काय टप्पे असतात?
सुरवातीला पालक फोन करतात, भेट ठरवतात. पण प्रत्यक्ष यायला उशीर करतात. जेव्हा प्रकरण टोकाला जातं तेव्हाच येतात. लोक काय म्हणतील या भीतीने ते काउन्सेलरकडे यायला वेळ लावतात. पालक येतात तेव्हा इतके वैतागलेले असतात की त्यांना शांत करण्यातच एक सेशन जातं. पहिल्या भेटीत पालकांचं आणि मुलाचं रुटीन विचारलं जातं. ते मुलांशी कसं वागतात, कशा प्रतिक्रिया देतात, ते समजून घेतात. मग काउन्सेलर त्यांना समजावतात, वागण्यात काही बदल सुचवतात. पालकांनी सोशिकपणा अंमलात आणणं सोपं नसतं. आतून कितीही राग आला तरी मुलांशी वागताना बाहेरून शांत राहावं लागतं. पालकांनी स्वतःच्या वागण्या-बोलण्यात-प्रतिक्रिया देण्यात बदल केल्यानंतर बर्‍याचदा काउन्सेलरकडे न येताच मुलांच्याही प्रतिक्रिया बदलतात. अर्थात मुलांमध्ये बदल व्हायला वेळ लागतो. पालकांनी मुलांवर चिडणं जाणीवपूर्वक बंद केलं तरी मुलं सुरवातीला आपला चिडचिडेपणा, हट्ट सोडत नाहीत. अशा वेळी पालकांना खूपच सामंजस्याने घ्यावं लागतं. मुलांमध्ये बदल होण्यासाठी जास्त वाट बघावी लागते. मुलांना पालकांमध्ये झालेला बदल जाणवत असतो. पण सहजासहजी मान्य करतील ती मुलं कसली? पण हळूहळू मुलांच्या वागण्यातून ते जाणवतं.
साधारणपणे पहिल्या टप्प्यात पालकांशी बोलणं, त्यांच्याकडून मुलांची हिस्ट्री समजून घेणं आणि त्याविषयी चर्चा. पुढच्या टप्प्यात पालकांचा नेमकी समस्या शोधून त्यांना काही उपाय सुचवणं, वागण्यात बदल सुचवणं आणि त्यावर चर्चा. तिसर्‍या टप्प्यात त्यांच्यातले बदल टिकून राहिलेत का, हे तपासणं, बदलांमुळे मुलांच्या वागण्यात अपेक्षित बदल दिसताहेत अथवा नाही याची चर्चा आणि बदल दिसत नसतील तर मुलांना काउन्सेलिंगसाठी आणण्याचे प्रयत्न करणं, असं चालतं.
मुलांच्या इंटरनेटच्या वेडाची नुकती सुरवात असेल तर एखाद-दोन सेशन्समध्ये, पालकांशी बोलूनच तो प्रश्न सुटतो. असं एक उदाहरण म्हणजे ८ वर्षांची मुलगी होती. प्रिया म्हणूया तिला. आई नोकरी करत असल्यामुळे शाळेव्यतिरिक्तचा वेळ प्रिया घरात एकटीच असायची. घरात वायफाय होतं. मग ती कंप्युटरवर काहीतरी करत राहायची. मात्र एक दिवस प्रियाने आईच्या मैत्रिणीला फेसबुक रिक्वेस्ट टाकली. मैत्रिणीकडून ते आईला कळलं. आईला धक्का बसला. मग एकदा आई आणि एकदा प्रिया अशी दोन काउन्सेलिंगची सेशन्स झाली. घरातलं वायफाय बंद केलं. आणि प्रश्न सुटला.
एक चांगली गोष्ट म्हणजे हल्ली पालक जागरुक झालेत. त्यांना मुलांमध्ये इंटरनेट किंवा गॅझेट्सच्या वेडाची झलक जाणवली की लगेच काउन्सेलरकडे जातात. मुक्तांगणमध्ये तर आमचा अनुभव तर असा कीे मुलांना मोबाईल घेउन देण्याचं ठरलं की पालक आधीच मुलांना आमची संस्था सहज दाखवायला म्हणून घेउन येतात. पुढच्या भागात आपण आणखी केसेसची चर्चा करूया.
  - मुक्ता पुणतांबेकर, सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आणि संचालक,
मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र
 शब्दांकन: रूपाली गोवंडे.

Friday, 27 October 2017

वेबविश्वात आपली मुलं सुरक्षित आहेत का? - भाग चार



हॉस्टेलमध्ये रहाणार्‍या मुलांकडे लक्ष ठेवणं पालकांना थोडं अवघड जातं. या बाबतीत पालकांनी नेमकं काय करायचं?
- मी सुचवेन की तंत्रज्ञानाची मदत घ्यावी आणि स्काईपसारख्या माध्यमातून मुलांशी बोलत राहावं. आई-वडील आणि मुलं यांचा व्हॉट्स ॲप ग्रुप बनवावा. आम्ही घरात असा ग्रुप बनवला आहे. आपण काही चांगलं वाचलेलं, चांगला सिनेमा बघितलेला, हे सगळं मुलांबरोबर शेअर करावं. सतत जेवलास का आणि झोपलास का असं विचारत बसू नये. उपदेश तर नकोच नको. आपल्या संवादातून मित्रत्वाची भावना मुलांच्या मनात निर्माण करा. आपण आता मोठे झालो आहोत, हे आपल्या आई-वडिलांना समजलंय, ही जाणीव मुलांमध्ये निर्माण होऊ द्यात. माझी एक मैत्रीण म्हणते की हॉस्टेलवर रहाणार्‍या तिच्या मुलाशी तिचं स्काईपवर होणारं बोलणं जास्त जिव्हाळ्याचं असतं. दिवसातलं २० मिनिटांचं बोलणं थेट आणि समोरासमोर बसून होतं आणि दोघांकडून तेवढा वेळ एकमेकांना दिलाच जातो. काही वेळा एकाच घरात राहूनसुद्धा दिवसेंदिवस स्वत:च्या व्यापात व्यस्त असणार्‍या आई-मुलाचंही रोज एवढं बोलणं होत नाही.
डिजिटल व्हर्च्युअल गेमपायी एखाद्याने आपलं जीवन संपवलं, असं आपण ऎकतो. ही नेमकी काय मानसिकता असते?
- टीन एज किंवा ज्याला पौगंडावस्था म्हटलं जातं या अवस्थेत मुलं वहावत जातात. पटकन कोणाच्याही प्रभावाखाली येतात. मग ते मित्रमैत्रिणी असोत. किंवा फिल्मस्टार असोत. मित्रमैत्रिणी जे सांगतील तसंच मुलं करतात. नकळतपणे निगेटीव्ह गोष्टींचं आकर्षण या अवस्थेत मुलांना जास्त असतं. व्हिलनचा रोल करणार्‍याविषयी त्यांना आकर्षण वाटू शकतं आणि हे त्या वयात नैसर्गिक असतं. मग अशा गेम्सच्या आहारी ते लवकर जातात. पहिल्या भागात आपण म्हटलं की इंटरनेटवर किती वेळ बसायचं, त्याचाही नियम करावा. अर्धा तास ठीक आहे. तर, ज्या मुलांना पालकांनी अर्धा तास इंटरनेटवर बसायची परवानगी दिलेली आहे, त्या मुलांच्या बाबतीत गेमचं आकर्षण, त्यातून काही विपरित प्रकार घडण्याची शक्यता खूप कमी असते. पण जेव्हा मुलं तासच्या तास कंप्युटरसमोर किंवा मोबाईल हातात घेऊन बसलेली असतात तेव्हा ते गेम्सच्या प्रभावाखाली येतात. म्हणूनच, मुलांचा इंटरनेटवरचा वेळ कमी ठेवण्याचीच सवय पहिल्यापासून लावावी.
आणखी एक, घरातला कंप्युटर/लॅपटॉप घरात सगळ्यांचा वावर जिथे असतो, तिथेच हवा. उदा. हॉलमध्ये. म्हणजे घरातल्या सगळ्याचं आपल्याकडे लक्ष आहे, हे मुलांच्या डोक्यात रहातं. मुलांच्या मोबाईलला शक्यतो पासवर्ड ठेवू नये. मुलांना विश्वासात घेऊन समजावून सांगा्वं की मी तुझी प्रायव्हसी जपणार आहे. मात्र मोबाईलवरचे गेम तू मला दाखवून खेळ. मुलांशी रोजचा संवाद ठेवणं गरजेचंच आहे. आपल्या कामाचे, ऑफिसमधले इंटरेस्टींग किस्से त्यांना जेवताना सांगा. त्यांच्या कॉलेजमध्ये काय घडलं, ते सहज विचारा. मात्र मुलांनी सगळं सांगितलचं पाहिजे, असा अट्टाहास धरु नका. कारण टीन एजर्स घरात जरा गप्पगप्प झालेली असतात. त्यांना मोकळं व्हायला थोडा वेळ द्यायला हवा.
एखादा मुलगा / मुलगी आज डिप्रेशनमध्ये गेला / गेली आाणि लगेच उद्या आत्महत्या केली, असं कधीच घडत नसतं. हे पालकांनी लक्षात घ्यायला हवं. ही विचारप्रक्रिया किमान ६-७ महिने डोक्यात चालू असते. अशा वेळी पालकांचं मुलांकडे नीट लक्ष असेल, तर त्यांच्या वागणुकीमध्ये होणारे बदल पालकांना लगेचच जाणवतात. त्यांच्या वागणुकीत, सवयीत बदल झालेत का? त्यांचा रात्रीच्या जागरणांचा वेळ वाढलाय का? अचानक आपला मुलगा / मुलगी पहाटे उठून मोबाईलवर बराच वेळ खेळतायत का? अशा गोष्टी पालकांना लक्षात यायलाच हव्यात.
आत्महत्या हा वैफल्याचा, तीव्र नैराश्याचा परिणाम असतो. अशा वेळेला पालकांना जाणवलं की आपल्या बोलण्याने फार फरक पडत नाहीये, तर काउन्सेलरची जरुर मदत घ्यावी. पालक स्वतःसाठीच काउन्सेलरकडे जाउन बोलू शकतात. प्रत्येक वेळेला मुलांना न्यावं लागतंच असं नाही. मुलं यायला तयार नसतील, तर हल्ली काउन्सेलर घरीही येतात.
इंटरनेट आणि गॅझेटसच्या वापरामुळे कोणते शारिरिक आणि मानसिक आजार होतात?
- या दोन्हीच्या अतिवापरामुळे आपल्या शरिरावर आणि मनावर दुष्परिणाम होतात. याला इंटरनेट ॲडिक्शन डिसऑर्डर (IAD) म्हणतात. या परिणामांना अमेरिकन सायकॉलॉजीकल असोसिएशन आणि जागतिक आरोग्य संघटनेने आजार म्हणून मान्यता दिली आहे. पहिला परिणाम डोळ्यांवर होतो. तासनतास बसल्‍याने आजार होतात. सारखं बसून राहिल्याने शरिराला काहीच व्यायाम होत नाही. मोबाईल, कंप्युटर,टीव्ही एकटक बघताना जंक फुड पोटात जात असेल, तर मुलं ओव्हरवेट किंवा अंडरवेट होतात. संध्याकाळी मोकळ्या हवेत न खेळल्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.
मानसिक परिणाम म्हणजे एकाग्रता कमी होते, स्मरणशक्ती कमी होते. एकटेपणा आवडायला लागतो. नकार या मुलांना सहन होत नाही. नकारावर मुलं आक्रमक प्रतिक्रिया देतात. या सगळ्याचा नातेसंबधांवर, अभ्यासावर आणि मग पुढे करियरवर परिणाम होतोच. मग ही मुलं आणखी आणखी निराशेच्या गर्तेत जाऊ लागतात. गेम खेळणार्‍या मुलांवर आणखी एक परिणाम होतो. त्यांच्यातला चिडचिडेपणा वाढतो. मग त्यांना मारामारी, रक्त, मरणं हे सगळं खेळण्याइतकं साधं सोपं वाटायला लागतं. आणि त्यांच्यातली संवेदनशीलता संपून जाते. पुढे जाऊन ही मुलं गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळायची शक्यता जास्त असते.
हे सगळं होऊ नये, यासाठी पालकांनी मुलांना गेम्स खेळायचा वेळ ठरवून देणं आणि आपण त्या बाबतीत केलेल्या नियमांवर ठाम रहाणं गरजेचं आहे. ठाम राहाणं म्हणजे सतत कडक राहाणं नाही. इतर वेळेला मुलांना मिठी मारा, त्यांना जवळ घ्या. मुलांवर पालकांच्या अशा स्पर्शाचा चांगला सकारात्मक परिणाम होत असतो.
- मुक्ता पुणतांबेकर, सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आणि संचालक,
मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र
शब्दांकन: रूपाली गोवंडे

Wednesday, 25 October 2017

वेबविश्वात आपली मुलं सुरक्षित आहेत का? - भाग तीन



हल्ली पालकच मुलांना बक्षीस म्हणून सहजपणे मोबाईल हातात देतात किंवा इंटरनेटवापराला परवानगी देतात. त्यापेक्षा मुक्त खेळाला प्राधान्य द्यावं, हे पालकांना आणि मुलांना कसं समजावून सांगावं ?
- गॅझेट हे बक्षीस होऊच शकत नाही. पालकांनी मुलांसोबत घालवलेला वेळ, क्वालिटी टाईम, हे मुलांचं खरं रिवॉर्ड असायला हवं. मुलांना काही गोष्टींची आवड लावता येईल. बोर्ड गेम, पत्ते असे खेळ. एखाद्या दिवशी रात्री जेवणानंतर किंवा सुट्टीच्या दिवसांमध्ये मुलांबरोबरीने हे खेळ खेळावेत. मैदानी खेळांची सवय असणारी मुलं इंटरनेटच्या आहारी फार कमी प्रमाणात जातात, अशीही निरिक्षणं आहेत. त्यामुळे लहानपणापासूनच मुलांमध्ये मैदानी खेळांची आवड निर्माण करावी. अशी मुलं मानसिकदृष्ट्या जास्त सक्षम बनतात. मुलांना घरकोंबडं बनू द्यायचं नाही. रात्रीचं जेवण सर्वांनी एकत्र गप्पा मारत करायचं. त्यावेळी टीव्हीही नको आणि कोणाच्याच हातात मोबाईलही नको. असे छोटे छोटे नियम घरात बनवता येतील. अशा वेळेला मुलांना काय करा आणि काय करु नका, हे दोन्हीही सांगायचं नाही. तर पर्याय उपलब्ध करुन द्यायचे. मुलांना हळूहळू या पर्यायांची गोडी लागेल.
पालकांचं म्हणणं असं आहे की, टीनएजर्स मुलांना रागावताही येत नाही. आणि त्यांचा घरातल्यांशी संवाद तुटत चालला आहे, हेही जाणवतं. मग करायचं तरी काय?
- पालकांच्या बाजूने मुलांशी संवादाचे सर्वतोपरी प्रयत्न व्हायला हवेत. मुलांकडून पालकांना सूचना मिळत असतात. उदा - मुलं आयांना म्हणतात की, तू सारखी एकच गोष्ट मला सांगत असतेस. जेव्हा बघावं तेव्हा प्रत्येक गोष्टीवरुन लेक्चर देतेस. खरोखरच चाळीशी-पंचेचाळीशीतल्या आया एकच गोष्ट पुन्हापुन्हा सांगत राहतात. किंवा बोलायला लागल्या की थांबतच नाहीत. मुलांच्या प्रतिक्रिया म्हणजे पालकांसाठी वेक अप कॉल्स असतात. ते ऐकून जागं व्हायचं. जाणीवपूर्वक आपल्या वागण्यात बदल घडवून आणायचे. एक गोष्ट खरी की सगळ्या वेळेला मुलांचं मत आईवडिलांबाबत चांगलं असू शकत नाही. पण आईवडिलांनी घरातल्या नियमांबाबत ठाम रहायला हवं. एक गोष्ट आईवडील नक्की करु शकतात. मुलांना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हटकणं सोडून द्यायचं. प्रत्येक दोन पिढ्यांमध्ये जनरेशन गॅप असतेच.
मुलांचे कपडे, हेअरस्टाइल तुम्हाला पसंत नाही, असं होऊ शकतं. याबाबत तुमचं वेगळं मत असू शकतं. पण ह्या क्षुल्लक गोष्टींच्या मागे लागून पालक खूप त्रागा करतात. मुलांच्या मागे लागतात. यामुळे नातं खराब होतं आणि मोठ्या गो्ष्टींबाबत मुलांशी संवाद साधता येत नाही. नात्यामध्ये कोणताही संवादच उरत नाही. चर्चाही होत नाहीत.
हे करु नका.. ते करु नका असं मुलांना प्रत्यक्ष सांगण्यापेक्षा त्यांना विविध पर्याय द्यावेत. उदाहरणार्थ आज आपण टेकडीवर फिरायला जाउया का.. तुझ्या आवडीचा खेळ आपण दोघांनी खेळूया.. एखादा चांगला सिनेमा बघूया वगैरे. तुम्हीच इंटरनेटच्या चांगल्या वापरात मुलांना सहभागी करून घ्या. त्यांच्या जिव्हाळ्याची माहिती शोधणं, नेटवरचे लेख वाचणं असं काही. मुलांशी संवाद साधायला, तो वाढवायला सुरवात करा. यासाठी दिवसातला अर्धा तास किंवा एक तासही पुरेसा आहेे.
हल्लीच्या टीनएजर्सना आजुबाजुच्या लोकांशी बोलण्यात जराही स्वारस्य नसतं. अशा मुलांना इंटरनेटच्या व्हर्चुअल जगातून बाहेर कसं काढायचं? कारण ही मुलं नातेवाईकांकडे यायला तयार होत नाहीत आणि आली तरी मोबाईलमध्ये तोंड खुपसुन बसतात.
- हो. माझी मुलं जेव्हा टीनएज मध्ये होती तेव्हा मी गंमतीने म्हणायचे की या मुलांचं पालक होण्यापेक्षा काउन्सेलर होणं सोपं आहे. मुलं आणि नातेवाईक किंवा पालकांचं मित्रवर्तुळ यात असं शोधून काढायचं की आपले कोणते नातेवाईक त्यांना आवडतात. कोण कम्फर्टेबल वाटतात. त्यांच्याबरोबर मुलांना राहू द्यायचं. किंवा नातेवाईक आल्यावर त्यांच्याशी अर्धा तास बोल आणि नंतर तू तुझ्या कामाला जा असं मुलांना सांगता येतं. मीही हे सर्व केलं आहे. थोडं मुलांचं ऐकायचं आणि थोडं तुमचं त्यांना ऐकायला लावायचं.
इंटरनेटमुळे असं होत चाललंय की लोकांना समोरासमोर येऊन बोलायची सवय राहिली नाहीये. माझ्याकडे काउन्सेलिंगला येणारी मुलं नजरेला नजर देऊन बोलू शकत नाहीत. त्यांची कोणाशी प्रत्यक्ष बोलायची सवयच गेलेली असते. टीन एजमध्ये जातात तेव्हा मुलांमध्ये अनेक बदल होतात. न्यूनगंडाची भावना निर्माण होते. आत्मविश्वास जातो. मग बोलायची, लोकांना थेट भेटायची सवय कमी होते. याच वेळी इंटरनेट हातात आलं की संपलंच. त्यामुळे प्रत्यक्ष समोर न येता संवाद साधंण सोप जातं आणि मग त्यांना तेच बरं वाटू लागतं. आणि यात बदल करावा असं वाटत नाही.
अल्बर्ट आईनस्टाइन यांनी म्हटलंय, भविष्यात तंत्रज्ञान नात्यांहून महत्वाचं होईल तेव्हा इडियटसची जनरेशन तयार होईल. आणि ते आता खरं झालयं, असं दिसतंय. लोकांना खरीखुरी माणसं, नाती याहून व्हर्च्युअल जग जास्त खरं आणि जवळचं वाटतंय. आपण मोबाइलला स्क्रॅच येऊ नये म्हणून त्याला स्क्रीन गार्ड लावतो, त्याची काळजी घेतो. त्यापेक्षा आपल्या जवळचं माणूस दुखवू नये, नात्याला तडा जाऊ नये, नातेसंबंध सुरळीत, सुरक्षित राहावेत, याची काळजी घेणं जास्त महत्वाचं आहे. हे मुलांना पट्वून देणं आपली पालक म्हणून जबाबदारी आहे. मोबाईल ही निर्जीव गोष्ट आहे, हे त्यांच्या लक्षात आणून द्यावं लागेल.
- मुक्ता पुणतांबेकर, सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आणि संचालक, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र 

शब्दांकन: रूपाली गोवंडे

Monday, 23 October 2017

वेबविश्वात आपली मुलं सुरक्षित आहेत का?भाग दोन



इंटरनेट गरज न रहाता व्यसन बनतं. तसं होऊ नये यासाठी पालकांनी कोणती खबरदारी घ्यावी?
- यासाठी अगदी छोट्या बाळांपासून विचार करावा लागेल. हल्ली आईवडील खूप बिझी असतातच, मग बाळ जेवत नाहीये म्हणून त्याला फोनवर गाणी, गेम, टीव्हीवर कार्टुन लावून देतात. मग ती बाळं एका जागी बसतात, त्यांना भरवणं सोपं जातं. मात्र मुलं गुंग होऊन, हिप्नोटाईज झाल्यासारखी जेवतात. व्यसनप्रवृत्तीची सुरवात अशीच होते. पूर्वी बाळांना गोष्टी सांगत भरवलं जायचं.
आजच्या पालकांनी हे लक्षात घ्यायची गरज आहे की, आपला मुलांसोबत घालवायचा वेळ, संवाद याला टिव्ही/ कंप्युटर/ मोबाईल हे पर्याय कधीच होऊ शकत नाहीत.
माझं सांगणं कदाचित अतिरेकी वाटेल.. पण मी असं सांगेन की मुलं ७-८ वर्षांची होईपर्यंत त्यांना मोबाईलची ओळख करुन देउच नका. कारण त्याच्या मेंदुवर, मानसिक वाढीवर त्याचे परिणाम होत असतात. कार्टुन्स एक वेळ ठीक आहेत. पण तेही बघण्यावर वेळेची मर्यादा घालून द्यायचीच. सुरवातीपासूनच असं केलं की मुलं ऎकतात. फक्त या बाबतीत पालकांनी ठाम असायलाच हवं. काही वेळ दुपारी आणि काही संध्याका्ळी..हे खूप झालं.
माझ्या मुलांच्या बाबतीत मी हेच केलं होतं. पालकांनी स्वत:साठीहीे मर्यादा घालून घ्यायला हव्यात. ही किंमत पालकांना द्यावीच लागते. अशी मर्यादा लहान वयातच घातली की पुढे जाऊन अनेक संभाव्य धोके टाळता येतील.
सायबर सिक्युरिटी हा एक मह्त्वाचा मुद्दा आहे. इंटरनेटवर अनोळखी लोक मुलांना काहीही खाजगी माहिती विचारु शकतात. मुलांना त्याचं गांभीर्य कळत नसतं. दहा वर्षाच्या आतली मुलं आपलं म्हणणं ऎकायच्या मनस्थितीत असतात. मात्र, टीन एजमधली मुलं पालकांना सहसा जुमानत नाहीत. म्हणूनच लवकरच्या वयात मुलांना शिकवा, समजवा. ज्यांची मुलं लहान आहेत, त्यांनी आताच शहाणं व्हावं.
या नवपालकांना मी सांगू इच्छिते. या गॅजेट्सपासून दूर ठेवण्यासाठी किंवा दोन वेळा कार्टून्स बघण्यावरच त्यांनी थांबावं यासाठी आपण जे करायचं त्यातलं मुख्य म्हणजे मुलांना पुस्तकवाचनाची गोडी लावणं. मुलांसोबत काम करणार्‍या ज्येष्ठ कार्यकर्त्या रेणुताई गावस्कर यांनी मला सांगितलं होतं, तू तुझ्या मुलाला रोज गोष्टी वाचून दाखव. ही आईने मुलाला दिलेली सगळ्यात चांगली गिफ्ट असेल. आणि खरंच, मला आणि माझ्या मुलांना खूप मजा यायची हे करताना, माझ्या आईबाबांनी पण हे केलं. यातून आपण मुलांशी जोडलेले राहातो.
माझा मुलगा १६ वर्षाचा होईपर्यंत आमचं पुस्तकवाचनाचं रुटीन असायचं. फास्टर फेणे पासुन पुलंपर्यंत खूप पुस्तकं आम्ही एकत्र वाचली. आपल्या संस्कृतीचा भाग असणारी पुस्तकं, हे लेखक. यासाठी फार वेळ द्यायचीही गरज नाही. मुलं झोपायच्या आधी १५ मि तुम्ही हे करु शकता. हे झालं लहान मुलांच्या बाबतीत. टीन एजर्सबद्द्ल आपण नंतर बोलू.
आईवडील आणि अन्य मोठी माणसं सतत मोबाईल वापरत असतात. इथूनच सुरवात होते का?
- हो. इथूनच सुरवात होते. मानसोपचारतज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांचा 'नवा उपवास' नावाचा एक लेख आहे. पालकांनी हा लेख वाचायला हवा. त्यात त्यांनी सुचवलंय, कुटुबांचा एखादा उपासाचा दिवस ठरवता येईल, की त्या दिवशी घरातल्या कोणीही गॅजेट वापरायचं नाही. कुटुंबाने मिळून हा आगळावेगळा उपास करायचा. संध्याकाळी घरी आल्यावरही कोणीही गॅजेट वापरायचं नाही. आणखीही एक प्रयोग करता येईल. पालकांनी आपले मोबाईल घरी ठेऊन घराबाहेर जाता येतं का ते बघावं. किंवा रोज मी अमूक इतका वेळ फोन बघणार नाही, असा नियम करावा. हे अर्थातच मुलांना कल्पना देऊन, त्यांना बरोबर घेउनच करावं. आणखीही एक नक्की करावं. मुलांबरोबर व्यायामाचा, वॉकचा वेळही ठरवून व्यतीत करावा.
गांधीजींचं खूप छान वाक्य आहे. जगात जो बदल घडवायचाय, तो आधी स्वतः व्हा. तेव्हा मुलांमध्ये बदल घडवायचाय, तर तो स्वत:मध्ये आधी घडवा. मुलं तुमच्या वागण्याकडे बघून शिकत असतात.
- मुक्ता पुणतांबेकर, सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आणि संचालक, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र 
शब्दांकन: रूपाली गोवंडे

Sunday, 22 October 2017

वेबविश्वात आपली मुलं सुरक्षित आहेत का?



भाग एक
वेबविश्वात आपली मुलं सुरक्षित आहेत का आणि एकूणच इंटरनेट व्यसन आणि नवनवीन गॅझेट्च्या अतिवापराबद्द्ल पालकांना त्यांचे प्रश्न मांडायला ‘नवी उमेद’ने सांगितलं, तेव्हा पालकांचे तर प्रश्न आलेच.. पण एका टीन एजर मुलीचाही एक प्रश्न आला. तो असा होता: इंटरनेटची गरज आहे आमच्या पिढीला. तुम्ही त्याला व्यसन का म्हणताय?
या प्रश्नामध्येच या पिढीची मानसिकता, इंटरनेटच्या वापराकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन समोर आला. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालक आणि सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ मुक्ता पुणतांबेकर यांनी याच प्रश्नाच्या उत्तरापासून बोलायला सुरवात केली.
त्या म्हणाल्या, प्रत्येक गोष्टीचा एक वापर असतो. पण वापर, अतिवापर आणि गैरवापर यातला फरक ओळखता यायला हवा. दारूचं उदाहरणच घेऊन समजून घ्यायचं झालं तर - दारु औषधांमध्येही वापरली जाते. ती जेव्हा व्यसनासाठी वापरली जाते तेव्हा तो तिचा गैरवापर ठरतो. एखाद्या चांगल्या गोष्टीचा अतिवापर होतो, तेव्हा त्याचं रूपांतर व्यसनात होऊ शकतं. एखादी व्यक्ती दिवसभर सतत व्यायामच करत बसली तर तिला व्यायामाचं व्यसन लागलं आहे, असंच म्हणावं लागतं.
इंटरनेट ही काळाची गरज आहे. माहिती तंत्रज्ञानाने जी क्रांती घडवून आणली ती खूप मह्त्वाची आहे. ती नाकारता येणारच नाही. इंटरनेटचा हा जादूचा दिवा आपण सगळेच जण कामासाठी, करमणुकीसाठी वापरतो. ते ठीक असतं. पण हळुहळु आपण त्याच्यावरती अवलंबून रहायला लागतो. त्याहीपेक्षा, त्याचे गुलाम बनून जातो. मग गैरवापर/अतिवापर सुरु होतो. आपलं असं झालंय का?
सुरवातीला आपण हे स्वतःच तपासून बघू शकतो. जसं, आपण १५ मि फोन जवळ नाहीये तर अस्वस्थ होतोय का? आपण सोशल साईट वर एखादी पोस्ट टाकली आहे. तर त्यावर किती लाईक्स आलेत, कमेंटस आल्यात हे दर दोन मिनिटांनी बघावसं वाटतयं का? त्यावर आपला मूड अवलंबून आहे का? या प्रयोगाचं उत्तर हो आलं तर समजावं की काहीतरी गंभीर गोष्ट आहे. इंटरनेट शाप की वरदान हे आपआपल्या बाबतीत असं तपासून बघायलाच हवं.
नव्या पिढीचं इंटरनेट ॲडिक्शन, मुलांचं इंटरनेटवेड हा काळजीचाच विषय आहे. मग पालक म्हणतात की मुलांना इंटरनेटच्या वापराचा वेळ कसा ठरवून द्यायचा? अर्थातच हे प्रत्येकाच्या कामाच्या स्वरुपावर अवलंबून असतं. पण साधारणापणे १८ वयापर्यंतच्या मुलांसाठी दिवसातला अर्धा पाऊण तास इंटरनेट वापरणं ठीक आहे. कॉलेजमध्ये जाणार्‍या मुलांना प्रोजेक्ट्स करायची असतात, माहिती गोळा करायची असते. त्यामुळे थोडा जास्त वेळ त्यांना इंटरनेटची गरज लागू शकते. यावर संवाद हाच उपाय आहे. सुरवातीपासूनच पालकांनीच मुलांशी संवाद साधून इंटरनेटच्या वापरावर मर्यादा घालून देणं आणि स्वत:च्या वर्तनातून त्यांना त्या मर्यादांचं मह्त्व समजावून सांगणं गरजेचं ठरतं.
जेव्हा पालकांचे आम्हाला इंटरनेट ॲडिक्शनच्या समस्यांबाबत फोन येतात. तेव्हा बरेचदा आम्ही फक्त त्यांनाच भेटायला बोलवतो. त्यांचा दृष्टिकोन बघतो. त्यांच्याशी बोलतो. त्या नंतर जेव्हा त्यांच्या वागण्यात ते आमच्या टिप्सअनुसार काही बदल करतात. पालकांनी थोडा सूर बदलला तरी फरक पडतो. अर्थात त्यासाठी पालकांनीही थोडा संयम बाळगला पाहिजे. मग मुलांना आमच्याकडे घेउन यायची गरजच पडत नाही.

- मुक्ता पुणतांबेकर, सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आणि संचालक, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र :
 रूपाली गोवंडे

Sunday, 15 October 2017

ॲनीने घालून देलेला धडा

ट्रस्ट (Trust) हा २०१०चा हॉलिवूडपट. तेव्हा इंटरनेटवर चॅट साईट्स असायच्या. ओळखीचे-अनोळखी लोक एकमेकांशी त्या साईटवर चॅट करायचे. चित्रपटात अॅनी कॅमेरॉन ही चौदा वर्षाची मुलगी टीन चॅट नावाच्या साईटवर चार्ली नावाच्या अनोळखी मुलाशी बोलायला सुरवात करते. साईटच्या नावावरून उघड आहे, ती शाळकरी मुला-मुलींसाठी आहे. अॅनीबरोबर चॅट करणारा चार्ली आधी स्वत:चं वय सोळा सांगतो, नंतर ओळख वाढल्यावर वीस सांगतो, मग पंचवीस. हळूहळू ते फोनवरही बोलायला लागतात. अॅनी बराच वेळ त्याच्याबरोबर फोनवरही बोलताना दिसते. नंतर भेटायला येतो तेव्हा चाळीशीतील निघतो. अॅनी अर्थातच दचकते, त्याला जाब विचारते. पण तो पट्टीचा भामटा आहे. तो तिची समजूत काढून तिला हॉटेलमध्ये घेऊन जातो. जबरदस्तीने तिचं लैंगिक शोषण करून निघून जातो. ते त्याने रेकॉर्डही केलं आहे. अॅनीची मैत्रीण ब्रिटनी. झाला प्रकार तिच्या लक्षात येतो. ती शाळाप्रशासनाला ते सांगते. शाळा पोलिसांना कळवते. पोलिस तपास करण्यासाठी ॲनीला पोलिस स्टेशनवर घेऊन जातात, तेही सगळ्या विद्यार्थ्यांसमोर. तिच्या आई-वडिलांना कळवण्यात येतं. ध्यानीमनी नसताना हे घडलेलं. ते हबकलेले. त्यातच हे प्रकरण एफबीआयकडे जाते.
एका चौदा वर्षाच्या मुलीला फसवणं किती सोपं आहे. तू ब्युटीफुल आहेस, आय लव्ह यू म्हटलं की झालं. एकाच वयाची मुलं-मुली असतात तेव्हा ते समजण्यासारखं. संमतीने झालेली शारिरीक जवळीकही समजण्यासारखी. इथं तसं नाही. त्या विकृत माणसाने नियोजनपूर्वक त्या निरागस मुलीला घोळात घेतलंय. इंटरनेटवर चॅट करताना बोलण्यातली लैंगिकता, कामुकता वाढवत नेत तिला वासनेकडे ओढण्याची, तेही तिला जाणवू न देता व्यवस्थित आखलेली पध्दत. हे बघून आपल्याला प्रचंड संताप येतो. त्याला चांगला चोपावंसं वाटतं. पण गुन्हेगाराला शोधणं या पठडीबद्ध दिशेने चित्रपट जातच नाही. ॲनी, तिच्या आई-वडिलांवर झालेला परिणाम याचा वेध घेणं. वडील तर गुन्हेगाराला शोधून शिक्षा द्यायची या विचाराने पछाडलेले. ॲनीची आई त्यांना ताळ्यावर आणते. सांगते, मुलीला सावरणं महत्वाचं. तिच्याजवळ बसा, धीर द्या. आपण फसवलं गेलोय, हे मानायलाच ॲनी आधी तयार नाहीये. माझ्याबरोबरच्या मुलींचेही शाळेतल्या मुलांबरोबर शरीरसंबंध आलेले आहेत, मग तुम्ही माझ्याच बाबतीत गवगवा का करताय? ती वडिलांचा रागराग करतेय.
अमेरिकेतले स्थानिक पोलिसही हे प्रकरण फारशा संवेदनशीलतेने हाताळत नाहीत. वरच्या पातळीवर ते नीट हाताळलं जातं. मुलीच्या समुपदेशनासाठी पालक स्त्री समुपदेशकाचीही मदत घेतात. मुलीचं प्रकरण एकदा शाळेत माहीत झाल्यावर काही मु्लांकडून घाणेरडी शेरेबाजी करणार, ते नेटवर टाकणं, हे सगळं तिथेही झालंय. त्याचाही ॲनीला त्रास होतो. आत्महत्येच्या प्रयत्नातू्न ती आईच्या सतर्कतेमुळे वाचते. ॲनी आणि तिचे आई-वडील यांना झालेला त्रास हा चित्रपटाचा फोकस आहे. मुलगी आणि वडील यांच्यात निर्माण झालेलं अंतर कमी होतं, ते छान दाखवलं आहे. मुलीला कळतं की त्या माणसाने आणखी काही मुलींनाही याच पध्दतीने फसवलं आहे, तेव्हा ती भानावर येते. तो फार नाजूक क्षण.
मुलीला फसवणारा तो विकृत माणूस कोणी अट्टल गुन्हेगार असण्याची गरज नाही, आजूबाजूला वावरणारा, सभ्य वाटणारा, अगदी कुटुंबवत्सल माणूसही असू शकतो. चित्रपटात शेवटी तो विकृत माणूस निघतो, एका दूरच्या शहरातील एका शाळेचा एक शिक्षक. तो विवाहित, तरुण मुलांचा तो बापही आहे. दिसायलाही खरोखर कुटुंबवत्सल, सभ्य.
चित्रपटाच्या शेवटी श्रेयनामावली दाखवताना त्याला समोर आणलं आहे. यातून दिग्दर्शकाचा हेतू कळतो. त्याला थ्रिलर बनवून गल्ला जमवायचा नाही तर जागृती करायची आहे. असे विकृत लोक असणारच, पण ॲनीची झाली तशी फसवणूक होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी, प्रकार उघडकीला आल्यावर, पालक, शाळा, पोलिस यांनी ते कसे हाताळावेत, संवेदनशीलता दाखवावी, ते परिणामकारकपणे दाखवलं आहे.
आता चॅट साईट फारशा नाहीत, पण सोशल मिडियाचा वापर खूपच वाढला आहे. त्याचा वापर करून बदमाश लोक ॲनीची झाली, तशी फसवणूक करू शकतात. तेव्हा काळजी घ्यायलाच हवी, हाच ॲनीने घालून देलेला धडा.
- उदय कुलकर्णी