Saturday, 24 December 2016

यांच्याकडून आपण सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे!

अन्यायाचा प्रतिकार करणाऱ्या ह्या चंद्रपूर आणि लातूर जिल्यातील मुलींचं उदाहरण.
यांच्याकडून आपण सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे! 
पश्चिम महाराष्ट्रातलं ३ ते ४ हजार लोकसंख्येचं एक गाव... ‘मसुचीवाडी’! गावात शिक्षणाच्या सोयी नसल्यामुळे गावातली मुलं शेजारच्या गावात शाळा –कॉलेजमध्ये जातात. पण आता गावातल्या मुलींना गावाबाहेर न पाठवायचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला – आणि त्याचं कारण आहे शाळेच्या वाटेवर होणारा लैंगिक हिंसाचार! गेल्या आठवडाभरात विविध वृत्तवाहिन्यांवर ही बातमी दाखवली जात होती. गेल्या दोन वर्षांपासून मसुचीवाडीला हा त्रास होत होता. गावातल्या लोकांनी आपल्या पातळीवर याला विरोध करायचे केलेले प्रयत्न अपुरे पडले. पोलीसही दखल घेत नव्हते आणि नेते मंडळींना देखील हा प्रश्न फारसा महत्त्वाचा वाटत नव्हता. अखेर मागच्या आठवड्यात जेव्हा ग्रामपंचायतीमध्ये मुलींचे शिक्षण बंद करायचा आणि निवडणुकांवर बहिष्कार घालायचे ठराव करण्यात आले! तेव्हा कुठे महिला आयोग, पालकमंत्री, आमदार ,पोलीस अशा सर्वांना जाग आली – आणि मुलींना त्रास देणाऱ्या चार जणांपैकी तिघांना अटक करण्यात आली.
रस्त्यावर होणाऱ्या छेडछाडीमुळे मुलींचे शिक्षण थांबवले जाण्याचे हे काही पहिलेच उदाहरण नाही - मागच्या वर्षी उत्तरप्रदेशातल्या बरेली जवळच्या एका गावात देखील २०० मुलींनी एकाचवेळी शाळा सोडलेली होती. त्याआधी हरयाणात महेन्द्रगढमधील एका गावातल्या ४०० मुलींनी याच कारणाने शाळा सोडली होती. ग्रामीण भागातच नव्हे तर अगदी मुंबईसारख्या शहरातदेखील शाळाकॉलेजकडे जाणारे रस्ते असुरक्षित असल्यामुळे अनेक वस्त्यांमध्ये मुलींना सातवी नंतर घरीच बसावे लागते. वर्षानुवर्षे घरोघरी अनेक मुली रस्त्यावर आपल्याला होणारे त्रास पालकांपासून लपवूनच ठेवत आलेल्या आहेत. कारण एखाद्या मुलीवर लैंगिक हिंसा होणे – हा त्या कुटुंबाचा अपमान समजायची पद्धत आहे म्हणून मुलीला अशा छेडछाडीला सामोरे जावे लागल्याचे जेव्हा पालकांना समजते, तेव्हा पुढचा अतिप्रसंग टाळण्यासाठी ते मुलींचे शिक्षणच बंद करतात ! अर्थातच एकदा मुलींचे शिक्षण थांबले की तरण्याताठ्या पोरीला घरात ठेवण्याचा धोका नको म्हणून तिचे लग्न लावले जाते आणि तिच्यावरच्या अन्यायाची मालिका पुढे सुरूच राहते!
अन्यायाला प्रतिकार करण्या ऐवजी घाबरून स्वत:चेच नुकसान करून घेण्याचाच असा पायंडा पडलेला असताना जेव्हा चंद्रपूर, लातूर सारख्या मागास समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यातल्या मुली संघटितपणे गुंडाचा बिमोड करतात – तेव्हा त्यांचा आदर्श सर्वांसमोर मांडणे गरजेचे वाटते.
पहिले उदाहरण आहे - चन्द्रपूर जिल्ह्यातल्या सिदूर तालुक्यातल्या दीपशिखा गटाचे. या गटाचे नेतृत्व करणारी चुणचुणीत मुलगी - वैभवी उल्माले. वैभवी जेव्हा शाळेला एकटी जायची तेव्हा वाटेवरती एक माणूस नेहमी लैंगिक हावभाव करून दाखवत असे – सुरुवातीला ती घाबरून मान खाली घालून गपचूप निघून जात असे. पण एके दिवशी शेतातून जात असताना तो माणूस तिच्या जवळ येऊ लागला , तेव्हा तिने एका शेतकरी आजोबांकडे मदतीसाठी धाव घेतली. तेव्हा तो माणूस पळून गेला आणि आजोबांनी पुन्हा कधीच एकटीने शाळेत न जायचा सल्ला दिला. वैभवी तेव्हापासून मैत्रिणींच्या सोबतच शाळेला जायला लागली. मैत्रिणींशी गप्पा मारताना लक्षात आलं की त्या माणसाने त्यांच्यापैकी सर्वांनाच कधीनाकधी त्रास दिलेला होता. मग युनिसेफ तर्फे चालवल्या जाणाऱ्या दीपशिखा वर्गात शिकवणाऱ्या ताईना त्यांनी हा अनुभव सांगितला. ताईशी बोलून त्यांना लैंगिक हिंसेला प्रतिकार करायचं बळ मिळालं आणि एक दिवस त्यांनी मुलींना जातायेता त्रास देणाऱ्या माणसाला घेरलं. त्याला पकडून ग्रामपंचायती समोर उभं केलं आणि ग्रामपंचायतीने त्याला इतका सज्जड दम भरला की तो माणूस गाव सोडून पसार झाला.
दुसरे असेच उदाहरण आहे – लातूर मधल्या बोरीवती गावातले. लातूरच्या बोरिवती गावात रहाणाऱ्या पमाताईंचे घर म्हणजे गावातल्या सगळ्याच मुलींच्या आणि बायांच्या विश्वासाची जागा! पमाताई दीपशिखा प्रेरिका म्हणून काम करतात. पण त्यांचे काम वर्ग घेण्यापुरतंच मर्यादित ठेवलेलेलं नाही. वर्गात शिकवली जाणारी मुलीच्या आत्मसन्मानाची मूल्ये प्रत्यक्षात कशी उतरवता येतील त्यासाठी देखील त्या जागरूक असतात. आपण एखादी अडचण पमाताईंना सांगितली तर गावातल्या इतर बायांच्या मदतीने त्या नक्की दूर करतील असा विश्वास दीपशिखा वर्गातल्या मुलींच्या मनात तयार झालेला होता. याच विश्वासापोटी बोलायला अतिशय अवघड अशी समस्या घेऊन काही मुली पमाताईंकडे आल्या. शाळेतून येताजाताना या मुलींना एक माणूस विचित्र खाणाखुणा करायचा. . .अचकट विचकट बोलायचा. . . नको तिथे हात लावायचा. सुरुवातीला प्रत्येक मुलगी आपल्यालाच असा घाणेरडा त्रास होतो आहे असे मानून गप्प बसत असे. पण एकमेकींशी बोलल्यावर त्यांच्या असे लक्षात आले की आपल्या सगळ्याचजणींना हा त्रास होतो आहे. दीपशिखा वर्गात एक दिवस हा विषय निघाला आणि पमाताईंनी या त्रासाचा बंदोबस्त करायचे ठरवले. एक दिवस सगळ्या पोरींनी त्या फाजिल माणसाला बसमधेच घेरले आणि अक्षरश: हाताला धरून ओढत ओढत गावातल्या चौकात आणले. सर्वांसमोर त्याला असा काही दम दिला की पुन्हा तो माणूस गावात फिरकला देखिल नाही. आता बोरिवती गावातल्या मुलींना बिनघोरपणे शाळेत जायला मिळते आहे!
या दोन्ही उदाहरणांमध्ये म्हणजे मुलींना एकमेकींशी बोलण्यासाठी दीपशिखा वर्गांच्या निमित्ताने एक स्वतंत्र अवकाश मिळाला होता. तसेच त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपाय शोधायला मदत करणारी, धीर देणारी व्यक्ती त्यांच्यासोबत होती. म्हणून त्या मुलींना शिक्षणाचा हक्क सोडून द्यावा लागला नाही! मुलींसाठी आपापल्या वस्तीमध्ये, गावामध्ये अशा जागा आपण निर्माण करायला हव्यात – तरच त्यांना आत्मनिर्भर होण्याची दिशा दिसेल
वंदना खरे.

इंजीनियरिंग मार्फत रोजचे प्रश्न कसे सोडवावे



इंजीनियरिंग मार्फत रोजचे प्रश्न कसे सोडवावे असे लोभी गावातल्या मुलांना शिकविणाऱ्या २३ वर्षीय कृष्ण ची कथा - सांगत आहेत
मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव आणि योग्य मार्गदर्शन मिळालं तर किती गोष्टी घडू शकतात ते कृष्णा थिरुवेंगदम च्या गोष्टीतून लक्षात येईल.
23 वर्षांचा कृष्णा SBI youth for india fellow च्या माध्यमातुन महाराषट्रातल्या एका खेड्यात फेलो म्हणून हजर झाला. भंडारा जिल्ह्यातलं तुमसर तालुक्यातलं लोभी हे ते गाव. जेमतेम 3000 लोकवस्तीचं. तंत्रज्ञान वापरून गावासाठी काही नवं करता येईल का, त्यांच्या गरजांवर काही उपाय सापडतील का हे या फेलोशिपच उद्दीष्ट होतं. पण गावात गेल्यावर कृष्णाला जाणवलं कि इथं कुठलीही गोष्ट बाहेरच्या माणसांनं येऊन सांगितली तर ती टिकेल, लोक ऐकतील असं नाही. तर त्यापेक्षा गावातील लोकांनी त्यांच्याच कल्पनेतून काही उपाय शोधले तरच ते कायमस्वरूपी टिकतील आणि वापरले जातील.
कृष्णानं मग सुरुवात केली ती मुलं आणि तरुणांपासून. योग्य आणि गरजेचं तंत्रज्ञान त्यांना शिकवलं . त्यांच्या रोजच्या गरजा आणि अडचणींवर उपाय शोधण्याचं काम तो त्यांच्या सोबातच करू लागला.
लोभी जिल्हा परिषद शाळेच्या 6 वी ते 8 वी च्या मुलांसोबत त्याचं काम सुरु झालं. काही काळात त्याच्या या कामाची माहिती आजूबाजूला पोहोचली आणि आज तो 6 वी ते 12 वी च्या 80 मुलांसोबत काम करतो आहे.
पहिल्या टप्प्यात त्यानं विज्ञानातील काही सोपे प्रयोग मुलांना करून दाखवले. ते बघून मुलांची उत्सुकता चाळवली गेली. मग दुसऱ्या टप्प्यात त्यानं कार, हायड्रॉलीक लिफ़्ट आणि जॅक, मिक्सर आणि छोटी मशिन्स बनवून दाखवली. हे दाखवत असतानाच तांत्रिक जोडण्या त्यातील विज्ञान अशी सगळी माहिती या मॉडेल्स मधूनच दिली. काही काळातच मुलांनी स्वतःच मॉडेल्स बनवायला सुरुवात केली. तिसऱ्या टप्प्यात कृष्णानं त्यांना त्यांच्या कल्पना लिहून काढायला सांगितल्या. रोजच्या येणाऱ्या अडचणीतून मुक्त होण्यासाठी कोणती मॉडेल्स बनवाल हेही विचारलं. यावेळी मुलांनी खरोखरच विसमयकारक कल्पना मांडलेल्या होत्या.
यावेळी मग कृष्णाने मुलांना स्थानिक वस्तूच मॉडेल्स करण्यासाठी पुरवल्या. महत्त्वाचं म्हणजे आता त्यानं मुलांना प्रयोग करण्यासाठी पूर्ण वाव, अवकाश दिलं. तो स्वतः त्यातून बाहेर पडला. मग मुलांनी स्वतंत्रपणे हे प्रयोग केले. यातून त्यांनी गूळ तयार करण्याचं मशीन, हातानं वापरता येईल असं भात काढणी मशीन तयार केलं. विशेष म्हणजे हातानं चालवता येईल असं washing मशिनही मुलांनी बनवलं. वीज कपातीच्या गावातील नेहमीच्या संकटासाठी हे उपयुक्तच. यासाठी त्यांनी सहज उपलब्ध होणारं करवत, खिळे, हातोडी, प्लायवूड आणि बांबू हे साहित्य वापरलं. एका बॉक्सला दोन्हीकडून मध्ये बांबू लावला. एका बाजूने सायकलचा गियर बांबू फिरवण्यासाठी बसवला गेला. हे हातानं चालवायचं मशीन तयार झालं. पण आता हेच मशीन सायकलवर बसवून पायानं पॅडल मारत वापरता येईल का याची चाचपणी मुलं आणि कृष्णा करत आहेत. म्हणजे नदीवर कपडे घेऊन जायचं. पेटीत कपडे, पाणी आणि साबण पावडर टाकायची आणि सायकल चालवत घरी यायचं. पोहोचेपर्यंत कपडे धुऊन झालेले असतील आणि वेळ वाचेल.
अशी किंवा अशीच इतर मशिन्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य यांविषयी एक हॅन्डबुक काढायचं आता कृष्णाच्या मनात आलं आहे. अर्थात यांविषयी इंटरनेटवर बरीच माहिती उपलब्ध असली तरी ती तांत्रिक भाषेत. पण मुलांना ते त्यांच्या स्थानिक भाषेत मिळालं तर ते काम अधिक सोपं होईल असं त्याला वाटतं. तसंच तो गावात एक इनोव्हेटिव्ह स्टुडीओ उभा करायच्या तयारीत आहे. रीतून मुलांना प्रयोग करण्यासाठी हक्काची जागा मिळेल आणि त्याचं कामही लोकांना दाखवत येईल.
कृष्णा आधी फक्त 2 तास मुलांसोबत काम करायचा. मुलं लगेचच कंटाळून खेळायला पळायची पण आता शिक्षकांनाही या कामाचं महत्त्व पटलं आहे. त्यामुळेच मुलांनी जास्त वेळ या प्रयोगांसाठी द्यावा असा तेही प्रयत्न करतात.
BAIF संस्थेच्या सहकार्याने कृष्णा हे काम करतो आहे. मूळचा चेन्नईचा असलेला कृष्णा शिकाऊ ( intern) म्हणून National Innovation Foundation येथे काम करतो आहे. महत्त्वाचं म्हणजे त्याला तमिळ आणि इंग्रजी शिवाय दुसरी भाषा येत नाही. पण मुलांची भाषा मात्र मराठी आणि हिंदी आहे. अस असलं तरी आजवर कामाच्या आड भाषेचा अडसर आलेले नाही. किंबहुना मुलांशी संवाद साधण्याची कलाच त्याला साधली आहे अस म्हणायला हवं.
कृष्णा म्हणतो कि, दैनंदिन अडचणींवर मात करण्यासाठी मुलांनी उपाय शोधवेत, त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळवा म्हणून मी त्यांना प्रोत्साहन देतो आहे. पण योग्य मार्ग, दिशा त्यांना मिळत नाही. ती दरी मी सांधायचा प्रयत्न करतो आहे.
इनोव्हेशन म्हणजे प्रत्येक वेळी काहीतरी मोठं, अवघड मशीन तयार करणं नव्हे तर कोणतीही छोटी गोष्ट सुद्धा मोठा प्रभाव टाकेल, जसं या गावात झालं आहे.
 वर्षा जोशी-आठवले

प्लास्टिक कचऱ्यापासून सुटका? हो, शक्य आहे !



राज्यातील पहिल्या क्रमांकाचे प्रदूषित शहर अशी चंद्रपूरची ओळख़. कारण सीएसटीपीएस हा पॉवर प्लांट, शहराच्या चारही बाजूला असलेल्या कोळसा खाणी आणि औद्योगिकीकरण. चंद्रपूर शहर अनेक वर्षांपासून विषारी प्रदूषणाचा सामना करीत आहे़. आता यात भर पडली आहे ती प्लास्टिक कचऱ्याची. चंद्रपुरात रोज ५ ते ६ टन प्लास्टिक कचरा गोळा केला जातो. शिवाय मनपाच्या डम्पिंग यार्डवर २० वर्षांपासूनचा हजारो टन प्लास्टिक कचरा पडलेला आहे. यावर तोडगा काढण्याचा महानगरपालिका सातत्याने प्रयत्न करत आहे. आज एका डॉक्टरने यावर उपाय शोधला आहे. 
बालमुकुंद पालिवाल हे त्याचं नाव. पेशाने भूलतज्ञ. वैद्यकीय पेशातील असल्याने प्लास्टिक कचऱ्याच्या दुष्परिणामांची जाणीव त्यांना होतीच. त्यांनी मनपासमोर प्लास्टिक पुन:प्रक्रिया केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला. मनपाने प्रस्ताव स्वीकारताच डम्पिंग यार्डवर प्लास्टिक पुन:प्रक्रिया केंद्र (प्लास्टिक प्रोसेसिंग युनिट) सुरू करण्यात आले. त्यामुळे प्लास्टिकच्या पुन:प्रकियासोबतच अनेक गरीब कुटुंबातील मुलांना, प्लास्टिक गोळा करणाऱ्या महिला, पुरुषांना नगदी रोजगार मिळाला आहे. 
पुन:प्रक्रियेनंतर आकर्षक पेपर वेट, बेंचेस, टाईल्स, चेंबर कवर्स, पेव्हिंग ब्लॉक बनविले जाणार आहेत. सिमेंट, लोखंड आणि लाकूड याला पर्याय म्हणून प्लास्टिक कचऱ्यापासून तयार होणाऱ्या साहित्यांचा वापर केला जाणार आहे. महानगरपालिका या साहित्यांचा प्रायोगिक तत्वावर सुरुवातीला वापर करणार असून, प्लास्टिक विटापासून संरक्षक भिंत बांधणार असल्याचे आयुक्त सांगतात. डॉ़ पालिवाल यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या या केंद्रामुळे चंद्रपुरातील प्लास्टिकच्या समस्येवर कायमस्वरुपी 'उपचारा'सोबतच डम्पिंग यार्डमध्ये हजारो टन पडलेल्या प्लास्टिकचीही समस्या मिटणार आहे.
डॉ़ पालिवाल यांनी बल्लारपूर येथेही हा प्रयोग राबविला आहे. तेथून आता विविध साहित्याचे उत्पादन होत असून, प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लागत असल्याने बल्लारपूरच शहराची प्लॉस्टिक कचऱ्यापासून बऱ्यापैकी सुटका झाली आहे

‘मनपाच्या दोन शाळांत प्लास्टिक बँक स्थापन करण्यात आली आहे. तसेच घराघरातून गोळा केल्या जाणाऱ्या कचऱ्यातूनही प्लास्टिक कचरा वेगळा गोळा करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत. या युनिटमुळे प्लास्टिक कचऱ्यातून निर्माण होणाऱ्या समस्येवर मात करता येणार असल्याचे आयुक्त संजय काकडे यांनी सांगितले.
कुरकुरे, खर्रापन्नी, व्यावसायिकांकडून होत असलेला प्लास्टिक वापर आणि अन्य पॅकिंगसाहित्य यामुळे प्लास्टिकची समस्या अधिक तीव्र होत आहे. मात्र, प्लास्टिकवर पुनप्रक्रिया करून वेगवेगळे साहित्य करता येणे शक्य असल्याने या समस्येवर मात करता येऊ शकते, असे डॉ. पालीवाल म्हणतात.

- प्रशांत देवतळे, चंद्रपूर 

तृतीयपंथीय बनले ‘पोलीस मित्र’


तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणाचा एक प्रयत्न ठाणे ग्रामीण पोलिसांनी मीरा-भाईंदरमध्ये केला आहे. याठिकाणी महाराष्ट्र पोलिसांच्या 'पोलीस मित्र' या उपक्रमांतर्गत तृतीयपंथीयांना समाविष्ट करण्यात आलं आहे.
काशीमिरा इथे काही तृतीयपंथीयांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पळून जाणार्‍या चोरांना पकडून देण्यात पोलिसांना मदत केली. ही घटना कलाटणी देणारी ठरली. मग त्यांना ‘पोलीस मित्र’ होण्यासाठी तयार करण्यात आलं. सध्या मीरा-भाईंदर उपविभागात 2 2 तृतीयपंथीय पोलीस मित्र म्हणून काम करत आहेत. नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांविषयी जागरूकता निर्माण करणं, वाहतुकीचं, गर्दीचं नियमन, सुरक्षा, भुरटय़ा चोरांचा माग काढणं, पोलिसांना खबर देणं अशी विविध कामं ते करतात. त्यांच्यातले काही जण तर पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतलेलेही आहेत अशी माहिती मीरा रोडचे पोलीस उपअधीक्षक सुहास बावचे यांनी दिली. वाहतुकीचं नियमन करणाऱ्या, नियम समजावून सांगणाऱ्या या ‘पोलीस मित्रां’चं म्हणणं नागरिक ऐकून घेतात, त्यांच्याशी अदबीने वागतात असं बावचे यांनी सांगितलं.
तृतीयपंथीयांकडे बघण्याच्या समाजाच्या दृष्टिकोनात हळूहळू बदल व्हायला सुरुवात झाली असल्याचं दिसून येत आहे. तृतीयपंथीयांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी असे अनेक उपक्रम राबवण्याची गरज आहे. त्यातूनच त्यांच्या पूर्वापार जीवनमानात बदल घडू शकेल आणि समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. शिक्षण आणि कौशल्यविकास प्रशिक्षणाची त्यांना गरज आहे.
2011 च्या जनगणनेनुसार देशात तृतीयपंथीयांची संख्या एकूण 4 लाख 87हजार 803 आहे त्यापैकी फक्त 46%साक्षर आहेत. भीक मागणारे, नाचगाणी करणारे, मनोरंजन करणारे यापलीकडे जाऊन त्यांना ओळख मिळाली पाहिजे. माणूस म्हणून त्यांच्याकडे बघितले गेलं पाहिजे.


- सोनाली काकडे-कुळकर्णी

Friday, 23 December 2016

'सारोळा'शी 'संपर्क


१९६७ साली आम्ही एसएससी झालो. म्हणजे २०१६ मध्ये आमच्या बॅचचा सुवर्ण महोत्सव सुरू होतो. एका शाळेत असलेल्या आम्हा सर्वांनी एक whatsapp ग्रुप ही बनवला आहे. तर सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने आपण काहीतरी करावं, ज्यातून ही घटना साजरी होईल; असा एक विचार आमच्यात व्यक्त होऊ लागला. अनेक पर्यायांमधून शेवटी सध्या महाराष्ट्राच्या काही भागात असलेल्या दुष्काळात होरपळणार्यांना मदत करण्याचा निर्णय झाला.


अशी मदत देण्याचा सर्वात सोपा, सोयीस्कर मार्ग म्हणजे पैसे जमवून दुष्काळ निवारण निधीला अथवा या विषयात काम करणाऱ्या एखाद्या सामाजिक संस्थेला देणगी देणे होय. तो न अवलंबता आपल्या मदतीतून छोटं मोठं काम उभं रहावं, ते आपल्याला बघायला मिळावं, असं आम्ही ठरवलं. 'संपर्क' या स्वयंसेवी संस्थेबरोबर केलेल्या कामामुळे माझा उस्मानाबादचे तरुण पत्रकार (जे सध्या तिथल्या पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत) महेश पोतदार यांच्याशी परिचय होता. महेशच्या पत्रकारितेला सामाजिक जाणिवेची जोड असते, हे मला माहीत होतं. महेशकडून मला 'सारोळा' या गावाची माहिती झाली. त्याच्या बोलण्यावरून या गावाला मदत करणे उचित ठरेल, असं आम्हाला वाटलं. पण तेवढ्यावर निर्णय न घेता आमच्यापैकी दोघे जण सारोळ्याला जाऊन आले आणि त्यांनी स्वतःची खात्री करून घेतली. अशी खात्री होण्यात 'मदतीची गरज' या निकषापेक्षा 'आपसातले सर्व प्रकारचे मतभेद बाजूला करून एकूण गावाच्या उन्नतीसाठी धडपडणारे, तसं करताना परंपराशरणतेला सोडचिठ्ठी देऊन नवनवीन मार्ग शोधणारे लोक' ही त्यांची ओळख आम्हाला खूप जास्त महत्त्वाची वाटली.
'सत्पात्री दान' देण्यापेक्षा स्वयंप्रेरणेने उन्नती साधू पहाणार्याओ गावाच्या प्रयत्नांना हातभार लावण्यात कितीतरी जास्त समाधान आहे. ते आम्हाला सारोळा गावामुळे मिळू शकत आहे, हे आमचं मोठंच भाग्य.
या आमच्या उपक्रमाला आणखी एक महत्त्वाचं अंग आहे. एक नाला खोल करून त्यातून येणार्याय, त्यात साठणार्यात पाण्यामधून गावातल्या सर्व विहिरींना, बोअरवेल्सना मुबलक पाणी वर्षभर मिळण्याची व्यवस्था करावी, त्याबरोबर तिथल्या मातीचं अक्षरशः सोनं करण्याचाही प्रयत्न करावा, हे या कामाचं ढोबळ स्वरूप. त्यात खोदकाम करणार्या् पोकलेनचं भाडं आम्ही देत आहोत, त्यासाठी लागणारं डीझेल मिळवून देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही स्वतः जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषिअधिकारी यांनी आजच्या समारंभाला उपस्थित राहून स्पष्टपणे दिली आहे आणि उकरलेली माती उचलण्याचं काम गावकरी स्वतः करणार आहेत. अशा रीतीने मुंबई महानगरीतले काही नागरीक स्वतःला मराठवाड्यातल्या एका गावाशी जोडून घेत आहेत आणि याला शासनाचा सक्रीय आशीर्वाद लाभत आहे! म्हणून हे काम अधिक लक्षणीय ठरत आहे. अशा प्रकारे शहर, गाव आणि शासन यांचा सहयोग सारोळा येथे साकारत आहे!


अशी सुरुवात झाली. मग आम्ही, म्हणजे या बाबतीत थोडे फार सक्रीय असणार्यायनी एक whatsapp ग्रूप बनवला. त्यात मुंबईचे आम्ही शाळावाले होतो, महेश होता आणि सारोळ्याचा कैलास होता. काम सुरु झालं आणि आम्हा मुंबईकरांच्या अपेक्षेपेक्षा भलत्याच जास्त वेगाने पुढे सरकू लागलं. किती खोदाई झाली, याचे फोटो कैलास रोज ग्रूपवर टाकू लागला. डीझेल किती खर्च झालं, हे समजण्यासाठी पोक्लेनचं रीडिंग सुद्धा whatsapp वर येऊ लागलं. दुसरं पेमेंट आम्ही त्यांच्या खात्यावर मुंबईतच जमा केलं. तसंच तिसरं. एकून चार लाख रुपयांची रक्कम आम्ही सारोळ्याच्या नाला खोल करण्याच्या कामाला दिली. डिझेलचा खर्च district magistrate ने कबूल केल्याप्रमाणे शासनाने दिला. आणि माती गावकऱ्यांनी स्वतःच उचलून नेली. इथे मला आमचा वर्गमित्र द्वारकानाथ संझगिरी ह्याचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. निधी जमविण्यात त्याने पुढाकार घेतल्याने आमचे कार्य बरेच सोपे झाले.
झालेल्या कामात आम्हाला आनंद आहे. आता पावसाची वाट बघायची. आपण दिलेल्या देणगीतून प्रत्यक्षात काहीतरी साकारतंय, हे समाधान मोठं आहे. देणगी देणार्यादना आत्तापासूनच सारोळा गावाशी एक भावनिक बंध जुळल्यासारखं वाटत आहे. पुढे काय करायचं, कोणते पर्याय आहेत, अगोदर काय, नंतर काय, चर्चा चालू झाल्या आहेत.
पहिला पाऊस होऊ दे, गावापर्यंत पाणी येऊ दे, मग पुढचं ठरवू, असं सध्यापुरतं ठरलं आहे.
या पेजवरचा मजकूर शेअर करून इतरांचीही उमेद वाढवा. तसंच उमेद वाढवणारा मजकूर पाठवून या पेजसाठी योगदानही करू शकता.


हेमंत कर्णिक

कारल्याच्या पिकातून साधली आर्थिक उन्नती



* 2 एकरात 13 लाखांचे उत्पन्न
* मल्चिंग व ठिंबकमुळे उत्पादनात वाढ
* पाण्याचा कमी वापर करून विविध पिकांचे नियोजन

भंडारा दि.4 :- एकीकडे शेतकरी संकटात असल्याचे चित्र आपण पाहतो आहोत. तर दुसरीकडे काही शेतकरी निराश न होता परिश्रम, पिकांचे योग्य नियोजन,उपलब्ध पाण्याचा काटकसरीणे वापर, मल्चिंग आणि ठिंबकचा योग्य उपयोग करून शेतीतुन सोनं पिकवत आहेत. निलज येथील एका शेतकऱ्याने कारल्याच्या विक्रमी उत्पादनातून वर्षाला 13 लाख रुपयांचा निवळ नफा कमावून आर्थिक उन्नती साधली आहे.
पवनी तालुक्यातील नागपुर-भिवापुर रोड़वरील निलज फाटा म्हणून हे गाव ओळखले जाते. या गावातील नरेश ढोक या तरुण शेतकऱ्याने पारंपारिक धान उत्पादनाला फाटा देत संपुर्ण शेती भाजीपाला लागवड़ीखाली आणली. त्यांच्याकडे स्वत:ची चार एकर शेती आहे. यात पूर्वी त्याचे वडील रामचंद्र ढोक धानाचे पिक घेत होते. मात्र 10 वर्षापूर्वी नरेश यांनी शेतीत लक्ष घातले. शेतात विंधन विहीर तयार केली. सिंचनाची सुविधा होताच नरेशने हळूहळू संपूर्ण शेतीत भाजीपाला लागवड सुरु केली. या व्यतिरिक्त 4 ते 5 एकर शेती बटइने करतात. ही सर्व शेती त्यांनी ठिंबक सिंचनाखाली आणली आहे.
यावर्षी नरेशने 2 एकर शेतीत कारल्याच्या US 6207 या वाणाची लागवड केली. पहिले कारल्याचे पिक ऑगस्ट मध्ये घेतले. पाण्याचा कमी वापर आणि तण व्यवस्थापनासाठी त्यांनी मल्चिंगचा वापर केला. यासाठी 41 हजार रुपये खर्च आला.
कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त पिक घेण्यावर त्यांचा भर असतो. पाणी वाचले तर आणखी एका हंगामाचे नियोजन करता येते असे ते सांगतात. म्हणूनच ठिंबकद्वारे पाणी आणि विद्राव्य खते दिली. कारल्याचा वेल चढ़वण्यासाठी बांबू, तार, दोर इत्यादीचा आधार दिला. केवळ दीड महिन्यात कारल्याचे पिक अतिशय डौलदारपणे शेतात उभे राहिले. या पहिल्या पिकातून त्याला लागवडीपासून ते विकण्यापर्यतचा सर्व मिळून 2 लाख 55 हजार रुपयांचा खर्च वजा जाता 4 लाख 50 हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला.
नरेशने मार्केटची चाचपणी करून पुन्हा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात याच वाणाची लागवड केली. यावेळी त्यांना मल्चिंगचा आणि आधाराचा खर्च वाचला. हे पिक साधारण फेब्रुवारीमध्ये विकण्यास तयार झाले. यावेळी 2 एकरातुन विक्रमी 30 टन कारल्याचे उत्पादन झाले. भावही चांगला मिळाला. एकूण 1 लाख 71 हजार रुपये खर्च वजा जाता नरेशला 8 लाख 50 हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला.
ऑगस्ट ते मार्च या आठ महिन्यात केवळ 2 एकरात नरेशने कष्टाने 13 लाख रुपयाचे उत्पन्न घेतले. एका क्लास वन अधिकाऱ्याच्या वार्षिक उत्पन्नापेक्षाही हे उत्पन्न जास्त आहे आणि हे अतिशय आनंददायी आहे. शेती तोट्याची आहे असे म्हणणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नरेशने केलेली शेती निश्चितच आशादायी आणि प्रेरणा देणारी आहे. त्यांच्या या कामात त्यांचे आई- वडील, पत्नी सर्वांचीच मदत होते असे नरेश यांनी सांगितले.
नरेश केवळ कारल्याचे उत्पन्न घेऊन थांबत नाहीत तर मधु मका लावण्याचा प्रयोग, गॅलार्डियाची फुले असोत की शेडनेट मधील ढोबळी मिरची नरेश सतत वेगवेगळे आधुनिक तंत्र वापरून विविध पिक घेण्याचा प्रयत्न करतात. नविन प्रयोग करताना त्यात अपयश आले, तोटा झाला तरी त्यातुन मिळणारा अनुभव समृद्ध करून जातो. या अनुभवाच्या शिदोरीवर पुढचा प्रयत्न शंभर टक्के यशस्वी होतो असे ते आत्मविश्वासाने सांगतात. शेतीचे नियोजन कसे असावे याचा वस्तुपाठ नरेश ढोक यांच्याकडून शिकण्यासारखा आहे आणि अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा देणारा सुद्धा.

 माहिती अधिकारी मनीषा सावळे

Monday, 19 December 2016

'गेटकेन लग्न — दुष्काकाळाची गरज


मराठवाडा- नाव जरी घेतलं की रणरणतं ऊन, ऊन्हामुळे सुकलेली वैराण भूमी, पाण्यासाठी घागरी, मडकी घेऊन फिरणारी डोकी नजरेसमोर येतात.
अशा या भागात 'गेटकेन' लग्नपद्धती पूर्वीपासून प्रचलित आहे. फारच मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाहेच्छुक वधुवरांचा विधीवत विवाह म्हणजे 'गेटकेन' लग्न. आजच्या परिस्थितीत 'गेटकेन' विवाहद्धती ही तेथील एक गरज बनत चालली आहे. कारण 'दुष्काळ'!
दुष्काळाच्या या चक्रव्युहात समाजातल्या सर्वच स्तरांतील लोक फसले आहेत. हौस, ऐपत असूनदेखील आज तेथे 'गेटकेन' पद्धतीनेच लग्नं लावली जात आहेत. कारण- पाण्याचे दुर्भिक्ष! लग्नसोहळ्यात पाण्याअभावी पाहुण्यांची व्यवस्था कशी करावी हा एक यक्षप्रश्न आज तिथे उभा आहे.पण यातून एक चांगलं फलित मिळतंय. लग्नसोहळ्यातला वायफळ खर्च वाचतोय. पैशाचा योग्य विनियोग करण्याच्या दृष्टीने ते एक यशस्वी पाऊल आहे. 'गेटकेन' लग्नांचा प्रसारही चांगला होतोय.
आता हा 'गेटकेन' शब्द आला कुठून?
गेट म्हणजे दरवाजा आणि केन म्हणजे ऊस.
गेटकेन म्हणजे साखर कारखान्याचे सभासद नसलेल्या बाहेरच्या शेतकऱ्यांचा कारखान्यांना कमी भावात मिळणारा ऊस.
गेट आणि केन हे दोन्ही शब्द मूळ इंग्लीश - याचा लग्नाशी कसा काय संबंध आला असेल?
कमी खर्चातील ऊस तसं कमी खर्चातील लग्न.
कांही भाव ना ठरवता , कांही देणं-घेणं न करता
केलेलं लग्न.
कविता जमादार - इंगळे