Monday, 2 October 2017

अनिता जनार्दन भडके, मुख्याध्यापिका, मनपा शाळा, औरंगाबाद.

'ती’च्या उमेदकथा - नवरात्रोत्सवविशेष

औरंगाबाद शहरातल्या बन्सीलाल नगरची मनपा शाळा. रंग उदास झालेली, खिडक्यांच्या काचा तुटलेली, गरिबांघरच्या पोरांची... नेहमीसारखीच... पण या शाळेत एक गोष्ट मात्र वेगळी आहे. ती म्हणजे या शाळेची मुख्याध्यापिका शाळा टिकावी, मुलं शिकावीत म्हणून जीवाचं रान करते... तिचं नाव आहे अनिता जनार्दन भडके.
अनितामॅडम मूळच्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या, भूम तालुक्यातील सुकटा या गावातील. माहेर याच तालुक्यातलं पाथरूड. बाप दादासाहेब बोराडे. त्यांनी अनिताला दहावीपर्यंत शिकवलं आणि दहावीची परीक्षा दिल्याच्या 15 व्या दिवशीच तिचं लग्न लावून दिलं. वरात औरंगाबादला आली. सोबत आलं मनातलं शिकायचं आणि शिक्षक व्हायचं स्वप्नदेखील. 



थोड्यात दिवसात निकाल लागला. आणि अनिता दहावीला बोर्डात पहिल्या आल्या. स्वप्नं पूर्ण होतील अशी आशा वाटू लागली. पण डीएड करण्यास नवऱ्याने नकार दिला. तब्बल पाच वर्षं नवऱ्याने शिकायला परवानगी द्यावी म्हणून त्या प्रयत्न करत राहिल्या. शेवटी एकदा नवऱ्याची नजर चुकवून घराशेजारी असलेल्या डीएड कॉलेजला प्रवेश घेतला. यावेळी कदाचित त्यांची चिकाटी बघून नवऱ्यानेही सूट दिली आणि डीएड झालं. आता पुढचा टप्पा होता, शिक्षक म्हणून नोकरीचा. इथंही पुन्हा नवऱ्याचा नकार. पाच वर्षं प्रयत्न करत राहिल्या आणि मॅडम महापालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाल्या.
स्वप्न साकार झालं. आणि कर्तृत्व दाखवायची संधीही मिळाली. मॅडम काही दिवस कंचनवाडीच्या मनपा शाळेत होत्या. इथे फक्त सव्वाशे मुलं होती. गावात रिकाम्या फिरणाऱ्या शाळाबाह्य मुलांचं प्रमाण खूप जास्त होतं. मॅडमनी ही सगळी मुलं शाळेत आणायचं ठरवलं. त्यासाठी सर्वप्रथम वर्गातली छडी फेकून दिली. गाणी, कविता, कथा, गोष्टी सुरू झाल्या आणि मुलांचा आकडा अडीचशे पार करून गेला. पण दुसऱ्याच महिन्यात मॅडमची बदली झाली. बदली रद्द करण्यासाठी गावकऱ्यांनी शाळेला कुलुपही ठोकलं. महापालिकेच्या इतिहासात एक शिक्षकासाठी झालेलं हे पाहिलं आंदोलन. 



पुढे मॅडम बन्सीलाल नगरच्या मनपा शाळेत आल्या इथे तर विद्यार्थ्यांची वानवाच. मॅडमनी वस्त्या, पालावर फिरून भटक्या विमुक्तांची, दलितांची, गरिबांची, शाळा सुटलेली, शाळेत न जाणारी अशी सगळी मुलं गोळा करून शाळा सुरू केली. या मुलांना येण्याजाण्यासाठी वाहनांची सोय सुरू केली. आज या शाळेत शिक्षकांच्या वर्गणीवर, एक तीस सिटांची बस, एक 18 सिटांची व्हॅन आणि सहा सहा सिटांच्या दोन रिक्षा सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे याचे सगळे पैसे मॅडम आणि शाळेतले शिक्षक आपल्या पगारातून वर्गणी करून देतात. शाळेजवळ राहणाऱ्या मुलांना त्यांनी सायकल घेऊन दिल्या. आजही त्यांना पंक्चर काढायला, हवा भरायला मॅडमच पैसे देतात. दुपारच्या खिचडीची सोय उत्तम असते. शाळेची गोडी लागावी म्हणून मॅडम शाळेत कधी जांभळं, बोरं, पेरू, केळं अशी फळं आणतात आणि वाटतात. मुलंही खुशीत असतात.
आता मॅडमची रिटायरमेंट जवळ आलीय. मॅडम म्हणतात, "रिटायरमेंटनंतर मला एक शाळा उघडायची आहे, जिथं गरीब श्रीमंत असं कॉम्बिनेशन असणार आहे. त्या शाळेत श्रीमंतांना फी आणि गरिबांना मोफत शिक्षण देणार." या शाळेसाठी मॅडमनी तीस वर्षांपूर्वी अर्धा एकर जमीन घेऊन ठेवली आहे. महिन्याला शंभर रुपये करत त्यांनी या जागेचे पैसे फेडलेत, निवृत्त झाल्यानंतर त्या येणाऱ्या पेन्शनमधून शाळानिर्मितीचा खर्च भागवणार आहेत. 



नोकरी करतच अनिता यांनी आपलं पुढचं शिक्षणंही पूर्ण केलं. त्यांनी बीए, बीएड, एमए, एमड आणि एमफिल पूर्ण केलं. शिक्षणशास्त्रात पीएचडी करायचं हे त्यांचं पुढचं स्वप्न. ज्या महिलेचं दहावी झाल्यानंतर पंधराव्या दिवशी लग्न होतं, बोर्डात पहिला येऊन डीएड करायला पाच वर्षे लागतात, डीएड ला प्रथम येऊन नौकरी करायला पुढची पाच वर्षे जातात... तीच महिला शिक्षकी पेशात आपल्या कामाने आदर्श निर्माण करत, शिक्षणाच्या सगळ्याच डिग्र्या पादाक्रांत करते. हा प्रवास खरंच थक्क करून सोडणारा आहे. 

चोरांच्या मनसुब्यावर केली मात


"रंग रंगुल्या, सान सानुल्या
गवतफुला रे गवतफुला
असा कसा रे मला लागला
सांग तुझा रे तुझा लळा"



बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या पुस्तकातील इंदिरा संतांची कविता विद्यार्थी तन्मयतेने गात होती. गाताना त्यांच्या चेहऱ्यावर त्यांचा स्टुडिओ पुन्हा सुरू झाला याचा आंनद ओसंडून वाहत होता.
स्टुडिओ अन तोही शाळेत, होय बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याच्या दक्षिणेला असलेले पारगाव जोगेश्वरी. या गावातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील हा रेकॉर्डिंग स्टुडिओ. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असलेल्या या शाळेत इतर शाळेप्रमाणे डिजिटल रूम तर आहेच. शिवाय हा एक ध्वनिमुद्रण स्टुडिओसुद्धा आहे. या डिजिटल रूम कम रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये बोर्ड ऑक्टोपॅड, कोंगो बोंगो, ढोलकी, ड्रम, ढोल झांज, खंजीर, ट्रॅंगल, डफ, बासरी, बिगुल अशी वेगवेगळ्या प्रकारची वाद्य ठेवलेली आहेत. मराठी, इंग्रजीतील कविता विद्यार्थी तेथे आपल्या आवाजात गाण्याच्या तालासुरात रेकॉर्ड करतात. ही एम पी थ्री स्वरूपातील गाणी पालकांच्या मोबाइलवर सुद्धा पाठवली जातात.



विद्यार्थ्यांचा अभ्यास होतो. शिवाय गायन, वादन आणि तंत्रज्ञानाचा वापर आदी कौशल्याचा विकास होतो. दोन वर्षापासून सुरू असलेला हा उपक्रम या शाळेतील स्टुडिओच्या काही साहित्याची जुलै महिन्यात चोरी झाल्याने बंद पडला होता. ज्यांच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरू झाला ते शाळेतील शिक्षक सोमनाथ वाळके यांनी या चोरीची खंत सोशल मीडियावर व्यक्त केली. ग्रामीण भागातील एक आगळा वेगळा उपक्रम बंद पडल्याचे दुःख त्यांनी व्यक्त केले होते. त्यावर मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण आणि शिक्षण विकास मंच या संस्थांनी स्वतःहून या स्टुडिओची पुन्हा उभारणी करण्याचं आश्वासन दिलं. विशेष म्हणजे वाळके यांनी किंवा शाळेने मागणी न करताच ही आर्थिक मदत मिळाली. त्यामुळे नवीन साहित्य पुन्हा आलं आणि स्टुडिओ सुरू झाला. एवढेच काय
तर डिजिटल शिक्षणासाठी गावकऱ्यांनी सुध्दा शाळेला काही टॅब भेट दिले. लोकसहभागाच्या या चळवळीने चोरांच्या मनसुब्यावर मात केली.
- राजेश राऊत .





सेवानिवृत्त अधिकारी, तरीही झाडतोय रस्ता..

गांधी जयंती विशेष -
भल्या पहाटे उठून हातात फावडं, खुरपं आणि झाडू घेऊन रस्त्यावर स्वच्छता करत फिरणारा सेवानिवृत्त अधिकारी पहायचा असेल तर उस्मानाबादमधल्या लिंबोणी बागेला भेट द्या. 7 वर्षापूर्वी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागात कक्ष अधिकारी या पदावरून ते निवृत्त झाले.
लक्ष्मण दगडू धाकतोडे. लिंबोणी बागेतील जिजाऊ चौकाचा परिसर चकाचक ठेवणारी ही व्यक्ती सामान्य नाही. परिस्थितीने गांजलेली तर मुळीच नाही. किंवा कुणाकडून शाबासकी, बक्षीसी मिळावी म्हणूनही त्याची धडपड नाही. आपापला परिसर प्रत्येकाने स्वच्छ ठेवावा, हा संदेश देण्यासाठी, आपल्या परिसरात रोगराई निर्माण होऊ नये, संतांनी सांगितलेला मूलमंत्र जपण्यासाठी त्याची ही सगळी उठाठेव सुरू आहे.
उस्मानाबादमधील कळंब तालुक्यातील शिरढोण गावातले लक्ष्मण धाकतोडे. निवृत्तीच्या दिवसापासून त्यांनी स्वच्छतेच्या कामात स्वत:ला झोकून दिलं आहे. त्यांना दोन विवाहित मुली, एक मुलगा आहे. मुलगा पुण्यातील कात्रज भागात व्यवसाय करतोय. स्वतःचं पेन्शन, मुलाची मिळकत यावर आराम करायचं सोडून धाकतोडे पहाटे उठून गल्लीभर स्वच्छता करायला निघतात. रस्त्यावर पडलेला कचरा गोळा करून एकत्र करतात. गेल्या सात वर्षापासूनचा त्यांचा हा नित्यक्रम. नाल्यातील घाण फावड्याने बाहेर काढणे, त्यानंतर हा कचरा घंटागाड्यांमध्ये टाकणे, परिसरात रस्त्यालगत आलेले गवत खुरप्याने काढणे आणि कुणाच्याही भावना न दुखवता स्वच्छता राखण्याचा संदेश देणे, असा त्यांचा ठरलेला दिनक्रम. या स्वच्छतेच्या दुतामुळे गल्ली स्वच्छ चकाचक दिसते.



  उस्मानाबादेत पालिकेच्या कर्मचाऱ्यांची स्वच्छता कागदावर अधिक, प्रत्यक्षात कमीच असा त्याचा अनुभव या भागातील नागरिकांचा अनुभव. धाकतोडे यांच्या कामाने खरंतर कर्मचाऱ्यांचीही सुटका झाली. कर्मचारी येण्यापूर्वीच धाकतोडे परिसर स्वच्छ करून ठेवतात. ते म्हणतात, “माझ्यावर बालपणीपासून स्वच्छतेचे संस्कार आहेत. आमच्या गुरूजींनी शाळेत दुसरीमध्ये दिलेली ही शिकवण मी अंगिकारली आहे. सेवानिवृत्तीनंतर गप्पा मारण्यात वेळ घालविण्यापेक्षा स्वच्छता करून परिसर चांगला ठेवावा, या भावनेतून काम हाती घेतलं. माझं काम बघून आता काही नागरिक आपआपल्या भागापुरती स्वच्छता करतात. प्रत्येकाने आपल्या स्वत:पुरती स्वच्छता ठेवावी, हीच अपेक्षा आहे. या कष्टाच्या कामामुळे माझे आरोग्यही उत्तम आहे. कधीही दवाखान्यात जाण्याची वेळ आली नाही.”
खरं तर संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांच्या शिकवणुकीचा, त्यांनी घालून दिलेल्या मार्गाचा वर्तमानात विसर पडत चाललाय. दूरचित्रवाहिन्यांवर आणि पेपरात छबी येण्यापुरतं हातात झाडू घेतलेले नेत्यांचे चेहरे पाहिल्यानंतर लोकांना किळस येते. अशा ढोंगी पुढाऱ्यांना सणसणीत चपराक देणारं धाकतोडे यांचं काम उस्मानाबादच्या लिंबोणी बागेत पहायला मिळते.


- चंद्रसेन देशमुख.

Saturday, 30 September 2017

- सुगंधी फ्रान्सिस, सोनिया गिल, किरण मोघे – अखिल भारतीय जनवादी महिला संघटना

‘ती’च्या उमेदकथा - नवरात्रोत्सव विशेष
ऑनर किलिंगच्या भीषण प्रकारातून वाचलेल्या मीता आणि सीमा आज मानाचं जीवन जगत आहेत. त्यांची सत्यकथा समजून घ्यायला हवी."बरं झालं मॅडम तुम्ही या मुलीची जबाबदारी घेता आहात. नाही तर हिची रवानगी सुधारगृहात झाली असती. तिथे तिचे आणखी हाल झाले असते." असं पोलिसच म्हणाले तेव्हा मुलीला संरक्षण देण्याचं आम्ही पक्कं केलं. ऑनर किलींगची केस हाताळणाऱ्या अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सुगन्धीताई सांगत होत्या.
ऑनर किलींग ! शब्द जरी उच्चारला तरी अंगावर शहारे येतात. तथाकथित इभ्रतीखातर केलेला आपल्याच नातलगाचा खून.
भारतभर दरवर्षी एक हजाराहून अधिक ऑनर किलिंगच्या केसेस होतात. अशाच ऑनर किलिंगच्या घटना १९९९ मध्ये पनवेल आणि २००४ मध्ये वसई इथे घडल्या. मात्र तिथे 'सैराट’ इतकं भीषण घडलं नाही. मुलींच्या नातलगांनी त्यांच्याच समोर त्यांच्याच नवऱ्यांचे, नवऱ्याच्या इतर नातलगांचे जीव घेतले गेले. मात्र या घटनांमधल्या मीता आणि सीमा या मुली मागे जिवंत राहिल्या. त्यावेळी त्या कोणत्या मानसिकतेतून गेल्या असतील याची कल्पना करणंदेखील अशक्य आहे. पीडित मीता आणि सीमा या घटनेनंतर एकाकी पडल्या. अशा स्थितीत कोणीही पुढे यायला तयार नसताना देशपातळीवर महिलांच्या हक्कांसाठी लढणारी 'जनवादी महिला संघटना ' मदतीसाठी पुढे आली. संघटनेच्या जेष्ठ कार्यकर्त्या सुगंधी फ्रांसिस ,सोनिया गिल आणि किरण मोघे या तिघींनी या मीता-सीमा यांची जबाबदारी घेतली.
कोर्टात केस जाताच पनवेलची मीता व वसईची सीमा यांच्या पालकत्वाचा, सुरक्षिततेचा प्रश्न पुढे आला. केसदरम्यान या मुलींच्या जिवाला धोका होता. मीताचे नातेवाईक तर ही एकटी सापडली तर हिलाही ठार करू अशी उघड उघड धमकीच देत होते. अशा वेळी कुणाला कळू न देता तिला इकडे तिकडे हलवलं जात असे. कोर्टात सुनावणीच्या वेळीही तिच्या येण्याबाबत गुप्तता पाळली जायची.
   सुगंधीताई सांगतात, “आम्हा कार्यकर्त्यांना मारण्यासाठी गुंडदेखील पाठवले होते”. इतक्या वाईट परिस्थितीतसुद्धा त्या मीतासोबत खंभीरपणे उभ्या राहिल्या. सीमा या घटनेदरम्यान गरोदर होती. तिची जास्तच काळजी घेणं गरजेचं होतं. सुगंधी, सोनिया आणि किरण यांनी स्वखर्चाने सीमाची सुरक्षित राहण्याची सोय केली. केसेस पुढे रेटल्या. केस संपल्यावर पुढे कुठे जायचं,काय करायचं, यापुढे कसं जगायचं या चिंतेने ग्रासलेल्या असताना त्यांनी या दोन्ही मुलींचं पालकत्वच स्वीकारलं. म्हणजे काय केलं?
मीताला शिकवलं आणि तिचं लग्न करून दिलं. ती शिक्षिकेची नोकरी करत आहे. आपल्या कुटुंबात सुखाने राहात आहे. सीमाला तर तिच्या बाळासह स्वतः सुगंधी फ्रान्सिस यांनी सून म्हणून स्वीकारलं. दोघीही सुगंधी आणि किरण यांना आईचा दर्जा देतात. मीता-सीमाच्या मुलांच्या त्या आजी झाल्या आहेत. त्यांच्या आयुष्यात घडून गेलेल्या भीषण प्रसंगाचं सावट निवळलं आहे. अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मदतीसाठी त्या कृतज्ञ आहेत. .
लता परब.

मुलं शिकावीत म्हणून जीवाचं रान करते...

‘ती’च्या उमेदकथा - नवरात्रोत्सवविशेष
औरंगाबाद शहरातल्या बन्सीलाल नगरची मनपा शाळा. रंग उदास झालेली, खिडक्यांच्या काचा तुटलेली, गरिबांघरच्या पोरांची... नेहमीसारखीच... पण या शाळेत एक गोष्ट मात्र वेगळी आहे. ती म्हणजे या शाळेची मुख्याध्यापिका शाळा टिकावी, मुलं शिकावीत म्हणून जीवाचं रान करते... तिचं नाव आहे अनिता जनार्दन भडके.
अनितामॅडम मूळच्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या, भूम तालुक्यातील सुकटा या गावातील. माहेर याच तालुक्यातलं पाथरूड. बाप दादासाहेब बोराडे. त्यांनी अनिताला दहावीपर्यंत शिकवलं आणि दहावीची परीक्षा दिल्याच्या 15 व्या दिवशीच तिचं लग्न लावून दिलं. वरात औरंगाबादला आली. सोबत आलं मनातलं शिकायचं आणि शिक्षक व्हायचं स्वप्नदेखील. 
थोड्यात दिवसात निकाल लागला. आणि अनिता दहावीला बोर्डात पहिल्या आल्या. स्वप्नं पूर्ण होतील अशी आशा वाटू लागली. पण डीएड करण्यास नवऱ्याने नकार दिला. तब्बल पाच वर्षं नवऱ्याने शिकायला परवानगी द्यावी म्हणून त्या प्रयत्न करत राहिल्या. शेवटी एकदा नवऱ्याची नजर चुकवून घराशेजारी असलेल्या डीएड कॉलेजला प्रवेश घेतला. यावेळी कदाचित त्यांची चिकाटी बघून नवऱ्यानेही सूट दिली आणि डीएड झालं. आता पुढचा टप्पा होता, शिक्षक म्हणून नोकरीचा. इथंही पुन्हा नवऱ्याचा नकार. पाच वर्षं प्रयत्न करत राहिल्या आणि मॅडम महापालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाल्या.स्वप्न साकार झालं. आणि कर्तृत्व दाखवायची संधीही मिळाली. मॅडम काही दिवस कंचनवाडीच्या मनपा शाळेत होत्या. इथे फक्त सव्वाशे मुलं होती. गावात रिकाम्या फिरणाऱ्या शाळाबाह्य मुलांचं प्रमाण खूप जास्त होतं. मॅडमनी ही सगळी मुलं शाळेत आणायचं ठरवलं. त्यासाठी सर्वप्रथम वर्गातली छडी फेकून दिली. गाणी, कविता, कथा, गोष्टी सुरू झाल्या आणि मुलांचा आकडा अडीचशे पार करून गेला. पण दुसऱ्याच महिन्यात मॅडमची बदली झाली. बदली रद्द करण्यासाठी गावकऱ्यांनी शाळेला कुलुपही ठोकलं. महापालिकेच्या इतिहासात एक शिक्षकासाठी झालेलं हे पाहिलं आंदोलन. पुढे मॅडम बन्सीलाल नगरच्या मनपा शाळेत आल्या इथे तर विद्यार्थ्यांची वानवाच. मॅडमनी वस्त्या, पालावर फिरून भटक्या विमुक्तांची, दलितांची, गरिबांची, शाळा सुटलेली, शाळेत न जाणारी अशी सगळी मुलं गोळा करून शाळा सुरू केली. या मुलांना येण्याजाण्यासाठी वाहनांची सोय सुरू केली. आज या शाळेत शिक्षकांच्या वर्गणीवर, एक तीस सिटांची बस, एक 18 सिटांची व्हॅन आणि सहा सहा सिटांच्या दोन रिक्षा सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे याचे सगळे पैसे मॅडम आणि शाळेतले शिक्षक आपल्या पगारातून वर्गणी करून देतात. शाळेजवळ राहणाऱ्या मुलांना त्यांनी सायकल घेऊन दिल्या. आजही त्यांना पंक्चर काढायला, हवा भरायला मॅडमच पैसे देतात. दुपारच्या खिचडीची सोय उत्तम असते. शाळेची गोडी लागावी म्हणून मॅडम शाळेत कधी जांभळं, बोरं, पेरू, केळं अशी फळं आणतात आणि वाटतात. मुलंही खुशीत असतात.
आता मॅडमची रिटायरमेंट जवळ आलीय. मॅडम म्हणतात, "रिटायरमेंटनंतर मला एक शाळा उघडायची आहे, जिथं गरीब श्रीमंत असं कॉम्बिनेशन असणार आहे. त्या शाळेत श्रीमंतांना फी आणि गरिबांना मोफत शिक्षण देणार." या शाळेसाठी मॅडमनी तीस वर्षांपूर्वी अर्धा एकर जमीन घेऊन ठेवली आहे. महिन्याला शंभर रुपये करत त्यांनी या जागेचे पैसे फेडलेत, निवृत्त झाल्यानंतर त्या येणाऱ्या पेन्शनमधून शाळानिर्मितीचा खर्च भागवणार आहेत. 
नोकरी करतच अनिता यांनी आपलं पुढचं शिक्षणंही पूर्ण केलं. त्यांनी बीए, बीएड, एमए, एमड आणि एमफिल पूर्ण केलं. शिक्षणशास्त्रात पीएचडी करायचं हे त्यांचं पुढचं स्वप्न. ज्या महिलेचं दहावी झाल्यानंतर पंधराव्या दिवशी लग्न होतं, बोर्डात पहिला येऊन डीएड करायला पाच वर्षे लागतात, डीएड ला प्रथम येऊन नौकरी करायला पुढची पाच वर्षे जातात... तीच महिला शिक्षकी पेशात आपल्या कामाने आदर्श निर्माण करत, शिक्षणाच्या सगळ्याच डिग्र्या पादाक्रांत करते. हा प्रवास खरंच थक्क करून सोडणारा आहे. 
अनिता जनार्दन भडके, मुख्याध्यापिका, मनपा शाळा.
- दत्ता कानवटे.

सामाजिक जाणिवेचा यवतमाळचा दुर्गोत्सव


रात्र चढत जाते तशी रस्त्यांवर वाढणारी गर्दी...जिल्ह्या-जिल्ह्यातून, परराज्यातून आलेले लाखो भाविक...डोळे दिपवणारी रोषणाई...थेट इतिहासात नेणाऱ्या, जुनं वैभव दाखविणाऱ्या कलाकृती...आणि प्रत्येक मंडळाकडून दिला जाणारा सामाजिक संदेश हे चित्र आहे यवतमाळच्या नवरात्रोत्सवाचं. अमरावती परिमंडळात तीन हजार सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळं. त्यातील 2 हजार 590 मंडळं एकट्या यवतमाळ जिल्ह्यात आहेत. या दुर्गोत्सवातले खरे कलाकार म्हणजे इथले मूर्तिकार. 'जिवंत' भासणारी दुर्गेची मूर्ती हे इथलं वैशिष्ट्य. या मूर्ती थेट भक्तांच्या मनाचा ठाव घेतात.
दरवर्षी येथील दुर्गोत्सव गर्दीचा उच्चांक मोडत आहे. या काळात यवतमाळ शहरात अंदाजे 100 ते 200 कोटींच्या वर उलाढाल होते. दररोज किमान 1 ते 2 लाख भाविक या उत्सवात सहभागी होतात. नवरातरी आधी दोन महिने सर्व मंडळांचं काम सुरू होतं. कोणता देखावा, त्यातून कोणता सामाजिक संदेश देणार, यासाठी मंडळांमध्ये स्पर्धा लागलेली असते.
‘स्व. बब्बी पहेलवान सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळा’चे हे 76 वे वर्ष. यावर्षी अवयवदान, देहदानाबाबत जनजागृती करून इच्छुकांचे अर्ज भरून घेत आहे. तसंच व्यापाऱ्यांना डस्टबीन वाटप, वृक्षलागवड केली जात असल्याचं मंडळाचे अध्यक्ष अतुल दवंडे आणि सचिव देवा राऊत यांनी सांगितलं. ‘समर्थ दुर्गोत्सव मंडळा’ने बेटी बचावचा संदेश देत दुर्गादेवीच्या दरबारात नऊ कन्यांचा देखावा साकारला आहे. तुळशीचे महत्व अधोरेखित करून ऑक्सीजन देणारे रोपटे घरी लावा, असा संदेश मंडळाने दिला आहे. यवतमाळचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी अध्यक्ष असलेल्या ‘जयहिंद दुर्गोत्सव मंडळा’ने रक्तदान शिबिराचे आयोजन करून शासकीय रक्तपेढीला मदत केली आहे. या मंडळाचं 54 वे वर्ष आहे. ‘शिवराय दुर्गोत्सव मंडळा’चं हे पहिलंच वर्ष. या मंडळाने नऊ दिवस प्रबोधनपर व्याख्यानमालेचं आयोजन केलं आहे. या नऊ दिवसात शासकीय दवाखान्यात जन्माला येणाऱ्या कन्येचा आणि मातेचा विशेष सत्कार या मंडळाकडून केला जात असल्याचं मंडळाचे अध्यक्ष सचिन येवले यांनी सांगितलं. होतकरू महिलांना शिलाई मशीन वाटप, शाळकरी मुलींना सायकल वाटप असे विविध सामाजिक उपक्रम मंडळांमार्फत सुरू आहेत. एकविरा दुर्गोत्सव मंडळाने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. 'आत्महत्येचा विचार आल्यास तत्पूर्वी आम्हाला प्रत्यक्ष भेटा, बोला मार्ग निघेल', असं आश्वासक आवाहन त्यांनी केलं आहे. अनेक मंडळांनी स्वच्छ भारत मोहिमेचे कॅम्पेन केलं आहे. मंडळाचे पदाधिकारी सामाजिक संघटनांना सोबत घेऊन दररोज सकाळी शहर स्वच्छ करतात.
कोलकातानंतर देशात यवतमाळ येथे सर्वात मोठा दुर्गोत्सव साजरा होतो. या उत्सवाला १०० पेक्षा अधिक वर्षाची परंपरा आहे. यवतमाळच्या दुर्गोत्सवाची पाहिजे तशी प्रसिद्धी होत नसल्याने अस्वस्थ झालेल्या चंद्रेश सेता यांनी 1 ऑक्टोबर 2016 रोजी 'यवतमाळ नवरात्री डॉट कॉम' या संकेतस्थळाची निर्मिती केली. यावर यवतमाळच्या नवरात्र उत्सवाचा इतिहास, मंडळांची नावं, पदाधिकारी, मूर्तींची छायाचित्रे, व्हीडीओ, नवरात्रीतील प्रत्येक दिवसाचे महत्व अशी सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे आता 55 देशातील नागरिक थेट उत्सवात ऑनलाइन सहभागी होतात. नवरात्रीत दररोज 3 ते 4 हजार भाविक या संकेतस्थळावरून नवरात्र उत्सवाचा आनंद लुटतात.
दुर्गोत्सव पाहण्यासाठी बाहेरगावावरून येणाऱ्या‍ भाविकांसाठी विविध सामाजिक संघटना फराळ, पाणी, चहाची व्यवस्था ठेवतात. विशेष म्हणजे सर्व धर्माचे लोक या दुर्गोत्सवात आत्मियतेने सहभागी होतात. त्यामुळे या काळातही शहरातील सामाजिक सौहार्द कायम असते. त्याची दखल घेत यावर्षी जिल्हा पोलीस दलातर्फे प्रथमच 'दुर्गोत्सव अवार्ड' मंडळांना देण्यात येणार आहे. त्यासाठी पोलीस दलाने मंडळांसाठी स्पर्धेचं आयोजन केले आहे. महाराष्ट्रातील क्रमांक एकचा हा दुर्गोत्सव! पण पुणे, मुंबईतील गणेशोत्सवाच्या तुलनेत प्रसिद्धीपासून काहीसा दूर असल्याची खंत मात्र यवतमाळकरांना आहे.

- नितीन पखाले.

Thursday, 28 September 2017

बेबीताई गायकवाड, भाजीविक्रेती, कवयित्री, सामाजिक कार्यकर्ती

‘ती’च्या उमेदकथा - नवरात्रोत्सव विशेष
पाथर्डी तालुक्यातील शिराळ चिचोंडी हा दुष्काळी भाग. परिस्थितीमुळे बेबीताई कुटूबासह 1994 साली नगरला आल्या. पतीला एका कंपनीत रोजगार मिळाला, लवकरच कंपनी बंद पडली. गायकवाड कुटूंबासह पाचशे कुटुंबाच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला अन् तिथून सुरू झाला जगण्याचा संघर्ष. बेबीताईने अहमदनगर शहरातील प्रोफेसर चौक भागात भाजीचं दुकान सुरू केलं.
समाजासाठी काही करण्याची वृत्ती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, संत गाडगेबाबा, स्वामी विवेकानंद, राजा राममोहन राय यांची पुस्तकं वाचत त्यांच्या कामाला सुरुवात झाली. त्यांनी 20 महिलांसोबत त्यांनी ‘क्रांती ज्योती महिला मंडळ’ सुरू केलं. आज काळ बदलला तरी विधवा महिला कुंकू लावत नाहीत. समाजही हे मान्य करत नाही. हे त्यांनी हेरलं. ही पद्धत बंद पाडायची हेच पहिलं काम बेबीताईंनी हाती घेतलं.2012 सालचा मकर संक्रांतीचा दिवस. शहीद सैनिकांच्या वीरपत्नींसाठी बेबीताईंनी हळदीकुंकवाचा कार्यक्रम आयोजला. राज्यातील हा पहिलाच कार्यक्रम. या कार्यक्रमाला विधवा महिला उपस्थित राहतील की नाही ही मोठी शंका होती. मात्र तब्बल २९ महिला या कार्यक्रमाला आल्या. त्यानंतर पुढील प्रत्येक कार्यक्रमाला या महिला आपल्या कुटुंबासह उपस्थित रहात आहेत. दर संक्रांतीला हा कार्यक्रम होतो. अगदी तरुणपणी वैधव्य आलेल्या दोघींचे त्यांनी पुनर्विवाहही करून दिले.

क्रांतीज्योती मंडळाचे त्यांनी 2015 मध्ये ‘स्वंयंसिद्धा फाउंडेशन’मध्ये रूपांतर केलं. आता नगर शहरापुरतं काम मर्यादित न राहता जिल्हाभरात व्याप वाढू लागला आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी अाता व्याख्यानं, गरीब, अादीवासी शाळकरी मुलांना शैक्षणिक अाधार, महिलांसाठी वाचनालय असे उपक्रम सुरु केले अाहेत. जिल्हातील सुमारे शंभर महिला फाऊंडेशनशी जोडल्या गेल्या आहेत.
बेबीताईचा मूळ छंद कविता करण्याचा. तोही कामासोबत सुरूच राहिला.


महिला अत्याचार, हुंडाबळी, लेक वाचवा यासह पाणी अडवा, पाणी जिरवा अशा सामाजिक उपक्रमांवर त्या सातत्याने ठिकठिकाणी व्याख्यान देतात. शिवशंभो प्रतिष्ठानचा आदर्श माता, दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा रत्नशारदा, लोकसत्ता दैनिकातर्फे नवदुर्गा आणि राज्य शासनाच्या प्रथम भाषा संवर्धनाचा कवी मंगेश पाडगावकर यासारख्या विविध पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला आहे. 

  बेबीताई गायकवाड, भाजीविक्रेती, कवयित्री, सामाजिक कार्यकर्ती.