Friday, 17 November 2017

मातेसह सासुलाही अमरत्व देणारी डॉक्टर


रत्नागिरीचं जिल्हा शासकीय रुग्णालय. मृत्युपश्चात नेत्रदानाचं महत्त्व आत्ता कुठं लोकांना थोडफार कळू लागलं आहे. अवयवदानाबद्दल केवळ जनजागृतीपर्यंतच न थांबता दुःख बाजूला सारून इथल्या नेत्रचिकित्सक डॉ. सोनाली पाथरे यांनी आदर्श घालून दिला आहे. नुकतंच त्यांच्या सासूबाईंचं निधन झालं. आणि त्याआधी काही काळ आईचं.
डॉ.सोनाली नेत्रदानाविषयी जनजागृती करतात. सोनाली यांच्या आईचं साधना भगाडे यांचं निधन झालं आणि आपल्या कुटुंबापासून अवयवदानाच्या अंमलबजावणीची सुरुवात करायला हवी. हे जाणून त्यांनीच स्वतः आईच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करून डोळे काढले. त्यानंतर काही काळाने त्यांच्या सासूबाईंचं निधन झालं. यावेळी पती पराग पाथरे यांना मानसिक आधार देतानाच सासू अंजली पाथरे यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करून त्यांचे डोळे कोल्हापूर लॅबला पाठवून दिले. आई आणि सासू दोघींनीही केलेली नेत्रदानाची इच्छा सोनालीने पूर्ण केली. आणि 2 दोन गरजू अंध व्यक्तींच्या जीवनात प्रकाशकिरण पोचला.खरं तर, जवळच्या व्यक्तीच्या मूत्यूसमयी माणूस गळून जातो. तरीही, आपल्या सासूबाई आणि आईची नेत्रदानाची इच्छा पूर्ण करताना, स्वतःच शस्त्रक्रिया करणाऱ्या सोनाली यांचं कौतुक करावं तितकं कमीच. एकीकडे जवळच्या व्यक्तीला कायमचं गमावल्याचं दुःख तर दुसरीकडे डॉक्टर म्हणून कर्तव्य बजावत त्यांनी दोन अंधांना दृष्टी मिळवून दिली.

डॉ. सोनाली म्हणतात, “आई आणि सासूबाई दोघीही, आज डोळ्यांच्या रूपात समाजात वावरत आहेत. यापेक्षा मोठी आनंदाची दुसरी बाब नाही. जर दोघींनीही नेत्रदानाचा संकल्प केला नसता, तर या आनंदाचा अनुभव मिळाला नसता. आपल्या मायेची माणसं आपल्या भोवतीच वावरत असल्याचा भास होतो.” यासाठी पती डॉ.पराग पाथरे यांची खंबीर साथ मिळाल्याचं सोनाली सांगतात. 
- जान्हवी पाटील.

Thursday, 16 November 2017

कुरुंजीतलं गमभन





आपल्याला माहीत आहेच की मुलं मोठ्यांचं सतत निरीक्षण करत असतात आणि या निरीक्षणातल्या गोष्टी मुलांच्या वागण्यात झिरपत जातात.
कुरुंजीत आजीआजोबा, आईवडील, मुलं अशी एकत्र राहणारी कुटुंबं आहेत. त्याशिवाय चुलत, आते, मामे कुटुंबं पण शेजारीपाजारी राहतात. त्यामुळे मुलं नात्यांच्या एका विस्तृत पटाला सामोरी जात आहेत. चुलत भावंडं सख्ख्याइतकीच जवळची. आते, मामे भावंडंसुद्धा जवळची. त्यामुळे खूप वेगवेगळ्या वयाची मोठी माणसं, मुलं सतत एकत्र असतात.
यामुळे आपल्यापेक्षा लहानांची आणि वयस्करांची काळजी घेणं आपसूकच त्यांना समजतं.
कुरुंजीच्या देवीचं मंदिर नदीजवळ आहे. एकदा मुलांचा एक कंपू मला घेऊन देवळात गेला. यात बारा-तेरा ते सहा अशा वयाची बरीच मुलं-मुली होती. देवळापलीकडे एक शेत आणि नंतर नदी. एक मुलगा म्हणाला, चला आपण पाण्यापर्यंत जाऊया. लगेच त्यातले मोठे दोघे म्हणाले, नको. आपल्याबरोबर लहान मुलं आहेत. आपण नाही पाण्यात जायचं. आणि सगळी मागे वळाली.

कुरुंजीपासून एक-दीड तासाच्या चालायच्या अंतरावर डोंगरावर कचरेवाडी आहे. या वाडीतली मुलं शाळेच्या वसतीगृहात राहतात. दर शनिवारी चालत घरी जातात आणि सोमवारी परत येतात. तेरा-चौदा वर्षाच्या मुलामुलींबरोबर या वर्षी एक सहा वर्षाचा मुलगा पण आलाय.
एका शनिवारी शाळा सुटल्यानंतर गावातली मुलं आणि मी घरी परत येत होतो. रस्त्यात हा सहा वर्षाचा मुलगा एकटा चालत जाताना दिसला. मुलांनी त्याला विचारलं तर म्हणाला, बाकीचे आले नाहीत मी एकटा घरी चाललोय. गावातल्या मुलांचा जीव कासावीस. दोघे त्याच्या बरोबर थांबले, एक पळत पुन्हा शाळेत गेला. कचरेवाडीच्या मोठ्या मुलांना सांगितलं. तीही निघतच होती. त्यांना गडबड केली, सोबत आणलं आणि त्या सहा वर्षाच्या मुलाला जोडून दिलं. खरं तर गावातली मुलं निघून जाऊ शकली असती, पण एकत्र कुटुंबामुळं लहानांची काळजी करणं हा त्यांच्या वृत्तीचा भाग बनला आहे.
गावात वयस्कर मंडळी भरपूर. बहुसंख्य जणांचा मुक्काम घराबाहेर अंगणात किंवा गावात मध्यावर असलेल्या मारुतीच्या देवळाच्या कट्ट्यावर असतो. येता जाता मुलांना हाक मारणं, कामं सांगणं चालू असतं, मुलं पण कुठल्या आजोबांना नाही म्हणत नाहीत. काही आजोबा रागराग करतात, शिव्या देतात पण मुलं ते स्वीकारतात किंवा काणाडोळा करतात.


आणखी एक गंमतीची गोष्ट म्हणजे वयपरत्वे म्हाताऱ्या माणसांना कपड्यांचं भान राहत नाही. पण मुलं त्याकडे लक्ष देत नाहीत. एकदा आम्ही एका घराशेजारून चाललो होतो. तर समीर पोक्तपणे म्हणाला इकडून नको आपण पलीकडून जाऊ. मी कारण काय असावं असा विचार करत बघितलं तर त्या घरातली म्हातारी बाई तिथंच शू ला बसली होती. या गोष्टी लहान वाटतील. पण आजच्या चौकोनी कुटुंबाच्या काळात मुलांना म्हाताऱ्या माणसांच्या अशा गोष्टी स्वीकारणं जड जातं हे बघितलं आहे.
मुलं मला फिरायला सोबत नेतात तेव्हा त्यांचं माझ्याकडे लक्ष असतं. माझी पर्स, पिशवी धरतील, आधारासाठी मजबूत काठी तोडून आणतील, खूपच उतार असेल तर मला हाताला धरून नेतील. लहान-मोठ्यांची काळजी घेणं हा त्यांच्या वाढण्याच्या प्रक्रियेतला भाग बनला आहे.
गावात मुलांना कुठेही मोकळेपणाने हिंडण्याफिरण्याची पूर्ण मुभा असते. दहा-बारा वर्षाची मुलं जनावरं चरायला किंवा नदीवर पाणी पाजायला घेऊन जातात. एकटे किंवा सोबतीने. अंधार व्हायच्या आत घरी येणं महत्त्वाचं. अंधारात मुख्यतः सापाची जास्त भीती असते म्हणून!
गावातले सगळे एकमेकांना ओळखत असतातच. त्याबरोबर आजूबाजूच्या गावचे पण ओळखत असतात.
नववी-दहावीच्या मुलींबरोबर गप्पा मारताना भीती हा विषय निघाला. कशाकशाची भीती वाटते यावर मुली साप, भूत, अंधार असे उल्लेख करत होत्या. रस्त्यावरून एकट्या जात असताना भीती वाटत नाही का? मी विचारलं. त्यात काय भीती वाटण्यासारखं आहे? असा प्रतिप्रश्न मुलींनी केला. मी म्हटलं, रस्त्यावरून एकटं जाताना कुणी येईल असं नाही का वाटतं? मुलींना ही भीतीच समजली नाही. सगळे तर ओळखीचे असतात, कोण काय करणार, असा त्यांचा सूर होता. या मुली किती भाग्यवान असेच वाटून गेलं. खरं तर, मुली बैल चरायला घेऊन जात असतात तेव्हा बरेचदा रस्ता निर्मनुष्यच असतो. पण माणसांची भीती नाही हे किती चांगलं !
- रंजना बाजी

Tuesday, 14 November 2017

जिंदगी से संतुष्ट हूं : शम्स जालनवी


पहाटे 5 ची वेळ. एक म्हातारबाबा सायकलवरून पेपर वाटताना दिसतो. जवळ जाऊन बोलल्यावर कळतं की हे आहेत, महंमद शमशोद्दीन उर्फ शम्स जालनवी. जालन्याच्या सांस्कृतिक क्षेत्रातील मोठं प्रस्थ... शायरी, मुशायऱ्यामधून प्रेक्षकांच्या गळ्यातले ताईत.
सध्या वय 91. गेल्या 40 वर्षांपासून ते पेपरवाटपाचं काम करत आहेत. 1926 साली त्यांचा जालन्यात जन्म झाला. शमशोद्दीन यांना वयाच्या 14 व्या वर्षांपासून गझल, शायरीचे वेध लागले. त्याकाळी शायरी गझलाच्या खूप मैफिली व्हायच्या, शायरी गझलांना चांगले दिवस होते. त्या वातावरणात शमशोद्दीन मोठे झाले. घरप्रपंचाचा गाडा चालवण्यासाठी फिटरकीचं काम करू लागले. यंत्रांच्या संगतीतही त्यांचं शायरी, गझलांचं प्रेम कमी नाही झालं. तिथूनच शमशोद्दीन यांचा ‘शम्स जालनवी’ या नावाने प्रवास सुरु झाला. आजही त्यांना विविध ठिकाणांहून बोलावणं येतं, त्यांच्या कार्यक्रमाला चाहते आवर्जून उपस्थित राहतात. भारतभर त्यांनी शायरी मुशायऱ्यांना हजेरी लावली. ते म्हणतात, “हैद्राबाद म्हणजे तर घर-अंगण. तिथे मैफिलीत वाहवा मिळवण्याची मजा काही औरच !”



1986 साली फिटरकीच्या व्यवसायातून ते दूर झाले. तेव्हाच त्यांनी पेपरवाटपाचं काम सुरु केले ते आजतागायत. शम्स यांना 3 मुलं, 3 मुली. या वयातही पेपरवाटपाचं काम का क

रता असं विचारल्यावर ते म्हणाले, "दिल की तसल्ली के लिये करता हूं। सरकार से हजार रुपये महिना मिलता है, अपना खुदका गुजारा हो जाता है। दोनों बेटे इलेक्ट्रिशियन हैं। लेकिन मैं खुद भी मेहनत करना चाहता हूं । किसीका लेना नही, किसीका देना नही। दोपहर तक पेपर बाटता हूं। उसके बाद आराम करता, पढते रहेता। आज भी नई नई गझले बनाता हु, जिंदगीसे संतुष्ट हूं । इस दुनिया में अच्छेबुरे सब मिलते, वादे करनेवाले भी और वादे तोडनेवाले भी। इसलीये मै हॅंसकर टाल देता हूं ।" 


- अनंत साळी


Sunday, 12 November 2017

बदललेल्या दीप्ती,प्रविणा,झायरा,नेहा


ब्लॅक फॉरेस्टपासून मावा केकपर्यंतचे विविध प्रकार, पान मसाल्यासारख्या चवीची चॉकलेट्स, वेगवेगळ्या नानकटाई आणि नाही म्हणू शकणार नाही इतका निखळ न प्रेमळ आग्रह अनुभवायला मिळाला तो मुंबईतल्या मालाड पूर्व इथल्या दोन कौशल्यविकास केंद्रांमध्ये. सरकारच्या कौशल्यविकास योजनेअंतर्गत आमदार अतुल भातखळकर यांनी आपल्या कांदिवली पूर्व मतदारसंघात महिलांसाठी कौशल्यविकास केंद्र सुरू केली आहेत. बेकरीसारख्या कोर्सेसची फी १५ ते २० हजार रुपयांपर्यंतही जाते त्याचं प्रशिक्षण इथे साहित्यासह मोफत मिळत असल्याचं इथे भेटलेल्या महिलांनी सांगितलं. ''पूर्वीही आम्ही घरी केक करत होतो पण क्लासमुळे आत्मविश्वास मिळाला. प्रोफेशनल टच मिळाला, नव्या कल्पना समजल्या'' असं इथल्या दीप्ती मोहनानी आणि प्रविणा पांचाळ यांनी सांगितलं.झायरा शेख यांना तर या कोर्समुळे मोठा आधार मिळाला आहे. झायरा यांच्या पतीचं पाच वर्षांपूर्वी अपघाती निधन झालं. तेव्हा पदरात तीन आणि सात वर्षांची मुलं होती. मुलं झाल्यावर त्यांनी नोकरी सोडली होती त्यामुळे उत्पन्नाचं कोणतंच साधन नव्हतं. मग त्यांनी शिवणकाम सुरू केलं. ते करताना त्यांना कौशल्यविकास केंद्राविषयी कळलं. ''बेकरीचा कोर्स केल्यानंतर उत्पन्नाचं चांगलं साधन मिळालं आहे. आमच्या प्रशिक्षक पद्मिनी दुबे यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार मी मुलीच्या शाळेपासून ऑर्डर घ्यायला सुरुवात केली. आता महिन्याला साधारण पाच ते सहा मोठ्या ऑर्डर्स असतात. सणासुदीच्या काळात जास्त ऑर्डर्स मिळतात असं झायरा यांनी सांगितलं .


''उत्पादनाच्या निर्मितीबरोबरच त्याचं मार्केटिंगही तितकंच महत्वाचं आहे.आपलं उत्पादन विकणं हीदेखील कला आहे. यासाठीही आम्ही महिलांना मार्गदर्शन करतो असं प्रशिक्षक पद्मिनी दुबे यांनी सांगितलं. दुबे यांचा बेकरी प्रशिक्षणाचा अनुभव दांडगा आहे. कोरा केंद्रातही त्यांनी प्रशिक्षक म्हणून काम केलं आहे. कोर्स करून महिला जेव्हा आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करतात, आर्थिकदृष्टया स्वावलंबी होतात तेव्हा खूप समाधान वाटत असल्याचं दुबे मॅडम सांगतात.
कोर्स पूर्ण झाल्यावरही दुबे मॅडमकडून मार्गदर्शन मिळत असल्याचं कॉलेजमध्ये शिकत असलेल्या नेहा सानपने सांगितलं. लिविंग फ़ुड्झ वाहिनीच्या २०१७च्या स्पर्धेची ती विजेती आहे.एकीकडे कॉलेजचं शिक्षण घेताघेताच ठाण्यात एके ठिकाणी तिने शेफ म्हणून आपली कारकीर्द सुरू केली आहे. स्त्रियांना बदल घडवायचा असेल तर आत्मविश्वास असणं , स्वावलंबी असणं जरुरीचं आहे असं मानणाऱ्या मंजू कल्याणसिंह यांनी या दृष्टीने आपल्याला कोर्सचा फायदा झाल्याचं सांगितलं.
२६ दिवसांचा हा कोर्स असून यात ९ प्रकारचे केक्स, चॉकलेट्सचे ३ प्रकार, १० प्रकारची बिस्किट्स, पिझ्झा ब्रेडसह ब्रेडसचे प्रकार शिकवले जातात. कोर्स पूर्ण झाल्यावर प्रेझेंटेशन ठेवलं जातं, अशी माहिती या केंद्रांचं व्यवस्थापन बघणाऱ्या शुभांगी हिवाळे यांनी दिली. अशाच प्रकारे या केंद्रात शिवणकाम आणि ब्युटी पार्लरचं पूर्णपणे मोफत प्रशिक्षण दिलं जातं. पार्लरच्या प्रशिक्षण घेतलेल्या अनेक महिलांनी घरी व्यवसायाला सुरुवात केली आहे. कॉलेजमधल्या मुलीना एकीकडे शिकता शिकता नववधूंना सजवण्याच्या ऑर्डर घेता येऊन कमाई करता येते. आतापर्यंत ३,००० महिलांनी या केंद्रांमधून प्रशिक्षण घेतलं आहे. या संपूर्ण प्रशिक्षणच्या खर्चाची, साहित्याची, प्रशिक्षकाच्या मानधनाची व्यवस्था आमदार अतुल भातखळकर करतात असं शुभांगी यांनी सांगितलं.
योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत असेल आणि त्या राबवताना उत्तम व्यवस्थापन केलं जात असेल तर त्या सामान्य जनतेसाठी कशा उपयुक्त ठरतात ते या निमित्तानं पाहायला मिळालं.

- सोनाली काकडे

Saturday, 11 November 2017

तंत्रज्ञान घडविते किमया



सुजाण शिक्षक; जाणत्या शाळा :मी बालाजी जाधव, २००६ साली साताऱ्यात माण तालुक्यातील शिंदेवस्तीच्या जिल्हा परिषद शाळेत माझी नेमणूक झाली. इथल्या बहुतांश विद्यार्थ्यांचे पालक मेंढपाळ, वीटभट्टी मजूर आहेत. मुलं शाळा बुडवून आई वडिलांसोबत कामाच्या ठिकाणी फिरायची. शिक्षणाविना मुलांचे भटकणे पाहून मी अस्वस्थ होत होतो. मग त्यांना शाळेकडे आकर्षित करण्यासाठी मी कॉम्प्युटरची युक्ती योजली. आमच्या जि.प. शाळेत कॉम्प्युटर नव्हता, मग मी स्वखर्चाने लॅपटॉप आणला आणि मुलांना मुक्तपणे हाताळायला देऊ लागलो.


आणि माझी युक्ती लागू पडली, लॅपटॉपच्या आकर्षणाने मुलं नियमित शाळेला येऊ लागली. मुलं शाळेत नियमित येत आहेत याचं मला समाधान होतं, पण मी ‘लातूर पॅटर्न’ मधून आलेला विद्यार्थी असल्याने मुलांनी अभ्यासात उत्तम प्रगती करावी असं मला वाटत होतं. म्हणूनच मी चौथीच्या मुलांना शिष्यवृत्तीची परीक्षा देण्यासाठी उद्युक्त केलं. पहिल्या वर्षी मी मुलांवर फार मेहनत घेतली, मुलांनीही अगदी झटून अभ्यास केला, सगळे उत्तीर्णही झाले पण एकाही विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळाली नाही.
हे मनाला लागलं आणि मी मुलांवर आणखी मेहनत घेऊ लागलो. इंटरनेटवरून अभ्यासाशी संबंधित डाऊनलोड केलेले व्हिडिओ मी शाळेत ऑफलाईन दाखवू लागलो. मुलांचा सराव वाढावा यासाठी भरपूर प्रश्नांची बँकच तयार केली आणि अर्थातच आमच्या प्रयत्नांना यश आले. 2008 साली आमच्या छोट्या शाळेचे विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले. त्यानंतर सलग सात वर्षे गुणवत्तायादीत येण्याचा विक्रम आमच्या शिंदेवस्तीच्या जिल्हा परिषद शाळेने केला.

यामुळे विस्ताराधिकाऱ्यांची शाबासकी मिळाली आणि मग मी तयार केलेली 'क्वेश्चन बँक' आमच्या संपूर्ण बीटमधल्या 60 शाळांसाठी वापरली जाऊ लागली. दरम्यान मला 'ब्लॉग'विषयी समजलं. 2010 साली माझा पहिला ब्लॉग सुरू झाला- http://www.shikshanbhakti.in/ अभ्यास रंजक बनविण्यासाठी काय करावं, कोणते पूरक उपक्रम घ्यावे तसेच शिष्यवृत्ती परीक्षेसाठीच्या प्रश्नपत्रिका मी या ब्लॉगवर उपलब्ध करून दिल्या. या ब्लॉगला महाराष्ट्रातील शिक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला.
कौतुकासोबत शिक्षक मित्रांची तक्रार होती, की ब्लॉगवरच्या प्रश्नपत्रिकांची प्रिंटआऊट काढून मग विद्यार्थ्यांना वाटावी लागते. हे जिल्हा परिषदेच्या शाळेला परवडणारं नाही, याची मला जाणीव झाली. मग मी HTML ही संगणकीय भाषा प्रणाली शिकलो. यानंतर मी थेट ऑनलाईन चाचण्या माझ्या ब्लॉगवर उपलब्ध करून देऊ लागलो. या बहुपर्यायी चाचणीत योग्य पर्यायांवर क्लिक करून प्रश्नपत्रिकेच्या शेवटी ‘सबमिट’वर क्लिक केले की दुसऱ्या मिनिटाला निकाल समोर येतो. यामुळे रोज सुमारे 12 हजार शाळा ब्लॉगला भेट देऊ लागल्या.
पण यासाठी इंटरनेटही गरजेचं असतं. ग्रामीण भागात जिथे 12 तास वीज नसते तिथं इंटरनेट कुठून आणणार, यावर उपाय मिळाला ऑफलाईन चाचण्यांचा. मी जाणीवपूर्वक हे अॅप अॅन्ड्रॉईड प्रणालीसाठी बनवलं. जेणेकरून इंटरनेट असताना शिक्षक त्यांच्या मोबाईलवर हे अॅप डाऊनलोड करू शकतात. आणि मग शाळेत इंटरनेट नसतानाही मुले चाचणी ऑफलाईन सोडवू शकतात आणि त्यांना लगेच त्यांचा निकालही मिळतो. या ऑफलाईन अॅपमुळे 'गुगल इंडिया'ने 2014 साली माझा विशेष सन्मानही केलेला आहे.

- बालाजी जाधव.

Friday, 10 November 2017

'नवी उमेद' - सकारात्मक बदल

आपल्या 'नवी उमेद'ची दखल यंदा दोन महत्वाच्या दिवाळी अंकांनी घेतली. ‘अक्षर’ हा जुना आणि स्वत:ची वेगळी ओळख असलेला, वर्तमान घडामोडींची आवर्जून दखल घेणारा अंक. आणि मिडिया वाॅच हा नवा, तरूण, ताजे विषय हाताळणारा, स्वत:ची ओळख निर्माण करू पाहणारा अंक. या दोन्ही अंकांनी 'नवी उमेद' या आपल्या फेसबुक पेजची सजग दखल घेतली आहे.
बहुतेक फेसबुकनिवासी, फेसबुकचा वापर विरंगुळा म्हणून, मित्रमैत्रिणीशी संपर्कात राहाण्यासाठी, व्यक्तिगत आयुष्यातल्या घटनांचं शेअरिंग करण्यासाठी करतात. याच ‘सोशल मीडिया’चा उपयोग सकारात्मक बदल घडवून आणणा-या, गावोगावच्या बायामाणसांच्या, ख-याखु-या कहाण्या सांगण्यासाठी ‘नवी उमेद’ने केला. त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रतिसाद देणा-यांत आपलाही सहभाग आहे, याचा आम्हाला आनंद आहे.
 


 


 ‘अक्षर’मधला मेधा कुळकर्णींचा आणि 'मिडिया वाॅच'मधला 
 लेख अवश्य वाचा. 'नवी उमेद'चं कौतुक म्हणून नाही. तर हा प्रयोग कसा सुरू झाला, त्यामागचा विचार, युनिसेफची साथ,
आमची टीम, कार्यपद्धती, डिजिटल, सोशल मिडियाकडे आम्ही कसं बघतो - हे सगळं जाणून घेण्यासाठी, आमचे लेख वाचा.
आणि ‘नवी उमेद’ला साथ देत राहाच.
- वर्षा जोशी आठवले, संपादक-समन्वयक
#नवीउमेद
Medha Kulkarni Hemant Karnik Aashay Gune Tanaji Patil Swati Mohapatra Anil Shaligram Amol Deshmukh Amol Saraf Balasaheb Kale Chandrasen Deshmukh Charushila Kulkarni Datta Kanwate Ganesh D. Pol Gitanjali Ranshur Manoj Jaiswal Janhavi Patil Lata Parab Manisha Bidikar Niteen Pakhale Prashant Pardeshi Rajesh Raut Sonali Kakade Suresh Kulkarni Unmesh Gaurkar @Surykant Netake Vijay Palkar Varsha Joshi Athavale

Thursday, 9 November 2017

कुरुंजीतलं गमभन


कुरुंजीच्या मुलांबरोबर हळूहळू ओळख होत गेली. मुलांना शक्यतो कशाही बाबत नाही म्हणायचं नाही, त्यांच्या नजरेतून जग बघायचं असंच ठरवलं होतं.
एका शनिवारी सकाळी कुरुंजीपासून एक किमी अंतरावरच्या त्यांच्या शाळेत गेले होते. साडेदहाला शाळा सुटल्यावर मुलांनी विचारलं, ताई, आज नवन्याच्या घरी जाऊ या का? मी म्हटलं, लांब कुठं चालवत नेऊ नका मला, आणि चढ उतारावर पण नको, मला त्रास होतो चालायचा.
करणनं कुरुंजीच्या विरुद्ध बाजूला मळे गावाकडे हात दाखवून म्हटलं, हे काय इथं आहे, सरळ चालत गेलं की आलं. काय त्रास नाही होणार.
मी हो म्हटल्यावर समीरनं दप्तर कुरुंजीतल्या एका मुलाकडं देऊन, आम्ही ताईंबरोबर फिरायला जातोय असा घरी निरोप दिला. तो निरोप बहुतेक सगळ्या मुलांच्या घरी गेला असावा. (खरं तर ही मुलं सतत कुठं ना कुठं फिरत असतात. त्यामुळं घरी अंधार व्हायच्या आत पोचली तर कुणी फारशी काळजी करत नाहीत.)
तर, नवन्या ( नवनाथ) सोबत होताच, त्याबरोबर समीर, मयूर, साहिल, करण , सार्थक, गंग्या ही मंडळी होती.
पाच मिनिटं चालत गेलो आणि मुलांनी रस्ता सोडून शेतातली वाट पकडली. उताराचीच वाट होती. मी दोनदा धडपडले. करणनं, ताईंचा हात धरा कुणीतरी , असं म्हणे पर्यंत मयूरनं एक चांगली दणकट काठी तोडून आणली, माझ्या हात दिली आणि, धरा ताई, चला आता, असं म्हणत मला मार्गी लावलं.
खाली उतरून गेलो तर अक्षरशः स्वप्नातलं वाटावं असं घर समोर उभं होतं. पूर्ण परिसरात एकच, मातीचं, उतरत्या कौलारू छपराचं घर , भोवती प्रशस्त जागा आणि झाडं!



मुलं पळत घरात गेली. नवनाथच्या घरी नवीन बैल आणला होता. ते त्यांचं उत्सुकतेचं, भेटीचं मोठं कारण होतं. मुलांनी बैल बघितला, बैल या विषयावर भरपूर चर्चा झाली, कुणाचा बैल चांगला, कुणाचा किती किमतीचा, मोठ्या मयूरच्या घरी डोंगरावरच्या धनगरांकडून आणलेला बैल लोकांची सवय नसल्यामुळे कसा अजून बुजतो वगैरे..
एवढ्यात मळे गावात राहणारा नववीतला किरण आला. नवनाथच्या घरावरून जाणारी ही पायवाट म्हणजे त्याच्या घरी जायचा शॉर्ट कट होता. आम्हाला बघून तो पण घरात आला. गप्पा झाल्या.
मुलं म्हणाली, जवळच ओढा आहे तिथं जाऊ या. निघालो. तो ही मोठा उतार. या वेळी किरणनं हाताला धरून मला ओढ्यापर्यंत उतरवून दिलं.



खाली लहानसा सुंदर ओढा होता. फारसा वाहत नव्हता पण मुलांना खेळायला पुरेसा! मुलं उधळली. पाण्यात उतरली. एकमेकांच्या अंगावर पाणी उडवलं. मस्तपैकी भिजली. पाण्यात नाचून झालं.
ओढ्यात अलीकडे मोठे खडक होते. त्यावरून पाणी वाहत आमच्यापर्यंत येत होतं. मुलं त्या खडकांवर चढली. एवढ्यात सार्थकला कपारीत भला मोठा साप दिसला. तो ओरडला. अरे, साप,साप करत मुलं खाली उतरली आणि शहाण्यासारखी चला इथून म्हणत पुन्हा नवन्याच्या घराकडे परत वळाली. रस्त्यात दिसणाऱ्या झाडांबद्दल रनिंग कॉमेंट्री चालूच होती. सापाचा कांदा हे झाड पहिल्यांदा मी बघितलं.
नवनाथच्या घरी पुन्हा! नवनाथ आणि त्याचा भाऊ विश्वास यांनी घरासमोर भाज्या लावल्या होत्या. कौतुकानं त्यानं ती बाग दाखवली. घराच्या मागे देखणा फणस होताच. विश्वासने एक मोठी काकडी (काकडाच होता तो) कापून आम्हा सगळ्यांना खायला दिली. मिरच्यांच्या झाडाला मिरच्या लागल्या होत्या. साहिल म्हणाला, मी मिरची अशीच खातो. विश्वासने एक मिरची दिली. साहिलनं ऐटीत खाऊन दाखवली. विश्वासनं पुन्हा एक काढून दिली. साहिलनं तोंडात टाकली आणि थू थू करत दंगा सुरू केला. भलतीच झोंबरी मिरची होती ती !
भरपूर पाणी पिऊन आम्ही परत कुरुंजीला निघालो.



सकाळी सातला चहा पिऊन घरातून मुलं निघाली होती. काकडीच्या तुकड्याशिवाय पोटात काही गेलं नव्हतं. घरी पोचलो तेव्हा दुपारचा दीड वाजला होता. पण मुलांची एनर्जी तेवढीच होती. पळत, उड्या मारत, एकमेकांना ढकलत मस्त चालत होती. ‘लहान लहान’ गोष्टींचा आनंद घेत होती, असं मी म्हटलं असतं, पण त्या गोष्टी त्यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या आणि मोठ्या होत्या.
मुलांबरोबरचं हे माझं पहिलं फिरणं. यानंतर बरंच फिरलो आम्ही. अजूनही फिरू.
अश्या फिरण्यातून मुलांचं विश्व, त्यांची सूक्ष्म निरीक्षणं, त्यांचे आनंद, त्यांचं एकमेकांमधलं नातं, मैत्री, बांधिलकी, त्यांची काळजी घेण्याची मानसिकता , त्यांची चालण्याची अचाट क्षमता अश्या बऱ्याच गोष्टी समोर येत आहेत.
- रंजना बाजी