नवी उमेदवर सध्या
'चला, मुलगे घडवूया' ही मालिका सुरू होती. मला दोन्ही मुली आणि मला सख्खा
भाऊ नाही. त्यामुळे मुलामुलीतला भेद आमच्या घरी आमच्या वाट्याला आलाच नाही.
घरात मुलगाच नसल्यामुळे जी सो कॉल्ड कामं मुलांनी करायची ती सगळी आम्ही
मुलीचं करत होतो.
आता मात्र माझ्या मुली लहान आहेत आणि आजूबाजूच्या
आयांकडून आणि कित्येकदा मुलांकडूनही मुली हे करत नाहीत, ते करत नाहीत हे
ऐकायला मिळायचं. ही मुलं एकत्र खेळताना मुली नर्स व्हायच्या तर मुलगे
डॉक्टर. एकदा मधे पडून मला सांगावं लागलं की मुलीही डॉक्टर असतात.
नुकतंच धाकटीला एक वाढदिवसाला जायचं होतं. गिफ़्ट आणायला गेलो. दुकानदाराने
लगेच 'लडकेको देना है या लडकीको' असं विचारलं. मुलींसाठी गिफ़्ट दाखवली ती
गळ्यातलं, कानातलं बनवायचं खेळणं, क्विलींगचा सेट, आर्टिफिशियल नखं आणि
दुसरं खेळणं होतं अर्थातच भातुकली. पुन्हा 2 ते 3 दिवसांनी मुलीला पाण्याची
बाटली हवी होती. पुन्हा एकदा तोच प्रश्न - 'बॉटल लडकी के लिये या लडके के
लिये' या वेळी मात्र हा प्रश्न ऐकून त्याला म्हटलं, 'अरे, पाण्याच्या
बाटलीत काय आहे मुलगी आणि मुलगा?' तर दुकानदार म्हणे, 'है ना । लडकीयोंके
लिए पिंक ओर बार्बीकी पिक्चर्सवाली बोटल्स है । ओर लडकोके लिए अव्हेनजर्स,
स्पायडरमॅन । ' हे ऐकूनच खरंतर चिडचिड झाली. त्याला म्हटलं हा फरक तुम्ही
करताय. सगळ्याच मुलींना पिंक कलर, बार्बी आणि भातुकली आवडते असं नाही.
तुम्ही वेगळं काही दाखवलंत तर तेही त्यांना आवडू शकतं.
अशी उदाहरणं
बघितली की वाटतं, हे मुलगा मुलगी प्रकरण इतकं खोलवर झिरपलं आहे की हे
बदलण्यासाठी काय करावं, कसं करावं हा प्रश्नच पडावा.
सरकारी शाळांत मीना राजू मंच हे काम करतो आहे. पण उच्च मध्यमवर्गीय शाळांचं आणि घरांचं काय?
उमेदवर मालिका सुरू केली तेव्हा हैदराबाद प्रकरण ताजं होतं. पोलिसांनी
आरोपींचं एन्काऊंटर केलं तेव्हा काहीजण याविरुद्ध बोलले तर काही लोक
बाजूने. विरुद्ध बोलण्याऱ्या लोकांना गलिच्छ भाषेत सुनवायला कुणालाच लाज
वाटली नाही. आपल्या नावात आईचं नाव लावणाऱ्या काहींनी इथं आपण मनातून कसे
आहोत हेही दाखवून दिलं.
तेव्हा मात्र हे सगळं बदलण्यासाठी काय करायला
हवं हा विचार आमच्या उमेद टीमच्या मनात घोळू लागला. आणि आशय गुणे या उमेद
टीममधल्या समंजस मुलाने 'चला, मुलगे घडवूया' हा विषय सुचवला. टीममधल्या
काहींनी याविषयी लिहिलंच शिवाय उमेदसाठी म्हणून बऱ्याच जणांनी या विषयावर
त्यांच्या घरात काय चर्चा झाली, त्यांच्या घरातील मुलांचे स्त्रियांविषयी
विचार काय आहेत, ते घडवण्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले ते लिहून पाठवलं.
या सगळ्यातून बऱ्याच टीप्स समोर आल्या. ज्यांच्या घरात लहानगी मुलं
मुली दोघेही मोठी होताहेत त्यांच्यासाठी या टीप्स नक्कीच उपयोगी ठरतील.
मुलांशी मोकळा संवाद हवा.
शंका, प्रश्न न टाळता समजतील अशी उत्तरं द्यायला हवीत.
घरात आई बाबा दोघांनी मिळून कामं केली तर मुलांवरही ते बघून असंच करायला हवं हे संस्कार सहज होतात. वेगळं सांगावं लागत नाही.
खेळाबाबतही हे खेळ मुलींचे, हे मुलांचे असं वर्गीकरण न करता मुलालाही भातुकलीची आवड कशी निर्माण होईल हे पाहायला हवं.
वाईट वाटलं, मन भरून आलं तर रडलं तरी चालतं, पण मन मोकळं करायला हवं हे मुलांनाही आवर्जून सांगायला हवं.
मुलांचे मित्रमैत्रिणी कोण हेही पालकांना माहीत हवं.
निर्णयही आईचं मत विचारात घेऊन घेतले जातात हे मुलांसमोर घडायला हवं.
कुटुंबातल्या पुरूषांना सर्व स्त्रियांविषयी आदर असणं. रंगरूपापेक्षा गुण,
कतृत्त्वाला महत्व.
या मालिकेत एकूण 17 पोस्ट्स प्रसिद्ध झाल्या.
पुरुष पालकांपैकी 5 बाबा लोकांनी मालिकेसाठी लिहिलं. तर 9 आयांनी लिहिलं.
विशेष म्हणजे एका आजींनी त्यांच्या नातवंडांविषयीही लिहिलं. मालिकेतलं
सर्वच जण विविध क्षेत्रातले आहेत. काही वकील आहेत, चळवळीतले कार्यकर्ते
आहेत, पत्रकारितेतले आहेत तर डॉक्टर आईही आहेच.
हैद्राबाद रेपवरच्या
प्रतिक्रियांत हे रोखण्यासाठी काय कारावं, कसं करावं यावर चर्चा खूप झाली.
पण, आम्ही पालक म्हणून काय जबाबदारी पार पाडलीये याबद्दल चर्चा व्हायला
हवी असं आम्हाला वाटलं. कारण, आम्ही चांगली बाजू लोकांपुढे आणत असते.
आमच्याच टीममध्ये मृणालिनी, लताचा नवरा संदीप परब, जालन्याचे उमेद
प्रतिनिधी अनंत साळी, नाशिकची चारूशीला, मुंबईची मेघना असे कितीतरी जागरूक
पालक आहेत, हे जाणवलं. त्यांनीही लिहिलं आणि ही मालिका सिद्ध झाली. यातून
नव्या पालकांना मुलं वाढवताना मदत झाली आणि मुलं वयात येणाच्या
टप्प्यातल्या पालकांना दिशा मिळाली हा हेतू साध्य व्हावा, हीच इच्छा.
- वर्षा जोशी - आठवले