Thursday 27 December 2018

पुदिना ताकाची चवच न्यारी

संगमनेरला (जि.अहमदनगर) येणारी प्रत्येक व्यक्ती हमखास नगर रस्त्यावरील स्पेशल पुदिनायुक्त ताकाचा (मठ्ठा) आस्वाद घेतेच. जाता-जाता सोबत पार्सलही घेऊन जाते. सहा वर्षांपूर्वी येथील विजय एकनाथ गुंजाळ यांनी ताकविक्री सुरू केली. आज त्यांच्या पुदिनायुक्त ताकाची ओळख लांबवर पसरली आहे. 
शहरालगत वडिलोपार्जित एक एकर जमीन. राजेश, अजित आणि विजय या तीन भावात जमिनीची सामायिक मालकी. या जमिनीत त्यांनी शेवग्याची लागवड केली आहे. त्यातच, आंतरपीक म्हणून पुदिनाही लावला आहे. त्याचाच वापर ते ताकासाठी करतात.
या छोट्या जमिनीच्या तुकड्यात काय भागणार? मग, वडील मजुरी करायचे. आणि तिघा भावांनी वेगवेगळ्या मार्गाने रोजगार शोधण्याचा प्रयत्न केला. मोठा भाऊ राजेश नगरपालिकेत कार्यालयीन निरीक्षक. मधला विजय. धाकटा अजित भाजीपाला खरेदीविक्रीच्या व्यवसायात. विजय बारावी शिकलेले. त्यांनी 2007 ते 2009 या काळात सेंद्रीय, कंपोस्ट खत तयार करुन त्याची विक्री केली. मात्र, त्यात फारसा जम बसला नाही. त्यांनी 

2012 मध्ये संगमनेरच्याच राजहंस दूध संघाकडून दूध, ताक विक्री आणि अन्य उत्पादनांच्या वितरणाचं काम घेतलं. तेव्हापासून त्यांनी संगमनेर रस्त्यावर ताकविक्रीचं दुकान सुरु केलं. तिथेच प्रयोग म्हणून त्यांनी पुदिनायुक्त ताक विकायचा निर्णय घेतला. विक्री सुरु केली आणि लोकही प्रतिसाद देऊ लागले. 
गुंजाळ यांची, आता संगमनेर भागात पुदिनायुक्त ताकविक्रीतून वेगळी ओळख निर्माण झाली आहे. या भागात पुदिनायुक्त ताक फक्त गुंजाळ यांच्या दुकानातच मिळतं. सुरूवातीला, दररोज साधारण पाच ते दहा लिटर ताकाची विक्री व्हायची, त्यात हळूहळू वाढ झाली. आता, दर दिवसाला साधारण शंभर ते दीडशे लिटर ताकाची विक्री होते. उन्हाळ्यात या ताकाला अधिक मागणी असते. उन्हाळ्यात दिवसाला तीनशे लिटरपर्यत विक्री जाते. आता विजय यांना कुटुंबातले सदस्यही मदत करू लागले आहेत.
ताकात वापरण्यासाठी पुदिन्याचा रस सुरुवातीला मिक्सरमधून काढला जायचा. पाच वर्षापूर्वी रस काढण्यासाठी 27 हजार रुपये खर्च करुन मशीन घेतलं आहे. दररोज साधारण
तीन ते चार किलो पुदिन्याचा रस ताकासाठी लागतो.
पुदिनायुक्त ताकामुळे पचनाला फायदा होतो. डोकं दुखणं थांबतं, उचकी थांबते. त्वचाविकारावर, वजन कमी होण्यासाठी, पोट साफ राहण्यासाठी, चरबी कमी करण्यासाठी हे पेय फायदेशीर आहे, असं गुंजाळ सांगतात.
"शेतीचं क्षेत्र कमी असल्याची अनेकांना खंत असते. त्यात पाणी नाही. दुष्काळामुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. मी मात्र एकरभर क्षेत्रातून प्रगती साधण्याचा प्रयत्न केला. मला त्यात यशही आलं. पुदिनायुक्त ताकविक्रीची या भागात सर्वप्रथम मी सुरुवात केली. आजे हे ताक लोकप्रिय झालं आहे. या सगळ्यात धडपड महत्वाची असते”, असं विजय गुंजाळ सांगतात.''

- सूर्यकांत नेटके.

होममेकर्स ते बसमेकर्स

रत्नागिरीतील एसटीची विभागीय कार्यशाळा. एसटीचा मेकॅनिक विभाग म्हणजे पुरूषांची मक्तेदारी. एसटी महामंडळाची गाडी एक महिला दुरूस्त करू शकते, यावर पटकन विश्वास बसणार नाही. पण इथं, कार्यशाळेत हातात पाना, स्क्रू-ड्रायव्हर, हातोडा, ऑईल घेऊन काही महिला बसेसची दुरूस्तीे करतात. तब्बल 17 महिला मेकॅनिक गेल्या नऊ दहा वर्षापासून हे काम करत आहेत. 
मुळात एसटीच्या मेकॅनिक विभागात दाखल होण्याची महिलांची मानसिकता नसते. कारण इथं करावी लागणारी अंगमेहनत. यामुळे या क्षेत्रात महिलांचा ओघ कमी असतो. मात्र, अलिकडे बदल घडतोय. रत्नागिरीत, या एसटी दुरूस्ती 
कार्यशाळेत अतिशय महत्त्वाचा मानला जाणारा ब्रेक सेक्शनही महिला मेकॅनिक हाताळतात.
या 17 महिलांना यंत्रअभियंत्यांनी त्यांच्या कौशल्यानुसार कामाची विभागणी करून दिली आहे. सकाळी 8 ते 4.30 पर्यंत या महिला वर्कशॉपमध्ये काम करतात. एसटीवर शेकडो प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असते. त्यामुळे एसटीच्या देखभालीचं काम काळजीपूर्वक आणि जबाबदारीनेच करावी लागतं.
नवीन टायर बसवणं, जिनेदुरूस्ती, बेअरींग बदलणं, बॉडीची दुरूस्ती करणे अशी कामं या महिला सहजतेने करताना दिसतात. गेली 37 वर्षे काम करणाऱ्या एसटी
कर्मचाऱ्यांसोबत, त्यांचं मार्गदर्शन घेत गंधाली सावंत हे काम आनंदाने करते आहे. घरची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पदवी घेतल्यावर ती एसटीच्या मेकॅनिक विभागात रूजू झाली. आज गंधाली या कार्यशाळेत फास्ट मेकॅनिक म्हणून ओळखली जाते.
वर्कशॉपमध्ये ब्रेकलाईन तपासण्याचं काम सर्वात महत्त्वाचं आणि मानसिक तणावाचं मानलं जातं. मात्र त्या ठिकाणी सुध्दा गेली 11 वर्षे स्मिता शिंदे प्रामाणिकपणे काम करत आहेत. ब्रेक सेक्शन हा खूप किचकट विभाग. इथं मन एकाग्र ठेवूनच काम करावं लागतं. त्यामुळे, स्मिता शिंदेच्या कामाला दाद दिलीच पाहिजे, असं अधिकारी म्हणतात. या मेकॅनिक महिला कुटुंब, संसार, मुलं या जबाबदार्‍या सांभाळून काम करत आहेत.
सुरूवातीला, जेव्हा या महिला मेकॅनिक म्हणून एसटी वर्कशॉपमध्ये हजर झाल्या तेव्हा या महिला एसटी दुरूस्तीचे काम कसे करणार, अवजड पार्टस् कसे उचलणार हे प्रश्न आमच्यासमोर होते. मात्र पहिल्याच दिवशी या महिलांनी आपली जिद्द आणि कष्ट दाखवताच आम्ही सारे अवाक झालो. त्यामुळेच, आम्हाला त्यांना सहकार्य करायला आनंद वाटतो, असं वर्कशॉपमधील ज्येष्ठ मेकॅनिक राजेश मयेकर यांनी सांगितलं.
या वर्कशॉपमध्ये स्मिता शिंदे, रसिका गावडे, दिप्ती झेपले, अन्वी चव्हाण, श्रध्दा नीमगरे, मंजिरी पुजारे, शीतल शिंदे, ऋत्विका शिगवण, शलाका सुर्वे, सुजाता कोकरे, सानवी खानविलकर या महिला मेकॅनिक कार्यरत आहेत. ब्रेक सेक्शन, इंजिन सेक्शन, मशिन, बॉडी, डीडब्लू, सबस्टोअर, फ्रंट, गियर बॉक्स या विभागांत त्या काम करतात. कोणालाही अभिमान वाटावा, असंच त्यांचं काम. 

- जान्हवी पाटील.

भारत - पाकिस्तानातल्या विद्यार्थ्यांनी एकमेकांशी केलेली कमिटमेंट

'‘भारत माझा देश आहे, ही प्रतिज्ञा आपण दररोज शाळेत म्हणतो. परतु, खरंच देशासाठी आपण काय करतो? हा प्रश्न मला सतत अस्वस्थ करायचा. या अस्वस्थतेतून शालेय मुलांना भारत-पाक शांततेसाठी एकत्र आणायचं, ही कल्पना सुचली''. डिसले सर सांगतात. ''दोन्ही देशातील बंधुभाव वाढावा, यासाठी काम सुरू केलं. मायक्रोसॉफ्ट कंपनीकडे तसा प्रस्ताव पाठवला. त्यांच्याकडून टेक्निकल मदत मिळाल्यानंतर, व्हॉट्सअपच्या माध्यमातून लिंक तयार केली आणि या प्रकल्पात देशभरातील शाळांचा सहभाग नोंदवला.''

हे रणजितसिंह डिसले, ध्येयवेडे प्राथमिक शिक्षक, परितेवाडी इथल्या जिल्हा परिषद शाळेतले. तालुका माढा. जिल्हा सोलापूर. त्यांच्या्च कल्पनेतला ‘लेट्स क्रॉस द बॉर्डर’ हा प्रकल्प मूर्त स्वरूपात आला. या प्रकल्पाला भक्कम साथ लाभली ती मायक्रोसॉफ्ट कंपनीसह व्हॉट्सअप, स्काईप या समाजमाध्यमांची. 
'भारत आणि पाकिस्तान, दोन्ही देश धर्माच्या नावावर वेगळे झाले असले, तरी या दोन्ही देशांमध्ये कला, संस्कृतीत बरंच साम्य आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तानात सांस्कृतिक देवाणघेवाण वाढली पाहिजे'. हे मत व्यक्त केलं, दोन्ही देशातल्या काही भावी नागरिकांनी.
भारत आणि पाकिस्तानमध्ये, शांततामय संबंध प्रस्थापित करण्यासाठी तयार झाली आहे 'शांतीसेना'. सुरूवातीला, 5 हजार शांततासैनिक तयारही झाले आहेत. हे सारं घडलं, कोणत्याही सरकारी हस्तक्षेपाशिवाय. मायक्रोसॉफ्टतर्फे या प्रकल्पाला देशातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक प्रकल्प म्हणून नुकतंच दिल्लीत गौरवण्यात आलं.
या उपक्रमात भाग घ्यायची तयारी 580 शाळांनी दर्शवली. महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, पंजाब, आंध्रप्रदेश अशा वेगवेगळ्या राज्यातील 148 शाळांची प्रकल्पासाठी निवड केली. प्रकल्पात महाराष्ट्रातल्या चार शाळा. सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी आणि आकूंब या दोन जिल्हा परिषद शाळा, पुणे जिल्ह्यातील जांभूळदरा येथील जिल्हा परिषद शाळा आणि कोल्हापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय.
पाकिस्तानातूनही इस्लामाबादमधील रूट इंटरनॅशनल स्कूल, लाहोरचे मरिहा जेएआयन स्कूल या दोन मोठ्या शैक्षणिक संस्थाच्या 148 शाळांचा सहभाग. तिकडे प्रकल्पासाठी रजा वकास, हयात जहान बेग, पुरशरा लक्वी, मुस्तफा रजव्हा, अशफाक वकास या शिक्षकांनी पुढाकार घेतला.
1 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2018 या सहा आठवड्यांच्या कालावधीत या प्रकल्पाचा पहिला टप्पा पार पडला. पहिल्या आठवड्यात, स्काईपद्वारे दोन्ही देशातल्या मुलांचा प्रत्यक्ष संवाद. दुसऱ्या आठवड्यात, मुलांनी एकमेकांच्या देशातील साम्य आणि फरक यावर चर्चा केली. तिसऱ्या आठवड्यात जगातील दहा शांत देशातील शिक्षकांना ‘ग्लोबल स्पीकर’ म्हणून ऑनलाईन लाईव्ह निमंत्रित करण्यात आले. त्यात ऑस्ट्रियातील सुसान गिलका, फिनलंडमधील पेक्का ओली, कॅनडातील वर्बितो नेगी, आयर्लंडमधील मेकील पेस्तो, जपानमधील नियो होरियो यांच्यासह डेन्मार्क, न्युझीलंड, पोर्तुगालमधील शिक्षकांनी मार्गदर्शन केलं. चौथ्या आठवड्यात भारत आणि पाकिस्तानमधील सैन्यांत संघर्ष का होतो, यावर मुलांनी चर्चा केली. पाचव्या आठवड्यात दोन देशातील संघर्ष आपण कसा थांबवू शकतो, याबाबत विद्यार्थ्यांनी आपली मतं मांडली. शेवटच्या सहाव्या आठवड्यात, भारत-पाकिस्तानचे संबंध शांततापूर्ण राहण्यासाठी मी काय करणार आहे, याबाबत एकमेकांशी ‘कमिटमेंट’ केली आहे. मुलांनी काही उपायही सुचवले. दोन्ही देशातील बातम्या आवर्जून बघायच्या असंही मुलांनी ठरवलं.
या प्रकल्पात सहभागी झालेल्या पाच हजार विद्यार्थ्यांना ‘पीस आर्मी’चं प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. हा प्रकल्प 2030 पर्यंत चार टप्प्यात होणार आहे. त्यात 50 हजार विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतलं जाणार आहे. दुसरा टप्पा फेब्रुवारी ते एप्रिल 2019 मध्ये असेल. या टप्प्यात दोन्ही देशातील प्रत्येकी 200 शाळा सहभागी होणार आहेत. गेल्या 70 वर्षांत युद्ध, तणाव या शिवाय दोन्ही देशांनी काहीच बघितलं नाही. युद्धाने किंवा चर्चेने प्रश्न सुटत नसतात, तर दोन्ही देशातील नगारिकांमधील संवादानेच ही दरी मिटेल, असा विश्वास या प्रकल्पात सहभागी शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.
- नितीन पखाले

माझी शाळा दप्तरमुक्त झाली, तुमच्या शाळेचं काय ?

जेवणाचा डबा, वॉटरबॅग आणि एक वही. मुलांच्या दप्तरात एवढंच सामान असलेली ही शाळा आहे, जुन्या जालन्यातील मराठी कन्यापाठ शाळा. पहिली ते चौथीपर्यंतची ही शाळा. दफ्तरमुक्त शाळेची संकल्पना शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. परिक्षित देशपांडे यांची. शालेय व्यवस्थापन समितीचे अडव्होकेट रावसाहेब देशपांडे,अविनाश देशपांडे, अडव्होकेट प्रदीप कोठीकर,सिध्दीविनायक मुळे, शुभदा देशमुख यांनीही संकल्पना उचलून धरली. शाळा दप्तरमुक्त करण्याचं ठरलं. पालकांचा मेळावा घेऊन त्यांना माहिती देण्यात आली. वरच्या वर्गात गेलेल्या विद्यार्थ्यांची पुस्तकं मागून घेण्यात आली आणि ती मुलांना घरी देण्यात आली. मुलांची नव्या इयत्तेची पुस्तकं शाळेत जमा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या नावाच्या बॉक्समध्ये ती ठेवण्यात आली. वर्गपाठाच्या वह्या वर्गातच ठेवल्या. 
उद्योजक सुनील रायथट्टा यांनी 127 बॉक्स दिले. तर बॉक्स ठेवण्यासाठी लोखंडी मजबूत रॅक डॉ. परिक्षित देशपांडे यांनी दिले. त्या त्या वर्गात हे रॅक ठेवण्यात आले. प्रत्येक बॉक्सवर विद्यार्थ्यांच्या नावाचे स्टिकर लावण्यात आले. आता मुलं शाळेत ही वह्यापुस्तकं वापरतात आणि घरी जाताना बॉक्समध्ये ठेवतात. त्यामुळे दुसरीचा एक वर्ग ,तिसरीचा एक वर्ग,आणि चौथीचे दोन वर्ग दफ्तरमुक्त झाले.
उपक्रमाला चार महिने झाले असून पालकांनाही हा उपक्रम आवडला आहे. मुलांचं पाठीवरचं ओझं कमी झालं. शाळेत ठेवण्यात आलेली पुस्तकं चांगल्या स्थितीत राहत असल्याचं लक्षात आलं आहे. वह्या पुस्तक हरवणं ,खराब होणं याबाबतची चिंता कमी झाली.तीच पुस्तके पुढील वर्षी विद्यार्थ्यांकडून मागून घेतली जातील. त्यामुळे पुस्तकं पुढील वर्षी मुलांना कामी येतील हे एक समाधान. दप्तर आवरणं ,बॅगा सांभाळणं हे काम कमी झालं.
राहिला प्रश्न मुलं गृहपाठ कसा करतील? यावरदेखील रामबाण उपाय काढण्यात आला. विद्यार्थ्यांनी एकच वही वापरायची. त्या वहीत एक रेघी, दुरेघी,चार रेघी आणि बॉक्स अशा चारही प्रकारची पाने असतात.वर्गात शिकवलेलं याच वहीत लिहायचं तर गृहपाठासाठी दिलेला अभ्यास याच वहीत करून आणायचा. शिक्षकांनाही एकाच वहीत वर्गापाठ - गृहपाठ असल्यानं मुलांच्या अभ्यासावर लक्ष ठेवणं सोपं झालं.
मीही या शाळेचा विद्यार्थी. शाळेच्या उपक्रमाचा मला अभिमान असून मीही यात खारीचा वाटा उचलणार आहे.
इतरही शाळातील माजी विद्यार्थी,उद्योजक,समाजसेवी,व्यवस्थापन समितीने हा उपक्रम राबवण्यासाठी भरघोस मदत केली तर कदाचित विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं लवकरच कालबाह्य होईल. माझी शाळा दप्तरमुक्त झाली, तुमच्या शाळेचं काय ?
-अनंत साळी .

जेव्हा मुलं वसतिगृहाविना थांबतात

राज्यात सध्या बालरक्षकाची चळवळ वेगाने काम करीत आहे. बालरक्षक ही शासन व्यवस्थेतील अशी संवेदनशील व्यक्ती आहे, जी प्रत्येक मूल शाळेत यावे म्हणून कार्यरत आहे. शाळाबाह्य मुलं शोधून काढणे, ती शाळेत यावीत म्हणून पालकांचे प्रबोधन करणे आणि त्यांना शाळेत दाखल करून दर्जेदार शिक्षण मिळेल, यासाठी 'बालरक्षक' सातत्याने प्रयत्न करतात. 
जालना जिल्ह्यातील काही गावांमधून मोठ्या प्रमाणात उदरनिर्वाहाकरिता दरवर्षी लोकांचे स्थलांतर होते. पोटापाण्यासाठी होणाऱ्या या स्थलांतरात कमावत्या व्यक्तींसोबत संपूर्ण कुटुंबाचीच फरफट होते. त्यामुळे या स्थलांतरात मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून
हंगामी वसतिगृहाची योजना सुरू करण्यात आली होती, मात्र या हंगामी वसतिगृहांमुळे मुलांचं स्थलांतर पूर्णपणे थांबलं नाही. मुलांचं स्थलांतर थांबवायचं असेल तर त्यांच्या पालकांना शिक्षणाचं महत्त्व पटवून, जबाबदारीचं भान देणं हाच विद्यार्थी स्थलांतर थांबविण्याचा मूलभूत उपाय आहे, याची जाणीव झाली.

म्हणूनच समता कक्ष, पुणे यांनी शालेय शिक्षण विभागाचे प्रधानसचिव नंदकुमार ऑगस्ट 2017 मध्ये जालना जिल्ह्यातील बालरक्षक आणि अधिकाऱ्यांची पुण्यात एक कार्यशाळा घेतली. याच कार्यशाळेत जालना जिल्ह्यातील मुलांचं स्थलांतर विना वसतिगृह थांबविण्याचा निर्णय बालरक्षकांनी घेतला. 
या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वात जिल्हा बालरक्षक टास्क फोर्स तयार करण्यात आला. ज्यात बालरक्षक, पोलीस अधिकारी, महिला आणि बालकल्याण विभागाचे अधिकारी, जिल्हा कामगार, समाजकल्याण तसेच विधी अधिकारी, प्राथमिक आणि माध्यमिकचे शिक्षणाधिकारी, डीआयइसीपीडीचे सर्व संपर्क अधिकारी इ.चा समावेश आहे.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी 2 ऑक्टोबरच्या महात्मा गांधी जयंतीनिमित्त होणाऱ्या ग्रामसभेमध्ये स्थलांतराच्या अनुषंगाने चर्चा घडवून आणण्यास सांगितलं. पालकांनी मुलांना कामावर सोबत न नेता शिक्षणासाठी गावातच ठेवावं, असं आवाहन करण्याच्या सूचना दिल्या. स्थलांतर होणाऱ्या गावांची यादी काढून ज्या गावात पाचपेक्षा अधिक मुलांचं स्थलांतर होत आहे, अशी 240 गावं निवडली. ज्या गावात सर्वाधिक स्थलांतर होते, तेथील ग्रामसभेला डीआयईसीपीडीचे अधिकारी, जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित राहून पालकांनी मुलांना कामावर सोबत न नेता, चांगल्या शिक्षणासाठी गावातच ठेवण्याचं आवाहन केलं.
स्थलांतरित होणाऱ्या पालकांच्या प्रबोधनासाठी 23 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2017 या कालावधीत जालना डीआयइसीपीडी, शिक्षण विभाग आणि विद्या प्राधिकरण पुणेच्या समता विभागाच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी नूतन मघाडे यांनी ज्या गावात सर्वाधिक स्थलांतर होते, त्या ठिकाणी सुसंवाद सभा घेतल्या. पालकांच्या अडचणींवर चर्चा केली. पालक जिथे कामाला जाणार आहेत तिथली असुरक्षितता, कामामुळे मुलांकडे होणारे दुर्लक्ष, त्यांना न देता येणारा वेळ आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यामुळे मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान याबाबत पालकांशी संवाद साधला आणि त्यांना मुलं शिक्षणासाठी गावातच नातेवाईकांकडे ठेवण्याचा आग्रह केला.
परिणामी जालना जिल्ह्यात 2017-2018 या शैक्षणिक वर्षात 5310 मुले ही वसतिगृहाशिवाय थांबविण्यात यश मिळालं आहे. त्यामुळे या वर्षी हंगामी वसतिगृहासाठी तरतूद केलेल्या प्रस्तावित तीन कोटींच्या निधीची बचत झाली आहे. एकही हंगामी वसतिगृह न चालविता आजी- आजोबा, काका- काकू, मामा- मामी आणि इतर नातेवाईकांकडे किंवा प्रसंगी शेजाऱ्यांकडे विद्यार्थी शिक्षणासाठी थांबले. 
- डॉ. प्रकाश मांटे.

मुलांच्यासोबत वाढताना आपण फक्त माणूस आहोत, ही भावना अधिक चांगली वाढीस लागते

बाबाचं मनोगत : 
सुनील आणि संगीताने त्यांच्या मुलाच्या - अर्हाच्या जन्माआधीपासूनच नियोजन केलं होतं. संगीता पहिल्यापासून सामाजिक कामांशी जोडलेली आहे. आयडेंटी फाऊंडेशनची ती विश्वस्त म्हणून काम पाहते. सुनीलसारखाच तिच्या ही कामाचा पिंड थोडा फिरस्तीचा. कामाचे हे स्वरुप आणि आर्थिक गरज लक्षात घेऊन त्यांनी लग्नानंतर पाच वर्ष स्वत:ला दिली आणि त्या काळात थोडी आर्थिक घडी बसवून मगच बाळाचा निर्णय घेतला. बाळ आपल्याला होणार आहे तर आपणच सांभाळ करायचा इतका साधा निर्णय; पण तो दोघांनी मिळून घेतला. 
संगीताचा आठवा महिना संपला. आणि ती ऑफिसमध्ये असतानाच अचानक पोट दुखू लागले आणि रात्रीच्या वेळेस बाळंतीण झाली. प्रिमॅच्युअर डिलीव्हरी. अचानक झालेल्या या बाळंतपणाने सुनीलही घाबरला. बाळाला काचेच्या पेटीत ठेवावं लागलं. दहा दिवसानंतर बाळ - बाळंतीण सुखरूप घरी आले. त्याच सुमारास सुनील प्रभातमध्ये रूजू झाला होता. संगीताला बाळंतपणाची सहा महिन्यांची सुट्टी होतीच. त्यामुळे एक रूटीन तयार करायला दोघांनी या वेळेचा वापर करून घेतला. 
सुनील सांगतो, "पहिले सहा महिने ती सुट्टीवर होती. त्यामुळे बाळाला पूर्ण वेळ ती सोबत होतीच. मीही संपादकांशी बोलून माझी कामाची वेळ बदलण्याची विनंती केली. दैनिकाला आवश्यक असणाऱ्या बातम्या आणि इतर जबाबदाऱ्या वेळेवर पूर्ण करेन, या हमीवर ऑफिसही तयार झालं. ऑफिसकडून जर नकार आलाच असता, तर मी नोकरी सोडायची तयारी ठेवली होती. कारण त्या क्षणी बाळाचं संगोपन महत्त्वाचं होतं. पण तसं घडलं नाही. याच काळात त्याची स्वच्छता कशी राखायची, त्याच्याशी कसं बोलायचं, खेळायचं हे समजून घेत होतो. संगीताने मानसशास्त्राशी संबधित कोर्सेस केले होते. शिवाय तिचं काम मुलांसोबतच होतं त्यामुळे तिच्या सूचना मी नीट मनापासून ऐकत होतो. साधारण तो तीनेक महिन्यांचा झाल्यावर मी तीन चार तास सलग त्याला सांभाळू लागलो. संगीताशिवाय त्याला सांभाळता येतं का? आपलं बाळ राहतं का? हे आम्ही पाहत होतो. मग हळूहळू संपूर्ण दिवस ती दिसणार नाही, असं पहायचो. आईचंच दूध त्याला वाटी चमच्याने पाजू लागलो. अर्हा सहा महिन्यांचा झाला आणि माझी व अर्हाची स्वतंत्रपणे गट्टी जमण्याचा काळ सुरू झाला. 
संगीता सकाळी 8 ते दुपारी अडीच बाहेर. ती परतल्यानंतर सुनील ऑफिसला जातो. अर्हा आता दोन वर्षांचा झाला आहे. मात्र, हे रूटीन कायम आहे. संगीता सकाळी फक्त स्वयंपाक करून जाते. त्यानंतर भांडी-कपडे, घरची स्वच्छता आणि पूर्णवेळ अर्हाचं संगोपन हे काम सुनीलच्या खात्यात असतं. 
सुनील सांगतो, "फीडींग सोडलं तर जे काही संगीता अर्हासाठी करू शकते. ते सारं मी करतो. सुरुवातीला, मला ते सारं शिकावं लागलं. संगीताकडून ट्रेनिंग मिळत होतं आणि मी तसं तसं करत होतो. पहिल्यापासूनच अर्हाबरोबर भरपूर गप्पा मारायचो. त्याला एकटं वाटू नये म्हणून त्याच्या नजरेसमोर राहत होतो. तंत्रज्ञान हे खूप मोठं वरदान वाटतं. मी त्याच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यात गुगलवर माहिती घेत होतो. बाहेरच्या देशांत ‘पालकत्वा'वर बरंच संशोधन, अनुभवपर लेखन झालंय. ते सारंच आपल्या मुलांना लागू होईल, असं नव्हे. पण त्यातील जेजे आपल्यासाठी शक्य आहे त्याचा अवलंब मी अर्हासाठी करत होतो. रात्री झोपताना बडबडगीते, गाणी म्हणतच झोपायचं. तोतरं न बोलता स्पष्ट बोलायचं. गोष्टी वाचून दाखवायच्या, चित्रं पहायला लावायची, असा सारा दिनक्रम आम्ही सेट केला. त्याच्या कुतूहलाला कायम जागं ठेवलं. बाबा हे काय? बाबा ते काय? या त्याच्या प्रश्नांना मी कधीच कंटाळत नाही. तंत्रज्ञानाचा आणखी एक फायदा झाला ते म्हणजे मोबाईलवर बातम्या टाईप करणे. किमान माहिती मिळवण्यासाठी फोनवर बोलता येणे. अर्हाला दुपारी 1 वाजता झोपायची सवय लावली त्यामुळे पुढच्या तासभरात मी माझ्या कामाचा काही भाग करून घेऊ शकतो. संगीता आल्यानंतर तो जागा होतो आणि मग दोघं पुढचा वेळ सोबत असतात.''
सुनील व संगीता परस्परसंवाद करताना अर्हाही त्यांच्या बरोबरीचा आहे, अशा रितीनेच बोलतात. घरकामातील एकमेकांना मदत करण्याची वृत्ती, पुस्तक घेऊन वाचणं असं तो या दोघांना पाहून शिकत आहे. बाळाच्या वाढीत बाबाचा सहभाग सुनीलला शंभर टक्के महत्त्वाचा वाटतो. सुनीलने पालकत्त्वाच्या बाबतीत एक उत्तम विचार मांडला. तो म्हणतो, "अर्भकावस्थेत बाळाला समोरची व्यक्ती आई की बाबा असं कळत नसतं. आपण म्हणजे त्यांच्यासाठी त्याची काळजी, प्रेम करणारी आणि भीतीच्या वेळेत सोबत असणारी व्यक्ती इतकंच त्यांना कळत असतं. त्यामुळे आपण त्याच्यासोबत वावरताना आपल्या डोक्यातील जेंडरच्या कल्पना पुसून टाकाव्यात. खरंतर मुलंच त्या पुसून टाकतात. मुलांच्यासोबत वाढताना आपण फक्त माणूस आहोत, ही भावना अधिक चांगली वाढीस लागते. अर्हाने त्या अर्थाने माझं माणूसपण जागं केलं असं मला सतत जाणवत राहतं.”
सुनील राऊत.
- हीनाकौसर खान-पिंजार

बाबाचं मनोगत : बाप असल्याचा आनंद बाळाच्या सोबतीतच मिळू शकतो


विशाल पोखरकर सध्या शिक्षणविषयक विशेषांक प्रसिद्ध करत आहे. विशालचा पिंडच मुळी अभ्यासू. त्यामुळे, घरात बाळ येणार म्हटल्यावर याने बालसंगोपनाशी संबंधित तीसेक पुस्तक वाचून काढली. आयुर्वेदीक ते अॅलोपॅथीक, मानसिक आरोग्य ते बाळ कसं सांभाळावं अशी सगळ्या तऱ्हेची. पालकत्वासाठीची इतकी सजग तयारी करणारा विशाल विरळाच. विशालची पत्नी आरजू. तिला जेव्हा गुड न्यूज कळाली, तेव्हाच दोघांनी बाळसंगोपनासाठी आपल्यालाच सज्ज व्हायचंय, हे ठरवून टाकलं. विशाल सुरुवातीलाच सांगतो, "बालसंगोपन ही अति काळजीची गोष्ट आहे असं एक वातावरण तयार केलं जातं आणि ते आपल्याला जमेल का अशी भीती-धास्ती निर्माण केली जाते. सोबतच अंधश्रद्धाही येतात. बाळाची पाचवी, बारावी किंवा मग तीट लावा, दृष्ट काढा. पण हे सारं टाळायचं, हे आम्ही आधीच ठरवलं होतं. शिवाय आरजूचं माहेर आटपाडी, माझं गाव मंचर. त्यामुळे पुण्यात अधिक सोयी मिळतील, हा विचार करून इथंच बाळंतपण करायचं, हे आम्ही सुरुवातीलाच ठरवलं. तेव्हाच आम्हाला हेही माहीत होतं 


की बाळाची देखभाल करायला, तिसरा माणूस सोबत नसणार." 
"माझी आई शेतकरी आणि आरजूची आईदेखील नोकरी करणारी. त्यापैकी कुणीही पूर्णवेळ आमच्यासोबत राहू शकत नव्हते आणि आम्हालाही, त्यांनी त्यांचं रुटीन हलवून वेळ द्यावा अशी अपेक्षा नव्हती.'' 
आरजूच्या पोटात दुखू लागलं, त्यावेळेस विशाल, त्याचे दोन मित्र व दोन मैत्रिणी यांनी तिला प्रसूतीगृहात नेले. विशाल पूर्ण वेळ आरजूसोबत लेबर रूममध्ये होता. आरजूच्या कळा तर घेता येणार नाहीत, पण किमान त्या अवस्थेत आपण तिच्यासोबत आहोत, ही भावना तिच्यापर्यंत पोहचावी, यासाठी विशालचा हा आटापिटा होता. बाळ आणि बाळंतीण तिसऱ्या दिवशी सुखरूप घरी आले. आणि चक्क तीन दिवसाच्या बाळाला विशालने आंघोळ घातली. विशाल म्हणतो, "तोपर्यंत इतकं लहान बाळ हातात घ्यायचीसुद्धा मला भीती वाटायची. पण बाळाची जबाबदारी घ्यायची, हे ठरवलं तेव्हा, आंघोळीपासून सारं करायचं मनात होतं. माझी आणि आरजूची आई घरात होत्या. पण त्यांना कटाक्षाने सांगितलं की, तुम्ही घरातलं काहीही काम करा. पण बाळाचं काम मीच करणार. तुम्ही काही दिवस कराल पण पुढं आम्हालाच करायचं आहे. तेव्हा मला तुमच्या देखरेखीखाली ते सारं शिकू द्या.'' 
आई आणि सासूला अशी तंबी दिल्यावर विशालने आपल्या शिक्षणाला सुरूवात केली. ती अशी, बाळाच्या- अर्शलच्या तिसऱ्या दिवसापासूनच. बाळसंगोपनाच्या पुस्तकांतली माहिती, त्यातील विसंगती, प्रत्येक अनुभवकर्त्याचे भिन्न अनुभव असं सारं गाठीशी ठेवून विशाल तारतम्याने बाळ-बाळंतिणीची काळजी घेऊ लागला. अर्शलला मालीश करणे, आंघोळ घालणे, शी-शू काढणे, त्याचे कपडे धुणे ही सारी कामं तो शिस्तीने करू लागला. महिन्याभरानंतर, आरजूच्या मदतीने दोघांसाठी स्वयंपाक करून, अर्शलची आवराआवर करून तो ‘सुगावा’ मासिकात कामावर जाई. संध्याकाळीही पुन्हा तो बाळाच्या देखभालीत वेळ घालवू लागला. अर्शल सहा महिन्यांचा झाल्यानंतर आरजूने नोकरीवर रूजू होणं भाग होतं. आता मुख्य अडचण येणार होती. विशाल सांगतो, "आमच्यासाठी ती अडचण नव्हतीच कारण आम्हाला पहिल्यापासून हे माहीत होतं की, आमच्या कामाच्या वेळा सांभांळाव्या लागणार. आम्ही काही तासांसाठी अर्शलला पाळणाघरात ठेवायचा निर्णय घेतला. अर्शलला दुपारी 1 च्या सुमारास तिथं सोडायचं आणि संध्याकाळी सहा वाजता आणायचं असं ठरलं. आरजू सकाळी स्वयंपाक करून साडेनऊला बाहेर पडायची. त्यानंतर अर्शलसाठी गरमगरम वरणभात करणं किंवा इतर काही पदार्थ शिजवणं, त्याची स्वच्छता, आंघोळ, औषधपाणी असं सारं मी करू लागलो. त्यासोबत खेळणं, उड्या मारणं, मस्ती घालणं यात आम्ही दोघं पक्के मित्र आहोत. अशाप्रकारे पाळणाघरात सोडेपर्यंतचा पूर्णवेळ त्याच्यासोबत घालवतो.
आज अर्शल पंधरा महिन्यांचा आहे. आता, तो आमच्या हालचालींकडे बारकाईने लक्ष देऊ लागला आहे. संस्कार हा ‘बिंबवण्याचा' प्रकार नसतो, हे त्याच्यामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झालं. साधं उदाहरण म्हणजे, आम्ही एका रॅकवर चार भाग केले आहेत. ज्यात पुस्तकं ठेवली आहेत आणि खालच्या एका भागात त्याची खेळणी. सकाळी मी जर पेपर किंवा पुस्तक वाचतो, तेव्हा, तोही खेळणी बाजूला ठेवून त्याच्या हाताला येणारी त्याची छोटी पुस्तकं घेतो. मी जर काही अधोरेखित करत असे्न, तर तोही त्याच्या पुस्तकावर काहीतरी रेघोट्या मारू लागतो. घरातलं आणि आमच्या दोघांचंही वागणं किती निर्मळ आणि संतुलित असायला हवं, याचा धडाच जणू आम्हाला अर्शलकडून मिळाला.”
बाळाशी ‘अलेले, काय रे बाळा’ असं केवळ गप्पा मारून त्याच्या मनापर्यंत पोहचता येत नाही त्यासाठी वडिलांचा संगोपनातच सहभाग हवा, असं विशालला मनापासून वाटतं. हे स्पष्ट करत त्याने एक उत्तम विचार सांगितला, "पती-पत्नी दोघांनाही वाटतं की, आता तिसरं कुणीतरी यावं तेव्हाच बाळाचा निर्णय होतो. म्हणजे दोघं मिळून जर तिसऱ्या व्यक्तीचं स्वागत करणार आहेत, तर त्याची जबाबदारी केवळ एकाकडे ढकलून कशी चालेल? आई नैसर्गिकरित्या तर मुळातच 9 महिने सांभाळते. मग बाळ झाल्यानंतर पहिली जबाबदारी तर बाबानेच घेतली पाहिजे. सहजीवनात समान वाटा नसेल, तर कसं चालेल? आणि हे वाटणी म्हणून नव्हे, तर आनंद म्हणून करायला हवं. दोघांनी मिळून कुठलीही गोष्ट केली की. निरस होत नाही आणि काम हातासरशी होऊन जातं. बाळसंगोपनही तसंच. उलट, बाळासोबत प्रत्येक क्षणी निर्भेळ आनंद मिळतो. याबाबत पूर्वनियोजन नसतं, म्हणून घोळ होतात. नोकरी सोडून देण्याची गरजही नसते. फक्त वेळेचं नियोजन आणि प्राधान्यक्रम थोडा बदलला, तरी सारं नीट होतं. बाप असल्याचा आनंद बाळाच्या सोबतीतच मिळू शकतो.'' विशाल तो आनंद मिळवत जगत आहे.
विशाल पोखरकर, मुक्त पत्रकार.
- हीनाकौसर खान

बाबाचं मनोगत : स्टेजवर तो मला सांभाळून घेत होता, हे पाहून तर हरखूनच गेलो!

मोठ्या मुलाच्या जन्मामुळे मागील सात वर्षांपासून तो संगोपनाचा कित्ता गिरवत आहे आणि आता दुसऱ्या अपत्याच्या निमित्ताने गेल्या सात महिन्यांपासून त्याची पुन्हा उजळणी सुरू झाली आहे. मोठ्या मुलाच्या उन्मेषच्या वेळी, लक्ष्मणची पत्नी श्वेता ही एका कॉलेजमध्ये नोकरी करत होती. बाळ पाच महिन्यांचं झालं आणि तिला कामावर रूजू होणं गरजेचं झालं. तिच्या माहेर वा सासरकडून मदतीला कुणीही येणं शक्य नव्हतं. अशा स्थितीत श्वेताने आपणच नोकरी सोडावी, असा विचार केला. पण, लक्ष्मणने त्या गोष्टीला ठाम नकार दिला. 
तो म्हणतो, बाळ जर आमच्या दोघांचं आहे तर संगोपन आम्ही दोघांनी करायला हवं. श्वेतानेच नोकरी का सोडावी? तिनेच करिअर का थांबवावं? मी नोकरी सोडून बाळाला सांभाळलं तर? बाळाला सांभाळण्यासाठी आमच्याकडे पर्यायी व्यवस्थाही नव्हतीच. मग विचार केला, आपण कामाच्या वेळेत थोडा बदल केला, तर? त्यावेळेस, मी पुण्यनगरी दैनिकात होतो. दैनिकात दररोज आलटून पालटून प्रत्येक बातमीदाराला रात्रपाळी करावी लागते. संपादकांना सुचवलं की, "इतर सर्व बातमीदारांची रात्रपाळी बंद करून रोजची रात्रपाळी मला द्या.' माझी नेमकी अडचण पाहता तेही तयार झाले आणि बातमीदार असूनही माझ्या कामाची वेळ दुपारी 4 ते रात्री साडे बारा अशी करून घेतली.''
लक्ष्मणच्या या उपायामुळे श्वेतासाठी नोकरी व बाळ सांभाळणं हे काम सोयीचं झालं. श्वेता सकाळी सात वाजता कामावर जाई आणि दुपारी अडीचपर्यंत घरी परते. या निर्णयाची कसोटी बाळाकडून येणाऱ्या प्रतिसादावर अवलंबून होते. पहिल्याच दिवशी, बाळाने रडरड केली आणि लक्ष्मणच्या लक्षात आलं, बाळाचा सांभाळ करणं हे येरागबाळ्याचं काम नाही. लक्ष्मण म्हणतो, "श्वेताने उन्मेषसाठी फ्रीजमध्ये दूध काढून ठेवलेलं होतं, तरीही बहुदा तो आईलाच शोधत होता. त्याच्या रडण्याने मीही घाबरलो. पण, दुसऱ्या दिवसानंतर मात्र चित्र बदललं. त्याला हळूहळू माझी सवय होऊ लागली. पाच महिन्याचं बाळ असल्याने, केवळ आईचंच दूध देऊ शकत होतो. मग बाजारातून ब्रेस्टपंप आणला. श्वेता रीतसर दूध बाटलीत काढून फ्रीजमध्ये ठेवू लागली. भूक लागली की, त्याला दूध कोमट तापवून पाजायचो. त्याची शी-शू काढण्यापासून ते आंघोळ घालून तीट-पावडर करण्यापर्यंत सगळं काही करू लागलो. बाळाचे कपडे, लंगोट्यासुद्धा धुऊन, वाळवून ठेवू लागलो. माझं आणि त्याचं खास बॉण्डींग तयार होऊ लागलं. सहाव्या महिन्यानंतर, श्वेता आमच्या स्वयंपाकाबरोबरच त्याच्यासाठी वेगवेगळ्या खीरी, मऊडाळभात असं नीट रांधून जाई. बाळाला कसं भरवायचं, कधी भरवायचं, याच्या सूचना श्वेताच्या आणि अंमलबजावणी माझी असं सूत्रच तयार झालं. मग, त्याला खेळवा, त्याच्यासोबत मस्ती करा, त्याला आनंदी ठेवा या सगळ्यात माझ्यातही बदल होत होता. मीही आनंदी राहू लागलो होतो. वडील म्हणून माझी सजगता वाढली होती. बाप असून आईपण अनुभवता येणं याचा मलाच आनंद होई.'' 
लक्ष्मणने केवळ वडील म्हणूनच नव्हे, तर एक उत्तम सोबती बनून श्वेताची साथ दिली होती. श्वेताला सकाळी लवकर उठावं लागायचं. त्यामुळे तो रात्री बाळ रडलं, तरी तिला तो उठवत नसे. मूल रडू लागलं की आईकडं सोपवायचं हे सूत्रच मला पटत नाही, असं लक्ष्मण सांगतो. तो, खुद्द स्वत:त असे अनेक छोटे छोटे बदल पाहत होता. मुलासाठी तो स्वयंपाकीही झाला. तो सांगतो, "वर्ष दीड वर्षाने मी त्याच्यासाठी पोहे, उपीट, शीरा, नाचणीची खीर असं गरमगरम बनवून देऊ लागलो. आईइतकीच त्याला माझीही ओढ वाटू लागली. अडीच वर्षांचा झाल्यानंतर आम्ही त्याला शाळेत घातलं. पण त्याला आणण्या- नेण्याची जबाबदारी आम्ही, आमच्याकडे ठेवली. त्यातून त्याच्याशी रोजचा संवाद वाढला. आता तो सहा वर्षांचा आहे आणि आमच्यातला बंध ही सहा वर्षांनी पक्व झाला असं म्हणायला हरकत नाही. 
मध्यंतरी उन्मेषच्या शाळेत पालकांसोबत एखादी कला सादर करायची, अशी अॅक्टिव्हीटी होती. त्यावेळेस मी एक छोटंसं भजन लिहीलं. आम्ही दोघं मिळून टाळ वाजवत ते सादर करणार होतो. माझी प्रॅक्टीस कमी झाली होती. श्वेताने मात्र त्याच्याकडून ते भजन पाठ करवून घेतलं होतं. तो टाळही नेमकेपणे वाजवत होता. आपणच लिहिलंय, तर आपल्याला जमेलच, अशा फुशारकीत मी होतो. प्रत्यक्षात स्टेजवर चढलो तर माझ्याच ओळी मला आठवत नव्हत्या. मी अक्षरक्ष: कागद पाहून म्हणत होतो आणि तो आत्मविश्वासाने न अडखळता म्हणत होता. उलट स्टेजवर तो मला सांभाळून घेत होता, हे पाहून तर हरखूनच गेलो.''
लक्ष्मण आणि श्वेताने दुसऱ्या अपत्याचा निर्णय घेण्याआधी, श्वेताने स्वत:चा केकचा व्यवसाय सुरू केला होता. त्यामुळे केकसोबत रांगोळी, मेहंदी, इतर कुकींग आयटम अशा ऑर्डर्स तिला मिळू लागल्या. आत्ताही, आमचं सात महिन्याचं पिलू- यश्मितला, माझ्याकडे ठेवून ती व्यवसाय सांभाळत असते. 
बालसंगोपन ही अडचण वाटू द्यायची नसेल, तर कामात संतुलन हवं, असं साधं सरळ तत्त्व लक्ष्मण सांगतो. "पती-पत्नीत, जोडीदार म्हणून, तुमची समज किती चांगली आहे, यावर सारं काही अवलंबून आहे. आपण जर एकमेकांच्या कामाचा, नोकरीचा, वेळेचा आदर केला. आवश्यक तो आराम एकमेकांना देऊ केला, तर आपलं बाळ आपण एकत्रित वाढवण्याचा आनंद घेऊ शकतो. उलट बाळांची जडणघडण प्रत्यक्ष अनुभवणं यासारखा दुसरा आनंद नाही. तुमचं अंडरस्टॅण्डींग महत्त्वाचं. मग अडचणी मोठ्या होत नाहीत. आणि त्या मोठ्या होऊ द्यायच्या नसल्या की कामाच्या जबाबदार्‍यांची योग्य ती विभागणी केली की पुरे! घरकामाच सुंतलन फार महत्त्वाचं.' लक्ष्मण आणि श्वेता जबाबदाऱ्यांचं योग्य संतुलन राखत, त्यांच्या दोन्ही मुलांमध्ये लिंगसमभावाची भावनाही नकळत रुजवत आहेत.
- लक्ष्मण मोरे. 
- हीनाकौसर खान

Tuesday 18 December 2018

क्या लोग थे, वो दिवाने..... कुछ याद उन्हे भी कर लो’...

दवाखान्यातला औषध-गोळ्यांचा वास, विशिष्ट रंगाच्या भिंती आणि पडदे, खास पोषाखातले कर्मचारी. मात्र नांदेडमधल्या दास क्लिनिक आणि सहजीवन काउन्सेलिंग सेंटरमध्ये रुग्णांना वेगळा अनुभव येतो. टिळकनगर भागात आहे हे क्लिनिक. डॉ. किशोर अतनूरकर यांचं. रुग्णसेवेसासाठी आयुष्य वेचणारे डॉक्टर, शास्त्रज्ञ आणि समाजसेवकांच्या कार्याची माहिती देणारा कोपरा. आकर्षक रंगसंगती, प्रकाशझोतांचा सुयोग्य वापर करून सजावट केलेले माहितीपर बोर्ड. ही माहिती वाचताना आपण रुग्णालयात असल्याचं रुग्ण विसरतात. कोपऱ्याचं नावही सुरेल-‘क्या लोग थे, वो दिवाने..... कुछ याद उन्हे भी कर लो’.
2016 मध्ये रयत आरोग्य मंडळाच्या, रयत आरोग्य पत्रिकेचे संपादक म्हणून ते काम करत होते. वैद्यकक्षेत्रातील सेवाभावी व्यक्तींची चरित्र संपादित करण्याचं काम त्यांनी तेव्हा केलं. ज्येष्ठ स्नेही डॉ अरुण महाले यांनी ही माहिती भिंतीवर लिहिण्याविषयी सुचवलं.
त्यांचा सल्ला अतनूरकर यांनी लगेचच आपल्या ओपीडीत अमलात आणला. या सर्व माहितीची भिंतीवर सुंदर सजावट करण्याचं काम सुहासिनी देशपांडे यांचं.
हा कोपरा तयार करण्यामागचा उद्देश डॉक्टरांनी सांगितला. "वैद्यकीयक्षेत्रातील आजची प्रगती कित्येक पिढ्यांमधल्या संशोधक, डॉक्टरांची देण आहे. त्यांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे, त्यांच्याविषयी आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे, या हेतूनं हा कॉर्नर तयार केला."
डॉ अतनूरकर यांनी स्त्रीरोग व प्रसुतिशास्त्रात एम.डी, काउन्सेलिंग/ सायकोथेरपीमध्ये एम.एस केलं आहे.
2005 साली ‘प्रायव्हेट मेडिकल प्रॅक्टिसनर अ‍ॅन्ड पॉप्युलेशन कंट्रोल प्रोग्रमः अ स्टडी ऑफ सोशल अ‍ॅन्ड मेडिकल आसपेक्ट,” यात पीएचडी मिळवली आहे. स्त्रीआरोग्य, लैंगिक शिक्षण, विवाहपूर्व समुपदेशन,संततीनियमन याबाबत ते लोकजागृती करतात. अनेक पुरस्कारांनी डॉ अतनूरकर यांना सन्मानित करण्यात आलं आहे.
-उन्मेष गौरकर.

Monday 17 December 2018

अवघ्या महिन्याभरात ग्रंथालयाचे १०० हून अधिक वाचक

अवघ्या महिन्याभरात ग्रंथालयाचे १०० हून अधिक वाचक. हे आहे ई बुक ग्रंथालय. नाशिक जिल्ह्यातला शालेय स्तरावरचा पहिलाच उपक्रम. वाचन प्रेरणा दिनाचं औचित्य साधून विलास सोनार यांनी सुरू केला. . सोनार, पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलचे ग्रंथपाल. ''नवमाध्यमांमुळे वाचनसंस्कृती लोप पावली जात असल्याचा सूर सारखा ऐकायला मिळतो. मी पट्टीचा वाचकवेडा. नवमाध्यम आपली दुखरी नस होत असताना त्याचा वापर वाचनचळवळीचा प्रसार करण्यासाठी करायचं ठरवलं.'' सोनार सांगत होते. 

ई बुक ग्रंथालयात १६०० हून अधिक पुस्तकं आहेत. यासाठी कुठलंही शुल्क नाही. उपक्रमांतर्गत व्हाट्स अप ग्रुपवर दररोज एखादी कथा, लघुकथा, कांदबरी, शोधनिबंध, पाककृती अशी कुठल्याही विषयाशी संबंधित पोस्ट टाकली जाते. महिन्यातून दोनदा वाचकांकडून सूचना मागवण्यात येतात. कधी पीडीएफ पुस्तक तर कधी ध्वनिमुद्रित पुस्तक पोस्ट केलं जातं. भ्रमणध्वनी हातात असेल तर अगदी इतर कामं करताकरताही ही पुस्तकं एकाच वेळी कुटुंबातल्या इतर व्यक्तीही ऐकू शकतात. पुस्तकातल्या फॉंटचा आकारही वाढविता येतो. अशा विविध वैशिष्ठयांमुळे दिवसागणिक वाचक संख्या वाढत आहे. वाचकांकडून वेगवेगळ्या विषयांवरच्या पुस्तकांची मागणी होत आहे. दिवाळी अंकही ग्रुपवर पोस्ट करण्यात आले. सध्या पुलंचं 'असा मी असामी'आणि वपुंचं कथाकथन देत असल्याचं सोनार सांगतात. 
सुरुवात शाळेपासून झाली. आता हा उपक्रम नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संस्थापातळीवर सुरू आहे. संस्थेच्या विविध व्हॉट्स ग्रुप वर सोनार यांनी उपक्रमाची माहिती देत लिंक पाठविली. अशा प्रकारे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक यांच्यापर्यंत उपक्रम पोहोचला आहे. आता विद्यार्थ्यांनाही या माध्यमातून वाचनाची गोडी लागावी यासाठी शाळेच्या संकेतस्थळावरून पालकांसाठी हे ग्रंथालय लवकरच खुलं करण्याचा प्रयत्न असल्याचं सोनार सांगतात. 
-प्राची उन्मेष.

वीटभट्टीवरील मुले शाळेत येतात तेव्हा..


चांगलं शिक्षण मिळणं हा प्रत्येक बालकाचा अधिकार आहे आणि तो मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. अकोला जिल्ह्यातील आकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात वीटभट्ट्यांचा व्यवसाय चालतो. तिथे अनेक लहान मुले वीटभट्टीकामगार असलेल्या आपल्या पालकांसोबत राहतात. यातील बहुतांश मुले शाळेत न जाता आपापल्या पालकांसोबत काम करताना आढळून यायची. हे सर्व पाहून वाईट तर वाटायचंच, पण फक्त वाईट न वाटून घेता या मुलांना शाळेत दाखल करायचंच, असा आम्ही निश्चय केला.
आकोटच्या गटसाधन केंद्राने शाळाबाह्य विद्यार्थ्यांचं एक सर्वेक्षण हाती घेतलं. 2017 च्या डिसेंबर महिन्यात
चौहट्टाबाजार, किनखेड, करोडी, पाटसूल परिसरातील वीटभट्ट्यांचे बालरक्षक तसंच त्या परिसरातील केंद्रप्रमुख, शिक्षक यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वात सर्वेक्षण केलं. वीटभट्ट्यांवर जाऊन प्रत्येक कुटुंबात किती मुलं आहेत, त्यापैकी किती मुलं शाळेत जातात आणि किती शाळाबाह्य आहेत, याचं विस्तृत सर्वेक्षण केलं.आकोट तालुक्यात एकूण 206 शाळाबाह्य मुलं असल्याचं आढळलं. त्यातील निम्म्याहून जास्त मुलं, मूळ अमरावती जिल्ह्यातील असल्याचं लक्षात आलं. ही मुलं अमरावतीतील वेगवेगळ्या ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेशित होती. मग अमरावती आणि अकोला DIECPD च्या संयुक्त 

विद्यमाने या शाळाबाह्य मुलांना पुन्हा शाळेत प्रवेशित करण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले. याकरिता अमरावती DIECPD चे प्राचार्य मा. डॉ. रवींद्र आंबेकर तसंच अमरावतीचे शिक्षक अकोला दौऱ्यावर आले.
सर्व टीमने पुन्हा एकदा प्रत्येक वीटभट्टीवर जाऊन पालकांशी संवाद साधला. मुलांना शाळेत पाठवणं का गरजेचं आहे, याबद्दल अमरावतीतील त्यांच्या ओळखीच्या शिक्षकांनी संवाद साधला. ‘तुम्ही पोटापाण्यासाठी वीटभट्टीवर काम करत असलात, तरी त्यामुळे तुमच्या मुलांची शाळा मात्र तुटतेय. मुलांचं नुकसान करू नका, त्यांना पुन्हा अमरावतीला पाठवा’, अशी विनंती केली. शिवाय वीटभट्टी मालकांसोबत दुपारी आम्ही सुसंवाद सभाही घेतल्या. त्यातही मुलांच्या शिक्षणाचं महत्त्व आम्ही समजावून सांगितलं. त्यांच्या पालकांकडून तुम्ही काम करवून घ्या, पण मुलांची फरफट थांबवा, असं सांगितलं. कारण आमच्यापेक्षा हे कामगार त्यांच्या मालकांचं नक्की ऐकतील अशी खात्री होती. आणि घडलंही तसंच! आम्हा सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून अकोल्यातील सुमारे 103 मुलांना अमरावतीतील शाळेत पुनःप्रवेशित करण्यात आम्ही यशस्वी ठरलो.
मूळ अमरावतीचे असलेले विद्यार्थी सोडले तरी इतर जिल्ह्यातून/ राज्यातून आलेली आणखी शंभर एक मुलंही या वीटभट्ट्यांवर होती. यातील काही मुलं कधीच शाळेत गेलेली नव्हती, या मुलांना शाळेची गोडी लागावी म्हणून त्यांच्यासाठी ‘वीटभट्टी तिथे शाळा’ ही अनोखी संकल्पना राबविण्यात आली. 1 जानेवारी 2018 रोजी या उपक्रमाचा शुभारंभ झाला. वीटभट्टीजवळच्या एका मोठ्या शेतात झाडाखाली ‘शांतीनिकेतन’ सारखी तात्पुरती शाळा आम्ही सुरू केली.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून आणि मुलं तसंच पालकांना गुलाबपुष्प देऊन शाळेचं उद्घाटन झालं. मोकळ्या रानातील या शाळेत हसत- खेळत अध्यापनाचे कार्य सुरू झाले. बहुतांश मुलं परप्रांतीय होती. त्यामुळे हिंदीचा आधार घेत त्यांना शिकवत होतो, उजळणी तर चक्क इंग्रजीमधून घेत होतो. मात्र अंकओळख आणि गणिती क्रिया मुलांनी सहज आत्मसात केल्या. विविध भाषिक खेळ घेऊन, गाणी म्हणत आमचा अभ्यास चालायचा.
- श्याम राऊत, 

Saturday 15 December 2018

मैत्रकूल - मुलांचं हक्काचं घरकूल



एक दोन वर्षांपूर्वी फेसबुकवरील मैत्रिणींनी या मैत्रकुलची ओळख करून दिली होती. कल्याण पश्चिमेस, बापगाव इथे उभारलेल्या या मैत्रकुलमध्ये 25- 30 मुलं शिक्षणासाठी येऊन राहिली आहेत. बागशाळेच्या माध्यमातून किशोर जगताप त्यांचे वर्ग घेत असतात असं कळलं होतं. त्या वेळी, त्यांना फूल ना फुलाची पाकळी म्हणून, थोडी मदत पाठवलीही होती. तेव्हा, त्यांची निधीसंचालक मौर्विका ननोरे हिच्याशी फोनवर बोलणं झालं होतं. हल्लीच, तिनं पुन्हा एकदा फोनवर आमंत्रण दिलं की, ताई, आमचा मैत्रकूल मेळावा आहे 8 डिसेंबरला. तर तुम्ही नक्की या. मलाही तिथं प्रत्यक्ष भेट द्यावीशी वाटली आणि मी 8 डिसेंबर रोजी तिथं गेले.
कल्याण पश्चिम स्टेशनपासून तासभराच्या अंतरावरचं बापगाव. रिक्षातून उतरल्यावर मैत्रकुलचा पत्ता कुणाला विचारावा असा, विचार करत असताना एक चुणचुणीत मुलगा समोर आला आणि त्यानं मला विचारलं, “ताई, तुम्हाला मैत्रकुलला जायचंय का?” मी हो म्हणाल्यावर तो स्वतः माझ्याबरोबर आला. तो अकरावी आर्ट्सला जवळच्याच अग्रवाल कॉलेजात शिकत होता. मी पोचेपर्यंत मोर्विकाशीसुद्धा फोनाफोनी झाली होतीच. स्वतः मौर्विकाने निर्मला निकेतनमध्ये एमएसडब्ल्यू केलं आहे. आणि ही मुलगी आता पीएचडीची तयारी करते आहे, याचं मला खूपच कौतुक वाटलं. तिथली मुलं मला खूप आत्मविश्वासपूर्ण आणि हसरी, खेळकर वाटली. तिथल्या भाषणांतून कळलं की, या मुलांनी आपापसात जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आहेत. लहान मुलांची जबाबदारी मोठी मुलं घेतात. तिथे कुणाला एमपीएससीच्या परीक्षेला बसायचं आहे, कुणी एमटेक करतोय, ते ऐकून मला खूप आनंद होत होता.
किशोर जगताप हे मागील तीस-पस्तीस वर्षे बागशाळा घेत आहेत. वस्तीतील वंचित, गरीब आणि टपोरी मुलांना एकत्र करून सार्वजनिक बागेत शिकवायचं. अशा मुलांमधील हुशार, होतकरू आणि ज्यांना शिकायची आवड आहे पण, आर्थिक कारणांमुळे जमत नाहीये अशा मुलांसाठी निवासी संकुल उभारण्याची कल्पना त्यांच्या मनात आली. किशोर हे पोलियोग्रस्त आहेत. शिवाय 2 वर्षांपूर्वी झालेल्या अपघातामुळे त्यांचं हिंडणफिरणं बंद झालं. त्यांना मुलांचा असा लळा लागलेला. निवासी संकुलाची कल्पना 2017 साली प्रत्यक्षात आली.
तिथं अंगण शेणाने सारवावं लागतं. तेही काम ही मुलं हौसेनं करतात. घरातल्या प्रत्येक खोलीला, अगदी स्नानगृहालासुद्धा त्यांनी नाव दिलं आहे. अंगणात बसून ती पेटी, तबला, ढोलकं वाजवून गाणीही म्हणतात. किशोरदादा खालीच बसून सगळ्यांचं म्हणणं शांतपणे ऐकत होते. त्यांना बोलायला उद्युक्त करत होते. नवीन व्यक्ती बोलायला आली की, ढोलकी वाजवून तिचं स्वागत व्हायचं. तेवढ्यात एक छोटी मुलगी येऊन वडिलांशी बोलावं तसं त्यांना काहीतरी सांगू लागली. त्यांनी तिचं बोलणं ऐकून तिला कुणाकडे तरी पाठवलं. मला तिथे नंतर आणखीही एक कळलं की, सहावी सातवीतल्या एका मुलाला वाईट संगत लागून तो खिसेकापू बनला होता. तो मुलगाही आज मैत्रकुलमध्ये येऊन खूप चांगलं काम करू लागला आहे. शिकू लागला आहे. एका मुलानं सांगितलं, की युट्युबवर बघून आम्ही छान छान पदार्थ बनवतो. हल्लीच आम्ही सिझलर बनवले होते. आमच्या इथे कुणी चुकलं तरी परत संधी मिळते, तू नको करू असं म्हणून कुणी निरुत्साही करत नाही.
आता ही मंडळी त्यांचं छोटंसं छान घरकूल सोडून खडवलीला अधिक मोठ्या घरात चालली आहेत. हे आधीचं घर भाड्याचं होतं पण ते नवं घर त्यांचं स्वतःचं असणार आहे. त्यासाठीच त्यांचं निधी जमवणं चाललं आहे. मौर्विका म्हणाली की, एकरकमी सगळी रक्कम देतो पण आमच्या आईचं किंवा वडिलांचं नाव संस्थेला द्या, असं म्हणणारे देणगीदार आहेत. पण आम्हाला तसं करायचं नाही. त्यापेक्षा हजार लोकांनी आम्हाला थोडे थोडे पैसे द्यावेत म्हणून आम्ही त्यांच्यापर्यंत जातो. त्या सर्वांना ही संस्था त्यांची आहे, असं वाटलं पाहिजे. नवीन घरात काय काय असेल त्याचं रेखाचित्रही एका मुलाने आम्हाला सांगितलं. त्याला सगळे रावसदादा म्हणत होते. तो म्हणाला की, ही नवी जमीन तीस गुंठ्याची आहे, इथे आम्ही किचनला मोठी जागा देऊ शकू. पेंटिंगची वेगळी खोली, गायन-वादनासाठी वेगळी खोली असेल, आमचे पाहुणेही राहू शकतील, अशी सोय आम्ही करणार आहोत. त्यांनी मला बोलायला सांगितलं तेव्हा, मी त्या मुलांचं आणि त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण वागण्याचं कौतुक केलं.
खरंच, शेवटी शिक्षण हेच महत्वाचं आहे आणि त्यासाठीची जिद्द हीसुद्धा फार महत्वाची आहे. मुलांची ही जिद्द तिथे प्रत्यक्ष गेले, म्हणून अनुभवता आली. मदत म्हणून नुस्ते पैसे पाठवून गप्प बसले असते, तर या मुलांना भेटण्याच्या आनंदास मुकले असते, असं वाटलं.
- सविता दामले

Thursday 13 December 2018

पाटी पेन्सिलच बरी...


नुकताच नवी उमेदवर पोलसाठी एक प्रश्न दिला होता. तो म्हणजे -
शाळेत जाणा-या मुलामुलींचं दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी नियमावली करावी, असं केंद्र सरकारने देशातल्या सर्व राज्य सरकारांना सांगितलंय.
शालेय विद्यार्थ्यांचं दप्तराचं ओझं कमी व्हावं असं तुम्हाला वाटतं का? तुमचं मत नोंदवा. आणि ओझं कमी करण्यासाठी कमेंटमध्ये उपायही जरूर सुचवा.
याविषयी जवळजवळ 95 टक्के लोकांनी हो असं उत्तर दिलं. काहींनी आवर्जून त्यांचं मतही नोंदवलं. तुम्ही सुचवलेले उपाय आम्ही विधिमंडळ आणि सरकारपर्यंत नक्की पोचवू. असंही आम्ही त्यात म्हटलं होतं. तर, ही त्यातली काही प्रातिनिधीक मतं -
Neeraja Patwardhan म्हणतात, एकाच फुलस्केप वहीत विभाग करून नोटस घ्यायच्या आणि मग त्या त्या विषयाच्या फायलीत घरी लावून ठेवायच्या. आपोआप अभ्यास होऊन जाईल.
वर्गात वापरायची पुस्तके शाळेतच उपलब्ध असावीत. बाकाच्या बाजूला त्याची पेटी किंवा चक्क टॅब पुस्तकांचा. मुलाने ते शाळेत वापरायचे फक्त. विकत घ्यायची ती घरी अभ्यासापुरती.
क्राफ्ट आणि चित्रकला वगैरेचे सामान शाळेत उपलब्ध असावे.
अश्या प्रकारे सार्वजनिक मालमत्ता काळजीने वापरायची अक्कलही येईल. सध्या ती तशीही गायब आहे.
@Rakhee Petkar म्हणतात, शाळेत लॉकर सिस्टम असावी.
Ganesh D. Pol म्हणतात, शाळेतील विषयांच्या तासांचं वेळापत्रक तयार केले पाहिजे. आज हिंदी उद्या इंग्रजी किंवा परवा मराठी अशा पध्दतीने दररोज एक विषय याप्रमाणे केले तर ओझे कमी होईल.
Vijay Bhoir म्हणतात, खरतर ह्या आधी असे बरेच प्रयत्न झाले आहेत. सरकार असे नियम करायला सांगत असेल तर उत्तमच आहे. पण त्याची अंमलबाजवणी किती शाळेत होते आणि किती शाळा त्या सूचना फॉलो करतात हे देखील महत्त्वाचे आहे. शाळेत लॉकर बनवून तशी सुविधा उपलब्ध करू शकतात. पण त्याचीही तपासणी झाली तर सगळ्या शाळेत हे लागू होईल. आणि होमवर्कसाठी एकच वही असावी किंवा एका वहीमध्ये त्याचे भाग करता यावे. जेणे करून घरी दिला जाणारा अभ्यास परिपूर्ण होईल. आणि जर शाळेनेच काही पुस्तकं मुलांसाठी शाळेत ठेवली तर घरची पुस्तके घरी आणि शाळेतली पुस्तके शाळेत वापरता येतील. नाहीतर पुन्हा इकडचे ओझे तिकडे आणि तिकडचे ओझे इकडे असं नको व्हायला.
Nilima Dabhikar यांचं म्हणणं आहे की, पुस्तके तर शासनच देतं, ती शाळेतच ठेवावीत. सर्व पुस्तके सर्वांसाठी... व्यवस्थित हाताळण्याची पण सवय लागेल. लेखन साहित्यही शाळेतच ठेवून घ्यावे. मुलांनी नाचत बागडत यावे आणि ताण रहित घरी जावे.
@Vilas Sakhubai Eknath Dhadge म्हणतात, शाळेने वेळापत्रक काळजीपूर्वक आखावे. साधारणपणे 3 विषय दररोज शिकवले जातील असे नियोजन करावे. विद्यार्थी फक्त याच विषयाचे पुस्तक व वही घेऊन येतील असे कटाक्षाने पाहावे.
जर काही वेळ शिल्लक राहत असेल तर अवांतर व जनरल knowledge या बद्दल विद्यार्थ्यांना माहिती दयावी
@Patil Vishwanath म्हणतात, ओझं मुख्यतः पुस्तकं, नोटबुक, प्रॅक्टिकल बुक यांचं आहे. आणि हे सर्व विषयाचं प्रत्येक दिवशी न्यावं आणावं लागतं.
@Shravani Ambre म्हणतात, पुस्तकं शाळेत ठेवण्याची व्यवस्था करावी. जेणे करून मुलांना या वयात पाठदुखी आणि खांदेदुखी अशा समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही.
@Er Digvijay Katkar म्हणतात, पाटी पेन्सिलच बरी होती.
Sharvari Sawant Namita Prabhu म्हणतात, प्रकल्प आधारित शिक्षण व्यवस्था निर्माण व्हावी. वर्क हा शब्दच बंद करावा.
Mrinal Kulkarni Deo शाळेत लॉकर उपलब्ध करून द्यावेत, जिथे वह्या पुस्तकं ठेवता येतील.

शाळेनं मला काय दिलं



बालपण म्हणजे व्यक्तीच्या जडणघडणीचा काळ. शाळेचे दिवस म्हणजे जीवनातील सोनेरी क्षण असतात. परळी शहरातील सरस्वती विद्यालयात माझं सातवीपर्यंतचं शिक्षण झालं. लहानपणापासून शाळेतील उपक्रम, अभ्यास याबाबत आम्ही बहिणी फार उत्साही असायचो. आमच्या घरातचं तसं वातावरण होतं. चुकून कधी शाळेला कधी दांडी मारून घरी बसलं की बाबा (दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे) म्हणायचे, “काय झालं? घरी कसं काय? तब्येत एवढी खराब झाली का सुटी घ्यायला?” बाबास्वत: कधी सुटी घ्यायचे नाही, आम्हाला कधी विनाकारण घेऊ द्यायचे नाही. 
आम्हाला टक्केवारीचा कधी ताण नव्हता. आम्ही तिघी बहिणी हुशार होतो. ‘बाबांची’ मुलं असतानाही आम्हाला कधी वेगळी वागणूक नव्हती. आमची शाळा भारी होती. सरस्वती विद्यालयाच्या आठवणींबाबत बोलायचं झालं तर शाळेने आम्हाला जीवनासाठी तयार केलं. देशभक्तीपर गीते, अभ्यास व इतर कार्यक्रम पार पडायचे. मला विटी-दांडू खेळ आवडायचा. अवांतर वेळेत त्यासाठी माझा वेळ जायचा. शाळेत आम्ही रमून जायचो. शिक्षकांच्या आपुलकीने, तळमळीने आम्हाला घडवलं. परळीत असताना कवडे सर इंग्रजी शिकवायचे. त्यांची छाप आजही आहे. आमच्या वर्गात मी नेहमी पहिली येत असे.
पुढे आठवी ते दहावी मुंबईत सेंट कोलंबा गर्ल्स स्कूलमध्ये प्रवेश घेतला. या शाळेत जिवाभावाच्या मैत्रिणी मिळाल्या. आजची त्या कायम आहेत. खूप चांगले शिक्षक मिळाले. शाळेने शिस्त दिली. मेहनत करण्याची उर्मी दिली. एखादं काम करत असताना प्रामाणिकपणे करणे, ही शाळेतून मिळालेली शिकवण. वक्तशीरपणा शाळेने दिला. सध्याच्या काळात वेळ पाळणं कठीण होत असलं तरी शिक्षण घेत असताना आम्ही वेळेबाबत दक्ष असायचो. 
इतरांप्रमाणेच गणित माझ्यासाठी अडचणीचा विषय होता. परंतू, मुंबईत असताना वैंगणकर या वर्गशिक्षिका होत्या. त्यांनी माझा आत्मविश्वास वाढवत माझी भीती घालवली. सुरुवातीला मुंबईतील शाळेत गेल्यानंतर इंग्रजी शब्दांच्या उच्चारांविषयी अडचणी यायच्या, कोरडे बाईंनी त्या दूर केल्या. मुंबईतही मी पहिल्या पाचात असायचे. कोलंबा शाळेत अभ्यासाबरोबरच स्पर्धा, नाटक, उपक्रमांत सहभागी होण्याची संधी मिळाले. मजेची गोष्ट म्हणजे मी पहिल्यांदा ज्या नाटकात काम केले त्यात मी चाळीचा मालक, लोकल पुढारी होते. बाबा उपमुख्यमंत्री असताना जे जाकिट घालत ते मी घातले होते. कदाचित यातूनच आजची बीजं रोवली गेली असतील. दहावीत असताना शाळेतील सौंदर्य स्पर्धेत मी सहभागी होते. रॅम्प वॉक झाल्यानंतर मला प्रश्न विचारला की आजच्या काळात स्त्रीचे समाजात काय स्थान आहे? या प्रश्नाच्या उत्तरानंतर मला ‘मिस सेंट कोलंबा’ने गौरवले. मी म्हटले होते, ‘स्त्री पुरूषाच्या बरोबरीने किंबहुना काकणभर पुढे आहे. तिला निसर्गाने स्वत:ची प्रतिक्रिया बनवण्याचे वरदान दिले आहे. समाजातील स्थान पाहिले तर प्रत्येक क्षेत्रात स्त्री अग्रेसर आहे. तिला जेव्हा संधी मिळेल तेव्हा ती समाजाचे दायित्त्व निभावण्यासाठी तत्पर आहे.’ आज मी जे काही ते माझ्या परळी व मुंबईतील शाळेतील जडणघडणीमुळेच. 
आजची मुलं ही गॅजेट प्रिय आहेत, त्यांनी तंत्रज्ञान हाताळावे. मात्र ग्रामीण व मैदानी खेळातही सहभागी व्हावे. शाळा ही तुम्हांला घडवण्यासाठी असते, त्यामुळे न्यूनगंड न बाळगता आनंदाने शाळेत जा, शिक्षण घ्या, स्वत:ला घडवा. 

- डॉ.प्रीतम गोपीनाथराव मुंडे.

Tuesday 11 December 2018

यंदा पिंपळवाडी शाळेतून एकही विद्यार्थी स्थलांतरित झाला नाही

साखर कारखान्यांचा गाळप सुरू होण्याचा हंगाम आला की पालकांबरोबर मुलांचं स्थलांतरदेखील ठरलेलं. पण जामखेड तालुक्यातल्या पिंपळवाडीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून यंदा एकही विद्यार्थी स्थलांतरित झाला नाही. अहमदनगर जिल्ह्यातला जामखेड तालुका आणि बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्याच्या हद्दीवरची साकत ग्रामपंचायत. या ग्रामपंचायतीच्या हद्दीतली पिंपळवाडी. लोकसंख्या साधारण आठशेच्या घरात. बहुतांश नागरिकांचा उदरनिर्वाह शेतीवरच. त्यामुळे पिकपाण्यात कमतरता आली तर रोजगारासाठी ऊसतोडणी हाच पर्याय. पोटापाण्याच्या प्रश्नापुढे लेकरांचं शिक्षण दुय्यमच ठरायचं. पण २००९ पासून मनोज काशीद आणि अनिल चव्हाण या शिक्षकद्वयीनं पिंपळवाडी शाळेचा चेहरामोहरा बदलायला सुरुवात केली आणि चित्र बदलू लागलं.
लोकसहभागातून शाळेची रंगरंगोटी झाली. आकर्षक चित्रं काढण्यात आली. डिजिटल शिक्षणासाठी संगणक आणि एलईडी टीव्ही घेतले. बाग आणि मैदान तयार करण्यात आलं. सांडपाण्याचं नियोजन करून ते झाडांना मिळण्याची सोय करण्यात आली. हँडवाश स्टेशन, दैनंदिन परिपाठ, सुंदर हस्ताक्षर , इंग्रजी वाचन , सामूहिक पाढे यासारख्या अनेक उपक्रमांमुळे शाळेला आयएसओ मानांकन मिळालं.
पुढे चव्हाण यांची बदली होऊन त्यांच्या जागी गणेश देवकाते रुजू झाले. तेही मेहनती. शाळेच्या सुधारणा आणि गुणवत्तेचा आलेख चढताच राहिला . मागच्या वर्षी काशीद यांची बदली होऊन राजेश्वर पवार रुजू झाले. त्यांनी देवकाते यांच्या सहकार्यानं शाळेची कामगिरी उंचावली. त्यामुळे पहिली ते चौथीपर्यंत असलेली वर्गसंख्या पाचवीपर्यंत वाढली. शाळेत सध्या 62 मुलं आहेत. पालकांनी रोजगारासाठी कोयता हाती घेतला असला तरी मुलांचं बोट मात्र त्यांनी गुरुजींच्या हातीच दिलं आहे.

- राजेश राऊत

बेवारस गुरांना जपणारा अवलिया!

रत्नागिरीतल्या लांजा इथं बांधकाम सुरू होतं. एक जखमी बेवारस गाय विव्हळत पडली होती. आजूबाजूने लोक चालले होते. पण कोणीच त्या गाईकडे पाहत नव्हतं. बांधकाम व्यावसायिक मुकेश गुंदेचा यांचं या गाईकडे लक्ष झालं. तिथपासून सुरू झाली अविरत गोसेवा. गेल्या पाच सहा वर्षात गुंदेचा यांनी काळवेळ न बघता शेकडो गाईंवर उपचार केले आहेत. 

गुंदेचा रत्नागिरीतली संवेदनशील व्यक्तिमत्त्व. संपत्तीचा सुयोग्य उपयोग जाणणारे. "माणसाला लागलंखुपलं तर आपण त्याला लगेच दवाखान्यात नेतो, मग एखादं जनावर विव्हळत असेल तर त्याला नकोत का उपचार मिळायला?असा प्रश्न पडला. या कामातून मिळणारं समाधान मोठं आहे," गुंदेचा सांगतात.
सुरुवातीला गुरांना मोकळ्या जागेवर नेऊन डॉक्टरांकडून ते उपचार करून घ्यायचे. बघूनबघून ते स्वतःच उपचार करायला शिकले. आता गंभीर परिस्थितीतच ते डॉक्टरांची मदत घेतात. गुरांना औषध-इंजेक्शन ते स्वतः देतात. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीनं तीन गुरांवर त्यांनी मोठ्या शस्त्रक्रियाही केल्या आहेत. त्यामुळे या गुरांना जीवदान मिळालं.
बेवारस जखमी गुरांसाठी गुंदेचा यांनी नरबे इथं स्वखर्चाने गोशाळा बांधली आहे. गुरं बरी झाली की त्यांना सोडलं जातं. साधारण 10 ते 15 गुरं तरी या गोशाळेत असतातच. त्यांच्यासाठी स्वखर्चानेच चारापाणी, आवश्यक सोयीसुविधा, उपचार. गुंदेचा गोशाळेत शिरताच त्यांच्याभोवती गुरं जमतात. त्यांच्या गोसेवेची, त्यांच्यातल्या आणि जनावरांमधल्या आपुलकीची, कीर्ती संपूर्ण जिल्ह्यात पसरली आहे. फोन करून जखमी गुरांची माहिती त्यांना दिली जाते. हे सर्व ते स्वतःचा व्यवसाय सांभाळून करतात.
रत्नागिरी शहरातही रस्त्यावर फिरणाऱ्या बेवारस गुरांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी शहरात गोशाळा बांधण्यासाठी गुंदेचा प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करत आहेत. 

-जान्हवी पाटील.

दुर्गम फागंदरची आदर्श वस्तीशाळा

 नाशिकच्या देवळा तालुक्यातील गिरणा नदीच्या काठावरचं फांगदर. फांगदर ही पंचवीस ते तीस घरांची, शेतमजुरी करणाऱ्या आदिवासींची वस्ती. इथं 2 जुलै 2001 रोजी ही शाळा सुरु झाली. ‘धरूया शिक्षणाची कास, करूया वस्तीचा विकास’ हे या वस्तीशाळेचं धोरण. 2007 सालापर्यंत या शाळेची इमारत म्हणजे एक कौलारू घर, पत्र्याची शेड आणि पाचटाचा झाप फक्त, अशी अपुरी बैठक व्यवस्था असलेली शाळा होती. मात्र 2007 मध्ये ही शाळा जिल्हा परिषदेकडे नियमित झाल्यावर सर्व शिक्षा अभियानातून शाळेला टुमदार इमारत मिळाली. 2016 मध्ये फागंदरची जिल्हा परिषद शाळा ही महाराष्ट्रातील पहिली आयएसओ मानांकन 

मिळविणारी वस्तीशाळा आहे. शेतमजुरांच्या आदिवासी वस्तीवर अपुऱ्या भौतिक सुविधा असूनही या शाळेला खाजगी शाळांच्या तोडीस तोड दर्जा मुख्याध्यापक आनंदा पवार आणि खंडू मोरे या शिक्षकांमुळे मिळाला आहे. अर्थात त्यात लोकसहभागाचाही मोठा वाटा आहे.
प्रयोगशील शिक्षणाच्या बाबतीत फांगदर शाळा एक पाऊल पुढे आहे. विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर टाकण्यासाठी दररोज एक प्रश्न विचारला जातो. वर्गांमध्ये जमिनीवर मुळाक्षरे, गणिताचे ज्ञानरचनावादी तक्ते रंगविण्यात आले आहेत. ‘अक्षरधारा’ या उपक्रमांतर्गत गारगोटीच्या दगडांपासून, शंख-शिपल्यांपासून विद्यार्थी अक्षरे रेखाटतात. त्यांच्या नेहमीच्या खेळातल्या या वस्तू वापरून जोडशब्द शिकविण्याचीही पद्धत विद्यार्थ्यांना भावते. शाळेत मुलांच्या क्षमतांनुसार तीन गट तयार करून त्यांच्या गरजेनुसार तयारी करून घेतली जाते. फांगदर शाळेने निसर्गाच्या सान्निध्यात प्रत्येक विद्यार्थ्यांस एकेक धडा वाचावयास सांगून ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करतात.


शालेय आवारातील वृक्षसंपदेमुळे शाळेचे मनोहारी रूप मनाला भुरळ घालते. टेकडीच्या माथ्यावरची शाळेची टुमदार इमारत आकर्षक रंगरंगोटीने लक्ष वेधून घेते. पिण्यासदेखील पाणी मिळणे मुश्कील असलेल्या ठिकाणी खडकाळ माळरानावर शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने शाळा हिरवाईने नटविली आहे. शालेय आवारात तीनशेपेक्षा अधिक झाडे असून, त्यात बेचाळीस औषधी वनस्पती आहेत. हिरडा, बेहडा, जायफळ, कोरफड, आवळा, तुळस, रिठा, निंब, वड, अश्वगंधा इत्यादी वनस्पती आहेत. प्रत्येक वृक्षास नावे दिल्यामुळे विद्यार्थ्यांना वृक्षांची ओळख होते. आवारात विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी पाण्याची सोय केली आहे. त्यामुळे विविध पक्ष्यांचा किलबिलाट शालेच्या आवारात ऐकू येतो.

फांगदर ही देवळा तालुक्यातील पहिली डिजिटल इ- लर्निंग शाळा आहे. संगणक, इंटरअॅक्टिव्ह स्मार्टबोर्ड आणि प्रोजेक्टरवर शाळेत अध्यापन केले जाते. आदिवासी शेतमजुरांची मुलं टॅबलेट आणि कॉम्प्युटरच्या माध्यमातून शिकतात. शिक्षकांनी विविध शैक्षणिक व्हिडिओ तयार केले असून शाळेचा स्वतंत्र ब्लॉग आहे. ह्या साधनांचा अध्यापनात वापर होत असल्याने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत आणि गुणवत्तेत वाढ झाली आहे.
पारंपरिक ‘खडूफळा’ पद्धतीला फाटा देण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. ‘क्षेत्रभेट’ उपक्रमामागे चार भिंतींच्या आड मिळालेले ज्ञान बाहेरील जगाशी जोडणे हा उद्देश आहे. नदी, घाट, लघुउद्योग, बायोगॅस प्रकल्प, आदर्श आधुनिक शेती, प्राथमिक आरोग्यकेंद्र, टपाल कार्यालय, बँक, वीटभट्टी, कुक्कुटपालन उद्योग, साखर कारखाना, पोलीस ठाणे अशा अनेक ठिकाणी शाळेच्या विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या आहेत. क्षेत्रभेटीमुळे अभ्यासक्रमाबाहेरच्या कित्येक व्यावहारिक गोष्टी समजून घेण्यास मदत होते.

- खंडू मोरे.