Wednesday 3 May 2017

ग्रामस्थांच्या सहभागाने शिक्षणही आलं..!

स्पर्धेचं युग, त्यात इंग्रजीशिवाय पुढे जाता येणार नाही. मराठी शाळेत शिकून भविष्य नाही, अशी कारणं सांगून आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालण्यांचा विचार पालक करतात. अनेक जण मराठी शाळांचा दर्जा चांगला नाही म्हणूनही मुलांना मराठी शाळेत घालण्यााचे टाळतात. हे सध्याचं चित्र. यातूनही काही शिक्षक व ग्रामस्थ असलेल्या शाळा टिकवण्याचे आणि त्यांचा दर्जा सुधारण्यााचे प्रयत्न करत आहेत. असाच एक प्रयत्न बीड जिल्ह्यात घडतो आहे. माजलगाव तालुक्यातील एक हजार लोकसंख्येचं जायकोवाडी गाव.

ग्रामस्थ, शिक्षण समिती व जिल्हा परिषद यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक माणिक राठोड यांनी शाळेचा चेहरा मोहरा बदलण्याचा संकल्प केला. शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी आणि त्यांनी शिक्षणात रमावं यासाठी काय करता येर्इल, हा विचार सुरु झाला. या संदर्भात चर्चा करण्यासाठी राठोड यांनी १५ ऑगस्ट २०१६ रोजी ग्रामस्थांची शाळेत बैठक घेतली. पहिली ते पाचवीचे विद्यार्थी होते ९०. पैकी अनेक विद्यार्थी गैरहजर असत. या विद्यार्थांना शाळेत आणण्याासाठी काय करता येईल यावर चर्चा झाली. शाळेत रंगरंगोटी करण्याबरोबच अद्ययावत ई-लर्निंग कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढच्या आठ-दहा दिवसातच ग्रामस्थ आणि शिक्षकांनी तब्बल तीन लाख रूपयांचे वर्गणी गोळा केली. त्यातून एका वर्गात डीजीटल कक्ष स्थापन करण्याात आला. शिवाय बोलक्या भिंती, ज्ञानरचानवादावर आधारित फरशीकाम, वृक्षारोपण आणि शौचालय उभारण्यात आलं. प्रोजेक्टरही खरेदी करण्यात आला. 
शाळेचा चेहरामोहरा बदलण्यासाठी शिक्षकांसह ग्रामस्थांनी एकत्र येत चोख काम केलं. या कष्टाचं फलित आता शाळेत पाहायला मिळतंय. शाळेत प्रत्येक दिवशी ९७ ते ९८ टक्के उपस्थिती वाढली. पंचक्रोशीत गावाचं कौतुक तर झालंच. शिवाय अन्य शाळांच्या तब्बल एक हजार शिक्षक व मुख्यााध्याोपकांनी शाळेला भेट दिली. यापैकी अनेक शिक्षकांनी शाळेच्या‍ नोंदवहीत ‘शाळा तर आहेच, याबरोबर शिक्षणही आहे’ अशा प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
- हनुमंत लवाळे.

No comments:

Post a Comment