Tuesday 23 July 2019

पाण्यापायी माणसं आणि नातंही काही काळ दुरावतेय...

दुष्काळ, अलिकडच्या काळात सहजपणे उच्चारला जाणारा शब्द. यंदा मात्र गावची, गावच्या माणसाची, शेतीची आणि शेतीत राबणाऱ्या जिवांची कोलहाल केलीय दुष्काळाने. देवगाव, दुष्काळाने होरपळ होत असलेलं एक गाव. कायम बागायती असणाऱ्या गावांतील शेती, हळहळू उजाड होत गेली. हिरव्यागार झाडांनी नटलेला परिसरात चोरून, लपून कुऱ्हाड पडायला लागली आणि मागच्या आठ-दहा वर्षात बरीच झाडं बुंध्यापासून थोटी झाली. शिवार उजाड होत गेला, पण कोणालाही त्याबाबत बोलावं वाटलं नाही. नवी झांड तर लावणंच बंद. त्याचा परिणाम गावशिवार बोडखा झाला.
यंदा दुष्काळ आला. तसंही देवगावाने गेल्या दहा वर्षात चार-पाच वेळा दुष्काळ सोसलाय. यंदा मात्र परिस्थिती अत्यंत गंभीर. खायला धान्याचा तुटवडा नाही. फक्त पाणी नाही, जनावरांना चारा नाही. अख्ख्या चार महिन्याच्या पावसाळ्यात पाऊस झाला नाही. विहीरी, तलाव, नाले, कोरडेठाक. लोक 1972 च्या दुष्काळाची तुलना करत होते. पण जाणकार त्यापेक्षाही भयंकर दुष्काळ असल्याचं सांगतात. शेताची तर वाटच लागली, पण प्यायलाही पाणी नाही. जनावरांची उपासमार, कर्ती पोरं गाव सोडून दूरदेशी जात आहेत. देवगावचे रंगराव पाटील गावकीतील पुढारी. त्यांनी मागणी केली आणि कधी नव्हे यंदा टॅंकरने पाणी पुरवठा करावा लागला. गावाच्या जवळ टॅंकर भरायला पाणी नाही, म्हणून पंधरा मैलावर असलेल्या सिंदफणा धरणात खोदलेल्या सरकारी विहिरीतून टॅंकर भरू लागली. गावांत टॅंकर आलं की साऱ्या गावाची पाणी भरायला धडपड. पाण्याच्या टाक्या, बॅलर, भांडी बादल्या, पातेले, आसंल त्यात पाणी भरायचं. टॅकरवाला मोजून-मापून पाणी देतू. नंबरशीर. दहा दिवसाला नंतर येतू. ठरलेला कालावधी लोटला की गावांतली माणसं रस्त्याकडं नजर लावून बसतात टॅंकरची वाट पाहत. गावांत पाण्याचा टॅंकर आला की त्यावर झुंबड उडते. आज एका भागात, उद्या दुसऱ्या भागात. नंबर लागलेले. एका भागात टॅंकर आला आणि दुसऱ्या भागातील लोक पाणी न्यायला आले की वादावादी.
अगदी नात्यातील लोक असले तरी. ...आज आमच्या भागात टॅंकर आलाय, उद्या येणार नाही. पाणी वाट्याला आलं नाही तर...उद्या देईल का आम्हाला. अजून महिनाभर पाऊस पडल्यावर कशाला कोण बोलतंय असं. दुष्काळाने पिचलेल्या
गावांतील हा संवाद यंदा सहजासहजी एेकायला मिळतोय. पाणी किती मोलांचं हे स्पष्ट होतेय. अगदी नात्यातील माणसांच नातंही काही काळ पाण्यामुळे दुरावलं जात असल्याचं पहायला मिळतंय. पै- पाहुणेही एकमेकांच्या घरी जाताना दिसत नाहीत की दूरदेशी गेलेली माणसं सुट्टीत गावांत यायला धजावत नसल्याचं चित्र एकट्या देवगावात नाहीत. राज्याच्या, डोंगर भागातील अनेक गावांत आज पहायला मिळत आहे. 
- सूर्यकांत नेटके, अहमदनगर

No comments:

Post a Comment