Tuesday 23 July 2019

पुण्याचे 'हिल-मॅन'

अनिल गायकवाड. त्यांना सगळे प्रेमाने मामा म्हणतात. मूळ गाव सातारा. सध्या वास्तव्य पुण्यात बाणेर इथं. 1978 साली एनसीएलमध्ये पर्यावरण या विषयावर कार्यक्रम झाला. यावेळी अनिल यांनी एक शोधनिबंध वाचला. मुंबई, कॅलिफोर्निया अशी समुद्राजवळ वसलेली शहरे तापमान वाढीमुळे पाण्याखाली जातील, प्रदूषण वाढेल, माणसाचं जगणं अवघड होईल, असा निबंधाचा गोषवारा. त्यावेळीच पर्यावरण विषयाच्या अभ्यासाला त्यांनी सुरूवात केली. 1978 ते 2006 या काळात पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी पर्यावरणाचं जमेल तितकं काम सुरू केलं. सगळ्यांनीच हे काम करायला हवं या हेतूने 2006 साली 'वसुंधरा स्वच्छता अभियान' या लोक चळवळीची त्यांनी सुरूवात केली. फक्त पुणं किंवा महाराष्ट्र सुंदर होऊन चालणार नाही तर संपूर्ण वसुंधरा स्वच्छ व्हायला हवी हा नावामागचा हेतू.
आठवड्यातून दर रविवारी एक तास काम करायचं ठरलं. कुठं खराटा हातात घेऊन स्वछता करा, कुठं पर्यावरणाविषयी जागरूकता, तर कुठं झाड लावणं. जेवढी झाडं लावता येतील तेवढी जगवायची, जेवढी जगवता येतील तेवढीच झाडं लावायची ही खूणगाठ मनाशी होती. पुण्यातील पाषाण टेकडीवर झाड लावायला सुरूवात झाली. पाण्यासाठी टेकड्यांवर टाक्या बांधण्यात आल्या. सध्या टेकडीवर 30 टाक्या आहेत. अनेक रहिवासी मित्रांनी आपल्या घरातून पाण्यासाठी कनेक्शन दिली. मात्र काही दृष्ट वृत्तीनी झाडे उपटली, तोडली काही वेळेस तर वणवे लावण्यात आले. नंतर मात्र झाडांची संख्या वाढल्यावर टेकड्यांवरची अवैध बांधकामं थांबली. ह्या कामाचा पसारा एवढा वाढला की, आयटी, अभियांत्रिकी, वकील, मोठे अधिकारी अशा सगळ्या लोकांनी येऊन श्रमदान करण्यास सुरूवात केली. गेली अनेक वर्षे रोज सकाळी 7 वाजता न सांगता सगळी मंडळी येतात टाकीतलं पाणी झाडांना घालून निघून जातात. मामांच्या कामाचा वारसा असा अनेक वसुंधरावासियांनी खांद्यावर उचलला आहे. आज जवळजवळ 25,000 झाडे लावली, जगवली अन् वाढवली आहेत.
मामा आणि ग्रुपचं काम इथंच थांबलं नाही. पुणे शहरात नदी प्रदूषण अफाट. 2008 साली त्यांनी राम नदी स्वच्छता अभियान हाती घेतलं. भुकूम-पाषाण-बाणेर अशा 18 किलोमीटर लांब नदीची स्वच्छता. राम नदी स्वच्छतेसाठी 20 विविध संस्था, 35 महाविद्यालये, इंडस्ट्री तसंच किर्लोस्कर वसुंधरा ट्रस्टने मदत केली. नदीचे 9 भाग करून प्रत्येक संस्थेला काम वाटून देण्यात आलं आहे. मग त्यात नदीच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांचं प्रबोधन, घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन अशा अनेक गोष्टी आल्या. रासायनिक शेतीमुळे होणारे दुष्परिणाम हे सगळ्यात जास्त निसर्गाला हानिकारक आहेत. 2014 साली त्यांनी पदमश्री सुभाष पाळेकर ह्यांच्या नैसर्गिक शेतीवरील शिबीरात सहभाग घेतला. नैसर्गिक शेती हाच उपाय हे लक्षात आल्यावर अनेक गावागावात प्रबोधन, जागरूकता अन् प्रात्यक्षिकाला सुरूवात केली. मामांनी आतापर्यंत 10 शिबीरात भाग घेतला आहे. मुळशी परिसर व इतर ठिकाणी देशी बियाणांचा प्रचार चालू आहे. महाराष्ट्रात नैसर्गिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा शेतमाल विकण्यासाठी दर वर्षी बाणेर, तर ह्यावर्षी सिद्धी गार्डनमध्ये 'वसुंधरा धान्य महोत्सव' भरवण्यात आला. पुणेकरांना वर्षभराचे धान्य घेता आलं. जवळच्या ठिकाणी नैसर्गिक शेतमाल मिळावा म्हणून बाणेर येथे एक दुकान उघडण्यात आलं. सागरमित्र संस्थेसोबत अनेक शाळेत प्लास्टिक कचरा व्यवस्थापनावर काम सुरू आहे. मासिक पाळीसाठी वापरलेल्या कृत्रिम पॅडमुळे होणाऱ्या परिणामाचा विचार करून सुती कापडाचे पॅड व जनजागृती चालू आहे. आज मामांनी सुरू केलेलं काम लाखो लोक पुढं नेत आहेत. त्याचंच ज्वलंत उदाहरण म्हणजे पुण्यातील पाषाण टेकडी. या टेकडीवर अवैध काँक्रीटकरण चालू होतं. ते थांबवण्यासाठी वसुंधरा अभियानाच्या गटाने एकत्र येऊन आंदोलन केलं. 4600 लोकांनी यावर सह्या केल्या. काम थांबलं. निसर्ग जिंकला. आता असंख्य कामांना उधाण आलं आहे ते लोकसहभागातूनच. 
मामा सगळ्यांना एकच सांगतात, “टूथपेस्टऐवजी दंतमंजन वापरा, साबणाऐवजी शिकेकाई-रिठा वापरा, कपडे सुती असावेत. आपण एवढा जरी बदल केला तरी पर्यावरण जगेल. नको असलेल्या गोष्टी टाळा, पर्यावरणपूरक आयुष्य जगा. कारण झाड आहे तरच माणूस आहे.”
अनिल गायकवाड- 99220 01442
- संतोष बोबडे, पुणे
#नवीउमेद #जागतिकपर्यावरणदिन
Santosh Bobade Anil Gaikwad

No comments:

Post a Comment