Wednesday 5 June 2019

२१ विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि प्रश्नांची साखळी... (बातम्या तुमच्या – आमच्या मुलांच्या)

मुलांच्या रिझल्टचा मोसम. सध्या घरात, घराबाहेर एकच चर्चा. किती गुण मिळणार, कुठे प्रवेश घेणार. मुलांची शैक्षणिक प्रगती हा विषय फारच प्रतिष्ठेचा झाला आहे.
अलिकडेच तेलंगणात बारावीच्या निकालानंतर एकापाठोपाठ एक अशा २१ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. 'बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासताना आणि नंतर गुणपत्रिका तयार करताना तेलंगणा राज्याच्या उच्च माध्यमिक मंडळाने या वर्षी अभूतपूर्व घोटाळे केले. अकरावीत नव्वद ते शंभर
गुण मिळवणाऱ्या अनेकांना बारावीत आपण नापास झालो आहोत वा आपल्याला अगदीच कमी गुण मिळाले आहेत याचा मोठा धक्का बसला. इतका, की आत्महत्या करेपर्यंत मुलांची मजल गेली.
सग़ळीकडून दबाव वाढला तेव्हा या मूल्यांकन प्रक्रियेत मोठा गोंधळ झाल्याचे सरकारने मान्य केले आणि नापास झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पुन्हा तपासल्या जातील असा निर्णय जाहीर केला, पण तेव्हा वेळ टळून गेली होती. गेलेले जीव परत येणार नव्हते. तेलंगणात गोंधळ सुरूच आहे. या घटनांचा विचार गंभीरपणे केला पाहिजे. या प्रकरणात सरकारकडून अक्षम्य घोटाळा, हलगर्जीपणा झाला आहे. आणि त्याचा जाब मागायलाच हवा.
जास्त चिंताजनक आहे की, कमी गुण मिळाले वा अपयश आलं म्हणून स्वतःला संपवायचा विचार आपल्या मुलांच्या मनात येतो, आत्महत्या करायला ती कचरत नाहीत.
विद्यार्थ्यांच्या या आत्महत्यांनी प्रश्नांची साखळीच तयार केली आहे. आपली मुलं या व्यवस्थेचे बळी जात आहेत का? शाळा, क्लासेस स्वतःच्या फायद्यासाठी पालकांच्या स्वप्नांना वापरून घेत आहेत का? आपण पालक मुलांना एक सक्षम व्यक्ती म्हणून घडवण्यात कमी पडतो आहोत का? मुलांचा शैक्षणिक प्रवास आनंददायी नसून आपण ताणाचा केला आहे का? पालकांचा, शिक्षकांचा मुलांशी संवाद संपला आहे का? समाजच कमकुवत आहे म्हणून आपली मुलंही दुर्बल होत आहेत का?
या प्रश्नांची उत्तरं नकारार्थी असती, तर त्या २१ मुलांनी जीवन संपवलं नसतं.
- लता परब

#नवीउमेद #Newsonchildren Swati Mohapatra #मुलांच्याबातम्या

No comments:

Post a Comment