Wednesday 5 June 2019

मुलं सांगताहेत, "पाणी वाचावा हो..."

''आंघोळीसाठी आवश्यक तेवढेच पाणी घ्या.''
''साठवलेले पाणी फेकू नका. ''
''पाण्याचा नळ दुरुस्त करा. ''
''प्यायला आवश्यक तेवढंच पाणी घ्या. "
''वाहनं ओल्या कपड्यानं पुसा''.
''हात धुण्यासाठी वापरलं जाणारं पाणी झाडांना मिळेल अशी व्यवस्था करा ''.
''कपडे धुण्याचं पाणी स्वच्छतागृहासाठी वापरा.''
घरोघरी जाऊन बीड जिल्ह्यातली जवळपास ६० हजार मुलं या सूचना देत आहेत. मुलं ५ वी ते ८ वीची. गेली काही वर्ष बीड जिल्हा सातत्यानं दुष्काळाचे चटके सहन करत आहे. यंदा तर सरासरीपेक्षा निम्माच पाऊस झालाय. पाणीबचतीचं महत्त्व मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यासाठी सरसावले आहेत बीड जिल्हा भारत स्काऊट -गाईड आणि जिल्हा परिषद.
''पाणी ही राष्ट्राची संपत्ती. बालवयातच हे महत्त्व समजायला हवं, तरंच जलअपव्यय टाळता येऊ शकेल. '' भारत स्काऊट आणि गाईडचे राज्य आयुक्त संतोष मानूरकर सांगतात.
जलदिनापासून म्हणजे २२ मार्चपासून जलअभियान सुरू झालं. १५ ऑगस्ट २०१९ पर्यंत ते चालणार आहे. जिल्ह्यातल्या सर्व शाळांमध्ये हा उपक्रम सुरू आहे. मुलांना पाणीबचतीचे धडे दिले जात आहेत. त्याचबरोबर १०० पानांची स्वतंत्र वही. तिचं नाव पाणी बचत बँक पुस्तिका. पहिल्या कॉलममध्ये दिनांक,वार, दुसऱ्यात पाणीबचतीचा तपशील, त्यासाठी राबविलेला उपक्रम, तिसऱ्या कॉलममध्ये किती लीटर पाणी बचत केली?, चौथ्या कॉलममध्ये पालकाची स्वाक्षरी. शेवटच्या पानावर पाणी उपक्रम राबवल्याबद्दल शिक्षक आणि मुख्याध्यापकांचा अभिप्राय घेऊन स्वाक्षरी घ्यायची आहे. मुख्याध्यापकांना १५ ऑगस्टपर्यंत स्काऊट-गाईड कार्यालयाला अहवाल सादर करायचा आहे.
सर्वाधिक जलबचत करणाऱ्या विद्यार्थ्यांचं, त्यांच्या उपक्रमांचं परीक्षण होईल. त्यातून पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना पारितोषिकं दिली जाणार आहेत.
या उपक्रमासाठी नवी उमेदतर्फे सर्व मुलांना शुभेच्छा. 
-दिनेश लिंबेकर, बीड

No comments:

Post a Comment