नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुका अतिदुर्गम, सातपुड्याच्या डोंगरदर्यात वसलेला आहे. या भागात अनेक नद्याचां उगम आहे. मात्र, इथे पडणारं पावसाचं पाणी वाहून जातं. त्यात, गेल्या पाच वर्षापासून पर्जन्यमान कमी झालेलं. जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळ. या भागातलं वाहून जाणारं पाणी साठवून ठेऊन त्याचा उपयोग करायचा, अशी कल्पना काकरदा ता.धडगाव इथल्या वसंत पाडवी या आदिवासी शेतकऱ्याला सुचली. त्यांनी आपल्या शेजारील आठ-दहा शेतकर्यांना एकत्र केलं आणि शासनाच्या सामूहिक शेततळे योजनेचा लाभ घेतला. मात्र त्यात मिळणाऱ्या अनुदानात त्यांना पाहिजे त्या आकाराचं तळं तयार होणार नव्हतं, हे लक्षात आलं. मग त्यांनी स्वतःकडचे पैसे टाकून जवळपास ४० गुंठे क्षेत्रात शेततळं तयार करुन त्यात हजारो लिटर पाणी साठवलं. त्यांनी पाणी वापरण्याची आचारसंहिताही तयार केली, हे विशेष. नियमानुसार, प्रत्येक शेतकऱ्याला एका दिवसाआड २० मिनिटं पाणी दिलं जातं. मात्र, पाणीबचतीसाठी या शेतकऱ्यांनी ठिबक, ड्रीप, स्प्रिंकल किंवा तुषारसिंचनासारख्या पद्धतींचा वापर करणं आवश्यक आहे. या भागातील कृषीअधिकारी आर.एम.पाडवी यांनी ही वॉटर बँक घडवून आणण्यात मदत केली.
या पाण्यावर सीताफळ, आंबा, आवळा, काजू, या सारखी पिकं, भाजीपाला घेऊन शेतकर्यांनी आपल जीवनमान सुधारलं आहे. सामूहिक मत्स्यशेतीही केल्याने या शेतकर्यांचा या वॉटर बँकेचा देखभाल दुरुस्तीचा खर्च निघाला. आणि ४० हजार रुपये नफादेखील झाला.
- रूपेश जाधव, नंदुरबार
- रूपेश जाधव, नंदुरबार
No comments:
Post a Comment