Wednesday 5 June 2019

दुष्काळावर शिक्षण हाच एकमेव उपाय

आम्ही ग्रामीण भागात काही संस्था चालवतो. शिक्षणक्षेत्रात किती भीषण परिस्थिती आहे याची कल्पना मोठ्या शहरांत राहणा-यांना करता येणार नाही. इथल्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मुलांना न शिकता डिग्री मिळते. कोणत्याही प्रकारचं प्रत्यक्ष शिक्षण न घेताच. या गोष्टी सगळ्या कॉलेजेसमध्ये चालतात असे मी बिलकूल म्हणणार नाही, पण ब-याच छोट्या गावांमध्ये शिक्षणाचे असेच हाल आहेत. म्हणायला मुलांकडे डिग्री आहे, पण प्रत्यक्षात शिक्षणच न घेतल्याने त्या डिग्रीचा कोणताही उपयोग त्यांना मिळणं शक्य नाही. मुलं चुकीच्या पध्दतीने पास होतात, मग डिग्री हातात घेतल्यावर ते जेव्हा नोकरीच्या बाजारात जातात तेव्हा त्यांची लायकी नसल्यामुळे त्यांना नोकरी मिळत नाही. 
आता लोक विचारतात, दुष्काळावर मात कशी करता येईल, शेतक-यांचं जीवन कसं सुधारता येईल. या सगळ्या लोकांना मी एकच सांगतो, चांगल्या पध्दतीची शिक्षणपध्दती अस्तित्वात आली पाहिजे. या मुलांना या भयाण परिस्थितीतून बाहेर काढण्याचा एकमेव उपाय हा आहे. पुढच्या पन्नास वर्षांत मराठवाड्याचं वाळवंट होईल, असं म्हणतात. मग, शेती हे या मुलांचं भविष्य असेल असं कसं म्हणायचं? प्रत्येक कुटुंबात शेतजमिनीच्या वाटण्या होऊन होऊन आता या मुलांच्या हातात, दीडदोन एकर जमीन उरली आहे. त्याचेही वाटे होत आहेत. डिग्र्या घेऊन ही मुलं जमिनी कसायला जातील. चांगलं शिक्षणही नाही आणि शेती कशी करायची याचीही फारशी माहिती नाही. अशी या मुलांची स्थिती. त्यांना मार्ग दाखवणं गरजेचं आहे. एका एकरात या मुलांची पिढी कशी टिकणार? नोकरी न मिळालेल्या शेतक-यांच्या मुलं नैराश्यातून टिकाचा विचार तर नाही ना करणार, याची भीती वाटते. त्यांना वाचवलं पाहिजे. त्यांना चांगलं शिक्षण देऊन शहाणं केलं पाहिजे. याची सुरूवात शाळेपासून झाली पाहिजे.
- सिध्दार्थ पाटील
(शेतकरी, कन्नड इथे ग्रामीण भागातल्या मुलांसाठी सुरू असलेल्या कॉलेजचे संचालक, वरिष्ठ वयोगटात बॅडमिंटनचे राष्ट्रीय खेळाडू)

No comments:

Post a Comment