Wednesday 5 June 2019

"कोणावर उपकार नाहीत, हे माझं कर्तव्य आहे''.

बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातलं कडा गाव. वस्ती साधारण २८०० घरांची. मराठवाड्यातल्या इतर गावांप्रमाणे इथंही दुष्काळ, पाणीटंचाई. 
''शेतकरी आपला अन्नदाता. तो संकटात असताना आपण त्याला मदत केली पाहिजे.'' डॉ भूषण पाटील सांगत होते. डॉ पाटील पुण्यातल्या एका संस्थेच्या अध्यापक महाविद्यालयात प्राचार्य. मुळचे ते कडा गावचेच. पुण्यात स्थायिक झाले असले तरी गावाशी ऋणानुबंध कायम. अनेक उपक्रमात त्यांचा सहभाग. आताही पत्नी डॉ नंदिनी, मुलगा प्रणव आणि सून प्रियांकासह ते एप्रिलअखेर आले होते.
गावामधल्या चारा छावणीतल्या ७०० जनावरांसाठी त्यांनी गोळापेंडीचं वाटप केलं. किंमत पाच लाख रुपये. ही गोळापेंडी जनावरांना महिनाभर पुरेल. ''हे कोणावर उपकार नाहीत. हे माझं कर्तव्य आहे.'' डॉ अत्यंत आदरानं, प्रेमानं शेतकऱ्यांना सांगतात. लहानपणी एका शेतकरी कुटुंबानेच आधार दिला,त्याचं स्मरण कायम राहील, हे सांगताना त्यांचा कंठ दाटून येतो.
२०१३ मध्येही डॉ पाटील यांनी चारा छावण्यातल्या पशूंना दोन लाख रुपये किमतीचं मिनरल मिक्श्चर आणि चाऱ्याचं वाटप केलं होतं. येत्या ३०  मे रोजी ते सोलापूर जिल्ह्यातल्या करमळा तालुक्यातल्या विहाळ इथे जाणार आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी २३ टन पशुखाद्य देणार आहेत . त्यासाठी प्रॉव्हिडंट फंडातून ते पैसे काढणार आहेत. 

-राजेश राऊत, बीड

No comments:

Post a Comment