Wednesday 5 June 2019

दिस-रात्र पाण्याचा ध्यास... गणेशगावची चित्तरकथा...सदा आबाची ऐका वाणी (भाग क्र.१५)


बाई म्हणून जगणं काय असतं? सण असो वा वार, दिवसातील चार ते पाच तास आम्ही केवळ पाणीच वाहतो. नांगराला जुंपलेल्या बैलावानी... दमून भागून हंडाभर पाणी येऊन बसूस्तर चिल्ली-पिल्ली भंडावून सोडतात, आई भूक लागली खायला दे? मग बिचाऱ्यांवर रागराग होतो.’ 
दोस्तांनू ही व्यथा हाई गणेशगावच्या गंगुबाई महालेंची. मराठवाडा अन‌् विदर्भच दुष्काळत पोळतोय असं ह्या सदाला वाटायचं. पर, त्र्यंबकेश्वर भागातील गंगुबाईनी सांगितलेले ह्ये चित्तर भयानक हाई.
गणेशगाव ग्रुप ग्रामपंचायतीतील हरेक महिला, युवती, गडी पाणी भरण्यात परेशान. इलेक्शन आल की हाईच जलयोजनेचं आश्वासन. पर आजपोतर काही झालं नाही. या गावच्या साऱ्या महिलांची एकच मागणी हाई, ‘सरकारने आमच्या डोईवरला हंडा उतरावा.’
यंदा तर दुष्काळ तर लईच बेकारं. त्र्यंबकपासून अवघ्या १५ किमी अंतरावर असलेल्या गणेशगांव, विनायकनगर आणि गोरठाण या गावांत पाणी मिळण मुश्कील. तिन्ही गावची लोकसंख्या जवळपास १६००. यात निम्म्या महिला.
दिवाळी जवळ आली की समदे खुश होतात पर गणेशगावला मातुर दिवाळी आली की लेकीबाळी, माणसांना पाणीटंचाईचा त्रास सुरु व्हतो. गवालगत एक विहीर हाई. पहाटे चार वाजेपासून इथं हंडा घेऊन बाया येतात. सैपाक, जेवण खावण झाली की धुणे, भांड्यासाठी या महिला विहीरीपाशी आल्याच. दिस पाण्यातच जातोय.
विनायकनगरलाबी तीच गत. गावातील विहीर आटली हाई. दोन-तीन टँकर पाणी विहिरीत टाकले तरी ते एक-दोन दिवसांच्या पलिकडे पुरत नाही. गावातील महिला धुणी-भांडी करायला दोन किलोमीटर पायपीट करत गणेशगावच्या विहिरीवर येतात.
राधाबाई महाले बोलल्या ‘दिवसातील निम्माहून अधिक वेळ हा पाण्यासाठीच जातोय. उजेडापूर्वीच डोक्यावर हंडा घेऊन निघावं लागतयं.’
वेणुबाई खोटरे सांगतात, ‘घरात एक दोन बायका असतील तर ठीक एक जण पाण्यासाठी फिरत राहते. दुसरी तोवर घरातील कामे करते. पुरुष लोक पाण्यासाठी येत नाईत. एकटी बाई असेल तर मरण हाई.’
गोरठाण गावात जासाल, इथं तर विहीरबी नाई. हातपंप ह्योच काय तो आधार. या ठिकाणी टँकरबी अजूक आला नाई. हातपंपावर नंबर लागलेले. भांडण ठरलेली. पाच वर्षाची पोर ते म्हाताऱ्या बाया बी इथ भर उन्हाच कळशी घेऊन रांगेत असत्यात.
दाेस्तांनू इथलली कविता सत्वर तर डोळ्यात पाणी आणून सांगत व्हती, ‘पाण्यासाठी जाणारा वेळ पाहता घरच्यांनी दहावी नंतर शिक्षण थांबवून घरी बसवल. पाणी संपल की पंपावरून पाणी आणायचे काम नशिबी आलेल.’
... तर मंग बघा दोस्तांनू इकडे ना खासदार येतो, ना आमदार. दुष्काळ लोकास्नी पिडतोय, पर त्याच या कुणास्नीबी घेणं नाय.. हा प्रश्न सुटला पायजेल... 

- प्राची उन्मेष, नाशिक

No comments:

Post a Comment