Wednesday 5 June 2019

१३ वर्षांच्या मुलीला, गावातल्या मंडळींसाठी खर्रा आणता आणता व्यसन लागलं, तिचं तोंड दोन बोटंसुद्धा उघडत नव्हतं..........

मुलांच्या जीवनात, १० वर्षांपर्यंत घडणाऱ्या घटनांवर त्यांचं भविष्य अवलंबून असल्याचं डॉ सीमा सांगतात. "वडिलांची पानटपरी असताना मुलगा व्यसनापासून लांब कसा राही्ल? अशाच एका विद्यार्थ्याला व्यसनातून बाहेर काढायला सहा महिने लागले. पुण्याच्या कॉलेजमधील एक तरुण. आईवडिलांचा एकुलता एक. पालकांना गलेलठ्ठ पगार. पण आपला मुलगा गेले सहा महिने ड्रग्जच्या आधीन आहे हे त्यांना माहितीच नव्हतं. मुलाची नखं ,डोळे पिवळे पडले होते. यात चूक कोणाची? एवढे कायदे असताना लहान मुलांकडे ड्रग्ज येतात कुठून? कुठल्याही सरकारी कार्यालयात धूम्रपान करणं गुन्हा आहे. मात्र, तसं होत का? धूम्रपानामुळे त्या व्यक्तीसोबत अजून १० जीव धोक्यात येतात, हे किमान सुशिक्षितांना तरी माहीत नसतं का?" 
डॉ सीमा निकम सांगत होत्या. त्या पुण्यातल्या चिंचवड इथल्या. सायकॉलॉजी अँड काउन्सेलिंग विषयात एम एस. जवळजवळ ३७४ व्यक्तींना त्यांनी आतापर्यंत व्यसनमुक्त केलं आहे. त्यांचा मुख्य भर समुपदेशनावर. चंद्रपूर जिल्ह्यातल्या आदिवासी भागात त्यांनी व्यसनमुक्तीचं काम केलं आहे. तिथली भीषणता त्या सांगतात.
"चंद्रपूर जिल्हा सगळ्यात जास्त व्यसनाच्या आहारी गेलेला. 'खर्रा' हा जहाल व्यसनी विषारी पदार्थ. तंबाखू, गुटखा, चुना,सुपारी अशा गोष्टींना एकत्र मळून तयार केला जातो. २५ ते ३० रुपयांच्या या व्यसनासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक आदिवासी १२-१२ तास काम करतात. दिवसभर नशेत. त्यामुळे पोटात अन्न नाही. मग शरीराच्या समस्या. उपाय म्हणून अँटासिड घ्यायचं. तेही व्यसनच. जवळजवळ सगळ्या पेनकिलरची नावं त्यांना तोंडपाठ. खर्याची सलग ८-१० दुकान तिथे दिसतात. त्यावर आबालवृद्धांची गर्दी. १३ वर्षाच्या मुलीला गावातील मंडळी खर्रा आणायला लावत. सगळे खातात म्हणून, तीही खाऊ लागली. तिचं तोंड दोन बोटांएवढंसुद्धा उघडता येत नव्हतं. घशाच्या कॅन्सरचं निदान झालं." .
"व्यसनाचं मूळ कारण आपली समाजरचना आणि शिक्षणपद्धती. संकट आलं की पळवाट काढण्याकडे आपला कल. व्यसन हा शारीरिक आजार नसून मानसिक आजार आहे. भावनिकदृष्ट्या खचलेला रुग्ण व्यसनाकडे अधिक लवकर वळतो. एका कंपनीचा ४० वर्षांंचा सीइओ आत्महत्येचा विचार करून व्यसनाकडे वळतो, तेव्हा लक्षात घ्या की, व्यसन
गरीब-श्रीमंत असा भेद करत नाही."
जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१८ च्या अहवालानुसार देशात दरवर्षी १० लाखांहून अधिक मृत्यू तंबाखूमुळे होतात. व्यसनांमुळे होणारी हानी पाहता मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची गरज आहेच. प्रतिकूलतेशी आपण लढायचं असतं, ही प्रेरणा मुलांमध्ये निर्माण करण्याची, जगण्यासाठी आवश्यक कौशल्य, मानसिकता, बाहेरच्या जगात वावरण्यासाठी उपयुक्त शिक्षण देण्याची गरज डॉ सीमा व्यक्त करतात.
महाराष्ट्र तसंच महाराष्ट्राबाहेर त्या व्यसनमुक्ती शिबिरं घेतात. महाराष्ट्र व्यसनमुक्ती मंडळ, सलाम फाउंडेशन या संस्थांसोबतदेखील त्या काम करत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अधिकारीवर्गाला मार्गदर्शन त्या करतात. व्यसनाधीन व्यक्तींसोबतच त्यांच्या कुटुंबाचं समुपदेशन त्यांना गरजेचं वाटतं. 'राष्ट्रीय रणरागिणी' पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.
डॉ.सीमा निकम यांच्या संपर्कासाठी - 8421534082
-संतोष बोबडे, पुणे 

No comments:

Post a Comment