Wednesday 5 June 2019

माणसांनी गावं सोडली. वस्त्यांमधील घरांना कुलुपं लागली.

राणीऊंचे गाव, ता घनसांगवी, जि जालना. दुष्काळझळांचा पहिला फटका बसतो, शेतमजुरांना. शेतात पिकं असतील, तर काही कामं मिळतात. रोजंदारीचा प्रश्न सुटतो. राणीऊंचे गावात पाऊसच खूप कमी झाला त्यामुळे पेराच झाला नाही. ३०/४० एकर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनादेखील चारा उपलब्ध नसल्याने जनावरांचा सांभाळ कसा करावा हा प्रश्न. पावसाच्या भरवश्यावर लावलेल्या तुरीला शेंगासुद्धा आल्या नाहीत. मग त्याच्या पळहाट्या तोडून त्याची पेंढ करून त्या जनावरांना टाकत आहे. राणीऊंचेगाव परिसरात अडीच हजार हेक्टर जमीन, पण पावसाने दगा दिल्यानं जेमतेम १५/२० हेक्टर मध्ये ज्वारीचं पीक हाती लागलं. गावात काम नसल्याने लोकांनी गाव सोडण्यास सुरुवात केली आणि बंजारा,भिल वस्ती रिकामी होऊ लागली. काही कुटुंब उसतोडीसाठी गेली. काही शहराकडे कामधंद्यासाठी गेली. त्यामुळे या कुटुंबातल्या मुलांना शाळा सोडावी लागली. आधी पोटोबा, या तत्वानुसार मुलांबळांसह लोकांनी गाव सोडले . त्यामुळे पहिली कुर्‍हाड पडली ती मुलांच्या शिक्षणावर. गावात नरेगाची कामंही नाहीत. राणीऊंचे गावात एक आश्रम शाळा, एक जिल्हा परिषदेची शाळा. माणसांनी गावं सोडली. वस्त्यांमधील घरांना कुलुपं लागली.
- अनंत साळी, जालना

No comments:

Post a Comment