उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातलं सावरगाव. लोकसंख्या ५ हजाराच्या घरात. उस्मानाबाद जिल्हा दुष्काळग्रस्त. परिसरात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्येचं एक कारण म्हणजे लग्नसमारंभांमुळे वाढलेला कर्जाच बोजा. किमान या कारणामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागू नयेत, यासाठी काहीतरी केलं पाहिजे , असं रामेश्वर तोडकरी यांना वाटलं. तोडकरी सावरगावचे सरपंच. काँग्रेसचे नेते. परिसरातले सगळे त्यांना आबा म्हणून ओळखतात. गेल्या ११ वर्षात त्यांनी १७६ गरीब मुलींची लग्न लावली आहेत. त्यात पत्नी स्वातीताईंची साथ आहे. त्या माजी पंचायत समिती सदस्य. यंदाही जानेवारीअखेरीला श्री पार्श्वनाथ दिगंबर संस्तुती भवनाच्या प्रांगणात सामुदायिक विवाह सोहळा रंगला. 'हुंडा घेणार नाही-हुंडा देणार नाही', 'मुली वाचवा, मुली शिकवा,' फलक लग्नमंडपात लावलेले, सामाजिक जागृती करणारे. यासाठी, कुठल्याही शासकीय मदतीची अपेक्षा ते ठेवत नाहीत. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून दरवर्षी ते या सोहळ्याचं आयोजन करतात.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संतोष बोबडे यांचंही सहकार्य यासाठी लाभतं.
- अनिल आगलावे, उस्मानाबाद
No comments:
Post a Comment