Wednesday 5 June 2019

अन्नदात्यासाठी अन्नछत्र, सदा आबाची ऐका वाणी (भाग १४)

दुष्काळ पोळतोय. हजारो जनावरे चारा छावण्यांमंधी हाईत. पर छावणीवर गुरांसाठी आलेल्या शेतकऱ्याला दोन घास मिळतील का न्हाई हा प्रश्न कायम हाई. छावणीवर मुक्कामी असलेल्यांना आज संकटात दोन घास देण्याचे काम होतयं शांतीवनच्या पाच ठिकाणच्या मदत केंद्रात. जगाचा पोशिंदा शेतकरी अन‌् त्याच्या पोटाची सोय बघायची, हे जरा विपरितच. पर अन्नदाता अडचणीत असंल तर त्याच्यासाठी गेलंच पाहिजे, ही ‘शांतीवन’ची भूमिका. 
शिरुर ह्यो मराठवाड्यातील सर्वात कमी पाऊस झालेला तालुका. त्यामुळे पाणी व चारा टंचाई ठरलेली. जनावरांसाठी चारा छावण्या सुरू हाईत. पाडळी, वंजारवाडी, काकडहिरा, थेरला आणि वडझरी या गावच्या छावणीत शांतीवन संस्थेने शेतकऱ्यांसाठी मदत केंद्र उभारलयं. या केंद्रामधी जनावराकड शेतकऱ्यासाठी अन्नछत्र सुरु केलयं. दररोज रात्री इथं शेतकरी, शेतमजूरांची पंगत होते. पाच ठिकाणच्या या अन्नछत्राने तीन हजारांवर शेतकऱ्यास्नी आधार दिलायं..
‘शांतीवन’चे दीपक नागरगोजे म्हणतात, ‘छावण्यांत जनावरांकडे पाहण्यासाठी शेतकऱ्याला मुक्कामी थांबावे लागते. हे शेतकरी परिसरातील चार पाच गावचे असतात. त्यामुळे कधी गावाहून जेवणाचा डबा येतो तर कधी शिळे अन्नच खावे लागते, अशी स्थिती. त्यामुळे पाच ठिकाणी अन्नछत्र सुरू केलयं. मानूर, लोणी, वारणी, नांदेवाली या गावांमध्ये अन्नछत्र सुरू होणार आहे.’
याच कामासाठी झटणारे ‘सेवाश्रम’चे सुरेश राजहंस म्हणाले, ‘केवळ अन्नछत्र करून आम्ही थांबलो नाही तर शेतकऱ्यांच्या आरोग्यविषयक समस्या, आत्महत्या करू नये म्हणून समुपदेशन, प्रबोधनात्मक कार्यक्रम घेत आहोत. हे सारे सामाजिक जाणीवेतून.’
...तर दोस्तहो दुष्काळ चटके देतोय पर माणुस माणसाला साथ देतोयं. शांतीवनचे अन्नछत्र बळीराजास्नी धीर देतयं. दुष्काळाम्होरं न झुकता लढ म्हणत... 
- अमोल मुळे, बीड 

No comments:

Post a Comment