Wednesday, 5 June 2019

तोरंगणचे काशिनाथ सात वर्षापासून पाड्याला देताहेत मोफत पाणी

पिण्याच्या पाण्यासाठीची वणवण अनुभवत, विशेषतः आईला होणारा त्रास बघतच काशिनाथ मोठा झाला. लग्न झालं. बायकोलाही तोच त्रास. उन्हाळ्यात पाणी आणायचं तर रात्री पंपाच्या परिसरात मुक्काम करावा लागे, अशी स्थिती. तोरंगणचा शेतकरी युवक काशिनाथ बोरसे. 
नाशिक जिल्ह्यातल्या हरसूलपासून आठ-दहा किलोमीटर अंतरावरचं तोरंगण. दुर्लक्षित आदिवासी पाडा. ३६० घरांची वस्ती.
साधारण ८ वर्षांपूर्वी गावाला दोन जलवाहिनी योजना मंजूर झाल्या. त्यासाठी ५० लाख रुपये खर्च झाले. पण नीट नियोजन नव्हतं. खर्च वाया गेलाच. शिवाय पाड्याला काहीच फायदा झाला नाही. जलवाहिनी योजना मंजूर असल्यानं टँकरनेही पाणी मिळेना. दोन हापसे तीन बोअर. तरीही गावात पाण्याचा खडखडाट. गावकऱ्यांना तब्बल तीन किलोमीटर अंतर पार करून हरसूल खर्डीपाडाजवळची कास नदी गाठावी लागे. तेव्हा कुठे पाणी मिळे.
तेव्हा, बोअरवेल खोदून पाहण्याचं काशिनाथनी ठरवलं. ३५ हजार रुपयांचं कर्ज, थोडी जमवलेली पुंजी, काही हातउसने असं मिळून ५० हजार रुपये जमा करत त्यांनी बोअरवेल खोदली. तिला पाणीही लागलं. गरजेपुरतं पिण्याचें पाणी उपलब्ध झालं.
आपली गरज तर भागली पण गावाचं काय? या विचारानं काशिनाथ अस्वस्थ होते. त्यांनी कुटुंबाशी चर्चा केली आणि बोरसे कुटुंबानं बोअरवेलचं पाणी गावासाठी खुलं केलं.
गाव एक किलोमीटर अंतरावर पसरलं आहे. अगदी शेवटच्या टोकाला राहणाऱ्या महिलेलाही या बोअरवेलचं पाणी मिळत आहे. गेली ७ वर्ष काशिनाथ गावाची तहान भागवत आहेत, एकही पैसा न घेता.
- प्राची उन्मेष, नाशिक

No comments:

Post a Comment