Wednesday 5 June 2019

दुष्काळी भागातल्या मुलांना ‘निरंजन’चा आधार

शिरूरकासार (जि. बीड) इथले जयश कासट १९९७ साली व्यवसायासाठी पुण्यात आले. व्यवसायात चांगला जम बसल्यानंतर पुण्यातच स्थायिक झाले. तरी, गावचा लळा होताच. दुष्काळापायी झालेली गावातल्या शेतकऱ्यांची झालेली दुरवस्था जयश यांना बघवत नव्हती. सामाजिक जबाबदारी म्हणून आणि त्यांच्यासाठी काही करता येईल का यासाठी जयश सतत प्रयत्नशील असायचे. यातून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या मुलांचं पालकत्व घेण्याची कल्पना त्यांना सुचली. निरंजन सेवाभावी संस्थेची स्थापना झाली. साल २०११. पहिल्यांदा, शिरूर कासारच्या पंचवीस मुलांना दत्तक घेतलं. गरजू मुलांना दत्तक घेण्याचा हा उपक्रम आत्तापर्यंत अविरत सुरू आहे. जयेश कासट म्हणाले, "ग्रामीण भागात दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे. शेतकऱ्यांची मुलं शिकली, तर त्या कुटुंबांचंभवितव्य बदलेल हा उद्देश ठेवून आम्ही मदत करतो. दरवर्षी विद्यार्थी संख्या वाढवत आहोत. यातून मानसिक समाधान मिळतं."
नगर जिल्ह्यातल्या १०० मुलांना दोन वर्षांपासून, पुणे जिल्ह्यामधील नांदगाव (ता. मुळशी) इथल्या ६० मुलांना पाच वर्षांपासून, रायगड इथल्या ९८ शेतकऱ्यांच्या मुलांना सहा वर्षांपासून शैक्षणिक मदत दिली जात आहे. पंचवीस मुलांपासून सुरू केलेला हा उपक्रम ५०० मुलापर्यंत पोचला आहे. हमाल, मापाडी यांच्या मुलांसाठीही कार्यकर्ते काम करत आहेत. रायगड जिल्हा परिषद शाळा हिरकणीवाडी इथल्या ९८ विद्यार्थ्यांचं शैक्षणिक पालकत्त्व संस्थेने स्वीकारलं आहे. दत्तक घेतलेल्या मुलांना गणवेश, बूट, दप्तर, पुस्तके, वह्या आणि वर्षभर पुरेल इतके शैक्षणिक साहित्य मोफत दिले जाते. या सर्व मदतीचा खर्च 'निरंजन'चे सर्व सभासद स्वतःच करतात. जयेशसोबत विराज तावरे (बारामती), स्वप्नील देवळे (पुणे), अभय जाजू (सोलापूर), अतुल डागा (नगर), जगदीश मुंदडा (हडपसर), नवनीत मानधनी (धर्माबाद, नांदेड), ब्रम्हानंद लाहोटी, अमित गायकवाड, आनंद जाखोटीया, भरत लढे, प्रतिम जगताप (अमेरिका), रमेश तोष्णीवाल (लातूर) हे सर्व तरूण एकत्र आले आहेत.
यंदा (२०१९) राज्यभरातल्या एक हजार मुलांना आधार देण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे.
संपर्क
जयश कासट, ८००७८८४४८३
अध्यक्ष, निरंजन सेवाभावी संस्था, पुणे
----------
सूर्यकांत नेटके, अहमदनगर

No comments:

Post a Comment