Saturday 7 September 2019

स्थानिक हवामान आणि बहुपीक पद्धतीचा अभ्यास करून शेती केली तर आत्महत्येचा विचारही शिवणार नाही- राजेंद्र भट

''भारतातील शेतकऱ्यांनी स्थानिक हवामान आणि बहुपीक पद्धतीचा अभ्यास करून शेती केली तर आत्महत्येचा विचारही त्यांना शिवणार नाही.'' राजेंद्र भट सांगत होते. भट ठाणे जिल्ह्यातल्या डोंबिवलीत वाढलेले. इंजिनिअर. 
तरुणपणी गडकिल्ले पालथे घालत असताना जाणीव रुजायला लागली- आपण निसर्गाकडून फक्त घेतो आहोत, देत तर काहीच नाही.
१५ वर्ष एका कंपनीत नोकरी केली. मग नोकरी कायमची सोडून १९९३ मध्ये शेतीसाठी जमीन खरेदी केली. बदलापूर स्थानकापासून सुमारे 6 किमी अंतरावर बेंडशीळ इथली 1 एकर खडकाळ,नापीक जमीन.
शेतीचं फारसं ज्ञान नसतानाही भट यांनी पहिल्या वर्षी पालेभाजी आणि भाताचं पीक घेतले. एक एकरात फक्त ७०किलो पीक. आता सध्या त्यांची ५ एकर शेती आहे.शेतीरूपी जंगलाला त्यांनी 'निसर्गमित्र' अस नाव दिल आहे.त्यात सुमारे दरवर्षी एक ते दीड टन भात होतो. आवडीमुळे,निसर्गावरील प्रेमामुळे त्यांनी शेतीत अनेक प्रयोग केले. चुकातून शिकता येत हा मूलमंत्र. जंगलात निगा न राखता, खत न वापरता चांगलं उत्पादन येतं. शेतातही हा प्रयोग करता येईल का ? जंगलात सगळीकडे एकाच प्रकारची झाडे,पक्षी,फळे, फुले पाहायला मिळत नाहीत. या निरीक्षणातून, विचारातून प्रयोग सुरू झाले. 

शेतीसाठी लागणाऱ्या मुख्य गोष्टी जसे बियाणं,कीटकनाशके, खते शेतातच बनवायला सुरुवात केली.झाडांची पाने तिथेच कुजवली, झाडांच्या फांद्या कापून भाजीपाल्यांसाठी मांडव तयार केले.पाण्याचे बाष्पीभवन थांबवण्यासाठी लेंडी पिपळीची वेल जागोजागी लावली. .देशी गांडूळाची मातीत निर्मिती करायला सुरुवात केली. पक्षांनी गांडूळ खाऊ नये म्हणून तण वाढू दिलं. तेच तण त्याच जागी कुजवलं. त्यातून सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत झाली. झाडांचा पाला, शेतीतून उरलेले काष्ठपदार्थ पुन्हा शेतात टाकून शेतीचा कस वाढवला जातो. निसर्गाला हानी न पोहोचवता, कमीत कमी खर्चात, श्रमात, जास्त पीक कसे घेता येईल?याचा विचार भट यांनी केला.
शेती शेजारील असलेल्या बंधाऱ्यातच पाणी अडवून तेच पाणी बोरद्वारे संपूर्ण शेतीला वापरतात. आंतरपीक, बहुपीक पद्धत वापरतात. मध्यभागी नारळ , नारळावर चढलेली काळ्या मिरीची वेल, त्याच्या खाली असलेलं कॉफीच झाड,त्याखाली कंद,त्यांच्यावर भाजीपाला अशी असंख्य प्रकारची पिकं. मार्चपासून ऑगस्ट शेवटापर्यंत येणारे ५२ जातीचे आंबे,त्यामध्ये असलेली केळीची,पेरूची रोपे,कीड थांबवण्यासाठी खाली लावलेला गवती चहा,सीताफळ,रामफळ अशी फळे,बकुळ,केवडा, चाफा,नागचाफा अशी कितीतरी प्रकारची फुलं ; कुडुलिंब,हेरडा,बिब्बा,रिठा ह्यासारख्या औषधी वनस्पती. साग,शिवण,अगस्त,रोजवूड, काजू,फणस अशी जवळपास ४०० प्रकारची झाडं. ५० प्रकारचे पक्षी.
शेतीसोबत शेती पर्यटन,कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्ध व्यवसायचा विचार शेतकऱ्यांनी करायला हवा, असा सल्ला भट देतात. त्यांनी सुरुवातीला ५ते ७ वर्ष दुग्धव्यवसाय केला.शेतीच्या ध्यासापायी त्यांनी सहा वर्षात त्यांच्या मुलांसोबत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून शेतीची पदवी संपादन केली.शेतीच्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांच्या प्रबोधनासाठी केला. वर्षभर शेती विद्यालयात मुख्याध्यापक.
२००६ मधल्या पुरात त्यांनी तयार केलेली सगळी माती वाहून गेली पण त्यांनी न हरता पुन्हा जंगल तयार केलं. .सतत काहीतरी करण्याच्या धडपडीमुळे त्यांनी शेणामातीपासून गणपतीच्या मूर्ती घडवल्या. त्याचं विसर्जन घरातच केलं. तेच पाणी पुन्हा शेतीत वापरलं. त्यांचा प्रवासात कुटुंबाची साथ मिळाली.
२००५ सालापासून ते निवासी प्रशिक्षण शिबीर घेतात. भट यांना २०१२ साली कोकण विभागातून कृषिभूषण हा पुरस्कार मिळाला.

- संतोष बोबडे, ठाणे

No comments:

Post a Comment