Wednesday 29 March 2017

‘टॉप सिक्रेट’नं भेदलं दुष्टचक्र

बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील फुल शेतीची ही गोष्ट. परंपरागत शेतीत उत्पन्न कमी आणि खर्च जास्त. वर्षानुवर्षे शेतकऱ्याच्या माथी असलेलं दुष्टचक्र भेदलं गजानन ढगे यांनी. ढगे यांनी १० गुंठे जमिनीत जून २०१६ मध्ये गुलाब शेती सुरु केली. त्यासाठी पुण्यातून हार्टीकल्चरचं प्रशिक्षण घेतलं. आणि ‘टॉप सिक्रेट’ जातीची १० हजार रोपं खरेदी केली. त्यासाठी खर्च आला प्रति रोप सात रुपये. त्यापैकी ९ हजार रोपांची लागवड केली. लागवडीच्या जागेत लालमातीचा वापर केला. रोपांना निंबोळी पावडरची ट्रीटमेंट दिली. 



हे फूल पॉलिहाऊसमधलं. हवामानानुसार पाण्याची गरज. उष्ण हवामानात अर्धा तास आणि एरवी पंधरा ते वीस मिनिटे ठिबकद्वारे. गुलाबासाठी खत महत्त्वाचे. दर सहा दिवसांनी खतांचा डोस द्यावा लागतो. हिवाळ्यात भुरीचा त्रास जाणवला तर त्यासाठी रासायनिक, सेंद्रिय आणि जैविक यांच्या कॉम्बिनेशनने भुरी कंट्रोल करावा लागतो. अश्या पद्धतीनं गुलाब शेतीचे पाणी, खते आणि कीड नियोजन करावं लागतं. 
पॉलिहाऊसमधल्या गुलाबांची गुणवत्ता उत्तम असते. आणि फुलं निर्यातही होतात. फुलशेतीसाठी ढगे यांना १० लाखांचा खर्च आला. पैकी एक लाख त्यांनी जमापुंजी वापरली. आणि नऊ लाख रुपये बॅंकेचं कर्ज घेतलं. कृषी विभागाने चार लाख एकाहत्तर हजार सबसिडी दिली. त्यामुळे आता चार लाख पंचवीस हजारांचे कर्ज ढगे यांच्यावर आहे.
लागवडीनंतर चार महिन्यांनी गुलाबाचे उत्पादन सुरु झाले. सुरुवातीला साडेतीनशे तर आता पाचशे ते सहाशे फुलं रोज निघतात. ढगे यांच्याकडची फुले चांगल्या प्रतीची. त्यामुळे त्यांना सरासरी चार रुपयांचा दर मिळत असून दोन हजार रुपयांचं रोज नगदी उत्पन्न मिळतं आहे. यामध्ये खते आणि फवारणीचा खर्च वजा होऊन ढगे यांना ३० हजार रुपये महिना निव्वळ नफा राहातो. अकोला आणि अमरावतीत त्यांची फुले हातोहात खपतात. विदर्भाचे हवामान, पाण्याची कमतरता आणि बाजारावर अवलंबून असलेली फुलशेती यात जोखीम आहेच हे गजानन ढगे जाणून आहेत. त्यामुळेच त्यांनी 'टॉप सिक्रेट' या जातीची लागवड केली. ही जात दिसायला उंच. मार्केट डाऊन असते तेव्हा रोपांची छाटणी करून पाणी बंद केले की फुलांची उगवण बंद करण्याची सोय आहे. पुन्हा पाणी देऊन फुलांची उगवण सुरु करण्याची सोय या जातीत आहे. त्यामुळेच बाजारातील चढ़ उतारात त्यांचे नुकसान होत नाही. 

कोरडवाहू भागातील कापूस सोयाबीन पट्ट्यातील बाकी शेतकऱ्यांप्रमाणेच ढगे यांची आधी परिस्थिती होती. केवळ ‘टॉप सिक्रेट’मुळे त्यांचं जीवन बदललं आहे.
- अमोल सराफ.

No comments:

Post a Comment