Sunday 19 March 2017

७० हजार जणांची ‘अन्नपूर्णा’

दुपारची बाराची वेळ. दोन तरुण उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयात येतात. रुग्णांच्या नातेवाइकांना जेवणाचा डबा आला आहे का, असं विचारतात. नकारार्थी मान हलताच त्यांचे नाव लिहून घेतले जाते. जेवणासाठी रुग्णालयाबाहेरच्या अन्नपूर्णा हॉलमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं जातं. गेल्या वर्षभरात असे सुमारे ७० हजार रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना अन्नपूर्णा ग्रुपने जेवणाची मोफत सोय करून आधार दिला आहे.
२६ डिसेंबर २०१५ रोजी उस्मानाबाद शहरातील जिल्हा रुग्णालयासमोर एका पत्र्याच्या शेडमध्ये अन्नपूर्णा हा उपक्रम सुरू झाला. विविध क्षेत्रातील तरुण यासाठी एकत्र आले आहेत. या तरुणांनी सुरुवातीला स्वत:च खर्च करून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी सोय केली. त्यानंतर कुणी वाढदिवस, स्मृतीदिन तर कुणी दातृत्वाच्या भावनेनं अन्नदान करू लागलं. पाहता-पाहता वर्ष झालं.
मात्र अन्नदानाचा या यज्ञ अखंडितपणे सुरू आहे. जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना शासकीय भोजन मिळत असलं तरी त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाइकांची प्रचंड गैरसोय होते. मुळातच सरकारी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची परिस्थिती जेमतेम असते. त्यात बाहेरचे जेवण घेणं परवडत नाही. परिणामी, नातेवाइकांना उपाशी रहावं लागत असल्याचं धक्कादायक वास्तव अतुल अजमेरा, जितेंद्र खंडेरिया या तरुणांना दिसलं. मग जवळच्या मित्रांशी बोलून त्यांनी अशा नातेवाइकांसाठी अन्नपूर्णा योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला.
आता योजनेला सामाजिक बळ मिळालं आहे. त्यामुळे हा उपक्रम आता कायम सुरू राहील, अशी आशा आहे. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्यासह विविध मान्यवरांनी या ग्रुपचं कौतुक केलं. सरकारी अनास्थेमुळं दुर्लक्षित असलेल्या मधुबन कुष्ठधाममधील रुग्णांनाही दररोज गरम जेवणाची सोय अन्नपुर्णा ग्रुपचे सदस्य करीत आहेत. आज अभिजीत निंबाळकर यांच्यासह संपूर्ण टीम त्यासाठी सज्ज असते
- चंद्रसेन देशमुख.

No comments:

Post a Comment