Tuesday 19 June 2018

गरिबांची ‘खिदमद’


बीडमधले मौलाना अब्दुल बाखी. त्यांच्या परिसरातच भाजीपाल्याचा व्यापार चालायचा. बऱ्याचदा योग्य भाव न मिळाल्यानं भाजीपाला परत घेऊन जाणंही शेतकऱ्यांना परवडायचं नाही. मग तो तिथेच टाकला जाई. हाच भाजीपाला जर गरिबांच्या घरात गेला तर त्यांनाही आधार होईल आणि परिसरातली अस्वच्छताही कमी होईल असा विचार बाखी यांनी केला. 
वर्ष 2014. बाखी यांना मौलाना तोहर शेख, इब्राहिम तांबोळी, सलीम मिर्झा, अब्दूल फुदूस या चार मित्रांचीही साथ लाभली आणि सुरुवात झाली ‘खिदमद खल्क’ या गरिबांची सेवा करण्यासाठी सुरू झालेली संस्थेची.
पाचही मित्रांनी शहरातल्या वेगवेगळ्या भागातल्या झोपडपट्ट्यांमध्ये फिरून अतिशय गरीब २५० कुटुंबांची यादी केली. भाजीपाला आडत व्यापाऱ्यांना कल्पना सांगितली आणि उपक्रम सुरू झाला. वह्या, स्वेटर, जुने कपडे, हळूहळू व्याप्ती वाढली. कुटुंबांची संख्याही वाढत ४ वर्षात एक हजार कुटुंबांवर पोहोचली.
शहरातल्या सर्व मंगल कार्यालयात ‘खिदमद खल्क’ ने संपर्क क्रमांक लावले. वाया जाणारं अन्न गरजूंना मिळू लागलं. एखाद्या आयोजकानं फोन केला, तर अन्नपदार्थ घेऊन यायचे. ते व्यवस्थित सिल्व्हर पॅकेटमधून गरजूंपर्यंत पोहोचवायचे. यासाठी कार्यालय सुरू झालं. पॅकींग मशीन, रिक्षा घेतली, चालक ठेवला. व्यवस्थापक नेमला. २० जण स्वयंसेवक. रिक्षाचं इंधन, व्यवस्थापक, वाहनचालकाचा पगार, पॅकींग खर्च आणि कुणाला शस्त्रक्रियेसाठी तर कुणाला शिक्षणासाठी रोख मदत यासाठी निधीची आवश्यकता लागते. भंगार सामान आणून द्या, असं आवाहन लोकांना केलं. त्याच्या विक्रीतून निधी मिळतो. शिवाय शहरात ५० ठिकाणी मदत पेट्या बसवल्या आहेत. त्यातही चांगला निधी जमतो." बाखी सांगतात.
मदत करताना धर्म, जात पाहिली जात नाही. यंदा ऐन दिवाळीत लक्ष्मणनगर भागात अतिक्रमणं उठवण्यात आली. उघड्यावर आलेल्या जवळपास ५० कुटुंबांना दिवाळीसाठी किराणा, कपडे अशी मदत केली. दरवर्षी दिवाळीत गरीब हिंदूंना तर रमजान ईदसाठी गरीब मुस्लीम कुटुंबियांना कपडे, महिनाभर पुरेल इतका किराणा देण्यात येतो. २०१६ मध्ये अचानकनगर परिसरात बोअर घेऊन, टाकी बांधून १५० कुटुंबियांचा पाणी प्रश्न कायमचा सोडवण्यात आला. आत्महत्याग्रस्त ४ शेतकऱ्यांच्या पत्नी, मुलींना शिलाई मशीन्सही देण्यात आली. गरिबांची खिदमद करणं असं सुरूच आहे.

-अमोल मुळे .

No comments:

Post a Comment