Monday 4 June 2018

दुग्धव्यवसायाचा दुष्काळात आधार

अहमदनगर जिल्हा. शेवगाव तालुका. शेवगाव- बोधेगाव रस्ता. तिथलंं सुळेपिंपळगाव. पुरेसा पाऊस नसल्यानं सततची पाणीटंचाई. गावातलं देशमुख कुटुंब शेतकरी. परिस्थिती सर्वसाधारण. पाच वर्षांपूर्वी, कुटुंबातल्या राहुल यांनी ३७ एच एफ गायी आणून दुग्धव्यवसाय सुरू केला. दोनशे लिटर दूध ते संकलन केंद्राला पुरवत. मात्र मिळणारा दर आणि खर्च यांचा ताळमेळ लागत नव्हता. तेव्हा गायी विकून म्हशी आणण्याचा आणि दुधाची थेट विक्री करण्याचा निर्णय राहुल यांनी घेतला. 
सुरुवातीला स्थानिक बाजारपेठेतून चार म्हशी खरेदी केल्या. टप्याटप्यानं खरेदी करत, आता मुऱ्हा जातीच्या २७, जाफराबादी जातीच्या १० म्हशी, ३७ वासरं , ३ गावरान गायी, १० पारठ्या म्हशी आणि कालवडी अाहेत.
राहुल यांची ३० एकर शेती आहे. चार एकर ऊस, सहा एकर मका, आणि पंधरा एकर चारा पिकं अाहेत. जनावरांचं मूत्र खड्ड्यात टाकून त्याचा शेतीला पंपाद्वारे पुरवठा केला जातो. गांडूळ खताचाही दहा गुंठ्याचा प्रकल्प अाहे. वर्षाला ३० ते ३५ टन खताची विक्री प्रतिटन सात हजार रुपये दराने होते. चारा पिकांसाठी केवळ सेंद्रिय खतच वापरलं जातं. त्यामुळे जनावरांना चारा सकस मिळतो. आणि जनावरांकडून दूध उत्तम मिळतं. रोज संकलित होणा-या २४० लिटर दुधापैकी ३० ते ४० लिटर रतीबाला आणि उर्वरित दुधाची पन्नास रुपये लिटरनं ग्राहकांना थेट विक्री होते. 
व्यवसायात राहुल यांच्या भावाची, सचिनचीही साथ आहे. अनेक ठिकाणी दुधात वाढ व्हावी, यासाठी म्हशीची वासरं (वगारी, रेडकू)सांभाळली जात नाहीत. देशमुख यांनी मात्र आत्तापर्यंत सर्व वासरं सांभाळली. त्यांच्यासाठी स्वतंत्र जागेची व्यवस्था अाहे. दूध काढणं, चाराकापणी, पाणी, अन्य कामं, व्यवस्थापन यासाठी ८ कामगार अाहेत. यंत्राएेवजी हातानं दूध काढलं जातं. प्रत्येक म्हशीच्या दुधाची नोंद केली जाते. निर्भेळ आणि सकस दुधाची खात्री देशमुख देतात. त्यांच्या गुरुदत्त दुग्धालयाचं पंचक्रोशीत नाव आहे. 
नैसर्गिक दुधाचे फायदे, म्हशीच्या दुधातून मिळणारे घटक, ऑक्‍सिटोसीन, ॲँटिबायोटिक्सचा वापर केलेल्या दुधामुळे होणारं नुकसान याबाबत देशमुख माहिती देतात.
राहुल यांनी शेताजवळून जाणारा छोटा ओढा अडवून नैसर्गिक लहान तलाव केला. मग या भागातून वाहणाऱ्या नदीवर तीन बंधारे बांधले. नदीचं खोलीकरण केलं. यामुळे आसपासच्या विहिरींची पाणीपातळीही वाढली. पूर्वी जानेवारीतच पाणीटंचाई निर्माण व्हायची.आता मे-जूनपर्यंत पाणी पुरतं.
 ---सूर्यकांत नेटके .

No comments:

Post a Comment