Thursday 3 January 2019

शाळा बदलली बाई अन् गावही बदलले बाई!

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील गढाळा. गावात 2018 च्या जून महिन्यात तीन- चार दिवस चूलच पेटली नव्हती, बाया- बापड्यांच्या डोळ्यातले अश्रूच थांबायला तयार नव्हते. मुलं सुद्धा खेळण्याचे विसरून भेदरलेली होती. तुम्हांला वाटत असेल असे कोणते संकट या गावावर ओढवले आहे? या गावातील लोकांवर सुतककळा आली होती, ती या गावच्या गुरूजींच्या म्हणजेच उत्तमराव वानखेडे यांच्या झालेल्या बदलीमुळे. गेली बारा वर्षे वानखेडे सर गढाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून सेवा बजावीत होते, नुकतीच त्यांची लाखगाव या गावी बदली झाली, पण वानखेडे सर ग्रामस्थांसाठी फक्त शिक्षक नव्हते तर ते लेकरांचे जणू मायबापच होते!

2006 सालच्या जून महिन्यात वानखेडे सर या गढाळा प्राथमिक शाळेत रूजू झाले. शाळेत येण्यास विद्यार्थी फारसे उत्सुक नसतात, याची जाणीव सरांना झाली. सातेकशे लोकसंख्या असलेल्या या गावातील निम्म्याहून जास्त लोक दिवाळीनंतर ऊसतोडणीला पश्चिम महाराष्ट्रात जायचे आणि मग शाळेची मुळातच कमी असलेली उपस्थिती दिवाळीनंतर तर अगदीच घटायची. ही मुले थेट पुढच्या शैक्षणिक वर्षातच शाळेत यायची. वानखेडे सरांना ही परिस्थिती बघवत नव्हती. त्यांनी पालकांशी संवाद साधण्यास सुरूवात
केली, त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. शिक्षण घेतले तरच मुलांचा भविष्यकाळ उज्ज्वल ठरू शकतो, नाहीतर विळा- कोयता आणि ऊसतोडीच्या कष्टांशिवाय मुलांना भविष्य नाही हे पटविण्यास सुरूवात केली.
“मुलांना तुमच्यासोबत ऊसतोडणीला नेल्याने त्यांची शाळा बुडते आणि शैक्षणिक नुकसान होते, त्यामुळे त्यांना गावातच ठेवा”, असे सरांचे सांगणे होते. 2008 साली पाच मुलांना गावातच ठेवायला काही पालक तयार झाले. सरांनी त्या मुलांची संपूर्ण जबाबदारी घेतली, फक्त रात्रीचे जेवण मुले आपल्या नातेवाईकांच्या घरी घेत. पालकांनी दिलेली अंथरूणे – पांघरूणे टाकून शाळेतच मुले झोपी जायची. वानखेडे सर स्वत: त्यांच्यासोबत शाळेत मुक्कामी राहत. मुलांचे काहीही दुखले- खुपले किंवा ती आजारी पडली तरी वानखेडे सर स्वत: त्यांना डॉक्टरांकडे नेऊन, प्रसंगी घरचे जेवण खाऊ घालून पोटच्या मुलांप्रमाणे त्यांची काळजी घेत. शिवाय मुले शाळेत मुक्कामीच असल्याने त्यांना स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लावणे, त्यांच्या अभ्यासावर विशेष मेहनत घेणे आणि एकूणच त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होईल, याकडे सरांनी विशेष लक्ष पुरविले.
याचा परिणाम असा झाला की, ऊसतोडणीवरून जेव्हा पालक परत आले, तेव्हा त्यांना मुलांच्या वागण्या- बोलण्यात आणि अभ्यासातही खूप सकारात्मक बदल जाणवला. त्यामुळे त्याच्या पुढच्या वर्षी अनेक पालकांनी आपली मुले गावातच शिक्षणासाठी ठेवण्याचा निश्चय केला. पाचेक मुलांचे तर गावातं कोणीच नातेवाईक नव्हते, तेव्हा त्या मुलांची जबाबदारी शाळेत पोषण आहार शिजविणाऱ्या चतुराबाई बंदुके मावशींनी घेतली. या मुलांच्या जेवणाचा, औषधांचा पूर्ण खर्च मावशींनी आणि त्यांच्या यजमानांनी आनंदाने केला.
अशा प्रकारे वानखेडे सरांनी गढाळा गावचे स्थलांतर 100 टक्के थांबविलेले आहे. पूर्वीची 40-42 ची पटसंख्या आता 82 वर गेली आहे. या शाळेतील बरीच मुले शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेली आहेत, तर आठ मुलांची नवोदय शाळेसाठी निवड झालेली आहे.
वानखेडे सरांनी गढाळा येथील शाळेत आणखी काय काय बदल घडविले ते जाणून घेण्यासाठी क्लीक करा: http://samata.shiksha/mr/new-change-new-beginning-gadhala/

- स्नेहल बनसोडे-शेलुडकर

No comments:

Post a Comment