Monday 21 January 2019

तीन हजार पिंपळांनी उजाड शिवाराचं पालटलं रूप

बीड तालुक्यातल्या लोणी घाट गावापासून तीन किलोमीटर अंतरावरचा उजाड परिसर. परिसरात झाडं नसल्यामुळे वाटसरू, पशुपक्ष्यांची दैना होत असे. पाच वर्षांपूर्वी हरिश्चन्द्र भागा ट्रस्टचा आश्रम इथं उभा राहिला आणि चित्र पालटू लागलं.
आज आश्रम परिसरात आणि लोणी पाचंग्री मार्गावर दुतर्फा १० फुटांहून अधिक उंचीचे थोडेथोडके नव्हेत तर तीन हजार घनगर्द पिंपळ वृक्ष आपल्या स्वागताला सज्ज आहेत. माऊली कदम महाराजांनी गेल्या साडेतीन वर्षांपासून अथक मेहनत घेत उजाड शिवाराचं नंदनवन केलं आहे. पिंपळासह लिंबोणी आणि आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड महाराजांनी केली आहे. दुष्काळात ठिबकद्वारे पाणी दिलं, झाडांची वेळोवेळी निगा राखली.

‘’पिंपळाचं झाड दीर्घकाळ टिकणारं आणि प्राणवायू देणारं. औषधी उपयोगही अनेक. पिंपळावरच्या पुष्पशयामुळे पाखरांचीही भूक भागते.’’माऊली कदम महाराज सांगतात.
हृषिकेश, काशी इथं धर्म अध्ययन आणि हिमालय परिसरात आयुर्वेदाचं अध्ययन महाराजांनी केलं. समाजाचं ऋण फेडता यावं यासाठी, आपल्या पालकांच्या स्मरणार्थ महाराजांनी आश्रम उभारला. ‘’वृक्ष असतील तरच जीवसृष्टी बहरेल. वृक्ष नाहीत तर पाऊस, प्राणवायू नाहीं, पशुपक्षी , माणूस जगणार नाहीत. इतकं साधं गणित आहे. ते आपण विसरता कामा नये,’’असं महाराज सांगतात.
- अनंत वैद्य, बीड

No comments:

Post a Comment