Monday 21 January 2019

जालन्याची घेवर

जालना शहर हे विविध परंपरांनी नटलेले शहर. गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून संक्रांतीच्या काळात घेवर या पदार्थांनी जालनेकरांच्या मेजवानीत आपले स्थान पक्के केले आहे.
सुरुवातीला फुलबाजार परिसरात घेवर बनविले जाई. परंतु या राजस्थानी पदार्थाची मागणी वाढू लागली. आणि आतातर संक्रांतीच्या साधारण महिनाभर आधी जालना शहरातील बडी सडक भागात घेवर बनवण्याची दुकानं थाटली जातात. मैदा, साखर आणि तुपापासून बनवल्या जाणाऱ्या मधमाशीच्या पोळ्याप्रमाणे दिसणाऱ्या कुरकुरीत केशरी गोड घेवर आता जालनेकरांच्या मेजवानीचा अविभाज्य घटक बनला आहे.

मैदा घोटून घोटून एका विशिष्ट सपाट कढई मध्ये उकळत्या तुपात साच्यामधे थोडा थोडा टाकला जातो. उकळत्या तुपात पडताच त्याचा थर बनत जातो, एकावर एक थर जमा होत मधमाशीच्या पोळ्यासारखे बनत जाते. त्यामुळे त्यात एक विशिष्ट कुरकुरीतपणा येत जातो.साधी घेवर आणि बदाम, पिस्ता, मावा असलेली घेवर पण विकली जाते. ती महाग असते. जास्त मागणी असते ती साध्या घेवरला. २०० ते ४०० रुपये प्रतिकिलो या भावाने घेवर विकली जाते.
गोड न खाणाऱ्यांसाठी साखर नसलेल्या घेवरही बनवल्या जातात. या सध्या घेवरवर पिस्ते, बदाम, मावा यांचे मिश्रण टाकून त्याचा स्वाद वाढवला जातो. तो मात्र महागड्या भावाने विकला जातो.
येणाऱ्या जाणाऱ्यांची लक्ष वेधून घेणाऱ्या या घेवरचा खप मोठ्या प्रमाणात होतोय. मराठवाड्यात प्रामुख्याने जालन्यातच मोठ्या प्रमाणात बनणाऱ्या केशरी रंगाच्या या घेवरची चव आजूबाजूच्या जिल्ह्यातही पोहचली आहे. आता इथं बनणारी घेवर बाहेर गावी देखील पाठवली जाते.  या घेवर सोबतच शेवयांसारख्या दिसणाऱ्या फेणीला सुद्धा मोठी मागणी असते. केशरफेणी, सांबारफेणी अशा प्रकारची साधी आणि गोड फेणी लोक मोठ्या आवडीने खातात. गरम दुधात फेणी टाकून खाण्याला खवय्ये पसंती देतात. त्यामुळे संक्रांत येऊ लागली की खवैय्यांचे पाय घेवर, फेणीच्या दुकानाकडे वळू लागतात.
- अनंत साळी, जालना



No comments:

Post a Comment