Thursday 3 January 2019

शस्त्र नाही,यंत्र

तुरुंगातून सुटका झाल्यावर समाज आपल्याला स्वीकारेल का? आपलं पुढलं भविष्य काय? असे अनेक प्रश्न कैद्यांच्या मनात असतात. सुटका झाल्यावर अनेकदा काही मार्ग सापडत नाही आणि मग व्यक्ती पुन्हा गुन्ह्यांच्या चक्रव्यूहात अडकते. बीड जिल्हा कारागृह प्रशासनाने कैद्यांना यावर मार्ग दाखवला. रागाच्या भरात कधी काळी शस्त्र हाती घेतलेले हात इथे आता कौशल्यविकासाचे धडे गिरवत आहेत. त्यासाठी पुढाकार घेतला जनशिक्षण संस्थानने. केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्रालयांतर्गत, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागांतर्गत ही संस्था येते. निरक्षर, नवसाक्षर, शालेय शिक्षण अर्धवट राहिलेल्या व्यक्ती यांच्यातील कौशल्य ओळखून त्याप्रमाणे व्यावसायिक शिक्षण त्यांना ही संस्था देते.
250 पेक्षा अधिक न्यायाधिन बंदी सध्या बीडच्या जिल्हा कारागृहात न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यापैकी सुमारे 40 पुरुष आणि 25 महिला कैद्यांचं ऑक्टोबर महिन्यापासून प्रशिक्षण सुरू करण्यात आलं. पुुरुष कैद्यांना इलेक्ट्रिक उपकरणांच्या दुरुस्तीचं तर महिला कैद्यांना शिवणकामाचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. दोन ते चार महिने कालावधीचे हे दोन्ही कोर्स आहेत.
संस्थेचे संचालक गंगाधर देशमुख सांगतात, " कौशल्यविकासातून कैद्यांना समाजात प्रतिष्ठेनं जगण्याचा मार्ग दाखवण्यात येत आहे. मिळालेल्या प्रशिक्षणातून कैद्यांनी आपले व्यवसाय सुरू करावेत आणि गुन्हेगारीचा मार्ग सोडावा हा यामागचा हेतू आहे." संस्थेचे दशरथ कांबळे आणि कीर्ती कुलकर्णी हे प्रशिक्षण देत आहेत. कारागृह अधीक्षक महादेव पवार, वरिष्ठ तुरुंग अधिकारी संजय कांबळे हे यासाठी मेहनत घेत आहेत.
वरिष्ठ तुरुंंग अधिकारी संजय कांबळे म्हणाले, "कारागृहातून सुटल्यानंतर कैद्यांनी गुन्हेगारी सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात यावं, कष्ट करून जीवन जगावं यासाठी कारागृह प्रशासन विविध उपक्रम राबवत आहे. जनशिक्षणसारख्या संस्थांची मदत यात मोलाची ठरते." 
-अमोल मुळे.

No comments:

Post a Comment