Monday 21 January 2019

पार्वती आजींची डोळस सेवा


 ''इथे एवढी चांगली सेवा मिळते, नर्स प्रत्येकाची काळजी घेतात. चहा, नाश्ता , जेवण सगळं काही वेळच्यावेळी. तरी लोकांमध्ये गैरसमज का?'' रत्नागिरी शासकीय रुग्णालयात मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यावर पार्वती आजींना प्रश्न पडला आणि त्यांनी यावर कामही सुरू केलं.
पार्वती हिराजी गिझम ६७ वर्षांच्या. मूळच्या लांजा बेनीच्या. १०-१२ वर्ष त्यांनी मुंबईत घरकाम केलं. नातीसाठी त्या पुन्हा रत्नागिरीत आल्या. गिझम कुटुंब मोलमजुरी करणारं. मोतीबिंदूचा त्रास जाणवू लागल्यावर त्यांनी जिल्हा रुग्णालयाच्या नेत्र विभागात उपचार घेतले. याच शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात हजारो रुपये खर्च होतात. इथं मात्र संपूर्ण सेवा मोफत आहे. याबाबतची माहिती पार्वती आजींनी गावातल्या लोकांना द्यायला सुरुवात केली. शस्त्रक्रिया झाल्यावर आवश्यकता भासल्यास रुग्णाला सोबत म्हणून राहण्याची तयारीही त्यांनी दर्शवली. रुग्णांची नातेवाईक असल्याचं त्या इथल्या परिचारिकांना सांगतात.
आजींची तळमळ, विश्वासाचे बोल यामुळे रुग्णालयात जाताना आजी सोबत असाव्यात असं रुग्णांनाही वाटतं. आपली कामं सोडून त्या रुग्णाच्या मदतीला धावून जातात. गेल्या दोन वर्षात लांज्यातल्या १९ रुग्णांच्या शस्त्रक्रियेसाठी पुढाकार घेतला आहे. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये आणणं, त्यांचा केसपेपर काढणं, तपासण्या करून घेणं, शस्त्रक्रियेसाठी तारीख घेणं, ही सर्व कामं आजी करतात. यासाठी एक पैसाही आपणहून त्या कोणाकडे मागत नाहीत. रुग्णांचे नातेवाईकच स्वतःहून त्यांना चहापाण्यासाठी शंभर-दोनशे रुपये देतात.
''पैशांपेक्षा माणुसकी महत्त्वाची. अडीअडचणीला धावून येणारी माणसं ही संपत्तीच.'' असं सांगणाऱ्या पार्वती आजींच्या मदतीला धावून येणारी अनेक माणसं गावात आहेत. 


-जान्हवी पाटील, रत्नागिरी

No comments:

Post a Comment